तिथी
|
श्रावण शुक्ल ५ (२५:५२)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
हस्त (१६:१३)
|
योग
|
साध्य (१८:४४)
|
करण
|
बव (१४:३४), बालव (२५:५२)
|
स्वातंत्र्य दिन
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला
इंग्रजांपासून स्वतंत्र्य मिळाले. त्याच्या
गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक
राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच
देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरणूवका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा
केला जातो.
नागपंचमी
पुराणांमध्ये एक
कथा आहे. तक्षक नागाने केलेल्या अपराधाबद्दल सजा म्हणून राजा जनमेजयान सर्पयज्ञ
सुरू केला. या सर्पयज्ञात त्याने सर्व सर्पांच्या आहुती देणे सुरू केले. तक्षक नाग
मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. राजा जनमेजयान मग `इंद्राय स्वाहा:
तक्षकाय स्वाहा: ।’ असे म्हणत इंद्राचीही आहुती तक्षक नागाबरोबरच देऊन टाकली.
आपल्या या कृतीतून राजा जनमेजयान अपराध्याइतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच
अपराधी हे दाखवून दिले. आस्तिकऋषींनी राजा जनमेजयाला तप करून प्रसन्न करून घेतले.
जनमेजयान आस्तिकऋषींना `वर मागा’ असे म्हटले आणि मग आस्तिकऋषींनी सर्पयज्ञ थांबवावा, असा वर मागितला.
तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.
भगवान श्रीकृष्ण
कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस श्रावण
शुध्द पंचमी होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी
शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा
नाही, हे नियम पाळत
असतात. नागदेवता ची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा
नैवेद्य दाखविला जातो. व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
नागपंचमीची कथा
एका राज्यात एक
गरीब शेतकरी कुटुंब होते. त्या शेतकर्याला दोन मुले व एक मुलगी होती. एकदा शेतात
नांगर फिरवत असताना शेतकर्याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण
पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला. त्यानंतर नागिणीच्या मनात त्या
शेतकर्याविषयी सूडाची आग धगधगू लागली. एके दिवशी तिने शेतकर्याचा सूड घ्यायचे
ठरवले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागीण शेतकर्यासह त्याची पत्नी व दोन मुलांना
डसली.
दुसर्या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्याच्या
मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागीणीला पाहताच शेतकर्याच्या मुलीने
नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकर्याच्या मुलीची
श्रद्धा पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिणीने तिचे आई-वडील व दोन
भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा. या दिवसापासून नागदेवतेचा
कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणार्या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले
जाते.
नवनाग पूजन
१)
अनंत
२)
वासुकी
३)
शेष
४)
पद्मनाभ
५)
कंबल
६)
शंखपाल
७)
धृतराष्ट्र
८)
तक्षक
९)
काल
वरील नऊ नागांचे
चित्र पाटावर किंवा भिंतीवर रक्तचंदनाने काढून किंवा छापील चित्राचे पूजन करावे.
श्रावणी
ऋक् शुक्ल यजु: हिरण्यकेशी श्रवणी
ऋक् श्रावणी (उत्सर्जन व उपाकर्म)
जुने जानवे टाकुन नवीन जानवे घालणे, पुन्हा नव्याने अध्ययन करणे, हा सांघिक स्वरुपाचा कुलाचार आहे.
त्यावेळी वेगवेगळ्या देवतांचे पुजन होम - हवन विधी करतात.
१)
ॠग्वेदीयांना श्रावण शुक्ल पक्षात श्रवण
नक्षत्र हा मुख्य काल सांगितला आहे. तो न साधेल तर पंचमी अथवा हस्त नक्षत्र घ्यावे.
२)
ऋग्वेदीयांनी पूर्वाण्हात
श्रावणी करावी.
३)
यजुर्वेदीयांना श्रावणी करिता श्रावणातील पौर्णिमा हा मुख्य
काळ सांगितला आहे
जेव्हा दोन दिवस सूर्योदयव्यापी पौर्णिमा असेल तेव्हा पूर्व दिवसाची घ्यावी.
४)
तैत्तरीय शाखीयांनी दुसऱ्या दिवशी ४-६ घटिकांहून अधिक
आणि १२ घटिकांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या दिवशीची घ्यावी.
५)
हिरण्यकेशी
तैत्तारीयांनी श्रावण पौर्णिमा
हा मुख्य काळ घ्यावा. तो न साधेल तर संगवकाळाला स्पर्श करणारे श्रावणातील
हस्त नक्षत्र घ्यावे.
६)
आपस्तंबांच्या श्रावणीला श्रावणातील पौर्णिमा हा मुख्य काळ
सांगितला आहे. ती न मिळेल तर भाद्रपदातील पौर्णिमा घ्यावी.
७)
बौधायनांना श्रावणातील पौर्णिमा हा मुख्य काळ आहे. ती न
मिळेल तर आषाढातील पौर्णिमा घ्यावी.
८)
कात्यायन, काण्व-माध्यंदिन यांना श्रावण महिन्यातील श्रवणयुक्त पौर्णिमा, किंवा श्रावणातील केवळ
पौर्णिमा किंवा हस्तयुक्त पंचमी किंवा केवळ पंचमी हे मुख्य काळ आहेत. श्रावणातील
पौर्णिमा किंवा पंचमी न साधल्यास भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा किंवा पंचमी घ्यावी.
९)
सामवेदीयांना भाद्रपद शुक्ल पक्षातील हस्त नक्षत्र हा
प्रमुख काळ आहे. संक्रांति## इ. दोषांमुळे तो
न मिळाल्यास श्रावणातील हस्त नक्षत्र घ्यावे.
सामवेदीयांना उपाकर्माला अपराण्हकाल हा मुख्य काल सांगितला आहे.
१०)
अथर्ववेदीयांना श्रावणी पौर्णिमा किंवा भाद्रपद पौर्णिमा हा
प्रमुख काळ आहे. यासाठी सूर्योदयापासून सांगवकाळापर्यंत तिथी घ्यावी.
सर्वच शाखांसाठी
श्रावणीसाठी ग्रहणकाळ संक्रतीकाळ वर्ज आहेत.
·
श्रावण अधिक असेल
तर कोणाचीच श्रावणी करू नये.
·
नवीन मौंजी
झालेल्यांनी नवी श्रावणी (प्रथम उपाकर्म) करण्यासाठी वरीलपैकी जो योग्य आहे तो
दिवस घ्यावा. मात्र त्यामध्ये गुरु-शुक्रांचे अस्त, सिंहस्थ गुरु, तिथी क्षय, भद्रा वर्ज करावे.
श्रावणी बुधवार
दर बुधवारी बुध-बृहस्पति पूजन करावे.
बुध - बृहस्पतींची कहाणी
ऐका बुध-बृहस्पतींनो, तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या.
त्याच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेला जात. राजाच्या सुना “आमचे हात रिकामे नाहीत” म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस
गेल्यावर त्यांस दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणं
भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं, “असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले”. सर्वांत धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला. होतं तेव्हां दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण
विन्मुख जातात.
ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, “आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखी
होऊ, असा काही उपाय सांगा,” ते म्हणाले, “श्रावणमासी दर बुधवारी आणि
बृहस्पतवारी जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास
दाराच्या पाठीमागं दोन बाहुली काढावी. संपत्ति पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर
काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा. म्हणजे इच्छित हेतु
पूर्ण होतात.”
त्याप्रमाणे ती करूं लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं, “ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढते
आहे.” ही गोष्ट तिनं आपल्या
जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली.
इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा
बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं? हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली व
तिला नगरात फिरविलं, “ज्याच्या गळ्यांत माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल,” अशी दवंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या
बाईच्या नवर्याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा
हत्तीण फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यांत माळ घातली. याप्रमाणं तीनदां झालं. पुढं
त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा ती अन्न अन्न करून देशोधडीस
लागल्याची खबर समजली.
मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले, तिथं त्याची माणसं आली. राजानं
आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुध-बृहस्पतीच्या व्रताची व
स्वप्नाची हकीकत कळविली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट
केला. हिच्या हातांत चांदीचं भांडं दिलं. तूप वाढू सांगितलं. ब्राह्मण जेवून
संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. त्याचा सन्मान केला. मुलंबाळं झाली. दुःखाचे
दिवस गेले. सुखाचे दिवस आले.
जशी त्यांवर बुध-बृस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत.
ही साठां उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
घबाड
२५:५२ नंतर घबाड
योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: आश्लेषा
चंद्र नक्षत्र : चित्रा
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य नक्षत्र ते
चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल
प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८
+ ६ = २४
आता ७ ने
भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून
घबाड.
पंचमी श्राद्ध
अपराण्ह काळी पंचमी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण शुक्ल ५ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment