तिथी
|
श्रावण शुक्ल ७ (२५:०१)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
स्वाती (१६:११)
|
योग
|
शुक्ल (१५:३२)
|
करण
|
गरज (१२:५६), वणिज (२५:०१)
|
सीतला सप्तमी
या दिवशी
जलदेवतांची प्रार्थना केली जाते. वंशामधील जे कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते परत
मिळावेत म्हणून प्रार्थना केली जाते.
पापनाशिनी सप्तमी
हे व्रत श्रावण
शु. सप्तमी दिवशी जर हस्तनक्षत्र असेल तर उदयव्यापिनी धरून करतात. त्या दिवशी जगद्गुरू
चित्रभानूची पूजा करून दान,
पुण्य, हवन व व्रत केल्यास त्याचे अक्षय्य फल मिळते. सर्वप्रकारची
पापे, ताप दूर होतात
महालक्ष्मी स्थापना व पूजन
श्रावणातल्या शुक्रवारी
कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करावी. पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे
चित्र काढून त्याची पूजा करावी.
फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, कुंकू लावलेला २१ मण्यांचा
कापसाचा चौसर तिला घालावा. सवाष्णींना
भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार
करावा. श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करावी. ही पुजा संतती रक्षणार्थ मानली जाते. घरामधील
सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवतीमातेने त्यांचे रक्षण करावे अशी तिला मनोभावे प्रार्थना
करायची अशी प्रथा आहे.
श्रावणी शुक्रवार
दर शुक्रवारी जरा–जीवंतिका पूजन
करावे.
शुक्रवारची कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात असे. तो दारिद्र्यानं फार पिडला
होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गाईलं.
शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, “बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार
तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करावा, संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावे. तिला हळद-कुकूं द्यावं. तिची
ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभऱ्यांची खिरापत द्यावी.
नंतर आपण जेवावं. याप्रमाणं वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं” असं सांगितलं. ती घरी आली. देवीची
प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली.
त्याच गावांत तिचा भाऊ रहात असे. तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला. साऱ्या
गावाला आमंत्रण केलं पण बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं
दुसरे दिवशी भावाकडे ब्राह्मणांचे मारे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवीत आहेत.
बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे. बोलावणं करायला विसरला असेल. तर आपल्याला
भावाच्या घरी जायला काही हरकत नाही, असा मनांत विचार केला. सोवळे नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका
पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं
झालं. तेव्हां तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढतां वाढतां तिच्या पानाशीं
आला. ती खालीं मान घालून बसली होतीं. तिला हाक मारली, “ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही, तुझ्याकडे पाहून सगळे लोक मला
हसतात, ह्यामुळं मी तुला काही
बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या काही येऊ नको”. असं सांगून पुढं गेला. ही आपली
तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं.
मुलांना घेऊन घरी आली.
दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली, “आई आई, मामाकडं जेवायला चल.” बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला
म्हणून काय झालं? आपली गरीबी आहे. तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडाला, तितकाच फायदा झाला, असं म्हणून त्याही दिवशी भावाकडे
जेवायला गेली. भाऊ तूप वाढतां वाढतां तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली
होती. भावानं तिला हाक मारली, “ताई ताई, भिकारडी ती भिकारडी आणि
सांगितलेलं ऐकत नाही. तू जेवायला येऊं नको म्हणून काल सांगितलं, आज आपली डुकरिणीसारखी पोरं घेऊन
आलीस. तुला लाज कशी नाही वाटली? आज आलीस तर आलीस. उद्या आलीस तर तुला हात धरून घालवून देईन”. तिने ते मुकाट्यानं ऐकून घेतलं.
जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिलं. फार दुःखी
झाली, देवीची प्रार्थना
केली. सारा दिवस उपास पडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू
लागली.
असं करता करता वर्ष झालं. बाईचं दळिद्र गेले. पुढं एक दिवशी ती शुक्रवारचं
उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मनात ओशाळा झाला. बहिणीला म्हणूं
लागला, “ताई ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये.
नाही काही म्हणू नको. घरी काही जेवू नको. उद्या तू आलीस नाही तर मी काही तुझ्या
घरी येणार नाही”. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लौकर उठली, वेणीफणी केली. दागदागिने ल्याली, उंची पैठणी नेसली, शालजोडी घेतली आणि भावाकडे जेवायला
गेली. भाऊ वाट पहातच होता. ताई आली तसा तिचा हात धरला, पाटावर बसवली, पाय धुवायला ऊन पाणी दिलं. पाय
पुसायला फडकं दिलं. इतक्यात जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं.
भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शालजोडी काढून बसल्यापाटी ठेवली. भाऊ पाहू लागला.
मनात कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली.
बसल्यापाटी ठेवू लागली. भावानं विचार केला, जड झाले म्हणून काढीत असेल, नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला, तो उचलून सरीवर ठेवला, भाजी उचलून ठुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला. जिलबी उचलून
मोत्यांच्या पेंद्यावर ठेवली. भावानं विचारलं, “ताई ताई, हे काय करतेस?” ती म्हणाली, “दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू
जेवायला बोलावलंस तिला भरवते आहे.” भाऊ काही हे समजेना. त्यानं तिला पुन्हां सांगितलं, “अग ताई, तू आता जेव तरी”. तिनं सांगितलं, “बाबा, हे माझे जेवण नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं
जेवण होतं ते मी सहस्त्रभोजनाच्या दिवशी जेवले”. इतकं ऐकल्यावर भाऊ मनांत ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या
अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केली. नंतर दोघजणं जेवली. मनातली अढी काढून
टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला.
देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं, तसं तुम्हा आम्हा करो, ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
शुक्रवाराची जिवतीची कहाणी
ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता.
तेव्हां राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. “अग अग सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन”. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या
तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ही सुईण
तिच्या घरी गेली, तिला सांगू लागली की, “बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल
तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन”. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली, “बाईसाहेब, बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुक
अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं
सर्व मुलाचीच दिसताहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार
नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी
तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन”. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणं डोहाळ्याच डंभ केलं.
पोट मोठं दिसण्याकरितां त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं.
नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली.
इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावू आलं त्याबरोबर “तुम्ही पुढ व्हा, मी येते,” म्हणून सांगितलं. धावत धावत
राणीकडे आली, पोट दुखण्याचं ढोंग करू
सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. “बाई बाई, तुझी आहे पहिली खेप.
डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल” असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली, मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व
तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्यापुढे ठेविला. मग बाईचे डोळे
सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्ये
दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली.
मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं.
इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणामासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी
आणि नमस्कार करून म्हणावं की, “जय जिवतीआई माते! जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो”, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य
केलं. तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमी वागू लागली.
इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही
न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हा याची नजर तीजवर गेली. हा
मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला.
दारात गाय-वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला.
वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, “कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला”? तेव्हा ती म्हणाली, “जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय?” हे ऐकून राजा मागं परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी
घेतली.
काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला
पुष्कळ मुलं होत होती. पण ती पाचवी-सहावीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी
चमत्कार झाला. पाचवीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि
म्हणू लागली,
“कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे”? जिवती उत्तर करिते, “अग अग, माझं ते नवसाचं बाळ
निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही”. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती. त्यांनी हा
संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनी निघून
गेल्या. उजाडाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. “तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा.” अशी विनंती केली राजानं ती मान्य
केली. त्याही रात्री याचप्रमाणं प्रकार झाला.
दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशीत
गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर
आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, “घरी जा. साऱ्या गावातल्या
बायकापुरुषांस जेवायला बोलाव. म्हणजे याचे कारण समजेल.” मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला.
मोठ्या थाटानं मामदं केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली. “घरी कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांनी
जेवायला यावं”
ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला. “मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम
पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला
येईन.” राजानं कबूल केलं.
जिथं तांदुळाचं धूण होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या
भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवांखालून गेली नाही. दर वेळेस “जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो” असं म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा
थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं
आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला.
तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची
तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हां त्याची आई गेली. त्याची
समजूत करू लागली. तो म्हणाला, “असं होण्याचं कारण काय?” तिनं सांगितलं की, “ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई.” असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं
आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धा आपण राज्य
करू लागला.
तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ
संपूर्ण.
रवि सिंह राशीत प्रवेश
६:५० ला रवि सिंह राशीत
प्रवेश करीत आहे.
रवि संक्रमणाच्या
वेळी, सिंह राशीसाठी
संक्रमणापूर्वी १६ घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत.
पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून
पुण्यकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ तारखेस ६:५० ते १३:१४ असा आहे.
सामुदायिक
मुहूर्त १५ म्हणजे महर्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या वेळी असणाऱ्या चंद्र
नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व त्यांची फळे पुढील
प्रमाणे:
·
१५ : महर्घ /
जघन्य : फळ = तेजी
·
३० : साम्यार्घ :
फळ = सम
·
४५ : समर्घ : फळ
= मंदी
रवि मघा नक्षत्र पवेश
६:५० ला रवि मघा नक्षत्रात
प्रवेश करीत आहे. रविचे
मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला
जातो.
रवि
नक्षत्र : मघा
चंद्र
नक्षत्र: स्वाती
वाहन उंदीर
रवि
नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते
त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
|
वाहन
|
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
|
१
|
घोडा
|
पर्वतावर पाऊस पडेल
|
२
|
कोल्हा
|
पाऊस पडणार नाही.
|
३
|
बेडूक
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
४
|
मेंढा
|
पाऊस पडणार नाही.
|
५
|
मोर
|
अल्पवृष्टी होईल.
|
६
|
उंदीर
|
अल्पवृष्टी होईल.
|
७
|
महिष
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
८
|
गाढव
|
अल्पवृष्टी होईल.
|
० / ९
|
हत्ती
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
रवि
नक्षत्र : मघा
चंद्र
नक्षत्र: स्वाती
अंतर: ६
६
ला ९ ने भागले असता बाकी राहते ६. म्हणून वाहन उंदीर आहे. याचाच अर्थ रवि मघा
नक्षत्रात असताना अल्पवृष्टी होईल.
नक्षत्रसंज्ञा : चं सू
सूर्य नक्षत्रे
|
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा,
जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
|
चंद्र नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा,
पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती
|
दोन्ही सूर्य नक्षत्रे
|
वारा सुटेल
|
दोन्ही चंद्र नक्षत्रे
|
पाऊस पडणार नाही
|
एक चंद्र व दुसरे सूर्य
|
पाऊस पडेल
|
रवि
नक्षत्र : मघा = चंद्र
चंद्र
नक्षत्र: स्वाती = सूर्य नक्षत्र
एक चंद्र व दुसरे सूर्य नक्षत्र आहे. याचा अर्थ रवि मघा नक्षत्रात असताना चांगला पाऊस पडेल.
स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री, स्त्री
स्त्री नक्षत्रे
|
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा,
मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
|
पुरुष नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी,
मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा
,उत्तराभाद्रपदा, रेवती
|
नपुंसक नक्षत्रे
|
विशखा, अनुराधा, जेष्ठा
|
सूर्य
नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री
पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.
रवि
नक्षत्र : मघा = स्त्री
नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: स्वाती = स्त्री
नक्षत्र
दोन्ही
स्त्री नक्षत्र आहेत. त्यामुळे रवि मघा नक्षत्रात असताना अल्पवृष्टी
होईल.
पावसाचा
अंदाज घेताना या बरोबरच रविच्याच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह
स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.
पतेति
पारशी कालगणनेनुसार सन
१३८८ सुरु होत आहे.
पतेती हा पारशी मंडळींचा
नववर्ष दिन असतो.
पतितांना पावन करते ती
पतेती.
पारशी हे झरतुष्ट्राचे
अनुयायी. त्यांचं वर्ष तीनशेसाठ दिवसांचं असतं. उरलेले पाच दिवस (गाथा) फक्त
देवाचे असतात. या पाच दिवसांत अनेक प्रकारची व्रते करतात. या पाच दिवसांतल्या
शेवटच्या दिवसाचं नाव "पतेती".
पारशी लोक अग्नी पुजक आहेत.
"अहुरमझदा" म्हणजे ईश्वराचं प्रतिक म्हणून ते अग्नीची पूजा
करतात. या दिवशी सकाळी लवकर उठून अग्यारीत (पारशी प्रार्थना मंदिर ) जातात. तेथे
अग्नीला चंदनाच्या समिधांनी आहुती देतात.
घराची सजावट करतात. पांढरा शुभ्र कोट व पार्शी टोपी असा परंपरागत वेष
घालतात. मस्त गोड मेजवानी करतात.
पतेतीचा मुख्य
उद्देश.म्हणजे पश्चात्ताप व्यक्त करण्याची प्रार्थना करणे.
जमशेद नावाच्या बादशहाने या
सणाला सुरुवात केली. .म्हणून त्याचं नाव या सणाशी जोडून .पतेती नवरोजला जमशेदजी
नवरोज असेही म्हणतात.
प्रार्थना आणि सण दोन्ही
एकत्र जोडून साजरा करण्याची पारशांची पध्दत मोठी मनोज्ञ आहे
भद्रा
२५:०१ नंतर भद्रा म्हणजेच
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा
भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा
भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ
आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील
काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ
मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
सप्तमी श्राद्ध
अपराण्ह काळी सप्तमी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण शुक्ल ७ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म
करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment