Monday, 10 April 2017

दिनविशेष - ११ एप्रिल २०१७



तिथी
 चैत्र शुक्ल पोर्णिमा (११:३८)   
वार
 मंगळवार
नक्षत्र
 चित्रा (२९:४२)
योग
 व्याघात (८:४८)
करण
 बव (११:३८)


वैशाख स्नानारंभ

चैत्र शुक्ल पौर्णिमेपासून वैशाख शुक्ल पौर्णिमेपर्यंत प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी कोठेही तीर्थक्षेत्री, अथवा नदी, विहीर, आड, तुळे किंवा सरोवर किंवा स्वतःच्या घरीदेखील शुद्ध थंड पाण्याने स्नान करावे आणि नित्य आन्हिक झाल्यावर
'ॐ नमो भगवते वासुदेवाय'
किंवा
'हरे राम हरे राम'
 या मंत्राचा यथाशक्ती जप करुन एकच वेळ भोजन करावे. एकतीस दिवसापर्यंत असा क्रम ठेवल्यास अनेक प्रकारचे रोग व दोष दुर होतात व त्याचा प्रभाव आणि पुण्य वाढतात.

हनुमान जयंती

हनुमानजयंती हे व्रत आहे. ज्या पंचांगाच्या आधाराने या व्रताचा निर्णय घेतला जातो, त्यापैंकी काहींच्या मते हनुमानजन्मतिथी अश्‍विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते ती चैत्र शुक्ल पौर्णिमा आहे. कोणत्याही देवतेची जन्मतिथी ही एकच असते; फक्त हनुमानाच्याच बाबतीत असे दुमत आहे. हे याचे एक वैशिष्ट्य होय. याविषयीच्या ग्रंथात दोन्ही तिथींचे उल्लेख आहेत, परंतु त्यांमधील आशयात फरक आहे. पहिला दिवस 'जन्मदिवस' म्हणून व दुसरा 'विजयाभिनंदनाचा महोत्सव-दिवस' सांगितला आहे.
या व्रतासाठी तात्कालीक किंवा रात्रिव्यापिनी तिथी ग्राह्य समजतात. ही तिथी दुपक असेल तर, व्रत दुसर्‍या दिवशी करावे. व्रत करणाराने हनुमानजयंतीच्या व्रतानिमित्त धनत्रयोदशीच्या रात्री रामसीता आणि हनुमंताचे स्मरण करीत भूमिशयन करावे व रूपचतुर्दशीला अरुणोदयापूर्वी उठून रामसीता आणि हनुमान यांचे पुन्हा स्मरण करून प्रातःस्नानादी नित्यकर्मे लवकर उरकावी. नंतर हातामध्ये उदक घेऊन
ममाखिलानिष्टनिरसनपूर्वकसकलाभीष्टसिद्धये
तेजोबलबुद्धिविद्याधनधान्यसमृद्धयायुरारोग्यादिवृद्धये
च हनुमद्व्रतं तदङ्‌गीभूतपूजनं च करिष्ये ॥
असा संकल्प करावा. हनुमानाच्या पूर्वीच प्रतिष्ठापित प्रतिमेसमीप पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे आणि अत्यंत विनीत भावाने
अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम् ।
सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिवरदूतं वातजातं नमामि ॥
अशी प्रार्थना करावी आणि यथाविधी षोडशोपचार पूजा करावी. स्नानासाठी जवळ उपलब्ध असेल तर नदीचे पाणी घ्यावे, नाहीतर श्रीजलमिश्रित विहिरीचे पाणी घ्यावे. वस्त्र म्हणून लाल कौपीन किंवा पीतांबर, गंध म्हणून केशरमिश्रित चंदन घ्यावे. मूंज गवताचे यज्ञोपवीत अर्पण करावे. फुले म्हणून शतपत्रे (हजार), केवड्याची पाने, कण्हेरी किंवा अन्य पिवळी फुले घ्यावी. धूप म्हणून अगरु, तगरादि घ्यावा. तुपाची वात दीप म्हणून लावावी. तुपात तळलेले अनरसे किंवा तुपात तळलेले गुळमिश्रित उकडीचे मोदक किंवा केळी वगैरे फळे नैवेद्यास घ्यावी. आरती, नमस्कार, पुष्पांजली आणि प्रदक्षिणा झाल्यावर
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि ॥
अशी प्रार्थना करुन प्रसाद वाटावा आणि शक्य असेल तर ब्राह्मणभोजन घालून स्वतः जेवावे. दिपोत्सव, स्तोत्रपाठ, गायन, वादन, कीर्तन वगैरे गोष्टी यथासंभव करुन रात्र जागवावी.
एखाद्या कार्यसिद्धिच्या उद्देशाने व्रत करावयाचे असेल तर मार्गशीष शु. त्रयोदशीला प्रातःस्नान वगैरे उरकून एका वेदीवर अक्षतांच्या पुंजीची तेरा कमळे काढावी. त्यावर यथाविधी पूजा केलेला जलपूर्ण कलश स्थापन करावा. त्यावर पिवळे वस्त्र घालावे. त्यावर १३ कमळांच्या १३ गाठी घातलेला नऊ पदरी पिवळा दोरा ठेवावा. नंतर वेदीची पुजा करावी. उपरोक्त विधीनुसार हनुमंताची पूजा, जप, ध्यान, उपासना आदी गोष्टी कराव्यात. ब्राह्मणभोजन घालून स्वतः भोजन केले असता व्रताची पूर्तता व इष्ट मनोरथ पूर्ण होतात.

चित्रा पौर्णिमा

दक्षिण भारतात चैत्र पौर्णिमेस म्हणजेच चित्रानक्षत्रावर जो उत्सव केला जातो, त्याला चित्रा पौर्णमी म्हणतात. या उत्सवात शिव व चित्रगुप्त यांची पूजा करतात.

चैत्री पौर्णिमा

प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला पूर्णचंद्राचे, तत्प्रकाशक सूर्याचे आणि विष्णुरूपी सत्यनारायणाचे व्रत केले जाते. त्यासाठी चंद्रोदयव्यापिनी पौर्णिमा ग्राह्य मानतात. या व्रतात देवपूजन , दानपुण्य, तीर्थस्नान आणि पुराणश्रवणादी विधी केल्याने पूर्ण फळ मिळते. त्या दिवशी चित्रानक्षत्र असेल तर चित्रमय वस्त्राचे दान करावे म्हणजे सौभाग्यवृद्धी होते.

चंद्रनक्षत्र

चैत्र पौर्णिमेस सोमवार आला असता हे व्रत करतात. यात चंद्राची पूजा, चंद्राच्या रौप्यमूर्तीचे दान, तूप आणि तीळ यांचे हवन करावयाचे असते.
फल- चंद्रलोकाची प्राप्ती.

महाचैत्री

चैत्र पौर्णिमेला गुरु व चंद्र यांची युती चित्रानक्षत्रात झाली तर तिला महाचैत्री असे म्हणतात. ही दानादी कृत्यांना विशेष पुण्यप्रद असते.

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी

चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी असते.

यवाग्रयण

आग्रयणाचे प्रकार तीन आहेत . व्रीह्याग्रयण , यवाग्रयण , आणि श्यामाकाग्रयण.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

सर्व देवांना दवणा वाहणे

या दिवशी सर्व देवांना दवणा वाहाव्यात.

प्रतिपदा श्राद्ध

अपराण्ह काळी प्रतिपदा तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र कृष्ण १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment