Thursday, 19 April 2018

दिनविशेष - २६ एप्रिल २०१८




तिथी
 वैशाख शुक्ल  ११ (९:२०)   
वार
 गुरुवार
नक्षत्र
 पूर्वाभाद्रपदा (१४:२६)
योग
 धृव  (१६:४०)
करण
 विष्टि (९:२०), बव (२०:४२)

मोहिनी एकादशी

या दिवशीचा व्रताचार अन्य एकादशीप्रमाणेच आहे. या एकादशीचे नाव 'मोहिनी एकादशी' असे आहे. या व्रताने मोहजाल व पापसमूह दूर जातात. भगवान रामचंद्रानी हे व्रत सीताशुध्दीसाठी केले होते. तसेच, कौंडिण्याच्या सांगण्याने धृष्टबुद्धीने व श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून ते युधिष्ठिराने केले. आजही सनातन धर्मनिष्ट लोक हे व्रत अत्यंत श्रध्देने करतात. या बद्दलची एक कथा आहे, त्यावरून मनुष्याचे वाईट संगतीने पतन व सुसंगतीने उद्धरण कसे होते हे समजते.
या दिवशी उपवास , विष्णूपूजा , जाग्रण इ. गोष्टी केल्याने विष्णूलोक मिळ्तो असे सांगितले जाते.

मोहिनी एकादशी कथा

युधिष्ठिराने विचारले, 'जनार्दना, वैशाख शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? त्या एकादशीच्या व्रताचा विधी कोणता व त्या व्रताचे काय फळ मिळते ते मला सांग.'
श्रीकृष्ण म्हणाले, 'धर्मराजा, पूर्वी रामाने वसिष्ठ ऋषींना हाच प्रश्न विचारला होता, त्यावेळी वसिष्ठ ऋषींनी रामाला जी कथा सांगितली तीच मी तुला सांगतो. ऐक तर.'
रामचंद्र म्हणाला, 'हे भगवंता, सर्व व्रतात उत्तम व्रत कोणते आहे ? हे ऐकण्याची माझी इच्छा आहे. ते व्रत सर्व पापांचा क्षय करणारे व सर्व दुःखांचे निर्मूलन करणारे असावे. हे महामुनी, सीताविरहातून उत्पन्न झालेली अनेक दुःखे मी भोगली आहेत. त्या दुःखांच्या भीतीनेच मी तुला हे विचारीत आहे.'
वसिष्ठ ऋषी म्हणाले, 'रामचंद्रा, तू चांगले विचारलेस. तुझी बुद्धी निष्ठावान आहे. रामचंद्रा, तूझ्या केवळ नामस्मरणानेही मनुष्य पवित्र होतो. तरीपण सर्व लोकांच्या हितासाठी पावन करणारे, सर्व व्रतात पवित्र आणि सर्वोत्तम असे व्रत मी तुला सांगतो. वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीचे नाव मोहिनी एकादशी असे आहे. ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे. या एकादशीच्या व्रतप्रभावाने मनुष्य मोहजालातून आणि पातकांच्या समुदायातून मुक्त होतो. हे मी तुला अगदी खरे खरे सांगतो. म्हणून रामा, तुझ्यासारख्यांनी ही एकादशी अवश्य केली पाहिजे. रामचंद्रा, या एकादशीची कल्याणकारक व पुण्यप्रद कथा मी सांगतो ती ऐक. केवळ ही कथा ऐकल्यानेही महापातकांचा नाश होतो.
सरस्वती नदीच्या रम्य किनार्‍यावर भद्रावती नावाची एक उत्तम नगरी होती. तेथे द्युतिमान नावाचा राजा राज्य करीत होता. तो चंद्रवंशात उत्पन्न झालेला असून धैर्यवान होता. तो युद्धही न्यायानेच करीत असे.
त्याच नगरात धनपाल नावाचा वाणी राहत होता. तो धन-धान्यांनी समृद्ध होता. आणि पुण्यकर्मे करणारा होता. त्या वाण्याने पाणपोई, अन्नसत्रे, देवालये, धर्मशाळा, सरोवरे वगैरे बांधली होती. तो शांत स्वभावाचा असून विष्णुभक्तीत तत्पर होता. त्याला पाच पुत्र होते. सुमना, द्युतिमान, मेधावी, सकृती व धृष्टबुद्धी अशी त्यांची नावे होती.
यांपैकी पाचवा धृष्टबुद्धी नित्य महापातके करण्यात मग्न असे. तो नेहमी वेश्येच्या संगतीत असे. विटाच्या गप्पागोष्टीत तो चतुर होता. द्यूत वगैरे व्यसनात तो बुडालेला होता. व परस्त्रियांशी विलास करण्याची त्याला लालसा होती. त्याने देव, अतिथी, पितर, ब्राह्मण यांची कधीही सेवा केली नाही. तो नित्य अन्याय करीत असे. तो दुष्टबुद्धीचा होता व पित्याचे द्रव्य उधळणारा होता. तो पापी अभक्ष्यभक्षण करी आणि नित्य मद्यपानात मग्न असे. वेश्येच्या गळ्यात हात घालून डोळे फिरवीत तो भरचौकात उभा राही.
यामुळे त्याला त्याच्या पित्याने घरातून बाहेर काढले. नातेवाइकांनीही त्याचा त्याग केला. स्वतःच्या देहाखेरीज त्याचे सर्व अलंकार नष्ट झाले. त्याच्याजवळचे द्रव्य संपल्यावर वेश्यांनी त्याचा त्याग केला व निंदा केली. त्यानंतर पुढे त्याच्या अंगावर वस्त्रही राहिले नाही. भुकेने तो व्याकुळ झाला. आता मी काय करू? कोठे जाऊ? कोणत्या उपायाने उपजीविका चालवू? अशी चिंता तो करू लागला.
पुढे त्याने त्या नगरातच चोर्‍या करणे सुरू केले. तेव्हा त्याला राजपुरुषांनी पकडले. पण त्याच्या पित्याच्या कीर्तीमुळे सोडून दिले. नंतर पुन्हा पकडले व सोडले असे अनेकदा झाले.
पण शेवटी राजसेवकांनी त्या दुराचारी धृष्टबुद्धीला बळकट बेड्या घातल्या, चाबकाचे फटके पुन्हा पुन्हा मारले. शेवटी राजाने त्याला आज्ञा केली की, 'अरे मूर्खा, तू आता माझ्या राज्यात राहू नकोस ! असे सांगून राजाने त्याला कारागृहातून मुक्त करून हाकलून दिले.
राजाच्या भीतीने तो गहनवनात निघून गेला. तेथे तो भुकेने व तहानेने व्याकुळ होऊन भक्ष्य मिळवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागला. तेथे एखाद्या सिंहाप्रमाणे तो हरिण, डुक्कर व चितळ यांची शिकार करू लागला. मांसाहार मिळवण्याकरता पाठीवर भाता बांधून व धनुष्यावर बाण चढवून तो सर्व वनात फिरत असे तो अरण्यातील पशुपक्षी मारू लागला. चकोर, मयूर, कंक, तित्तिर वगैरे पक्षी व उंदीर यांची हत्या तो अरण्यात फिरून करीत असे. याप्रमाणे पूर्वजन्मी केलेल्या पापाचे फळ म्हणून तो तेथे दुःखरूपी चिखलात बुडून गेला. त्याचे मन नेहमी दुःखाने व शोकाने भरून गेलेले असे. रात्रंदिवस त्याला चिंता जाळीत असे.
परंतु त्याचे पूर्वजन्मीचे थोडेसे पुण्य शिल्लक राहिले होते ! त्या पुण्यामुळेच की काय एकदा तो कौंडिण्य ऋषींच्या आश्रमात येऊन पोचला. तेथे तपोधन कौंडिण्य ऋषी वैशाख मासानिमित्त भागीरथीत स्नान करून नुकतेच आले होते. शोकभावनेने भरून गेलेला धृष्टबुद्धी त्या ऋषीसमोर गेला. इतक्यात कौंडिण्याच्या अंगावरील स्नानाने भिजलेल्या वस्त्रामधून गंगाजलाचा एक बिंदू धृष्टबुद्धीच्या अंगावर पडला. त्या बिंदूचा स्पर्श होताच त्याची सर्व पातके नष्ट झाली व दुर्भाग्य संपले.
धृष्टबुद्धी हात जोडून कौंडिण्य ऋषीसमोर उभा राहिला आणि म्हणाला, 'हे ब्राह्मणश्रेष्ठा, मी जन्मापासून पापच करीत आलो आहे ! द्रव्य खर्च केल्याशिवाय या पापाचे प्रायश्चित्त करता येत असल्यास मला सांगा. कारण सध्या माझ्याजवळ द्रव्य नाही.'
ऋषी म्हणाला, 'तुझ्या पापाचा क्षय होण्यासाठी मी तुला गंगानदीत पिंडदान केल्याचे पुण्य व्रत सांगतो, ते एकाग्र चित्ताने ऐक. वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षात मोहिनी नावाची एकादशी आहे. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू या एकादशीचे व्रत कर. या एकादशीला उपवास केल्यास ती एकादशी उपवास करणाराची, अनेक जन्मात संपादन केलेली मेरूपर्वताएवढी पापेही नष्ट करते.'
ऋषीचे हे बोलणे ऐकून धृष्टबुद्धी प्रसन्न झाला. रामचंद्रा त्याने कौंडिण्याच्या उपदेशाप्रमाणे विधिपूर्वक व्रत केले. व्रत केल्याबरोबर त्याची पापे संपली. त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि तो गरुडावर बसून जेथे कसलेच उपद्रव होत नाहीत, अशा वैकुंठ लोकाला गेला.
रामचंद्रा, अज्ञान व दुःख नाहीसे करणारे असे हे मोहिनी एकादशीचे व्रत आहे. या त्रैलोक्यातील चराचर सृष्टीत या व्रताहून श्रेष्ठ असलेले दुसरे व्रत नाही. या व्रतापुढे यज्ञकर्म, दान किंवा तीर्थे यांचे पुण्य सोळावा हिस्सा सुद्धा भरत नाही. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने हजार गाई दान केल्याचे पुण्य मिळते.
॥श्रीकूर्मपुराणातील मोहिनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले॥

घबाड

९:२० नंतर १४:२६ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: अश्विनी
चंद्र नक्षत्र : पूर्वा
तिथी: शुक्ल १२= १२    
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३+ १२= ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा

९:२० नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाभद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका

तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका

योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

द्वादशी श्राद्ध

अपराण्ह काळी द्वादशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख शुक्ल १२ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment