Monday, 25 June 2018

दिनविशेष - २७ जून २०१८


तिथी
 निज जेष्ठ शुक्ल १४ (८:१३)   
वार
 बुधवार
नक्षत्र
 जेष्ठा (९:३५)
योग
 शुक्ल (२५:३६)
करण
 वणिज (८:१३), विष्टि (२१:१६)



पंचतपव्रत

ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशीला गार्हपत्य, दक्षीणाग्नी, सभ्य, आहवनीय व भास्कर हे पाच अग्नी प्रज्वलित करावेत व सर्व दिवसभर ते प्रज्वलित ठेवावेत. सायंकाळी शंकर प्रसन्न व्हावेत म्हणून सुवर्णाच्या गाईचे दान देऊन मग स्वतः जेवावे. त्यायोगे शंकर प्रसन्न होतात.

वटपोर्णिमा

सुवासिनी स्त्रियांनी सौभाग्यवृद्धीसाठी करावयाचे एक व्रत. हे ज्येष्ठ पौर्णिमेला करतात. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीपासून पौर्णिमेस हे त्रिरात्रव्रत करावे, असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल, त्यांनी फक्त पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून, सत्यवान सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा:
नदीकाठी वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्या. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर अर्घ्य द्यावे. मग पुढील मंत्राने सावित्रीची प्रार्थना करावी.-
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणि ।
तेन सत्येन मां पाहि दुःखसंसारसागरात् ।
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।
अवियोगस्तथाऽस्माकं भूयाज्जन्मनि जन्मनि ॥
पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनींसह सावित्रीची कथा श्रवण करावी.
या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रुढी मात्र वेगळी आहे. सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा तिथेच सजीव झाला, या संकेताला अनुसरुन स्त्रिया या दिवशी वडाचीच पूजा करतात. त्यासाठी त्या वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळाशी पाणी घालतात आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करतात; नंतर त्याच्या मुळाशी असलेल्या सावित्री-ब्रह्मदेव ; सत्यवान-सावित्री, धर्मराज व नारद यांच्या प्रतिमांचे पूजन करतात व प्रार्थना करतात. पूजेनंतर सुवासिनींना सौभाग्यवायने देतात.
व्रताचे उद्यापन करताना ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला अल्पाहार करतात. त्रयोदशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करतात. वटवृक्षाच्या मुळाशी किंवा घरी चंदनाने काढलेल्या वटवृक्षाच्या मुळाशी सर्वत्रोभद्र मंडलावर कलश मांडतात आणि त्याच्यावर सात धान्यांनी भरलेले वेळूचे शिप्तर ठेवतात. त्याच्या जवळच चांदीचा वटवृक्ष, लाकडांचा भारा, कुर्‍हाड , व चांदीचा रथ मांडतात. रथात चांदीचा पलंग मांडून त्याच्यावर ब्रह्मा, सावित्री, सत्यवान, त्याची पत्नी सावित्री, यमधर्म आणि नारद यांच्या सुवर्णाच्या प्रतिमा ठेवतात. सुवर्णाच्या प्रतिमा शक्य नसल्यास मातीच्या प्रतिमा ठेवतात व त्याची पूजा करतात. रात्री सावित्रीचे चरित्रकथन, नृत्य, गीते इ. कार्यक्रम करतात. चवथ्या दिवशी आचार्यद्वारा हवन व यथाशक्ती चोवीस, सोळा, बारा किंवा आठ दांपत्यांची पूजा करतात. गोदान, शय्यादान व प्रतिमादान देऊन आणि ब्राह्मणभोजन घालून व्रताची समाप्ती करतात.
भारतखंडात अनेक पतिव्रता प्रसिद्ध आहेत; पण त्यांत सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. एखाद्या सुवासिनीने दुसर्‍या स्त्रीला नमस्कार केला असता, ती 'जन्मसावित्री हो' असाच आशीर्वाद तिला देते. सावित्री हे भारतीय संस्कृतीत अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरले आहे.
बंगालमध्ये वटसावित्रीव्रत करण्याची रीत थोडी वेगळी आहे. बंगाली सुवासिनी या दिवशी आपल्या पतीची पूजा करतात. त्या प्रसंगी पतीच्या अंगाला सुगंधी तेल व चंदनाची उटी लावतात, त्याच्या गळ्यात फुलांचा हार गालतात आणि त्याला नवीन वस्त्र देतात. याव्यतिरिक्त , त्या यमाचीही पूजा करतात. आणि त्याला फुले, फळे व वडाची डहाळी अर्पण करतात.

वट सावित्री कथा

भद्र देशाचा राजा अश्वपी. त्याची एकुलती एक कन्या सावित्री. ती रूपसंपन्न व सद्‍गुणी मुलगी होती. ती उपवर झाली तेव्हा राजाने तिला, 'तू इच्छेप्रमाणे पतीची निवड कर' - असे सांगितले तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्राला वरले. सत्यावानाचा पिता द्युमत्सेन हा आंधळा व राज्यभ्रष्ट होता. म्हणून आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत असे.

सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुषी आहे हे देवर्षी नारदांना ठाऊक होते. म्हणून त्यांनी व अश्वपती राजाने सावित्रीला दुसर्‍या वराची निवड करण्यास सांगितले, परंतु 'ज्याला मी मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसर्‍या पुरूषाचा मी विचारही करणार नाही,' असे सावित्रीने निश्चयपूर्वक सांगिलते व सत्यवानाशीच विवाह केला.

काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला. तेव्हा सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. कारण नारद मुनींच्या सांगण्यावरून सत्यवानाच्या मृत्यूचा हा दिवस आहे ते दिला ठाऊक होते.
लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली. म्हणून एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी स्वत: यम तेथे आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. क्षणभरातच सत्यवानाचे प्राण हरण करून यम जाऊ लागला.
तशी सावित्रीही त्याच्यामागून निघाली. यमाने तिची समजूत घालून, तिला परत जाण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना, तिची पतिनिष्ठा व कर्तव्य यासंबंधी सुसंवाद व विद्वत्तापूर्ण विवेचन केले.
तिच्या वाक्चातुर्याने यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला चार वर देऊ केले, तेव्हा सावित्रीने त्याच्याकडून पहिल्या वराने श्वशुराला दृष्टी, दुसर्‍या वराने त्याला राज्यप्राप्ती, तिसर्‍या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ आणि चौथ्या वराने पतीचे-सत्यवानाचे प्राण मागून घेतले. अशा प्रकारे पतिव्रत्याच्या बळावर सावित्रीने पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वत:च्या दिव्य, अलौकिक गुणांमुळे ती जगात अजरामर झाली.

वृषभ पूजन (कारहुणवी) / एरुवाक पौर्णिमा

आंध्रमधल्या शेतकर्‍यांचा एक विशेष सण. शेतात नांगर धरण्याचा हा दिवस असतो. या दिवशी शेतकरी आपले बैल व आउते यांना धुऊन काढतात. बैलांच्या अंगावर नवे कपडे व दागिने घालतात. त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. मग गावातले सर्व शेतकरी मिळून गावभर त्यांची मिरवणूक काढतात. मग बैलांसह आपल्या शेतात जाऊन नांगरणीचा मुहूर्त करतात आणि एवढे झाल्यावर घरी परततात.
महाराष्ट्रातील शेतकरी बैलपोळा म्हणून हा सण साजरा करतात. हा सण महाराष्ट्रात निरनिराळ्या भागात मासभेदाने असतो. त्या दिवशी बैलांना कामास जुंपत नाहीत. नदी, तळे, विहीर अगर घरात सोय असेल त्याप्रमाणे बैल धुऊन काढतात. अंगावर नवी वस्त्रे, दागिने घालतात. नैवेद्य दाखवून ज्वारी, बाजरी वगैरेंचा खिचडा खावयास घालतात. बैलांच्या मिरवणुकी गावातून वाजतगाजत काढतात.  गावातील पाटील, कुलकर्णी (तलाठी) यांच्यासमोर गावच्या वेशीत तोरण बांधून चांगले दोन बैल, त्यांपैकी एक तांबडा व एक पांढरा पळवत आणतात. त्यांपैकी ज्या रंगाचा बैल शिंगाने तोरण तोडील , त्या रंगाचे धान्य त्या वर्षी अधिक पिकेल, असा अंदाज बांधतात.
या दिवशी घराबाहेर मातीच्या बैलाची पुजा करतात.
हा सण कर्नाटकात या अगोदर एक महिना करतात.

मन्वादि

१४ मन्वंतराच्या आरंभ झाल्या अशा १४ तिथीना मन्वादि असे म्हणतात. या मन्वादि १४ तिथी पुढे दिल्या आहेत.
स्वायंभुव
 चैत्र शुक्ल तृतीया
स्वारोचीस
 चैत्र शुक्ल पौर्णिमा
उत्तम
 कार्तिक शुक्ल पौर्णिमा
तामस
 आषाढ शुक्ल पौर्णिमा
रैवत
 कार्तिक शुक्ल द्वादशी.
चाक्षुस
  आषाढ शुक्ल दशमी.
वैवस्वत
 ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
सावर्णी
 फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
दक्ष सावर्णी
 आश्विन शुक्ल नवमी.
१०
ब्रह्म सावर्णी
 माघ शुक्ल सप्तमी
११
धर्म सावर्णी
 पौष शुक्ल एकादशी.
१२
रुद्र सावर्णी
 भाद्रपद शुक्ल तृतीया.
१३
देव / रुची सावर्णी
 फाल्गुन शुक्ल अमावस्या.
१४
इंद्र/ भूती सावर्णी
 श्रावण कृष्ण अष्टमी.
मनुबाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत म्हटले आहे

महर्षय: सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा !                                             
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा: !!                        
(श्रीमद्भ्गव्दगीता  अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण म्हणतात हे अर्जुना  सात महर्षी जन आणि त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु  हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन  माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

यमघंट योग

९:३५ नंतर बुधवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


यमघंट योगावर जन्म झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.

याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५, गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर पुढे) देखील यमघंट योग होतो.


भद्रा

८:१३ नंतर २१:१६ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.


पौर्णिमा श्राद्ध

अपराण्ह काळी पोर्णिमा तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ शुक्ल पोर्णिमा आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



जेष्ठ शुक्ल पौर्णिमेला असणारे नक्षत्र, वार आणि ग्रह स्थिती यांच्या संयोगानी इतरही काही योग होऊ शकता. यंदा असे योग होत नसले तरीही माहिती साठी ते पुढे देत आहे

बिल्वत्रिरात्रिव्रत

ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा ज्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र व मंगळ्वार असेल, त्या दिवशी तिलमिश्रित पाण्याने स्नान करुन बेलाच्या झाडाची गंधादी पदार्थांनी पूजा करावी व एकवेळ हविष्यान्नाचे भोजन करावे. जर त्या वेळी कुत्रा, डुक्कर अगर गाढव दृष्टीस पडले तर जेवणाचा त्याग करावा.याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला करुन वर्षअखेर समाप्तीच्या दिवशी बेलाच्या झाडाजवळ जाऊन एका भांड्यात १ शेर वाळू वा जव, गहू, तांदूळ व तेल भरावे, त्याचप्रमाणे आणखी एक भांडे वस्त्राने झाकून त्यावर उमा-महेश्‍वराची मूर्ती स्थापन करावी. त्यास दोन तांबडी वस्त्रे वाहावीत आणि नानापरिमल गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य वगैरेंने पूजा करावी व प्रार्थना करून बेलपानांच्या एक हजार आहुती द्याव्यात आणि यथाशक्ती सोळा अगर आठ दांपत्यांना वस्त्रालंकार देऊन जेवण घालावे. यायोगे सर्वप्रकारची अभिष्टसिद्धी प्राप्त होते.

महाज्येष्ठी

ज्येष्ठ पौर्णिमेला ज्येष्ठानक्षत्र असेल, चंद्र व गुरु यांची युती असेल आणि सूर्य रोहिणी नक्षत्रात असेल, तर तिला महाज्येष्ठी असे म्हणतात. या दिवशी जप, दान इ.केल्याने महाफळ प्राप्त होते.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment