Saturday, 19 May 2018

दिनविशेष - २४ मे २०१८




तिथी
 अधिक जेष्ठ शुक्ल १० (१८:१८)   
वार
 गुरुवार
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (१९:४५)
योग
 वज्र (२१:००)
करण
 तैतिल (६:४३), गरज (१८:१८), वणिज(३०:००)


दशहरा समाप्ति

जेष्ठ शुक्ल प्रतिपदेपासून दशमी पर्यंत दहा दिवस गंगास्नान, गंगापूजन, गंगास्तोत्र पठण, दान, होम यापैकी शक्य ते करावे. 

गंगावतार/ दशहराव्रत

ज्येष्ठ शुक्ल दशमी दिवशी हस्त नक्षत्रावर श्रीगंगेचा जन्म (गंगावतरण ) झाला, म्हणून या दिवशी गंगेचे स्नान करुन (नदी-स्नान) अन्नवस्त्रदान, जप-तप, उपासना व उपवास करावा. त्यामुळे १० प्रकारची पापे (३ कायिक, ४ वाचिक, ३ मानसिक) नष्ट होतात. जर या दिवशी ज्येष्ठ, शुक्ल, दशमी, बुधवार,  हस्तनक्षत्र,  व्यातिपात योग  गरज कारण, आणि  वृषभस्थ रवी आणि कन्येचा चंद्र असेल तर हा महफलदायी अपूर्व योग मानला गेला आहे. या दिवशी अधिक योग एकत्र येत असल्याने पूर्वा व परा तिथी यांचा विचार गौण मानून ज्या दिवशी योगाधिक्य असेल तो दिवस निवडावा आणि स्नान, दान, जप, तप, व्रत करुन उपवास करावा जर ज्येष्ठ अधिक मास असेल, तर या गोष्टी अधिकात अधिक फलप्रद ठरतात. दशाश्‍वमेधांत १० वेळा स्नान करुन शिवलिंगाची दशगुणी (संख्या) गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य व फळांनी पूजा करावी व रात्री जागरण करावे म्हणजे अनंत फल मिळते.

गंगापूजन

ज्येष्ठ शुक्ल दशमी दिवशी गंगेकाठी कुठेही, अशक्य असल्यास जवळपासच्या जलाशयात अगर घरीच थंड पाण्याने स्नान करावे व सुवर्णपात्रात शुभ्र वस्त्रे नेसवलेली , शोभिवंत अभयमुद्रांकित, वरदहस्तयुक्त श्रीगंगेची प्रशान्त मूर्ती रेखाटावी अगर प्रत्यक्ष मूर्ती ठेवून तिच्या समोरच बसावे. नंतर
नमः शिवायै नारयण्यै दशहरायै गंगायै नमः |
पासून आवाहनादी षोडशोपचार पूजा करुन 'नमः' च्या जागी 'स्वाहा' म्हणून हवन करावे.
ॐ नमो भगवति ऐं र्‍ही श्रीं (वाक्-काम-मायामयि) हिलि हिलि मिलि मिलि गंगे मां पावय पावय स्वाहा ।
या मंत्राने पाच पुष्पांजली अर्पण करुन श्रीगंगेला भूमीवर आणले त्या भगीरथाचे आणि ती जेथून आली त्या हिमालयाचे नाम-मंत्राने पूजन करावे व १० फळे, १० दिवे व १० शेर गोडे तेल यांचे गंगायै नमः| म्हणून दान करावे. त्याचबरोबर तूपमिश्रित सातूच्या पिठात गूळ घालून त्याच्या गोळ्या कराव्यात व त्या पाण्यात सोडाव्यात. शक्यता असेल तर सोन्याचे कासव, मासा व बेडूक आदी जलचर यांचे पूजन करून पाण्यात सोडावेत. याशिवाय तेल, जवस, गहू प्रत्येकी दहा शेर ब्राह्मणाला दान द्यावेत. परदारा, परद्रव्य यापासून दूर राहावे. ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यन्त एकोत्तरवृद्धी (रोज १ वाढवून) दशहरास्तोत्राचे पठन करावे, म्हणजे सर्व पापे नष्ट होतात व दुर्लभ संपत्ती प्राप्त होते.

भद्रा

३०:०० नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

दशमी श्राद्ध

अपराण्ह काळी दशमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी अधिक जेष्ठ शुक्ल १० त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे. किंवा ज्यांचा गेल्या वर्षी (शके १९३९) जेष्ठ महिन्यात मृत्यू  झाला असेल आणि ज्यांची श्राद्ध तिथी त्यांचे जेष्ठ शुक्ल ९ आहे त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध या दिवशी करावे.
ज्या महिन्यात निधन झाले असेल तोच महिना अधिक मास येतो तेव्हा प्रथम वर्षश्राद्ध त्या अधिक महिन्यातच करावे. मात्र प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या निज जेष्ठ महिन्यात करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment