तिथी
|
श्रावण शुक्ल १ (१२:२३)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
पुष्य (७:४३), आश्लेषा (३०:००)
|
योग
|
सिध्दि (२२:२१)
|
करण
|
बव (१२:२३), बालव (२३:०६)
|
चंद्रदर्शन
अमावास्येला दिसेनासा
झालेला चंद्र रवीच्या पुढे १२ अंश गेला कि दिसू लागतो. २०:१४ ला पश्चिम दिशेला चंद्र
दर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त १५
म्हणजे महर्घ आहे.
इष्टि
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
श्रावणी सोमवार
दर सोमवारी महादेवाचे पूजन
करावे.
श्रावणी
सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे. गंगा
जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे. घरातच किंवा पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती
वा चित्र ठेवावे. पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करा.
'मम
क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये'
त्यानंतर
खालील मंत्राने ध्यान करा.-
'ध्यायेन्नित्यंमहेशं
रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं
रत्नाकल्पोज्ज्वलांग
परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्।
पद्मासीनं
समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं
विश्वाद्यं
विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्॥
ध्यानानंतर
'ऊँ नमः शिवाय' हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची
षोडषोपचारे पूजा करा.
पूजेनंतर
व्रताची कहाणी ऐका. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा.मग भोजन वा फलाहार घ्या.
श्रावणी सोमवार व्रताचे
फळ
सोमवारचे
हे व्रत नियमितपणे केल्यास भगवान शिव व पार्वतीची कृपा आपल्यावर होते.
जीवनात
संपन्नतेचा अनुभव येतो.
सर्व
संकटांना भगवान शिव दूर करतात.
शिवमुष्टि
तांदूळ.
श्रावणी सोमवारचे व्रत असते या दिवशी शंकराला शिवमूठ वाहिली जाते.
पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसर्या सोमवारी तिळाची, तिसर्या सोमवारी मुगाची, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा असेल तर सातूची शिवमूठ वाहिली जाते.
आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला अर्पण करण्याची वृत्ती इथं दिसून येते.
शंकराच्या १२ ज्योतीर्लिंग असलेल्या ठिकाणी भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.
शिवामूठ वाहताना असे म्हणतात.
शिवा शिवा महादेवा,
माझी शिवामूठ ईश्वरा देवा.
सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा,
नावडती आहे ती आवडती कर रे देवा.
सोमवारची
कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर
जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. परत येऊ लागला, म्हणजे “मी येऊ? मी येऊ?” असा ध्वनि उठे. हा
मागं पाही, तो तिथं कोणी नाही. त्या भीतीनं वाळू लागला. तेव्हा गुरुजींनी विचारलं, “खायला प्यायला वाण
नाही. मग बाबा, असा रोड का”? “खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही. स्नान करून येतेवेळेस मला कोणी “मी येऊ? मी येऊं?” असं म्हणतं. मागं पाहतो तो कोणी
नाही. ह्याची मला भिती वाटते”. गुरुजी म्हणाले, “भिऊ नको, मागं काही पाहू नको. खुशाल त्याला ये म्हण, तुझ्यामागून येऊ दे”.
मग शिष्यानं काय केलं. रोजच्याप्रमाणं स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला. ‘मी येऊं?’ असा ध्वनी झाला. “ये ये” असा जवाब दिला. मागं
काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं. बरोबर एक मुलगी आहे.
त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं.
त्यानंतर काय झालं. श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणूं लागला, “माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको”. आपण उठला. शंकराचे
पूजेला गेला. तिनं थोडी वाट पाहिली. सैंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात
घातला. इतक्यामधे पती आला. “अग अग, दार उघड”. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला. दार उघडलं. पती घरात आले. नित्य
नेम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असं चारी सोमवारी
झालं.
सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघंजणं पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड
दिसला. “हा उजेड कशाचा”? “ताटी भरल्या रत्नांचा”. “ही रत्ने कुठून आणली”? मनात भिऊन गेली. “माझ्या माहेरच्यांनी दिली”. “तुझं माहेर कुठं आहे”? “वेळूच्या बेटी आहे”. “मला तिथं घेऊन चल”. पतीसह चालली. मनी शंकराची प्रार्थना केली. “मला अर्धघटकेचं माहेर दे”. तो वेळूचं बेट आलं.
मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण
आली. दासी बटकी राबताहेत. शिपाई पाहारा करताहेत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट
केला. जेवणं झाली. सासूसासऱ्यांचीं आज्ञा घेतली. घरी परतलीं. अर्ध्या वाटेत आठवण
झाली, खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयता परत गेली. घर नाही, दार नाही. शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत. बटकी
नाहीत. एक वेळूचं बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यांत घातला. नवऱ्यांनं
विचारलं, इथलं घर काय झालं?, “जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. चारी सोमवारी हाक ऐकली. जेवती ताटं
ढकलून दिली. रत्नानी भरली. सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला
तेव्हा भिऊन गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं
माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली."
जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हां आम्हां पावो ही साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
सोमवारची
खुलभर दुधाची कहाणी
ऐका परमेश्वरा सोमवारा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता.
त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गर्भारा दुधानं भरावा. परंतु हे घडेल कसं? अशी त्याला चिंता
पडली. प्रधानानं युक्ती सांगितली. दवंडी पिटली, “गावातल्या सर्व माणसांनी आपल्या
घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं”. सर्वांना धाक पडला.
घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला काही सुचेनासं झालं. त्याप्रमाणं घरात कोणी दूध
ठेवलं नाही. वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही. सगळे दूध देवळात नेलं. गावचं दूध सगळं गर्भाऱ्यात पडलं, तरी देवाचा गर्भारा
भरला नाही.
दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती, तिनं घरचं कामकाज आटपलं, मुलांबाळांना खाऊं
घातलं, लेकीसुनांना न्हाऊं घातलं, गाईवासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जिवाचं सार्थक व्हावं
म्हणून थोडं गंध व फूल घेतलं, चार तांदुळाचे दाणे घेतले, दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे पूजा
केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. “जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध
तुझ्या गर्भाऱ्यात घातलं. तुझ्या गर्भारा भरला नाही, माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही.
पण मी आपली भावे भक्तीनं अर्पण करते”. असं म्हणून राहिलेलं दूध गर्भारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागं परतली.
इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गर्भारा भरून गेला. हे गुरवानं पाहिलं, राजाला कळवलं, परंतु त्याचा काही
केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळी बसवले. तरीही शोध लागला
नाही. चमत्कारही असाच झाला. पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीचे वेळेस
गर्भारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली, तिला अभयवचन दिलं.
तिनं कारण सांगितलं, “तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांचे हायहाय माथी आले. हे देवाला आवडत नाही, म्हणुन गर्भारा भरत
नाही”. “याला युक्ति काय करावी”? “मुलांवासरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनी आनंद करावा. देवाला भक्तीनं
पंचामृती स्नान घालावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गर्भारा भरेल. देव
संतुष्ट होईल”. म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटविली.
चवथ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलांबाळांना गाईवासरांना दूध ठेऊन उरलेलं
दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहातात तो देवाचा
गर्भारा भरून आला. राजाला आंनद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकीसुना घेऊन
म्हातारी सुखानं नांदू लागली.
तसं तुम्ही आम्ही नांदू. ही साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
तात्पर्य : जो माणुस आपल्या माणसांचा प्रतिपाळ नीट रीतीने करून देवाला भजतो, तोच देवाला आवडतो.
सोमवारची
शिवामुठीची कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या
होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला
उष्टं, नेसायला जाडंभरडं. राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास
आला. पहिला सोमवार आला. ही राणी गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना
विचारलं, “बाई बाई, कुठं जाता”? “महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो”. “यानं काय होत”? “भ्रताराची भक्ति होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. नावडती
माणसं आवडती होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ति होते”. मग त्यानी हिला विचारलं, “तू कोणाची कोण”? “मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते”. त्यांचेबरोबर देवळात
गेली.
नागकन्या-देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, “काय गं बायांनो वसा वसता”? “आम्ही शिवामुठीचा वसा
वसतो”. “त्या वशाला काय करावं”? “मूठ चिमुट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलाची पानं घ्यावी. मनोभावं पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा
देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा”. असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टंमाष्टं खाऊ नये.
दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला
बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी
तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चवथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामूठीकरिता घेत जावे”.
पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी
हिला धरून आणायला संगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपास
केला. जावा-नणंदांनी उष्टंमाष्टं पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना
केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व
सामान मागून घेतलं. पुढं रानांत जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा
देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा”, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस
उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळीं सासऱ्यानं
विचारलं, “तुझा देव कुठं आहे”? नावडतीनं जबाब दिला, “माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत. साप-वाघ आहेत, तिथं माझा देव आहे”.
पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं
मागं चालली. “नावडते, तुझा देव दाखव” म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. ह्यांना
काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे.
नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसह
वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, हांड्या ग्लासं लागलीं. स्वयंभू
महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली.
गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा” असं म्हणून शिवाला
वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले.
खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी
माणसं बाहेर आली.
इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं देवळाकडे
आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हा
त्याने सुनेला विचारलं, “हे असं कसं झालं”? “माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हांला दर्शन दिलं”. सुनेमुळं देव भेटला
म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली.
जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो. ही साठां उत्तरांची कहाणी. पांचां उत्तरी सुफळ
संपूर्ण.
द्वितीया श्राद्ध
अपराण्ह काळी द्वितीया तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण शुक्ल २ आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment