Monday, 8 May 2017

दिनविशेष - ९ मे २०१७



तिथी
 वैशाख शुक्ल १४ (२५:०७)   
वार
 मंगळवार
नक्षत्र
 चित्रा (१२:०१)
योग
 सिद्धि (१५:३४)
करण
 गरज (१२:१०), वणिज (२५:०७)

श्रीनृसिंह जयंती

वैशाख शुक्ल चतुर्दशीला श्रीनृसिंह जयंती असते. ज्या दिवशी सूर्यास्त काळी चतुर्दशी असेल तो दिवस घ्यावा. या चतुर्दशीस (पूर्वविद्धा म्हणजे त्रयोदशीयुक्त असेल तर अजून उत्तम) स्वाती नक्षत्र आणि शनिवार आणि वणिज करण असा योग आल्यास तो अतिशय उत्तम मनाला जातो. व नृसिंहजयंती व्रत करणार्‍यास सौभाग्य प्राप्त होते. जरी यातील एखादाही योग असेल तर तो दिवस पापनाशक आहे. यंदा १२:०१ नंतर स्वाती नक्षत्र आणि १२:१० नंतर वणिज करण आहे.

नृसिंहजयंती व्रत:
हे व्रत वैशाख शुक्ल चतुर्दशीला करतात. ही चतुर्दशी प्रदोषव्यापिनी पाहिजे. जर दोन दिवशी अशी चतुर्दशी असेल अगर दोन्ही दिवशी नसेल तर ( मदनतिथी ) त्रयोदशीचा संसर्ग टाळण्यासाठी दुसर्‍या दिवशीचीच तिथी घ्यावी. उपवास करावा. व्रताच्या दिवशी पहाटे सूर्याला व्रत करणार असल्याचे सांगुन तांब्याच्या कलशात पाणी भरावे व पुढील मंत्राने संकल्प सोडवा.
नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे ।
उपवासं करिष्यामि सर्वभोगविवर्जित: ॥
मध्यान्ही नदीवर जाऊन तीळ, गाईचे शेण, माती आणि आवळे यांनी मर्दन करुन वेगवेगळे चार वेळा स्नान करावे. नंतर पुन्हा शुद्ध स्नान करुन तेथे नित्य आन्हिक करावे. नंतर घरी यावे व क्रोध, लोभ, मोह, असत्य भाषण , कुसंग व पापाचरण यांचा त्याग करावा. ब्रह्मचर्य पाळावे आणि उपवास करावा. संध्याकाळी चौरंगावर अष्टदल काढून त्यावर सिंह, नृसिंह आणि लक्ष्मी यांच्या सुवर्णप्रतिमा प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापन करून त्यांची षोडशोपचारपूर्वक पूजा करावी. ( किंवा पौराणिक मंत्रांनी पंचोपचारांनी पूजा करावी) . रात्री गायनवादन, पुराणश्रवण, हरिकीर्तन, जागरण करावे. दुसरे दिवशी ब्राह्मणभोजन घालून परिवारासह स्वत: भोजन करावे. या प्रमाणे प्रतिवर्षी करण्याने नृसिंह-भगवान त्याचे सर्व ठिकाणी रक्षण करतात व यथेच्छ धनधान्य देतात .

भय मुक्त होण्यासाठी हे व्रत करतात. श्रीनृसिंहजयंती दिवशीच हे व्रत करतात. गव्हाच्या पिठाचे शिवलिंग करून त्याची स्थापना करतात व त्याची यथासांग पूजा करतात. काही ठिकाणी हे नृसिंहजयंतीच्या बरोबरच करतात. दोन्ही देवांची पूजा एकत्र करतात.

भद्रा

२५:०७ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

चतुर्दशी श्राद्ध

अपराण्ह काळी चतुर्दशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख शुक्ल १४ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment