तिथी
|
निज जेष्ठ शुक्ल ११ (२७:५३)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
स्वाती (२७:२०)
|
योग
|
शिव (२४:३०)
|
करण
|
वणिज (१५:३३), विष्टि (२७:५३)
|
निर्जला एकादशी
ज्येष्ठ शुक्ल एकादशीला निर्जला किंवा भीमसेनी एकादशी असे नाव आहे. सबंध
वर्षात दुसरी कोणतीही एकादशी न करता या एकादशीचे व्रत विधिपूर्वक केल्यास सर्व
एकादशी व्रतांचे पुण्य मिळते, असे सांगितले आहे. या व्रताचा विधी असा :-
एकादशीला आचमनाव्यतिरिक्त पाणी न पिता व काहीही न खाता उपवास करावा. रात्री
विष्णूच्या सुवर्णमूर्तीची षोडशोपचारे पूजा करावी. नृत्य-गायनाने ती रात्र
जागवावी. दुसर्या दिवशी सकाळी विष्णूची यथाविधी पूजा करुन ब्राह्मणभोजन घालावे व
जलकुंभ, सुवर्ण, छत्र, वस्त्र, व पादत्राण या वस्तू दान द्याव्या.
फल-दीर्घायुरारोग्य व स्वर्ग यांची प्राप्ती.
कथा
भीमसेनाने विचारले, 'हे पितामह व्यासा, तुम्ही महाबुद्धिवंत आहात. मी काय म्हणतो ते ऐका. युधिष्ठिर, कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल, सहदेव हे सर्वजण एकादशीला कधीही
भोजन करीत नाहीत. ते मला म्हणतात की, 'हे वृकोदरा, तूही एकादशीला जेवू नकोस.' आजोबा, मी त्यांना म्हणतो की, मला भूक सहन होत नाही. 'मी दाने देईन, केशवाची विधीपूर्वक पूजा करीन. पण
उपवास केल्याशिवाय एकादशी व्रताचे फळ कसे लाभेल ते सांगावे.'
भीमसेनाचे हे बोलणे ऐकून व्यास म्हणाले, 'भीमसेना, तुला नरक अनिष्ट वाटत
असेल, व स्वर्गाची इच्छा
असेल तर शुक्ल आणि वद्य पक्षातील एकादशांच्या दिवशी तू भोजन करू नकोस.'
भीमसेन म्हणाला, 'आजोबा, तुम्ही तर
महाबुद्धिवंत आहात. मी तुम्हाला खरे सांगतो की मला एकभुक्त राहणेही शक्य नाही. मग
माझ्याकडून उपवास कसा काय होणार? माझ्या पोटात वृक नावाचा अग्नी नेहमी प्रज्वलित असतो. मी खूप अन्न खातो तेव्हा
तो थोडा वेळ शमतो. मला वर्षातून एकच उपवास कसातरी करता येईल. तेव्हा मला नक्की
करून सांगा की मी हा एकच उपवास कोणता करावा. ज्या एकाच उपवासाने मला सर्व
एकादशींच्या उपवासाचे फळ मिळेल असा उपवास सांगा.'
व्यास म्हणाले, 'भीमा, तू मनुष्याने पाळायचे
नियम ऐकले आहेस. वैदिक धर्म काय आहे, हेही तू ऐकले आहेस. पण हे राजश्रेष्ठा, हे धर्म कलियुगात आचरणे शक्य नाही. थोड्या उपायात, थोड्या खर्चात, व अगदी कमी श्रमाने महाफल देणारे
सर्व पुराणांचे सार मी तुला सांगतो. ऐक. शुक्ल व कृष्ण या दोन्ही एकादशांना भोजन
करू नये. जो एकादशीला उपवास करतो, तो कधीही नरकाला जात नाही.'
व्यासांचे हे बोलणे ऐकून भीमसेन खूप घाबरला. आणि पिंपळाच्या पानासारखा थरथर
कापू लागला. तो म्हणाला, 'आजोबा, मी उपवास करण्यास
समर्थ नाही. म्हणून पुष्कळ फळ देणारे एकच एकादशी व्रत मला सांगा.'
व्यास म्हणाले, 'ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील सूर्य वृषभ किंवा मिथुन राशीत असताना जी
एकादशी येते, तिचा उपवास पाणीही न
पिता प्रयत्नपूर्वक करावा. स्नान आणि आचमन या कामापुरताच पाण्याचा उपयोग करावा.
तसे न केल्यास व्रतभंग होईल. हे व्रत करणार्याने एकादशीच्या सूर्योदयापासून
द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी वर्ज्य करावे. त्याने हा नियम पाळला तर त्याला
प्रयत्न केल्याशिवाय बारा एकादशा केल्याचे फळ मिळते.
द्वादशीच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करावे, ब्राह्मणाला विधीपूर्वक जलदान किंवा सुवर्णदान द्यावे. नंतर आवश्यक कृत्ये
करून आणि इंद्रिये व मन ताब्यात ठेवून ब्राह्मणांसह भोजन करावे.
भीमसेना, अशा प्रकारे व्रत
केल्यामुळे कोणते पुण्य मिळते ते ऐक.
सर्व वर्षात ज्या एकादशा येतात त्या सर्व एकादशाचे फल ही एकादशी केल्यामुळे
मिळते, यात संशय नाही. कारण
तसे मला शंखचक्रगदाधारी केशवानेच सांगितले आहे. या एकादशीचा उपवास पाणीही न घेता
केल्यास त्याचे काय फळ मिळते ते ऐक. हे वृकोदरा, सर्व तीर्थाचे जे पुण्य, सर्व दानांचे जे पुण्य ते या एकादशीनेच मिळते. सर्व वर्षातील शुक्ल व वद्य
पक्षातील ज्या धनधान्य देणार्या पुण्यकारक, पुत्र व आरोग्य वगैरे फळे देणार्या अशा सर्व एकादशांचे उपोषण केल्याचे एकत्र
फळ या एकच एकादशीच्या उपवासाने मिळते. हे नरव्याघ्रा भीमा, मी तुला हे अगदी सत्य सांगत आहे.
या एकादशीचे उपोषण करणार्याला त्याचे अंतःकाळी मोठ्या शरीराचे अक्राळ-विक्राळ, काळे, पिंगट दंड व पाश धारण करणारे भयंकर
यम दृष्टीस पडत नाहीत. हे नरव्याघ्रा, याच्या उलट त्याच्या अंतःकाळी पीतांबर धारण करणारे, सौम्य, शंखचक्र धारण करणारे व मनोवेगाने
जाणारे विष्णुदूत येतात आणि त्याला विष्णुलोकाला घेऊन जातात. म्हणून सर्व प्रयत्न
करून या एकादशीचे व्रत पाणी न पिता करावे व गाईचे दान करावे. म्हणजे मनुष्य सर्व
पापांतून मुक्त होतो.'
हे जनमेजया, व्यासाचे हे बोलणे ऐकून सर्व पांडवांनी या एकादशीचे उपोषण विधीपूर्वक केले.
भीमानेही त्या दिवसापासून या कल्याणकारक एकादशीचे व्रत केले म्हणून तेव्हापासून ही
निर्जला एकादशी 'पांडव एकादशी' किंवा 'भीमसेनी एकादशी' या नावाने सर्व लोकात प्रसिद्ध
झाली.
हे पृथ्वीच्या राजा, भीमसेनाने ज्यावेळी निर्जला एकादशीचे व्रत सुरू केले, त्यावेळी तो भुकेने व तहानेने
व्याकुळ झाला. त्याने दिवसाचे दोन प्रहर कसेतरी काढले तिसर्या प्रहरी भीमाला
उपोषण व तहान सहन होईना तेव्हा तो गंगेत जाऊन पुष्कळ वेळ पडून राहिला. नंतर त्याने
खूप वेळ स्नान केले. तेव्हा त्याला थोडीशी हुषारी वाटली. उपवासाची रात्र त्याने
फार कष्टात काढली याप्रमाणे त्याने व्यासाने सांगितल्याप्रमाणे व्रत पाळले. या निर्जला
एकादशीच्या भीमाने केलेल्या स्नानाचे स्मरण म्हणून दिवसाच्या तिसर्या प्रहरी
पुन्हा एकदा स्नान करावे हे राजा तूही सर्व पापाचे शमन व्हावे म्हणून हा उपवास
प्रयत्नपूर्वक कर. आणि भगवंताची आराधना कर.
एकादशीच्या दिवशी सकाळी शुद्ध होऊन पुढीलप्रमाणे संकल्प करावा.' हे देवेशा. आज हरिदिन आहे म्हणून
मी पाणीही प्राशन न करता उपोषण करीन व दुसर्या दिवशी पारणे करीन.' असा संकल्प करुन सर्व पापांच्या
नाशासाठी इंद्रियांचे संयमन करून श्रद्धायुक्त अंतःकरणाने उपवास करावा.
स्त्रियांचे किंवा पुरुषांचे पाप मेरू किंवा मंदार पर्वताएवढे जरी मोठे असले तरी
या एकादशीच्या प्रभावाने भस्म होऊन जाते. हे राजा, ज्याला धेनू दान करण्याचे सामर्थ्य नसेल त्याने घटात सुवर्ण घालून आणि तो
वस्त्राने गुंडाळून दान द्यावा.
या एकादशील पाणी न पिण्याचा जो नियम करतो तो मोठाच पुण्यवान होतो. कारण त्याला
उपवासाच्या प्रत्येक प्रहरागणिक चार कोटी तोळे सोने दिल्याचे पुण्य मिळते. जो
मनुष्य या एकादशीच्या दिवशी स्नान करुन दान, जप, होम वगैरे कर्मे करतो
त्याचे पुण्य कधीही नष्ट होत नाही, असे श्रीकृष्णानेच सांगितले आहे. निर्जला एकादशीचेउपोषण भक्तीने केले असता
वैष्णवपद प्राप्त होते. मग इतर नेम, नियम हवेतच कशाला? उपोषण करून जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी सोने, अन्न व वस्त्र दान देतो, त्याला त्याचे फळ अक्षय मिळते. या एकादशीच्या दिवशी जो अन्न जेवतो तो जणू पापच
भक्षण करतो व त्याला शेवटी दुर्गती मिळते. जे एकादशीला उपवास करून द्वादशीला दाने
देतात, ते अंती मोक्ष
मिळवतात.
ब्रह्मघातकी, मद्यपान करणारे, चोर, गुरूचा द्वेष करणारे, नित्य खोटे बोलणारे असे सर्व पातकी
या निर्जला एकादशीचे व्रत करतील तर ते सर्व पापातून मुक्त होतील.
निर्जला एकादशीच्या दिवशी इंद्रिय-निग्रह करून श्रद्धायुक्त अंतःकरणाने
स्त्री-पुरुषांनी आणखी काय करावे ते मी सांगतो, ऐक. त्या दिवशी जलाषयी नारायणाची पूजा करावी आणि धेनू दान द्यावी. किंवा
त्याऐवजी तुपाचे दान द्यावे. मोठ्या दक्षिणा देऊन व मिष्टान्न देऊन ब्राह्मण
संतुष्ट करावे. हे धर्मश्रेष्ठा राजा, ब्राह्मण संतुष्ट झाले म्हणजे त्यामुळे मोक्ष देणारा नारायण संतुष्ट होतोच.
जो हे निर्जला एकादशीचे व्रत करीत नाही, तो आत्मद्रोही असतो. तो पापी, दुराचारी व दुष्ट असतो, यात संशय नाही.
जे शांत, दानपर लोक जागरण करून
हे उपोषण करतात, व त्या दिवशी वासुदेवाची पूजा करतात ते आपल्या शंभर पूर्वजांसह विष्णुलोकाला
जातात.
या एकादशीचे पारणे करतना अन्न, पाणी, शय्या उत्तम आसन, कमंडलू व छत्र ही दाने द्यावीत. जो
मनुष्य पारण्याच्या दिवशी सत्पात्र ब्राह्मणाला जोडा दान देतो, तो निश्चितपणे सुवर्णाचे विमानात
बसून स्वर्गाला जातो. जे कोणी या एकादशीची कथा सांगतात किंवा भक्तिभावाने ऐकतात ते
सर्व स्वर्गलोकाला जातात, याविषयी शंका नाही. कुरुक्षेत्रामध्ये सूर्यग्रहणात श्राद्धविधी केल्याने जे
पुण्य मिळते, तेच पुण्य हे
माहात्म्य ऐकल्याने मिळते.
॥श्रीभारतातील व पद्म पुराणातील निर्जला एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
घबाड
२७:५३ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ
योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: आर्द्रा
चंद्र
नक्षत्र : विशाखा
तिथी: शुक्ल १२ = १२
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११
x ३ = ३३
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी
मिळवू : ३३ + १२ = ४५
आता
७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
भद्रा
१५:३३ नंतर २७:५३ पर्यंत
भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ
आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील
काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ
मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
एकादशी श्राद्ध
अपराण्ह काळी एकादशी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ शुक्ल ११ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment