Tuesday, 5 April 2016

दिनविशेष - ९ एप्रिल २०१६


तिथी
 चैत्र शुक्ल २ (९:२३), चैत्र शुक्ल ३ (२९:५६)  
वार
 शनिवार     
नक्षत्र
 भरणी (२०:३४)
योग
 प्रीति (२६:२६)
करण
 तैतिल (१९:३७)

उमादी पूजा

हे एक तिथिव्रतआहे.  चैत्र शुक्ल द्वितीयेस हे व्रत करतात. या व्रतास उमा, शिव व अग्नी यांची पूजा करावयाची असते.

नेत्रव्रत

हे व्रतसुद्धा चैत्र शुक्ल द्वितीयेला करतात. ह्यासाठी सूर्यचंद्रस्वरूपी आश्‍विनकुमाराची मूर्ती बनवून तिचे गंधपुष्पादी साहित्याने पूजन करतात. या व्रतात ब्रह्मचर्याचे पालन करावे. ब्राह्मणांना सुवर्ण-रजताची दक्षिणा द्यावी आणि गाईच्या दह्यात गाईचे तूप मिसळून भोजन करावे. हे व्रत १२ वर्षापर्यंत करतात. हे व्रत केल्याने दृष्टी सुधारते आणि चेहरा अधिक कांतिमान होतो.

सौभाग्य शयनव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल तृतीयेला करतात. या व्रताचा विधी असा – तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून गौरी आणि शंकराची सोन्याची मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर चंदन मिश्रित पाणी, अक्षता, गंध, फुल इ. नी त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. वंशपात्रात सौभाग्यवायन (सौभाग्याष्टक) ठेवून पुधीम मंत्र म्हणावा.
उमामहेश्वरौ प्रीयेताम् |
त्यानंतर गोश्रृंगोदक प्रश्न करून भूशयन करावे. दुसऱ्या दिवशी सवाष्ण-ब्राह्मणाला भोजन देवून त्यांना सुवर्ण प्रतिमा आणि सौभाग्यवायन दान करावे. त्यावेळी पुढील मंत्र म्हणावा
ललिता प्रीयताम् |
अशाप्रकारे एक वर्षभर प्रत्येक महिन्यातील तृतीयेला व्रत करावे. एका वर्षानंतर उद्यापनाच्या वेळी उमा-महेश्वराची सोन्याची मूर्ती, गाय आणि बैल यांचे पूजन करून दान करावी.
फळ: सर्व इच्छापुरती होते. सती प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना सर्व भोग देते. मोक्षप्राप्ती होते.

कथा

प्राचीन काळी जेव्हा सर्व लोक दग्ध झाले होते त्यावेळी सर्व प्राणीमात्रांचे सौभाग्य एकत्र येऊन श्रीविष्णूंच्या वक्षस्थळी स्थित झाले. नंतर सृष्टी रचनेच्या वेळी शिव-लिंगाकार एक मोठी भयानक अग्निज्वाळा उत्पन्न झाली. त्याच्या दाहामुळे हे सौभाग्य गळून पडले. त्यावेळी त्याचा अर्धा भाग दक्ष प्रजापतीने पिऊन टाकला. त्यातूनच सती नावाच्या कन्येचा जन्म झाला. कालांतराने सतीचा विवाह शंकराशी झाला.   
सौभाग्य पुंञाचा राहिलेला अर्धा भाग पृथ्वीवर पडला. त्यापासून आठ पदार्थांची उत्पत्ति झाली. पारा, सेम, राजि, धान, गोक्षीरकुसुम्भ-पुष्प, कुंकू आणि मीठ. यांनाच सौभाग्याष्टक असे म्हणतात.
दक्षकन्या सतीने आपल्या सौंदर्याच्या बळावर तिन्ही लोकांना पराजित केले.  मम्हणूनच ललिता म्हटले जाते. सतीचा विवाह चैत्र शुक्ल तृतीयेला भगवान शंकराबरोबर झाला म्हणून या दिवशी सती सहित शंकराची पूजा केली जाते. 

अरुंधती व्रत

हे स्त्री व्रत आहे. या व्रतास चैत्र शुक्लतृतीयेस प्रारंभ होतो. याचा विधी असा-  त्रिरात्र उपास करतात. कलशावर पुर्णपात्रात अरुंधतीची मूर्ती मध्यभागी बसवून तिच्या दोन्ही अंगी वसिष्ठ व रुद्र यांच्या मूर्ती बसवतात. हिच्या ध्यानाचा श्‍लोक पुढीलप्रमाणे-
ध्यायामि दिव्यरूपां तां वसिष्ठस्य प्रियां शुभाम् ।
पतिव्रतां पुण्यशीलां सौभाग्यैकनिकेतनम्‌ ॥ 
अर्थ- वसिष्ठपत्‍नी दिव्यरूपा, पुण्यशील पतिव्रता, सौभाग्याचे एकमेव स्थान अशा अरुंधतीचे मी ध्यान करिते. 
नंतर शोडशोपचारे पूजा अर्घ्यदान व प्रार्थना करतात. वंशपात्रात सौभाग्यवायन ठेवून त्याचे व सुवर्णमूर्तीचे ब्राह्मणास दान, चार दंपतींची पुजा व भोजन करतात. उद्यापनाच्या वेळी तिल व समिधा यांचे १०८ हवन, सुवासिनीपूजा, दंपतीभोजन व  शक्तीप्रमाणे कास्य पात्रदीप, आरसा, चामर, घोडा व शय्या यांचे दान करावे.
फळ-सौभाग्यप्राप्ती.
  
कथा   
एक विद्वान ब्राह्मण होता, त्याला एक रुपवती कन्या होती. बालवयातच तिला वैधव्य प्राप्त झाले. त्या दुःखाने घराबाहेर पडून यमुनेच्या तीरावर ती तप करु लागली. एके दिवशी शिव-पार्वती फिरतफिरत त्या ठिकाणी आले. त्या मुलीची ती अवस्था पाहून पार्वतीला फार दुःख झाले. तिने तिच्या वैधव्याचे कारण शिवास विचारले. तेव्हा शिव पार्वतीस म्हणाले,
ही बालिका पूर्वजन्मी ब्राह्मण पुरुष होती. त्या ब्राह्मणाने एका सुंदर स्त्रीशी विवाह केला व काही दिवसांनी तो प्रवासाला गेला. तो परत आलाच नाही. त्या स्त्रीला सर्व आयुष्य पतीवाचूनच कंठावे लागले. अशा रितीने पत्नीचा त्याग केल्याचे प्रायश्‍चित्त त्या ब्राह्मणाला भोगावे लागले. तोच आता मुलीच्या रुपाने जन्माला आला असून आज मितिस वैधव्यदुःख भोगीत आहे.
शिवाने सांगितलेला हा वृत्तान्त ऐकुन पार्वतीला करुणा आली. तिच्या पापाच्या निष्कृतीचा उपाय शिवाला विचारला. त्याने त्या स्त्रीला अरुंधतीव्रत सांगितले. त्या विधवा मुलीने ते व्रत केले व त्याच्या पुंण्याने ती पापमुक्त होऊन स्वर्गाला गेली.
या व्रतात वसिष्ठाची मूर्ती करायला सांगितली आहे. ती तो अरुंधतीचा पती म्हणून व ध्रुवाची मूर्ती करावया़ची ती अक्षय्यतेची प्रतीक म्हणून. विवाहाच्या वेळी वधूला ध्रुवदर्शन करावयाला लावतात, त्यातही अक्षय्य सौभाग्य लाभावे हाच हेतू असतो.

गौरी तृतीया (तीज)

हे व्रत चैत्र शुक्लतृतियेला करतात. विवाहित स्त्रीया या दिवशी प्रातःस्नान करुन उत्तम रंगीत वस्त्र (लाल साडी) परिधान करतात. नंतर शुद्ध व पवित्र अशा जागी २४ अगूंळे लांबीरुंदीची चौरस वेदी अगर पेढी बनवतात. त्यावर केशर, चंदन, आणि कापूर यांचे मंडळ काढून त्यावर सुवर्णाची अगर चांदीची मूर्ती स्थापन करतात. अनेक प्रकारच्या फलपुष्पदूर्वागंधादी साहित्याने तिचे पूजन करतात. त्याच ठिकाणी गौरी, उमा, लतिका, सुभगा, भगमालिनी, मनोन्मना, भवानी, कामदा, भोगवर्घिनी आणि अंबिका यांचे गंधपुष्पादींनी पुजन करतात. त्यांना शृंगारतात. भोजन म्हणून फक्त एकदा दुग्धपान करतात. असे केल्याने पतिपुत्रादि सौख्याची अखंड प्राप्ती होते.
हे व्रत चैत्र शुक्लभाद्रपद शुक्लकिंवा माघ शुक्लतृतीयेस करतात.

चैत्रगौर व हळदीकुंकू

चैत्र शुक्ल तृतीयेच्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया गौरीला देव्हार्‍यात बसवितात आणि पुढे महिनाभर तिची पूजा करतात. या महिन्यात कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदीकुंकवाचा समारंभ करतात. त्यासाठी गौरीपुढे रांगोळ्या काढतात. गौरीला वस्त्रालंकारांनी नटवतात. तिच्यापुढे रंगीबेरंगी चित्रे, नानाप्रकारची फळे व खाद्यपदार्थ मांडून आरास करतात. असोल्या नारळांना कुंच्या घालून ती बाळे म्हणून गौरीपुढे ठेवतात. कोकणात हळदी-कुंकवाला आलेल्या सुवासिनींचे व कुमारिकांचे पाय धुऊन त्यांच्या हातांवर चंदनाचे लेप करतात आणि त्यावरुन शिरा असलेली शिंप फिरवितात. भिजवलेल्या हरबर्‍यांनी आणि फळांनी त्यांची ओटी भरतात. त्यांना आंब्याची डाळ व पन्हे देतात. गौरीची आरती करताना  'गौरीचे माहेरनावाचे गाणे म्हणण्याची कोकणात चाल आहे. या महिन्यांत गौरी आपल्या माहेरी येते,आपल्या आईकडून सर्वप्रकारची कौतुके करुन घेते, मैत्रिणींबरोबर खेळते, झोपाळ्यावर बसून झोके घेते आणि अक्षय तृतीयेला परत सासरी जाते, अशी समजूत आहे.
                       
या उत्सवाचा प्रचार विशेषकरुन ब्राह्मणांत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महिनाभरातील या उत्सवात सवडीप्रमाणे शुक्रवार, मंगळवार अगर दुसर्‍या एखाद्या शुभदिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया सुवासिनींना हळदीकुंकवास बोलावतात, तसेच घरोघर जातात, पुरुष आपल्या मित्रमंडळीस त्या निमित्ताने फराळास बोलावतात व परिचय वाढवितात. आणि, अशाप्रकारे हा महिना आमोदप्रमोदात जातो.

ईश्‍वर-गौरी

चैत्र शुक्ल तृतीयेला लाकडाच्या शिव आणि गौरी यांच्या मूर्तींना स्नान घालावे. त्यांना उत्तम वस्त्रे नेसवावी. अलंकार घालावे आणि त्यांची पूजा करावी. त्यांना पाळण्यात, डोलार्‍यात अगर सिंहासनावर व्यवस्थित बसवावे. संध्याकाळी वाद्ये-वाजंत्री, लवाजमा, सवाष्ण स्त्रिया, सत्पुरुष यांच्यासमवेत थाटामाटाने नगराबाहेर एखाद्या फुलबागेत अगर तळ्याकाठी जाऊन तेथे त्या मूर्ती स्थापित कराव्या आणि काही काल तेथे कलाक्रीडामनोरंजनात घालवावा. नंतर त्या मूर्ती घरी परत आणून योग्य ठिकाणी ठेवाव्या. अशातर्‍हेने हे व्रत दर वर्षी केले असता नगरामध्ये सर्वत्रच उद्योगउत्साहआरोग्य आणि सर्वसौख्य ही नांदतात.

गौरीविवाह

हे एक व्रत आहे. चैत्र शुक्लतृतीया, चतुर्थी किंवा पंचमी या तिथीस गौरी व शिव यांच्या मूर्ती करुन त्यांचा विवाहसमारंभ करणे, असा याचा विधी आहे. मूर्ती करण्यासाठी सोने, चांदी, रत्‍ने, चंदन इ. पदार्थ वापरतात. फल-उत्तम पतीची प्राप्ती.

गुडधेनुदान

हे एक दान आहे. हे चैत्र महिन्याच्या किंवा माघ महिन्याच्या शुक्लतृतीयेस करतात. याचा विधी असा-
शेणाने सारवलेल्या भूमीवर दर्भ अंथरुन त्यावर कृष्णाजिन पसरतात. चार भार गूळ घेऊन त्याची सवत्स धेनू बनवितात. त्यांच्या कानाच्या जागी शिंपा, पायाच्या जागी उसाची कांडी, डोळ्याच्या जागी मुक्‍ताफळे, शेपटीच्या जागी रेशमी वस्त्र इ. बसवितात व तिची पूजा करुन तिचे दान देतात.
फल-सर्व पापांचा नाश.

गौरीविसर्जन

हे व्रत चैत्र शुक्लतृतीयेला करतात. होळीच्या दुसर्‍या दिवशी (फाल्गुन व. प्रतिपदा) ज्या कुमारिका आणि विवाहित बालिका दररोज गणगौरीचे पूजन करतात, त्या चैत्र शुक्लद्वितीयेला आपल्या पुजा केलेल्या गणगौरी एखाद्या नदी, तलाव अगर सरोवराकाठी नेऊन त्यांना उदक प्राशन करण्यास देतात आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी त्यांचे विसर्जन करतात. या व्रतापासून विवाहित मुलींना पतिप्रेमाची प्राप्ती होते आणि अविवाहित कन्यकांना उत्तम वराची प्राप्ती होते.

मत्स्यजयंती

चैत्र शुक्लतृतीया हीच मत्स्यजयंती होय.
दशावतारांच्या जयंत्या पुढीलप्रमाणे आहेत
चैत्रशुद्ध तृतीया
मत्स्यावतार
वैशाखशुद्ध पौर्णिमा
कूर्मावतार
भाद्रपदशुक्ल तृतीया
वराहावतार
वैशाखशुद्ध चतुर्दशी
नारसिंहावतार
भाद्रपदशुक्ल द्वादशी
वामनावतार
वैशाखशुद्ध तृतीया
परशुरामावतार
चैत्रशुद्ध नवमी
रामावतार
श्रावणकृष्ण अष्टमी
कृष्णावतार
आश्विनशुक्ल दशमी
बौद्धावतार
श्रावणशुद्ध षष्ठी
कल्क्यवतार
     
असे हे दहा अवतार आहेत.
दिवसाच्या मध्यभागीं ( मध्याह्नीं ) वामन, परशुराम, आणि राम हे झाले. अपराह्णीं मत्स्य व वराह हे झाले. सायंकाळीं कूर्म, नारसिंह, बौद्ध व कल्की हे झाले. मध्यरात्रीस कृष्ण झाला. याप्रमाणें हे अवतारकाल होत.

मन्वादि

१४ मन्वंतराच्या आरंभ झाल्या अशा १४ तिथीना मन्वादि असे म्हणतात. या मन्वादि १४ तिथी पुढे दिल्या आहेत.

स्वायंभुव
 चैत्र शुक्ल तृतीया
स्वारोचीस
 चैत्र शुक्ल पौर्णिमा
उत्तम
 कार्तिक शुक्ल पौर्णिमा
तामस
 आषाढ शुक्ल पौर्णिमा
रैवत
 कार्तिक शुक्ल द्वादशी.
चाक्षुस
  आषाढ शुक्ल दशमी.
वैवस्वत
 ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
सावर्णी
 फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
दक्ष सावर्णी
 आश्विन शुक्ल नवमी.
१०
ब्रह्म सावर्णी
 माघ शुक्ल सप्तमी
११
धर्म सावर्णी
 पौष शुक्ल एकादशी.
१२
रुद्र सावर्णी
 भाद्रपद शुक्ल तृतीया.
१३
देव / रुची सावर्णी
 फाल्गुन अमावस्या.
१४
इंद्र/ भूती सावर्णी
 श्रावण कृष्ण अष्टमी.
मनुबाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत म्हटले आहे

महर्षय: सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा !                                                    मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा: !!                        
(श्रीमद्भ्गव्दगीता  अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण म्हणतात हे अर्जुना  सात महर्षी जन आणि त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु  हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन  माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.


गौरी शंकराचा दोलोत्सव

गौरी-शंकराची पूजा करून झोपाळ्यावर स्थापना करावी. महिनाभर रोज देवी व महादेव ताम्हणात घेऊन पूजा करून झोपाळ्यात ठेवावे. सुवासिनींना हळदकुंकू लावून ओटी भरून पन्हे द्यावे.
फळ: सौभाग्य वृद्धी

श्रीराम दोलोत्सव

वर वर्णन केल्या प्रमाणेच श्रीरामाचा दोलोत्सव करावा. श्रीरामाची पूजा करून झोपाळ्यावर स्थापना करावी. महिनाभर रोज ही मूर्ती ताम्हणात घेऊन पूजा करून झोपाळ्यात ठेवावी.

मुस्लीम रज्जब मासारंभ


मुस्लीम कालगानाने नुसार रब्बज महिना आरंभ होत आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment