Saturday, 2 March 2019

दिनविशेष - ४ मार्च २०१९




तिथी
माघ कृष्ण १३ (१६:२९)  
वार
सोमवार
नक्षत्र
श्रवण (१२:१०)
योग
परिघ (१३:३२)
करण
वणिज (१६:२९), विष्टि (२९:४९)


महाशिवरात्रि

शिवपूजन : मध्यरात्री २४:२६ ते २५:१५ (पुणे शहरासाठी)
हे व्रत माघ कृष्ण चतुर्दशीला करतात. हे व्रत प्रतिवार्षिक म्हणून केले जाते. त्या दृष्टीने हे 'नित्यव्रत' आहे. तसेच मनात काही हेतू बाळगून त्याच्या पूर्तीसाठीही केले जाते व त्या दृष्टीने हे 'काम्यव्रत' आहे. प्रतिपदादी तिथीचे अग्नीआदी स्वामी आहेत. ज्या तिथीचा जो स्वामी असेल त्या तिथीस त्याचे पूजन करणे अधिक चांगले. चतुर्दशीचा स्वामी शिव होय. या दिवशीच्या रात्री, निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) हे व्रत करतात म्हणून याला 'शिवरात्री व्रत' म्हणतात ते योग्यच होय. प्रत्येक महिन्याची वद्य चतुर्दशी ही शिवरात्रच असते आणि शिवभक्‍त प्रत्येक वद्य चतुर्दशीला हे व्रत करतात. परंतु ईशान संहितेमधील 'शिवलिंगतयोद्‌भूता: कोटिसूर्यसमप्रभ: ।' या वचननुसार माघ कृष्ण चतुर्दशीच्या मध्यरात्री ज्योतिर्लिंगाचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे त्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हटले जाते आणि
शिवरात्रिव्रतं नाम सर्वपापप्रणाशनम् ।
आचाण्डालामनुष्याणां भुक्तिमुक्तिप्रदायकम् ॥
या वचनाप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, अस्पृश्य, स्त्रीपुरुष आणि बाल, तरुण, वृद्ध हे सारेही हे व्रत करू शकतात आणि बहुधा ते करतातही. हे व्रत न केल्याने दोष लागतो. राम, कृष्ण, वामन व नृसिंह यांच जयंति -दिवस, तसेच एकदशी हे सर्व दिवस उपवासाचे होत. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा दिवस उपवासाचा असून त्याच्या व्रतकालादिकाचा निर्णयही इतर उपवासाच्या दिवसांसारखाच आहे. तशात प्रदोष कालास व मध्यरात्रिसमयास लिहिले आहे की; माघ कृष्ण चतुर्दशीला रात्रीच्या समयी भूत, प्रेत, पिशाच, शक्‍ती आणि स्वत: शिव भ्रमण करीत असतात. अतएव, अशा वेळी त्यांचे पूजन केल्याने मनुष्य पापमुक्‍त होतो. जर ही शिवरात्र त्रयोदशी, चतुर्दशी व अमावस्या या तिथींना स्पर्श करणारी असेल तर अधिक उत्तम, आणि आदित्य अथवा भौमवारचा योग (शिवयोग) तर त्याहून उत्तम. 'व्रतान्ते पारणम् ' 'तिथ्यन्ते पारणम्' आणि 'तिथिभान्ते च पारणम्' या वचनानुसार व्रताचे उद्यापन केले जाते. पण शिवरात्रीव्रताचे वैशिष्ट्य असे आहे की,
तिथीनामेवसर्वासामुपवास व्रतादिषु ।
तिथ्यन्ते पारणं कुर्यात्‌विना शिवचतुर्दशिम् ॥
या म्हणण्याप्रमाणे शिवरात्रिव्रताचे उद्यापन चतुर्दशीलाच केले पाहिजे आणि चतुर्दशी पूर्वविद्धा (प्रदोष निशीथोभयव्यापिनी ) असेल तरच हे शक्य होते. हे व्रत करणाराने माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी सकाळी संध्यादी विधी पार पाडून मस्तकी भस्माचा त्रिपुंड्र तिलक धारण करावा, गळ्यात रुद्राक्षाची माला धारण करावी. हातात उदक घेऊन
शिवरात्रिव्रतं ह्येतत्करिष्येऽहं महाफलम् ।
निर्विघ्नमस्तु मे चात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते ॥
हा मंत्र म्हणून अर्घ्य सोडावे आणि संपूर्ण दिवस मौन पाळून शिवचिंतनात घालवावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे, शिवालयात जाऊन सोयीप्रमाणे पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुख होऊन बसावे आणि तिलक व रुद्राक्ष धरण करून
ममाखिलपापक्षयपूर्वक सकलाभीष्टसिद्धये शिवपूजनं करिष्ये ।
असा संकल्प करावा. तदनंतर ऋतुकालोद्भव गंधपुष्प,बिल्वपत्र, धोतर्‍याची फूले, घृतमिश्रित गुग्गुळाचा धूपदीप, नैवेद्य आणि नीरांजनादी आवश्यक साहित्य घेऊन रात्रीच्या पहिल्या प्रहरी 'पहिली पूजा', दुसर्‍या प्रहरी 'दुसरी पूजा' याप्रमाणे चार पूजाविधी पंचोपचार, षोडशोपचार अथवा राजोपचार जसे शक्य होतील तसे परंतु सर्व एकाच पद्धतीने पार पाडावे आणि त्याचबरोबर रुद्राचा पाठ म्हणावा. असे केल्याने एकाच वेळी पाठ, पूजा, जागरण, आणि उपवास या चारही गोष्टी साधतात. पूजेनंतर नीरांजन, मंत्रपुष्पांजली, अर्घ्यप्रदान आणि प्रदक्षिणा करावी. प्रत्येक पूजेच्या वेळी
मयाकृतान्यनेकानि पापानि हर शंकर ।
शिवरात्रौ ददाम्यर्घ्यंमुमाकान्त गृहाण मे ॥
असे म्हणून अर्घ्य सोडावे आणि
संसारक्लेशदग्धस्य व्रतेमानेन शंकर ।
प्रसीद सुमुखो नाथ ज्ञानदृष्टिप्रदो भव ॥
अशी प्रार्थना करावी. स्कंद पुराणात सांगितले आहे की, माघ कृष्ण चतुर्दशीला शिवाचे पूजन, जागरण आणि उपवास केल्याने मनुष्य मातेचे दुग्ध कधीही प्राशन करू शकत नाही, म्हणजे त्याला पुनर्जन्मापासून मुक्‍ती मिळते.

रवि पूर्वाभाद्रपदा नक्षत्र प्रवेश

२९:३६ ला रवि पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करीत आहे.

अमृत योग

१२:१० पर्यंत सोमवारी श्रवण नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धि योग होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

भद्रा

१६:२९ नंतर २९:४९ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष माणू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि कारणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका

तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

त्रयोदशी श्राद्ध

अपराण्ह काळी त्रयोदशी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी माघ कृष्ण १३ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.

No comments:

Post a Comment