Thursday, 30 August 2018

दिनविशेष - ३० ऑगस्ट २०१८






तिथी
श्रावण कृष्ण ४ (२२:१०)
वार
गुरुवार
नक्षत्र
रेवती (२०:०१)
योग
गंड (२०:३०)
करण
बव(९:५८), बालव (२२:१०)


श्रावणी गुरुवार

दर गुरुवारी बुध-बृहस्पति पूजन करावे.

संकष्टी चतुर्थी

पुणे चंद्रोदय: २१:३०
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे. या दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी. नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या प्रत्येक वेळी
'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः '
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना 'अमुक संकटनाशनार्थ' असे म्हणून त्या संकटाचा उल्लेख करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व शेवटी महानैवेद्य दखवून पारणे करावे. कथा ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.
मंगळवारी येणार्‍या चतुर्थीला 'अंगारकी संकष्टी ' म्हणतात. हा एक महान योग आहे. हे संकष्टीचे व्रत यथासांग करणार्‍यास वर्षातील सर्व चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते. यथाविधी व षोडशोपचारांनी गणपतीचे पूजन केल्यानंतर चंद्रोदय होताच चतुर्थी तिथीस, चंद्रास आणि श्रीगजाननास अर्घ्यप्रदान करावे. गजाननाची करुणा भाकावी. या व्रताच्या प्रभावाने साधकाची सर्व विघ्ने, संकटे दूर होतात. त्यास सर्व ऐहिक सुखे प्राप्त होऊन मंगलमूर्तीचे दर्शन होते, साक्षात्कार होतो, अशी लोकांत श्रद्धा आहे.

संकष्टी चतुर्थीची कथा

पूर्वी द्वारकेत सत्रजित नावाचा एक मोठा राजा होवून गेला. सत्रजित सूर्याचा मोठा भक्त होता त्याच्या उपासनेने. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. त्या मण्यात सूर्याचे तेज होते,. या मण्यामुळे राजास दररोज आठ भार सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित अभिमानी झाला.
सत्रजितची कन्या सत्यभामा हि अत्यंत रूपवती व सर्व कलासंपन्न होती ती कृष्णावर मनोमन प्रेम करायची त्यामुळे सत्राजित श्रीकृष्णाचा द्वेष करीत असे. सत्राजिताने सात्यकी बरोबर सत्यभामेचा विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला असता सात्यकीने विवाहास नकार दिला त्याला ठावूक होते कि सत्यभामेचे कृष्णावर प्रेम आहे,त्यामुळे सत्रजित श्रीकृष्णाचा अधिकच द्वेष करू लागला.
पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसंनजित हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याला ठार मारले व खावून टाकले पण तो दिव्यमणी सिहाच्या गळ्यात अडकला पुढे त्या सिंहास जांबुवंताने ठार केले व तो स्यमंतक मणी हस्तगत केला.
इकडे बंधू प्रसंनजित व स्यमंतक मणी दोन्ही गायब झाल्याने सत्रजितला कृष्णाचा संशय आला त्याने कृष्णावर मणी चोरल्याचा आरोप केला. चोरीच्या आरोपाने श्रीकृष्ण दुखी झाला व आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी कृष्ण अरण्याकडे निघाला. जंगलात एका गुहेतून दिव्य प्रकाश येत होता सैन्याला बाहेर थांबवून कृष्ण एकटाच गुहेत शिरला ती गुहा जांबुवंताची होती जम्बुवाताने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते. जांबुवंत हा ब्रम्हाचा पुत्र होता, लंकाविजयात त्याने रामाला साथ दिली होती त्याला आशीर्वाद होता कि श्रीकृष्णा शिवाय त्याला युद्धात कोणी हरवू शकत नव्हते,
जम्बुवान्ताला समजले कि तो प्रत्यक्ष प्रभूंशी युध्द करत आहे तेव्हा तो कृष्णाला शरण गेला इकडे गोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाची प्रार्थना केली व संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले.
श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. त्यांना घेवून श्रीकृष्ण द्वारकेत परतला त्याने सत्राजिताला मणी परत केला, तेव्हा सत्रजित लज्जित झाला सत्रजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागितली व त्याने आपली कन्या सत्यभामेशी श्रीकृष्णाचा विवाह लावून दिला् व अशा प्रकारे संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला.
दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण  होतात.दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. असे हे व्रत असते.

गोत्रव्रत

श्रावण कृष्ण चतुर्थीला स्त्रिया हे व्रत करतात. या चतुर्थीला 'बेल चौथ' असेही म्हणतात. व्रताचा विधी असा - एकवर्णी सवत्स धेनूची पूजा. 'तुझे सत्य माझी भक्‍ती' असे वाक्य गाईच्या कानात उच्चारणे. कथाश्रवण व नंतर भोजन. या दिवशी गोरसाचा कोणताही पदार्थ खात नाहीत. त्याचप्रमाणे सुरीने किंवा कात्रीने कापलेले कोणतेही पदार्थ खात नाहीत.
फल - पुत्रप्राप्ती व सौभाग्यवृद्धी.

रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रवेश

२६:५२ ला रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करत आहे. रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रवि नक्षत्र: पूर्वाफाल्गुनी
चंद्र नक्षत्र: आश्विनी

वाहन हत्ती

रवि नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
वाहन
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
घोडा
पर्वतावर पाऊस पडेल
कोल्हा
पाऊस पडणार नाही.
बेडूक
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
मेंढा
पाऊस पडणार नाही.
मोर
अल्पवृष्टी होईल.
उंदीर
अल्पवृष्टी होईल.
महिष
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
गाढव
अल्पवृष्टी होईल.
० / ९
हत्ती
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.

रवि नक्षत्र: पूर्वाफाल्गुनी
चंद्र नक्षत्र: आश्विनी
अंतर : १८
१८ ला ९ ने भागले असता बाकी राहते ०(शून्य) म्हणून वाहन हत्ती आहे. याचाच अर्थ रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात असताना भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.

नक्षत्रसंज्ञा : सू चं

सूर्य नक्षत्रे
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्रे
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती

दोन्ही सूर्य नक्षत्रे
 वारा सुटेल
दोन्ही चंद्र नक्षत्रे
 पाऊस पडणार नाही
एक चंद्र व दुसरे सूर्य
 पाऊस पडेल
रवि नक्षत्र: पूर्वाफाल्गुनी = सूर्य नक्षत्र
चंद्र नक्षत्र: आश्विनी = चंद्र नक्षत्र
एक सूर्य व दुसरे चंद्र नक्षत्र आहे. याचा अर्थ रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात असताना चांगला पाऊस पडेल.

स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री, पु

स्त्री नक्षत्रे
 आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
पुरुष नक्षत्रे
 अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा ,उत्तराभाद्रपदा, रेवती
नपुंसक नक्षत्रे
 विशखा, अनुराधा, जेष्ठा

सूर्य नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.

रवि नक्षत्र: पूर्वाफाल्गुनी = स्त्री नक्षत्र
चंद्र नक्षत्र: आश्विनी पुरुष नक्षत्र
एक स्त्री नक्षत्र तर दुसरे पुरुष नक्षत्रआहे. त्यामुळे रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात असताना समाधानकारक पर्जन्यवृष्टी होईल.

पावसाचा अंदाज घेताना या बरोबरच रविच्याच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.


घबाड

२०:०१ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मघा
चंद्र नक्षत्र : रेवती
तिथी: कृष्ण ४ = १५ + ४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

चतुर्थी श्राद्ध

अपराण्ह काळी चतुर्थी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण कृष्ण ४ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment