Saturday, 15 September 2018

दिनविशेष - २० सप्टेंबर २०१८


तिथी
भाद्रपद शुक्ल ११ (२५:१७)
वार
गुरुवार
नक्षत्र
उत्तराषाढा (१३:४४)
योग
अतिगंड (२६:२८)
करण
वणिज (११:५९), विष्टि (२५:१७)


परिवर्तिनी एकादशी

या दिवशी भगवान श्री विष्णू आपली कूस बदलतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे नाव आहे.

शुक्लैकादशी / विजया एकादशी

भाद्रपद शुक्ल पद्मा एकादशीला पहाटे प्रात:स्नानादी कृत्ये झाल्यावर भगवंताची यथाविधी पूजा करावी. उपवास करून रात्री हरिजागरण करावे व दुसरे दिवशी पूर्वान्ही (सकाळी) पारणे करावे जर सकाळी श्रवणनक्षत्राच्या मध्याच्या २० घटिका असतील तर भोजन करू नये. तसेच, जर मध्यान्हीच्या पुर्वी श्रवणाचा मध्य अंश नसेल, तर पाणी पिऊन पारणे करावे.
जर या दिवशी श्रवणनक्षत्र असेल तर या एकादशीला 'विजया एकादशी' म्हणतात. या व्रताने सर्व मनोरथ पूर्ण होतात. या दिवशी 'श्रीवामना'ची पूजा करतात. व्रत करणार्‍याने त्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर 'श्रीवामना'ची सोन्याची मूर्ती करून तिची गंधफुलांनी यथाविधी पूजा करावी व त्यावेळी 'मत्स्य, कूर्म, वराह' आदी नामांचा उच्चार करावा. रात्री जागरण करावे. दुसरे दिवशी असलेले देय द्रव्य ब्राह्मणांना दान देऊन, त्यांना भोजन घालून नंतर आपण स्वत: जेवावे व व्रताची सांगता करावी.

कटिपरिवर्तनोत्सव

भाद्रपद शुक्ल एकादशीला भगवंताचा कटिपरिवर्तन ( कूसबदल ) उत्सव करतात. त्या दिवशी 'देवप्रबोधिनी' एकादशीप्रमाणे सर्व विधी करतात. देवाला स्नान, रथयात्रा वगैरेसह समारंभाने आणून सायंकाळी महापुज व नीरांजनांनी आरती करून रात्री देवास उजव्या कुशीवर निजवावे व जागरण करावे. दुसरे दिवशी सकाळी '
'वासुदेव जगन्नाथ प्राप्तेअयं द्वादशी तव ।
पार्श्‍वेन परिवर्तस्व सुखं स्वापिहि माधव ॥'
अशी प्रार्थना करून पारणे सोडावे. राजपुतान्यात या उत्सवाला' जलझूलनी' असे नाव असून सामान्यपणे अथवा विशेष प्रकाराने हा साजरा करतात.

कर्मावर्मा

हे व्रत उत्तरभारतात प्रचलित आहे. हे व्रत भाद्रpad शुक्ल एकादशीस सायंकाळी करतात. या दिवशी बायका आपल्या परसात दोन खळगे करून एकात पाणी व दुसर्‍यात दूध ओततात. त्या दोन खळग्यांच्या मध्यभागी कुशतृणाचे रोप लावतात. जितके भाऊ असतील, तितकी कुशाची पाती आपल्या केसात खोचतात. विष्णूची पूजा करून केवळ फलाहार करतात. दुसर्‍यादिवशी खळग्यातले दूधपाणी, कुश, निर्माल्य सर्व नदीत नेऊन सोडतात. ब्राह्मणाला शिधा देतात व व्रताचे पारणे करतात. या व्रतामुळे स्वत:च्या व बंधूंच्या सर्व आपत्ती दूर होतात, अशी समजूत आहे.

घबाड

२५:१७ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराफाल्गुनी
चंद्र नक्षत्र : श्रवण
तिथी: शुक्ल १२ = १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

मोहरम

मोहरम किंवा मुह्हरम हा एक मुस्लिम सण आहे. इस्लाम साठी मोहरम हा वर्षारंभ मानतात. 
पैगंबर म्हणजे इस्लामचा 'पैगाम 'म्हणजे संदेश माणसापर्यंत पोचवणारा. पैगंबराने हा धर्म निर्माण केला. त्याला या धर्माचा 'इलहाम' झाला. त्याला जेव्हा याचा 'इलहाम' झाला म्हणजे दृष्टांत झाला त्यावेळेस त्याला आपण काय बोलत आहोत, कुठे आहोत याची जाणीव उरलेली नव्हती. त्या दिवसापासून याला, "सल्लील्लाहू अलेह वसल्लम हजरत पैगंबर नबी" असे म्हणू लागले. सुरवातीस हा युद्ध व रक्तपातास निशिद्ध असा महिना होता. हा महिना तसा पवित्र होता, परंतु इमाम हुसेन याच्या वधाची घटना याच महिन्यात घडली म्हणून हा महिना अशूभ ठरला. हजरत पैगंबर नबी साहेबांचे मुलीकडून नातू असलेले हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी म्हणजे सुन्नी पंथाच्या खलीफांनी इ.स. च्या सातव्या शतकात करबला मैदानात "दर्दनाक मौतीचा" अविष्कार करत ठार मारले.हा ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात विदेशी आक्रमक लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केला. या ताबुताचे तोंड मक्केकडे यांच्या श्रद्धास्थानाकडे करतात. हुसेनचे हत्याकांड झाले त्या दिवशी शत्रूने हुसेनच्या नातेवाईकांना पाणीही मिळू होऊ दिले नाही, म्हणून आज थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात. शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त भारत, पर्शिया व इजिप्तमध्ये पाळतात. हा प्रकार अरबस्तानात पाळत नाहीत. ते हा प्रकार अधार्मिक मानतात. कट्टर मुसलमान ताबूत हा मुर्तीपुजेचा प्रकार म्हणून निषिद्ध मानतो. शेवटच्या दिवशी एका दांडक्याला 'पंजा' लावून चांगले वस्त्र बांधतात.

भद्रा

११:५९ नंतर २५:१७ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

एकादशी श्राद्ध

अपराण्ह काळी एकादशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी भाद्रपद शुक्ल ११ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment