तिथी
|
श्रावण शुक्ल ३ (०८:०९)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
पूर्वाफाल्गुनी (२८:२३)
|
योग
|
वरीयान (१७:१६)
|
करण
|
गरज (०८:०९), वणिज (१९:२९)
|
विनायक चतुर्थी
विनायकी हे
संकष्टीप्रमाणेच एक सर्व कामनांना सिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल
पक्षातील चतुर्थीस 'विनायकी चतुर्थी' असे म्हणतात. आपल्या
पंचागात विनायकी व संकष्टी असे उल्लेख असतात. संकष्टीप्रमाणेच विनायकी हे व्रत आहे
व ते गजाननाला प्रिय आहे. त्याचा पूजाविधी संकष्टीप्रमाणेच असतो. विनायक हे
गणपतीचेच नाव आहे. या दिवशी चंद्रदर्शन अथवा चंद्रपूजा याचा संबंध नसतो. या दिवशी
दोन वेळा उपवास करावयाचा असतो. दुसरे दिवशी पारणे करतात. या व्रतसाधनाने सर्व
विघ्ने, बाधा वगैरेचे निरसन होते व सर्व कामना परिपूर्ण होतात.
गणपतीची कृपा होते. महान सिद्धिदायक असे हे व्रत आहे. संकटकाळी पुष्कळ लोक आपल्या
संकटनाशनार्थ हे व्रत करतात व श्रीगजाननाला नवस बोलतात. या विनायकी ७, ११, २१, अशा ठरवून
करावयाच्या असतात.
नागचतुर्थी (उपवास)
उपवासाचे महत्त्व
पाच युगांपूर्वी सत्येश्वरी
नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यु
नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न
ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. `भावाला चिरंतन आयुष्य व
अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख व संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक
कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक
मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो व त्याचे रक्षण होते.
नागाची पूजा करणे
सत्येश्वरीला तिचा भाऊ
नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने
वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी
नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.
नवीन वस्त्रे व अलंकार घालणे
सत्येश्वरीचा भावासाठीचा
शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी
करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला
सजवले. त्यातून सत्येश्वर समाधानी झाला. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया
नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात.
मेहंदी लावणे
सत्येश्वर नागराजाच्या
रूपात सत्यश्वेरीच्या पुढ्यात उभा राहिला. `तो निघून जाईल’, असे वाटून तिने त्याच्याकडून, म्हणजे नागराजाकडून तसे
हातांवर वचन घेतले. ते वचन देतांना सत्येश्वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण
झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री
स्वत:च्या हातांवर मेहंदी काढते.
झोका खेळणे
दुसर्या दिवशी सत्येश्वरीला
नागराज दिसला नाही. तेव्हा ती जंगलात सैरावैरा भटकू लागली व शोधता शोधता झाडांच्या
फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन
सत्येश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ
लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. त्या दिवशी झोका खेळण्यामागील
उद्देश असतो – `जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात
आलेल्या सर्व अडचणी व दु:खे खाली जाऊ देत.’
दुर्वागणपती व्रत
सौर पुराणा नुसार हे व्रत
तीन किंवा पाच वर्षे करावे.
हे व्रत श्रावण शुक्ल
चतुर्थीला करतात. ही चतुर्थी मध्याह् नव्यापिनी धरतात. जर ती दोन्ही दिवशी असेल तर
अगर दोन्हीही दिवशी नसेल तर 'मातृविद्धा प्रशस्यते' या नियमाने
पूर्वविद्धा धरावी. त्या दिवशी प्रात: स्नानादी कर्मे करून एकदंत, चतुर्भुज, गजानन, सुवर्णाच्या
आसनावर बसलेली अशी श्रीगणेशाची मूर्ती करावी. दुर्वाही सोन्याची करावी. नंतर
सर्वतोभद्र आसनावर मंडलावर कलश स्थापन करावा. त्यावर दूर्वा ठेवून गजाननाची
स्थापना करावी. त्यास लाल वस्त्र वाहावे व अनेक प्रकारच्या सुगंधित पत्री, फुले, बेलपान, आघाडा, शमी, दूर्वा आणि
तुळशीपत्र अर्पण करून पूजा करावी. नंतर आरती करून
'गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन ।
व्रतं संपूर्णतां
यातु त्वत्प्रसादादिभानन ॥
अशी प्रार्थना
करावी. याप्रमाणे ३ अगर ५ वर्षे केल्याने सर्व अभीष्टे सिद्ध होतात.
श्रावणी बुधवार
दर बुधवारी बुध-बृहस्पति
पूजन करावे.
बुध - बृहस्पतींची
कहाणी
ऐका बुध-बृहस्पतींनो, तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या.
त्याच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेला जात. राजाच्या सुना “आमचे हात रिकामे नाहीत” म्हणून सांगत. असे
पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांस दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे
पूर्वीप्रमाणं भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं, “असतं तर दिलं असतं. आमचे हात
रिकामे झाले”. सर्वांत धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला. होतं तेव्हां दिलं नाही, आता नाही म्हणून नाही.
ब्राह्मण विन्मुख जातात.
ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, “आम्ही संपन्न असता धर्म केला नाही
ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखी होऊ, असा काही उपाय सांगा,” ते म्हणाले, “श्रावणमासी दर बुधवारी
आणि बृहस्पतवारी जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास
दाराच्या पाठीमागं दोन बाहुली काढावी. संपत्ति पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास
कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा. म्हणजे इच्छित
हेतु पूर्ण होतात.” त्याप्रमाणे ती करूं लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं, “ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या
भांड्यानं तूप वाढते आहे.” ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली.
इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा
बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं? हत्तिणीच्या सोंडेत
माळ दिली व तिला नगरात फिरविलं, “ज्याच्या गळ्यांत माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल,” अशी दवंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या
बाईच्या नवर्याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा
हत्तीण फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यांत माळ घातली. याप्रमाणं तीनदां झालं. पुढं
त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा ती अन्न अन्न
करून देशोधडीस लागल्याची खबर समजली.
मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले, तिथं त्याची माणसं आली. राजानं
आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुध-बृहस्पतीच्या व्रताची व
स्वप्नाची हकीकत कळविली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजानं ती
गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातांत चांदीचं भांडं दिलं.
तूप वाढू सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. त्याचा
सन्मान केला. मुलंबाळं झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले.
जशी त्यांवर बुध-बृस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत.
ही साठां उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
दग्ध योग
८:०९ पर्यंत बुधवारी तृतीया तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
भद्रा
१९:२९ नंतर भद्रा म्हणजेच
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा
असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी
आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा
भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ
आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील
काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ
मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
चतुर्थी श्राद्ध
अपराण्ह काळी चतुर्थी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण शुक्ल ४ आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment