Monday, 3 April 2017

दिनविशेष - ४ एप्रिल २०१७



तिथी
 चैत्र शुक्ल ८ (११:२१)   
वार
 मंगळवार
नक्षत्र
 पुनर्वसु (२३:१२)
योग
 अतिगंड (१६:०२)
करण
 बव (११:२१)


दुर्गाष्टमी

प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

अशोक कलिका प्राशन

११:२१ पर्यंत हे व्रत करावे. या व्रताचा विधी असा -
हे व्रत चैत्र शुक्ल  अष्टमीला करतात. त्या दिवशी प्रातःस्नानादी नित्यकर्मे उरकून अशोकवृक्षाची पूजा करावी. त्याची फुले किंवा कोमलपर्णयुक्त आठ कळ्या घेऊन त्यांनी शिवाची पूजा करावी.
'त्वामशोक नमाम्येनं मधुमाससमुद्‌भवम् ।
शोकार्तः कलिकां प्राश्‍य मामशोकं सदा कुरु ॥'
असे म्हणून आठ कळ्या भक्षण करुन व्रत केले असता व्रती शोकरहित होतो. त्या दिवशी बुधवार किंवा पुनर्वसु नक्षत्र असेल किंवा दोन्ही असतील तर व्रती मनुष्याला कोणतेही दुःख राहात नाही,

भवानीदेवी उत्पत्ति

भवानीचा अवतार चैत्र शुक्ल  अष्टमीला झाला म्हणून त्या दिवशी देवीचे पूजन करुन 'अनरसे' आदीचा नैवद्य दाखवावा. या दिवशी अष्टमी नवमीयुक्‍त घ्यावी. जो मनुष्य अष्टमीस भवानीचे दर्शन घेईल, तो कदापी शोक पावणार नाही. सर्वकाल आनंदी राहील. या दिवशी पुनर्वसुनक्षत्र बुधवारयुक्‍त ही तिथी असता प्रातःकाळी यथाविधी स्नान केले असता, वाजपेय यज्ञाचे फल प्राप्त होते. या दिवशी ब्रह्मपुत्रतीर्थात स्नान केले असता ब्रह्मपद प्राप्त होते. त्याचप्रमाणे शुद्ध व नियतमन होऊन सर्व चैत्र महिना ब्रह्मपुत्रतीर्थात स्नान करील त्यास मोक्षप्राप्ती होईल.

श्रीराम नवमी

या व्रताची चार जयंत्यांमध्ये गणना होते. हे व्रत चैत्र शुक्ल  नवमीला करतात. व्रतासाठी  मध्याह् नव्यापिनी शुक्ल  नवमी घेतात. जर मध्यान्ह व्यापिनी नवमी दोन दिवस असेल तर किंवा दोन्ही दिवस असलेली नवमी मध्याह् नव्यापिनी नसेल तर हे व्रत पहिल्या नवमीस करावे. नवमीला अष्टमीचा वेध निषिद्ध नाही. दशमीचा वेध वर्ज्य समजावा.
या व्रताचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन प्रकार आहेत. नित्य व्रत करावयाचे असेल तेव्हा ते निष्काम भावनेने करावे म्हणजे अनंत अमिट फलाची प्राप्ती होते. काम्य व्रत केले असता कामनापूर्ती होते. भगवान श्रीरामचंद्राचा जन्म झाला त्या दिवशी त्या समयी चैत्र शुक्ल  नवमी, गुरुवार , पुष्यनक्षत्र (काहींच्या मते पुनर्वसू) मध्याह्‌न आणि कर्क लग्न असा योग होता. व्रतोत्सव दिनी नेहमीच हे सर्व जमून येतात, असे नाही. परंतु जन्माक्षं (जन्मनक्षत्र) अनेकदा येऊ शकते. ते असेल अशा वेळी हे व्रत अवश्य करावे.
जो कोणी श्रीरामनवमीचे व्रत शक्त्यनुसार विश्‍वासपूर्वक (श्रद्धायुक्त मनाने) करतो त्याला महाफल लाभते. व्रत करणाराने पूर्वदिवशी (चैत्र शुक्ल  अष्टमीला) प्रातःस्नानादी आन्हिक उरकून भगवान रामचंद्रांचे स्मरण करावे. दुसर्‍या दिवशी (नवमीला) शक्य तितक्या लवकर नित्यकर्मे उरकून
उपोष्य नवमीं त्वद्य यामेष्वष्टसु राघव ।
तेन प्रीतो भव त्वं भोसंसारात् त्राहि मां हरे ॥
असा मंत्र म्हणून आपली व्रताचरण करण्याची भावना श्रीरामचंद्रापाशी प्रकट करावी आणि
'मम भगवत्प्रीतिकामनया (वा अमुक फलप्राप्तिकामनया) रामजयन्तीव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प करुन काम-क्रोध-लोभ-मोहादीपांसून मुक्त राहून व्रत करावे.
तदनंतर श्रीराममंदिर अथवा आपले घर ध्वज-पताका, तोरणे आदींनी सुशोभित करावे. मंदिराच्या किंवा घराच्या उत्तरभागी रंगीत कपड्यांचा मंडप उभारावा. मंडपात अत्यंत स्वच्छ व शुद्ध भागी मंडल करुन त्यावर मध्यभागी कलशाची यथाविधी स्थापना करावी. कलशावर सुवर्णाचे श्रीरामपंचायतन (राम, सीता, भरत शत्रुघ्न-मागे दोन बाजूंस -पाठीमागे लक्ष्मण आणि चरणापाशी हनुमान) स्थापून त्याची षोडशोपचारे पूजा करावी. व्रतराज, व्रतार्क, जयसिंहकल्पद्रुम आणि विष्णूपूजन यांत वैदिक आणि पौराणिक असे दोन प्रकारचे पूजाविधी सांगितलेले आहेत. त्यांस अनुसरुन पूजन करावे. तो सर्व दिवस भगवान श्रीरामचंद्राचे भजन-स्मरण, स्तोत्रपठन, दान-पुण्य, हवन , पितृश्राद्ध आणि उत्सव यात घालवावा. रात्री गायन-वादन-नर्तन (रामलीला), तसेच चरित्रश्रवण करुन काल व्यतीत करावा. दुसर्‍या दिवशी दशमीला पारणे करुन व्रतोद्यापन करावे. शक्य असेल तर सुवर्ण प्रतिमा दान द्यावी. ब्राह्मंणभोजन घालावे. याप्रमाणे प्रतिवर्षी करावे.

रामनाम लेखव्रत

चैत्र शुक्ल  नवमीस हे व्रत सुरु करतात. स्नानादी कर्मे आटोपून शुद्ध झाल्यावर ' या रामनवमीच्या शुभ तिथीला या महिन्याच्या या पक्षात या संवत्सरात सर्व पापांचा नाश करुन मला विष्णुलोक मिळावा यासाठी श्रीरामाला प्रसन्न करण्यासाठी श्रीरामनामलेखन करीन', असा संकल्प करावा. लिखित रामनामाची नाममंत्राने षोडशोपचारे पूजा करावी. यायोगाने जो रामनाम लिहितो, त्याची सर्व पातके नष्ट होतात. सर्वप्रकारे सुख लाभते. या व्रताचे उद्यापन करावयाचे असते. घर गुढ्यातोरणांनी शृंगारावे. रामलक्ष्मणांची सुवर्ण प्रतिमा करावी. एकचतुर्थांश हिस्सा हनुमानाची प्रतिमा करावी. चांदीचे आसनावर पीत वस्त्र अंथरून त्यावर तांदूळ पसरून तांब्याचा कुंभ पंचपल्लव घालून स्थापन करावा. त्यावर तांब्याचे ताम्हन ठेवून त्यावर प्रतिमा ठेवावी. गणपति-पूजन, पुण्य़ाहवाचन करून श्रीरामाची पूजा करावी. अग्नीची प्रतिष्ठापना करुन विष्णुसूक्ताने हवन करावे. १०८ वेळा राममंत्राने हवन करावे. ब्राह्मणास भोजन घालून यथाशक्ती दक्षिणा द्यावी व नंतर आपण भोजन करावे.

नवमी श्राद्ध

अपराण्ह काळी नवमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र शुक्ल ९ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment