Tuesday, 4 September 2018

दिनविशेष - ९ सप्टेंबर २०१८


तिथी
श्रावण कृष्ण अमावस्या (२३:३२)
वार
रविवार
नक्षत्र
मघा (८:०१), पूर्वाफाल्गुनी (२९:४१)
योग
सिद्ध (१४:४३)
करण
चतुष्पाद (१३:०६), नाग (२३:३२)


श्रावणी रविवार

दर रविवारी गभस्ति सूर्याचे मौनाने पूजन करावे.

दर्श अमावास्या

अपराण्हकाली जास्त मानाने असणाऱ्या अमावास्येलाच "दर्श अमावास्या" असे म्हणतात. अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.

पिठोरी अमावस्या

एक काम्य व्रत. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून, चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. या व्रताचे विधान असे -
श्रावण अमावस्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापावे. त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्‍वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्‍या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन 'कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी 'मी आहे' असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे.

कहाणी

पिठोरी म्हणजे श्रावण अमावस्या. या दिवशी महिला उपवास करतात. सायंकाळी स्न करून घरातल्या मुलाला किंवा मुलीला खीरपुरीचे जेवण देतात. या दिवशी ६४ योगिनींच्या चित्राची महिला पूजा करतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत 'अतीत कोण?' असा प्रश्न विचारायचा असतो. त्याचे उत्तर म्हणून आपल्या मुलाचे नाव घ्यायचे. म्हणजे हा पुत्र किंवा कन्या दीर्घायुषी होतात, अशी श्रद्धा आहे.

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याच्या घरीं श्रावणांतल्या अंवसेच्या दिवशीं बापांचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशीं श्राद्ध त्या दिवशीं सकाळपासून त्याच्या सुनेचें पोट दुखूं लागें व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं. म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं सहा वर्षं झालं. सातव्या वर्षीहि तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. तें मेललं पोर तिच्या ओटींत घातलं. तिला रानांत हांकून लावलं. पुढं जातां जातां ती एका मोठ्या अरण्यांत गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तूं कोणाची कोण ? इथं येण्याचं कारण काय ? आलीस तशी लौकर जा. नाहीं तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील !

तेव्हां ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करतांच मी इथं आल्यें आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तूं इतकी जिवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अंवसेच्या दिवशीं बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशीं आमच्या घरीं माझ्या आजेसास-याचे श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणं माझीं झालीं. सातव्या खेपेलाहि असंच झालं. तेव्हा मामंजींना माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं सात वर्षे उपाशी राहिला, तर तूं घरांतून चालती हो ! असं म्हणून हें मेलेलं मूल माझ्या ओटींत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आले. आता जगून तरी काय करायचं आहे ? असं म्हणून रडूं लागली.

तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तूं भिऊं नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून रहा. रात्री नागकन्या, देवकन्या साती आसरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथि कोण आहे म्हणून विचारतील. असं झाल्यावर मीं आहे म्हणून म्हण. त्या तुला पहातील. कोण, कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हां तूं सगळी हकीकत त्यांना सांग ! ब्राह्मणाच्या सुनेनं बर म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तों एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहूं लागली. तों जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यांत रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आस-यांच्या स्वा-यासुद्धां आल्या. त्यांनीं शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथि कोण आहे ? म्हणून विचारलं.

त्याबरोबर ती खालीं उतरली मीं आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनीं मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या- देवकन्यांनीं तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हां आसरांनीं ती दाखवली. पुढं त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हें व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकीं हें व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिनं विचारलं, ह्यानं काय होतं ? आसरांनी सांगितलं. हें व्रत केलं म्हणजे मुलबाळं दगावत नाहीत, सुखासमाधानांत राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली.

ती आपल्या गांवांत आली. लोकांनी हिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितलं. भटजी भटजी, तुमची सून घरीं येते आहे. त्याला तें खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला, तों मुलबाळं दृष्टीस पडूं लागली. पाठीमागून सूनेला पाहिलं. तसा उठला, घरांत गेला, मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरांत आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलांबाळांसुद्धां सुखानं ती नांदू लागली. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

मातृदिन

भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला  रात्री ६४ योगिनी यांची पूजा केली जाते, ही पूजा ज्यांची मुले जगत नाहीत अशा स्त्रियांनी करावयाची आहे, त्या पूजेमुळे मुले जगतात असे फळ सांगितले असल्याने त्या योगिनी मातृवत होतात म्हणून त्या दिवसाला मातृदिन असे रूढार्थाने म्हटले असावे.
आपल्या आईबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भारतीय संस्कृतीमध्ये मातेच स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे.
ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे. तिला सर्वांहून अधिक घनिष्ट आणि प्रिय मानले गेले आहे.
अथर्ववेदामध्ये 'मात्रा भवतु सम्मना:' पुत्राने मातेला अनुकूल असा मनोभाव धारण करून राहावे असे सांगितलेले आहे.
प्राचीन काळी गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत. त्यात "मातृदेवो भव" मातेची देवाप्रमाणे पूजा कर असे सांगत असत. वसिष्ठाने मातेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना पुढीलप्रमाणे म्हटले आहे -
"दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे. शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे आणि एक सहस्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे."

धर्मसूत्रांनी मातेची सेवा-शुश्रूषा आणि तिचे भरणपोषण हे पुत्राचे आवश्यक कर्तव्य म्हणून सांगितलेले आहे. गौतम ऋषींचा पुत्र चिरकारी याने मातृमहात्म्याचे सुंदर चित्र इंद्रापुढे उभे केले होते.

नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति:|
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया||

मातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.

चिरकारी पुढे म्हणतो - "ती मुलांना जन्म देते म्हणून जननी. त्यांच्या अंगप्रत्यंगांना पुष्टी देते म्हणून अंबा आणि वीर संतती उत्पन्न करते म्हणून विरप्रसू म्हटले जाते. माता हे सर्व पीडितांचे सुख आहे. ती असते म्हणून लोक सनाथ असतात आणि ती गेल्याने अनाथ होतात.

सतीपूजन

याच दिवशी सतीचे पूजनही करतात. सर्व सौभाग्यवायने, आभूषणे एकत्र करून त्याला सात प्रदक्षिणा करतात. यात घरच्या मुलींनी भाग घ्यायचा नसतो.

वृषभपूजन (पोळा)

वर्षभर शेतात कष्ट करून बळीराजाला(शेतकऱ्याला) शेतातून सोनं(धान्य) पिकवून देणाऱ्या बळीराजाच्या खऱ्या मित्राचा हा सण आहे.
वर्षभर उन,वारा आणि पावसात सतत कष्ट करणारे "बैल" यांच्यासाठी हा सोन्याचा दिवस.
सर्व शेतकरी बांधव अगदी देवाप्रमाणे आपल्या या मित्राला सजवून अगदी डौलात त्यांची मिरवणूक काढतात.
कारण बळीराजासाठी ते देवापेक्षा कमी नसतात.
मिरवणुकीनंतर मग त्यांना मानाचा"पुरणपोळी" चा नैवेद्य दाखवतात.

दर्भाहरण / कुशग्रहणी

हे व्रत श्रावण अमावस्येदिवशी सकाळी करतात. शास्त्रानुसार
'कुशा: काशा यव दूर्वा उशीराश्‍च सकुंदका: ।
गोधूमा ब्राह्मयो मौजा दशदर्भा सबल्बजा" ।'
असे दहा प्रकारचे कुश ( दर्भ ) सांगितले आहेत. यांतील जे मिळतील ते घ्यावेत. ज्या दर्भाचे मूळ तीक्ष्ण असेल, त्याला सात पाने असतील, शेंडा तोडला गेलेला नसेल व हिरवा असेल, तो देव व पितृ दोन्ही कार्यात चालतो. यासाठी दर्भ असलेल्या ठिकाणी जाऊन अमावस्येदिवशी पूर्व वा उत्तराभिमुख बसून
'विरंचिनासहोत्पन्न परमेष्ठिन्निसर्गज ।
नुद सर्वाणि पापानि दर्भ स्वस्तिकरो भव । हुं फट्'
हा मंत्र उच्चारून कुशदर्भाला उजव्या हाताने उपटावे व आणावेत. या दिवशी तोडून आणलेले दर्भ वर्षभर उपयोगात आणतात.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

अमावस्या श्राद्ध

अपराण्ह काळी अमावस्या तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण कृष्ण ३० आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment