Sunday, 20 May 2018

दिनविशेष - २५ मे २०१८


तिथी
 अधिक जेष्ठ शुक्ल ११ (१७:४८)   
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 हस्त (१९:५९)
योग
 सिद्धि (१९:३६)
करण
 विष्टि (१७:४८), बव (२९:४१)

पद्मिनी (कमला)एकादशी

अधिक महिन्यातील शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला पद्मिनी किंवा कमला एकादशी म्हणतात. तसं तर प्रत्येक वर्षी २४ एकादशा असतात. मात्र जेव्हा अधिक महिना (मलमास) येतो, तेव्हा यांची संख्या वाढून २६ होते. अधिक महिन्यात शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला पद्मिनी एकादशी तर कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिला परमा एकादशी म्हणतात. भगवान
श्री कृष्णाने अर्जुनाला या व्रताचा विधी सांगितला होता.
हि एकादशी करण्यासाठी दशमीच्या दिवशी व्रताचा आरंभ करून एका पितळी भांड्यात भात इ. भोजन करावे. मात्र मीठ खाऊ नये. जमिनीवर झोपावे आणि ब्रह्मचार्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर प्रात:विधी झाल्यावर, दंतधावन करून १२ वेळा पाण्याच्या गुळण्या करून शुद्ध व्हावे.
सुर्योदयापूर्वी तीर्थस्थळी स्थानासाठी जावे. शेण, माती, तीळ, कुश आणि आवळा यांचे चूर्ण यांनी विधीपूर्वक स्नान करावे. श्वेत वस्त्र धारण करून भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करावी.

कथा

युधिष्ठिराने विचारले, 'हे मधुसूदना, अधिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? आणि तिचे माहात्म्य काय? हे मला कृपा करून सांग.'
श्रीकृष्ण म्हणाले, 'राजा, अधिक महिन्यात शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला पद्मिनी एकादशी म्हणतात.

पूर्वी त्रेता युगात हैहय नावाच्या राजाच्या वंशात कृतवीर्य नावाचा राजा महिष्मती नगरात राज्य करीत होता. त्या राजाला एक हजार परम प्रिय स्त्रिया होत्या. परंतु त्यांच्यापैकी कोणीही पुत्राला जन्म दिला नव्हता. त्यामुळे त्या राज्याला वारसदार नव्हता. देवता, पितर, ऋषी-मुनी तसेच अनेक चीकीत्सक इ. कडे त्या राजाने पुत्रप्राप्तीसाठी अनेक प्रयत्न केले. मात्र सगळे अपयशी ठरले. राजा वनामध्ये तपस्येसाठी जात असे.  इक्ष्वाकु वंशामध्ये उत्पन्न झालेल्या राजा हरिश्चंद्राची पद्मिनी नावाची मुलगी हि त्याची परमप्रिय पत्नी होती. एक दिवस, राजासोबत वनात जाण्यासाठी ति सज्ज झाली होती. दोघांनीही आपल्या अंगावरील उत्तम वस्त्र-अलंकाराचा त्याग करून वल्कले धारण  केली व ते दोघे गंधमादन पर्वतावर गेले.

राजाने त्या पर्वतावर दहा हजार वर्षे ताप केले तरीही त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही. तेव्हा पतिव्रता राणी कमलनयनी पद्मिनीला अनुसूयेने सांगितले कि - ३२ महिन्यांनतर येणारा मलमास (अधिक महिना) हा इतर बाराही महिन्यांपेक्षा श्रेष्ठ असतो. त्या महिन्यातील द्वादशीयुक्त शुक्ल पक्षातील एकादशीला जागरणासहित व्रत केल्यास तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या व्रतामुळे पुत्र देणारे देवता तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला लवकरच पुत्र देतील.

राणी पद्मिनीने पुत्र प्राप्तीच्या इच्छेने एकादशीचे व्रत केले. तिने एकादशीला निराहार राहून रात्री जागरण केले. या व्रताने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला पुत्र्प्रप्तीचे वरदान दिले. याच व्रतामुळे पद्मिनीला किर्तीवीर्य नावाचा पुत्र झाला. तो तीन्हीलोकात बलवान होता. तिन्ही लोकात देवातांशिवाय त्याला हरवण्याचे सामर्थ्य कोणाकडेच नव्हते.

त्यामुळे जे कोणी, मलमासासातील शुक्ल पक्षातील एकादशीला हे व्रत करेल, संपूर्ण कथा कथन अथवा श्रावण करेल त्यालाही याचे पुण्य प्राप्त होऊन विष्णुलोकाची  प्राप्ती होते.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥


घबाड

१९:५९ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: रोहिणी
चंद्र नक्षत्र : चित्रा
तिथी: शुक्ल १२ = १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

रवि रोहिणी नक्षत्र प्रवेश

१४:२० ला रवि रोहिणी नक्षत्रात प्रवेश करीत आहे.

भद्रा

१७:४८ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.


एकादशी श्राद्ध

अपराण्ह काळी एकादशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी अधिक जेष्ठ शुक्ल ११ त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे. किंवा ज्यांचा गेल्या वर्षी (शके १९३९) जेष्ठ महिन्यात मृत्यू  झाला असेल आणि ज्यांची श्राद्ध तिथी त्यांचे जेष्ठ शुक्ल ११ आहे त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध या दिवशी करावे.
ज्या महिन्यात निधन झाले असेल तोच महिना अधिक मास येतो तेव्हा प्रथम वर्षश्राद्ध त्या अधिक महिन्यातच करावे. मात्र प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या निज जेष्ठ महिन्यात करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment