Thursday, 8 June 2017

दिनविशेष - ९ जून २०१७



तिथी
 जेष्ठ शुक्ल पौर्णिमा (१८:४०)   
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 जेष्ठा (२९:११)
योग
 साध्य (२५:४१)
करण
 बव (१८:४०), बालव (--:--)


वृषभ पूजन (कारहुणवी) / एरुवाक पौर्णिमा

आंध्रमधल्या शेतकर्‍यांचा एक विशेष सण. शेतात नांगर धरण्याचा हा दिवस असतो. या दिवशी शेतकरी आपले बैल व आउते यांना धुऊन काढतात. बैलांच्या अंगावर नवे कपडे व दागिने घालतात. त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. मग गावातले सर्व शेतकरी मिळून गावभर त्यांची मिरवणूक काढतात. मग बैलांसह आपल्या शेतात जाऊन नांगरणीचा मुहूर्त करतात आणि एवढे झाल्यावर घरी परततात.
महाराष्ट्रातील शेतकरी बैलपोळा म्हणून हा सण साजरा करतात. हा सण महाराष्ट्रात निरनिराळ्या भागात मासभेदाने असतो. त्या दिवशी बैलांना कामास जुंपत नाहीत. नदी, तळे, विहीर अगर घरात सोय असेल त्याप्रमाणे बैल धुऊन काढतात. अंगावर नवी वस्त्रे, दागिने घालतात. नैवेद्य दाखवून ज्वारी, बाजरी वगैरेंचा खिचडा खावयास घालतात. बैलांच्या मिरवणुकी गावातून वाजतगाजत काढतात.  गावातील पाटील, कुलकर्णी (तलाठी) यांच्यासमोर गावच्या वेशीत तोरण बांधून चांगले दोन बैल, त्यांपैकी एक तांबडा व एक पांढरा पळवत आणतात. त्यांपैकी ज्या रंगाचा बैल शिंगाने तोरण तोडील , त्या रंगाचे धान्य त्या वर्षी अधिक पिकेल, असा अंदाज बांधतात.
या दिवशी घराबाहेर मातीच्या बैलाची पुजा करतात.
हा सण कर्नाटकात या अगोदर एक महिना करतात.

मन्वादि

१४ मन्वंतराच्या आरंभ झाल्या अशा १४ तिथीना मन्वादि असे म्हणतात. या मन्वादि १४ तिथी पुढे दिल्या आहेत.
स्वायंभुव
 चैत्र शुक्ल तृतीया
स्वारोचीस
 चैत्र शुक्ल पौर्णिमा
उत्तम
 कार्तिक शुक्ल पौर्णिमा
तामस
 आषाढ शुक्ल पौर्णिमा
रैवत
 कार्तिक शुक्ल द्वादशी.
चाक्षुस
  आषाढ शुक्ल दशमी.
वैवस्वत
 ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
सावर्णी
 फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
दक्ष सावर्णी
 आश्विन शुक्ल नवमी.
१०
ब्रह्म सावर्णी
 माघ शुक्ल सप्तमी
११
धर्म सावर्णी
 पौष शुक्ल एकादशी.
१२
रुद्र सावर्णी
 भाद्रपद शुक्ल तृतीया.
१३
देव / रुची सावर्णी
 फाल्गुन शुक्ल अमावस्या.
१४
इंद्र/ भूती सावर्णी
 श्रावण कृष्ण अष्टमी.
मनुबाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत म्हटले आहे

महर्षय: सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा !                                             
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा: !!                        
(श्रीमद्भ्गव्दगीता  अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण म्हणतात हे अर्जुना  सात महर्षी जन आणि त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु  हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन  माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

पौर्णिमा श्राद्ध

अपराण्ह काळी पोर्णिमा तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ शुक्ल पोर्णिमा आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



जेष्ठ शुक्ल पौर्णिमेला असणारे नक्षत्र, वार आणि ग्रह स्थिती यांच्या संयोगानी इतरही काही योग होऊ शकता. यंदा असे योग होत नसले तरीही माहिती साठी ते पुढे देत आहे

बिल्वत्रिरात्रिव्रत

ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा ज्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र व मंगळ्वार असेल, त्या दिवशी तिलमिश्रित पाण्याने स्नान करुन बेलाच्या झाडाची गंधादी पदार्थांनी पूजा करावी व एकवेळ हविष्यान्नाचे भोजन करावे. जर त्या वेळी कुत्रा, डुक्कर अगर गाढव दृष्टीस पडले तर जेवणाचा त्याग करावा.याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला करुन वर्षअखेर समाप्तीच्या दिवशी बेलाच्या झाडाजवळ जाऊन एका भांड्यात १ शेर वाळू वा जव, गहू, तांदूळ व तेल भरावे, त्याचप्रमाणे आणखी एक भांडे वस्त्राने झाकून त्यावर उमा-महेश्‍वराची मूर्ती स्थापन करावी. त्यास दोन तांबडी वस्त्रे वाहावीत आणि नानापरिमल गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य वगैरेंने पूजा करावी व प्रार्थना करून बेलपानांच्या एक हजार आहुती द्याव्यात आणि यथाशक्ती सोळा अगर आठ दांपत्यांना वस्त्रालंकार देऊन जेवण घालावे. यायोगे सर्वप्रकारची अभिष्टसिद्धी प्राप्त होते.

महाज्येष्ठी

ज्येष्ठ पौर्णिमेला ज्येष्ठानक्षत्र असेल, चंद्र व गुरु यांची युती असेल आणि सूर्य रोहिणी नक्षत्रात असेल, तर तिला महाज्येष्ठी असे म्हणतात. या दिवशी जप, दान इ.केल्याने महाफळ प्राप्त होते.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment