Thursday, 12 April 2018

दिनविशेष - १८ एप्रिल २०१८




तिथी
 वैशाख शुक्ल ३ (२५:३०)   
वार
 बुधवार
नक्षत्र
 कृत्तिका (२४:२७)
योग
 आयुष्मान (१७:१४)
करण
 तैतिल (१४:३९), गरज (२५:३०)

अक्षय्य तृतीया

अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून सामान्य शुभ कार्यांसाठी चांगला आहे.
या दिवशी दान, होम, जप व पितरांचे तर्पण करतात.या दिवशी जप, दान, होम इ. केले असता ते अक्षय्य होते असे मानले जाते. या दिवशी आपणांस अत्यंत प्रिय असेल ते दान करावे. मातीचे दोन घट पाण्याने भरून एकात तांदूळ व दुसऱ्यात तील घालून त्यास दोरा गुंडाळावा व ते धान्यावर ठेवावेत. ब्रह्मा-विष्णु-शिव स्वरूपात त्यांची पूजा करून दान करावे. त्यामुळे पितर तृप्त होतात आणि मनोरथ पूर्ण होतात.

या दिवशी रोहिणी नक्षत्र व बुधवार असा योग असेल तर तो महापुण्यकारक असतो.

गौरीहर दोलोत्सव समाप्ति

गौरीहर दोलोत्सावाची या दिवशी सांगता होते. म्हणून स्‍त्रिया या दिवशी हळदीकुंकू करून सुवासिनींना भोजनास बोलावून त्यांचा सत्कार करतात. कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळाची करंजी देतात. या शिवाय बत्तासे, मोगर्‍याची फुले किंवा गजरे देतात आणि भिजवलेली हरबर्‍यांनी ओटी भरतात.

श्री बसवेश्वर जयंती

समाजसुधारक बसवण्णा/बसवा/बसवेश्वर यांचा जन्म म्हैसूर (आजचा कर्नाटक) राज्यातील विजापूर जिल्ह्यातल्या बागेवाडी या तालुक्यात कम्मेकुळ या गावात, वैशाख शुद्ध तृतीया इ.स. ११३४ रोजी झाला. (जन्म : ३० मार्च, इ.स. ११३४ - मृत्यू : इ.स. ११६७) त्यांचे वडील मादीराज आणि माता मादलांबिका.
हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. बसवेश्वरांनी घालून दिलेल्या मार्गाला लिंगायत पंथ या नावाने ओळखले जाते.
बसवण्णांनी मंगळवेढा येथे "जगातील पहिली लोकशाही संसद म्हणजेच 'अनुभव मंडपाची' स्थापना केली. या अनुभव मंडपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. अनुभव मंडप म्हणजे जगातील पहिली संसद.

संक्षिप्त जीवन चरित्र

विश्‍वगुरू बसवेश्‍वर
(इ. स. 1134 ते इ. स. 1196)     
परमात्म्याचा प्रेषित म्हणून बाराव्या शतकात जन्म घेऊन जगाला शांतीचा अन् समतेचा संदेश देणारा लिंगायतहा धर्म बसवेश्‍वरांनी स्थापिला. इंगळेश्‍वर बागेवाडीमध्ये शैव ब्राम्हण दांपत्य मादरस-मादलांबिकेचे पुत्र होऊन आनंदनाम संवत्सर, वैशाख मास, अक्षय तृतीया (दि. 30-4-1134) रोहिणी नक्षत्रामध्ये म. बसवण्णांचा जन्म झाला. कोणत्याही स्वरूपाची रूढी-परंपरा, अंधश्रध्दा न मानता सत्यान्वेषक होऊन घर सोडून  कुडलसंगम येथील गुरूकुलाकडे आले. शास्त्राध्यायन आणि योगाभ्यासामध्ये बालपण घालवून तरूणपणात पदार्पण केले. लोकमनामध्ये घर करून राहिलेली अंधश्रध्दा, कर्मकांड, जातीयता आदींचा परिहार करण्यासाठी बसवेश्‍वरांनी महान कार्य केले.

            दि. 14-1-1155 रोजी बसवेश्‍वरांना परमात्म्याचे दिव्य दर्शन होऊन अनुग्रहीत झाले. ब्रम्हा, विष्णु,महेशाहुनही सृष्टीकर्ता परमात्मा श्रेष्ठ आहे, ही घोषणा करून त्या परमात्म्याला लिंगदेवअसे नाव दिले. निराकार देवाला प्राणी, मानव आदिंच्या आकारात पूजा करणे निषेध मानून देवाचे साकार म्हणजेच ब्रम्हांड हे गोलाकार आहे. त्यासाठी लिंगदेवाला विश्‍वाच्या आकारात पूजावे म्हणून इष्टलिंगाची परिकल्पना दिली. इष्टलिंग हे कोणत्याही जाति, वर्ण,वर्गाचे प्रतीक नसून एकूणच मानव समुहाचे गणचिन्ह आहे.

            विश्‍वगुरू बसवेश्‍वरांनी दिव्यानुभव मिळवुन नवसमाज निर्माणाची रूपरेषा मनात धारण करून कल्याणाच्या कार्यक्षेत्रात प्रवेश केला. पुढे आपल्या मामांची मुलगी निलगंगा यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर लेखनिक म्हणून कायक सुरू केले. त्यानंतर भंडारी म्हणून व पुढे प्रधानमंत्री म्हणून बिज्जल राजाच्या दरबारी मोठ्या निष्ठेने कार्यभार सांभाळला. कल्याणमध्ये अनुभव मंटपाची स्थापना केली. अनुभव मंटपात परिपूर्ण पीठ म्हणजे शून्यपीठनावाची आध्यात्मिक धर्मपीठाची स्थापना करून प्रथम पीठाधीश म्हणून श्री अल्लमप्रभुदेवांची नेमणूक केली. चिन्मयज्ञानी चन्नबसवेश्‍वर हे द्वितीय आणि सोलापुरचे सिध्दरामेश्‍वर हे त्या पीठाचे तृतीय पीठाधीश होते. सर्व जातीतील 770 शरणांच्या माध्यमातून वचनधर्म ग्रंथ देऊन धर्मप्रचार सुरू केला. जगाला भक्ती, कायक, दासोह व समतेचा महत्व पटवून दिले. या सगळ्याद्वारे गुरू बसवेश्‍वरांनी सर्वसामान्यांच्या घरादारापर्यंत धर्मगंगा नेऊन पोहचविली. गुरू बसवेश्‍वरांनी इष्टलिंग धारण करणार्‍या सर्वांना एकसमान मानले. जन्मत: ब्राम्हण असलेले आणि संस्काराने लिंगायत झालेले मधुवरस यांची कन्या लावण्यवती व जन्माने चांभार असलेले आणि संस्काराने लिंगायत झालेले हरळय्या यांचा मुलगा शिलवंत ह्या दोघांचा विवाह घडवून आणण्यास गुरू बसवेश्‍वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यामातून प्रेरित केले म्हणून धर्मगुरू बसवेश्‍वरांना हद्दपारीची शिक्षा ठोठावली. या शिक्षेचा स्विकार करून गुरू बसवेश्‍वर कल्याणमधुन बाहेर पडल्यानंतर हरळय्या, मधुवरस आणि शीलवंत यांना बंदिस्त करून प्रतिगामी लोकांनी त्यांचे डोळे काढुन हत्तीच्या पायाला बांधुन ओढत नेण्याची (यळेहूटे) शिक्षा ठोठावली. पुढे धर्मांध लोकांनी वचन साहित्याचा नाश करण्याचा प्रयत्न करीत असताना वीरमाता अक्कनागलंबिका, चिन्मयज्ञानी चन्नबसवण्णा, वीर गणाचारी मडिवाळ माचिदेव आदीनी युध्द करून वचनसाहित्याचे संरक्षण केले. त्यामुळे आजतागायत वचन साहित्यहे विश्‍वाचा अमुल्य ठेवा ठरला आहे. असे हे महान बसवेश्‍वर हे धर्मपिता मंत्रपुरूष लिंगायत धर्माचे संस्थापक आहेत. 62 वर्षे, 3 महिने, 2 दिवस सार्थक जीवन जगलेले गुरू बसवेश्‍वर नळनाम संवत्सरातील श्रावण शुध्द पंचमी (दि. 30-7-1196) रोजी लिंगैक्य झाले.

श्री परशुराम जयंती

ज्या दिवशी रात्रीच्या प्रथम प्रहरात वैशाख शुक्ल तृतीया असेल, त्या दिवशी प्रदोष काळी परशुराम जयंती साजरी केली जाते.

परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. जमदग्नीरेणुकामाता यांच्या पोटी यांचा जन्म झाला. धारिणीशी विवाह केला. ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. यांच्या दानशिलतेवर प्रसन्न होऊन विष्णूने यांचा द्वारपाल होणे पसंत केले.

कोकण प्रदेशाची निर्मितीच्या कथाही तेवढ्याच रंजक आहेत. असे म्हणतात की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.

केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असे सांगतात.. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हा अमर्त्य किंवा चिरंजीव मानला गेला आहे. त्यामुळे त्याचा कायम निवास असतो असा समज आहे.

श्री विष्णू अवतार

मत्स्य अवतार
चैत्र शुक्ल तृतीया
अपराह्नकाळी
कूर्म अवतार
वैशाख पौर्णिमा
सायंकाळी
वराह अवतार
भाद्रपद शुक्ल तृतीया
अपराह्नकाळी
नृसिंह अवतार
वैशाख शुक्ल चतुर्दशी
सायंकाळीं
वामन अवतार
भाद्रपद शुक्ल द्वादशी
माध्यान्हकाळी
परशुराम अवतार
वैशाख शुक्ल तृतीया
माध्यान्हकाळीं झाला. (हा प्रदोषकाळी झाला असे अन्य मत असून सध्या प्रचार ही प्रदोषकाळी मानण्याविषयीच आहे. )

राम अवतार
चैत्र शुक्ल नवमी
माध्यान्हकाळी
कृष्ण अवतार
श्रावण कृष्ण अष्टमी
मध्यरात्री
बौध्द अवतार
अश्विन शुक्ल दशमी
सायंकाळी
कल्की अवतार
श्रावण शुक्ल षष्ठी
सायंकाळी



कल्पादि

ब्रह्मदेवाच्या  दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)     चैत्र - शुक्ल ५,
२)     चैत्र – कृष्ण ५
३)     वैशाख – शुक्ल ३
४)     कार्तिक - शुक्ल ७
५)     मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)     माघ – शुक्ल १३
७)     फाल्गुन – शुक्ल ३
धर्मसिंधु ग्रंथात चैत्र कृष्ण ५ न सांगता चैत्र शुक्ल प्रतिपदा सांगितली आहे.

युगादि

ज्या तिथीला नवीन युगाचा आरंभ झाला त्या तिथीला युगादि असे म्हणतात. ४ युगांच्या आरंभीच्या ४ तिथी पुढील प्रमाणे आहेत.
१)
कृतयुग
 कार्तिक शुक्ल ९
२)
त्रेतायुग
 वैशाख शुक्ल ३
३)
द्वापारयुग
 माघ कृष्ण अमावास्या
४)
कलियुग
 भाद्रपद कृष्ण १३

जलकुंभ व पंखादान

मातीचे दोन घट पाण्याने भरून एकात तांदूळ व दुसऱ्यात तील घालून त्यांना दोरा गुंडाळावा व ते धान्यावर ठेवावेत. ब्रह्मा-विष्णु-शिव स्वरूपात त्यांची पूजा करून दान करावे. म्हणजे पितर तृप्त होतात आणि मनोरथ पूर्ण होतात.


तिसरी तीज


मुस्लीम शाबान मासारंभ

मुस्लीम कालगणनेनुसार शाबान मास आरंभ होत आहे.

दग्ध योग

२५:३० पर्यंत बुधवारी तृतीया तिथी  असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


तृतीया श्राद्ध

अपराण्ह काळी तृतीया तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख शुक्ल ३ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment