Thursday, 20 September 2018

दिनविशेष - २३ सप्टेंबर २०१८


तिथी
भाद्रपद शुक्ल १४ (अहोरात्र)
वार
रविवार
नक्षत्र
शततारका (२१:५०)
योग
शूल (२८:१२)
करण
गरज (--:--), गरज (१८:३५)


अनंत चतुर्दशी / अनंतव्रत

हे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशी दिवशी करतात. यासाठी उदयव्यापिनी तिथी घेतात. पौर्णिमायुक्‍त असेल तर फल अधिक वाढते. कथेच्या अनुरोधाने जर मध्याह्नपर्यंत चतुर्दशी असेल तर उत्तम मानतात. स्वत:स काही अडचण असेल तर ब्राह्मणाकडून पूजा करावी. कारण हे व्रत इतर कोणत्याही सोयीच्या दिवशी करता येत नाही. आणि या व्रताचा लोप होत. नाही.

व्रत करणार्‍याने त्या दिवशी प्रात:स्नान करून
'ममाखिलपापक्षयपूर्वक शुभफलवृद्धये श्रीमदनन्तप्रीतिकामनया अनंतव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून जागा सुशोभित करावी. चौरंगास कर्दळी लावून त्यावर साक्षात नाग अगर दर्भाचा बनवलेला सप्तफणांचा शेषस्वरूप अनंत याची प्रतिष्ठापना करावी. त्याच्यापुढे १४ गाठींचा रेशमाचा अनंतदोरक ठेवून आम्रपल्लवांसह पंचामृतादी धूप, दीप, गंध, फूल वगैरे षोडशोपचारांनी पूजा करून नैवेद्य अर्पण करावा.
"नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर ।
नमस्ते सर्व नागेन्द्र नमस्ते पुरुषोत्तम ॥"
असा श्‍लोक म्हणून नमस्कार करावा,
'न्यूनातिरिक्‍तानि परिस्फुटानि यानीह कर्माणि मया कृतानि ॥
सर्वाणि चैतानि मम क्षमस्व प्रयाहि तुष्ट: पुनरानमनाय ॥'
या मंत्राने विसर्जन करावे आणि
'दाता च विष्णुर्भगवाननन्त: प्रतिगृहीता च स एव विष्णु: ।
तस्मात्त्वया सर्वमिदं ततं च प्रसीद देवेश वरान् ददस्व ॥'
या मंत्राने वाण द्यावे बिनमिठाचे पदार्थ खावेत. .

कदलीव्रत

भाद्रपद शुक्ल चतुर्दशी दिवशी केळी (कर्दळी ) च्या झाडाखाली बसुन अनेक प्रकारच्या फळा - फुलांनी व धूप - दीप दाखवून त्याची पूजा करावी. सप्त धान्य, रक्‍तचंदन, घृतदीपक, दही, दूध अक्षता, वस्त्र, तुपात तळलेला नैवेद्य, जायफळ, सुपारी व प्रदक्षिणा यांनी अर्चना करून
'चिन्तयेत्कदलीं नित्यं कदलै: कामदीपितै: ।
शरीरारोग्यलावण्यं देहि देवि नमोऽस्तु ते ॥
अशी प्रार्थना करावी. याप्रमाणे ३ अगर ४ महिने केल्यास त्या वंशात स्त्री पातकी निघत नाही व सर्व पुत्रपौत्रादींसह सुदैवी व सदाचारिणी होतात.

पालीव्रत

भाद्रपद शुक्ल चतुर्दशी दिवशी चारी वर्णांपैकी कुणीही कुलस्त्रीने जलाशयावर जाऊन अक्षता घेऊन त्याचे मंडल करावे. त्यावर वरुणाची मूर्ती अथवा वारुण यंत्र स्थापन करावे. त्याची गंध-फुलांनी पूजा करावी.
'वरुणाय नमस्तुभ्यं नमस्ते यादसां पते ।
अपांपते नमस्तुभ्यं रसानां पतये नम: ॥'
या मंत्राने अर्घ्य द्यावा आणि
'माक्लेदं मा च दौर्गन्ध्यं वैरस्यं मा मुखेऽस्तु मे ।
वरुणो वारुणीभर्ता वरदोऽस्तु सदा मम ॥'
अशी प्रार्थना करून ब्राह्मणांना भोजन घालावे व मग स्वत: जेवावे.

भारतीय अश्विन मासारंभ

भारतीय कालगणनेनुसार अश्विन मास आरंभ होत आहे.

तुलायान

७:२३ ला रवि सायन तूळ राशीत प्रवेश करीत आहे.

चतुर्दशी श्राद्ध

अपराण्ह काळी चतुर्दशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी भाद्रपद शुक्ल १४ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment