तिथी
|
श्रावण शुक्ल ६ (०७:०१)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
चित्रा (अहोरात्र)
|
योग
|
सिध्द (१३:५९)
|
करण
|
तैतिल (०७:०१), गरज (१९:२९)
|
श्रियाळ षष्ठी
लोककल्याणकारी औट
घटकेचा राजा श्रीयाळशेट याची स्मृती म्हणून आपण शेकडो वर्ष साजरा केला जातो.
सीतला सप्तमी
या दिवशी जलदेवतांची
प्रार्थना केली जाते. वंशामधील जे कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते परत मिळावेत
म्हणून प्रार्थना केली जाते.
पापनाशिनी सप्तमी
हे व्रत श्रावण
शु. सप्तमी दिवशी जर हस्तनक्षत्र असेल तर उदयव्यापिनी धरून करतात. त्या दिवशी जगद्गुरू
चित्रभानूची पूजा करून दान, पुण्य, हवन व व्रत केल्यास त्याचे
अक्षय्य फल मिळते. सर्वप्रकारची पापे, ताप दूर होतात
श्रावणी शनिवार
दर
शनिवारी नरसिंह-पिंपळ शनी-मारुति पूजन करावे.
संपत
शनिवारची कहाणी
ऐका
परमेश्वरा शनिदेवा, तुमची
कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण रहात होता. त्याला तीन सुना
होत्या. पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे. सकाळीच जेवी, लेकी-सुना सुद्धा शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र
घरी ठेवी. याप्रमाणं आपला नित्याप्रमाणं शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं.
“मुली मुली, आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरीमडक्यात काही दाणे
पहा. थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकऱ्या कर. केनीकुर्डूची भाजी कर. तेरड्याचं बी
वाटून ठेव”. सुनेनं बरं म्हटलं.
माडीवर दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले तेवढेच तिनं दळले.
त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या. केनीकुर्डूची भाजी केली. तेरड्या टाकळ्याचं बी
वाटलं नि सासूसासऱ्याची वाट पहात बसली. इतक्यांत तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं
आले आणि म्हणाले, बाई
बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल. घरात गेली, चार तेलाचे थेंब घेतले, त्यांच्या अंगाला तेल लावलं.
वाटलेले बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला.
तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला, तो
काय दिला? ‘तुला काही कमी पडणार
नाही’, म्हणून म्हणाला. आपलं
उष्टं वळचणीला खोचलं, शनिदेव
अदृश्य झाले. काही वेळानं घरी सासूरासासरा, दीरजावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाली. आपल्या घरात तर काही
नव्हतं. हे असं कशानं आलं, म्हणून
आश्चर्य करू लागली.
दुसऱ्या
शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे
काय मौज झाली? शनिदेवांनी
मागच्यासारखंच कुष्ठ्याचं रूप घेतलं, ब्राह्मणाच्या
घरी आले. मागच्यासारखंच मला न्हाऊ घाल, माखू
घाल, म्हणून म्हणू लागले.
ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलूं लागली, “बाबा, आम्ही
काय करावं! आमच्याजवळ काही नाहीं”. देव
म्हणाले, “जे असेल त्यातलच थोडंसं
मला दे”. ब्राह्मणाची सूनेला
काही असलं तरी नाहीसं होईल” असा
त्यांनी शाप दिला नि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडीमडकी
पाहू लागली. तिला काही सापडलं नाही. संध्याकाळ झाली, सासूसासरा घरी आली. सर्व तयारी पाहू लागली. तो
त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला रागं भरली. सुनेनं झालेली हकीकत सांगितली.
पुढं
तिसरा शनिवार आला. ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर
म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले.
ब्राह्मणाच्या सुनेला, अंगाला
तेल लाव म्हणून म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवांनी तिला
पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? काही वेळानं सासुसासरा घरी आली, जेवणाची तयारी पाहू लागली, तो तिथं काही दिसेना. मग त्यांनी
सुनेला विचारलं, मागच्यासारखीच
हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला, मनांत
फार खिन्न झाली.
पुढं
चौथ्या शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखीच आज्ञा
केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं? गलितकुष्ठ्याचं रूप धरलं. ब्राह्मणाचे घरी आला.
सुनेला म्हणू लागला. “बाई
बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव”. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाजीभाकर
खायला दिली. त्याचा आत्मा थंड झाला. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय
दिला? असाच तुझाच आत्मा देव
थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्टं वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं
ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडीमडकी पाहू लागली. डाळदाणा दृष्टीस पडला. तो
काढला, तिनं चांगला स्वयंपाक
केला आणि सासूसासऱ्यांची वाट पहात बसली. इतक्यात सासूसासरा तिथं आली. सुनेला
विचारू लागली. “मुली
मुली, आज तू काय केलं आहेस”? सुनेनं सांगितलं, “सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे.
टाकळ्याची चोखणी आहे. आंघोळीला ऊन पाणी आहे. जेवायला बाजरीची भाकरी आहे. तोंडी
लावायला केनीकुर्डूची भाजी आहे”. सासूसासऱ्यांस
आनंद झाला. “आपल्या घरात तर काही
नव्हतं आणि इतकं सामान कुठुन आणलसं”? म्हणून
तिला विचारलं. तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली. दिलेला आशिर्वाद सांगितला.
सासऱ्याला आनंद झाला.
इतक्यात
काय चमत्कार झाला? सासऱ्याची
दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं
तो पत्रावळीवर हिरेमोत्ये दृष्टीस पडली सुनेला दाखविली, ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं
सांगितलं. सासरा म्हणाला, “देवानं
मुलीला दर्शन दिलं”. पुढं
दुसऱ्या सुनांस हकीकत विचारली, त्यांनी
दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं, “आम्ही
त्याला काही दिलं नाही, त्याचा
त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच
दिवशी हांड्यामडक्यात दाणे नाहीसे झाले. म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला”. पुढं सासुसासऱ्यांनी शनिदेवाची
प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागला.
जसा
शनिदेव त्यांना प्रसन्न झाला. तसा तुम्हा आम्हा होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
तात्पर्य
: कोणी काही मागण्यास आला तर त्याला संतुष्ट करावे.
शनिवारची
मारुतीची कहाणी
आटपाट
नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला एक सून होती. एक मुलगा होता. मुलगा
प्रवासाला गेला होता. सासू सासरा देवाला जात असत. भिक्षा मागून आणीत असत. सून घरात
बसून सैंपाक करून ठेवीत असे. सासूसासऱ्यांना वाढीत असे. उरलंसुरलं आपण खात असे.
असं होता होता श्रावणमास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा
आला. “बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल”. “बाबा, घरामध्ये
तेल नाही. तुला न्हाऊ कशानं घालू”? “माझ्यापुरतं
तेल घागरीत असेल. थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेवू घाल.” घाघरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेवू घातलं, उरलंसुरलं आपण खाल्लं. असे चार
शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर
फेकून अदृश्य झाला.
इकडे
घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासीबटकीनी घर
भरलं. सासूसासरा देवाहून आली, तो
घर काही ओळखेना. हा वाडा कुणाचा? सून
दारांत आरती घेऊन पुढं आली. “मामंजी, सासूबाई, इकडे या”. “ अग
तू कोणाच्या घरात राहिली आहेस?” तिनं
सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. “बाई बाई, मला
न्हाऊ घाल, माखू घाल”. “बाबा, घरामध्ये तेल नाही. तुला न्हाऊ कशानं घालू”? माझ्यापूरतं घागरीत असेल. थोडं
शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेवू घातलं, उरलंसुरलं
आपण खाल्लं, असे चार शनिवार झाले.
चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य
झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले.” असं म्हणून त्यांना आरती केली.
सर्वजण घरात गेली.
त्यांना
जसा मारुती प्रसन्न झाला, तसा
तुम्हा आम्हा होवो.
तात्पर्य
: मनुष्य अगदी गरीब असला तरी त्याने आपल्या हातून होईल तेवढा परोपकार करावा. त्या
परोपकाराचे फळ त्याला मिळतेच.
सप्तमी श्राद्ध
अपराण्ह काळी सप्तमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण शुक्ल ७ आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment