Sunday, 9 September 2018

दिनविशेष - १३ सप्टेंबर २०१८



तिथी
भाद्रपद शुक्ल ४ (१४:५२)
वार
गुरुवार
नक्षत्र
स्वाती (२४:५३)
योग
ऐन्द्र (२४:३६)
करण
विष्टि (१४:५२), बव (२६:३२)

श्री गणेश चतुर्थी

पार्थिव गणेश पूजन, चंद्रदर्शन निषेध, चंद्रास्त (२१:४२)
गणेशोत्सव गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. घराघरांत आणि सार्वजिनिक मंडळांत श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तींचे तलाव, नद्या, समुद्र यात विसर्जन होते.
या दिवशी चंद्रदर्शन वर्ज मानले आहे. चंद्र दर्शन घेतल्यास खोटा आळ येतो. त्यामुळे याला कलंकिनी चतुर्थी असेही म्हणतात.

गणेश चतुर्थी कथा

एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हासला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की " आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!" शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवश " भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी " तुझे तोंड कोणी पाहणार नही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले.त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हां गणपतीने सांगितले की , त्याने संकष्ट चतुर्थी व्रत" करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल.
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने "संकष्ट चतुर्थी व्रत " केल्यामुळे गेला, अशी कथा आहे.
आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे , हे एक साधे , सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे.श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फ़लदयी व महत्वाची मानतात. प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या.

गणपतीच्या पूजेत २१ पत्री

भारतीय संस्कृतित पूजेत वाहण्यात येणारी फुले, पाने यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध देवतेनुसार पूजा साहित्यामध्ये बदल बघावयास मिळतो. गणपतीच्या पूजेत २१ पत्रीचा समावेश असतो.

या पत्रींचे औषधी गुण आपण जाणून घेऊ यात.
१)      पिपंळ - याला 'बोधीवृक्ष' म्हणतात. गौतम बुध्दांना याच झाडाखाली आत्मज्ञान प्राप्त झाले होत. हवा शुध्दकरण्यासाठी हे एकच झाड एअरकुलर सिस्टीमच्या पाचपट अधिक काम करते. याच्या पानांत औषधी गुणधर्म असतात म्हणून आदिवासी भागात या पानांवर मुलांना जेऊ घातले जाते. पिपंळाची लाख (राख) खडीसाखरेबरोबर दिल्यास चांगली झोप लागते.
२)      केवडा - ही वनस्पती समुद्र किनार्‍यावर मोठया प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते.
३)      हादगा - हादग्याला आपण 'अगस्ती' म्हणूनही ओळखतो. याच्या फुलांची भजी छान लागतात. या फुलात अनेक जीवनसत्वांचा खजिना आहे. हा वृक्ष मध्यम आकाराचा आहे.
४)      बोर - बोराच्या बियांचे चुर्ण चेहर्‍यांवर लावल्यास पुटकुळया जातात. मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे, तापावरील दाह यासाठी उपयुक्त ठरतो.
५)      मधुमालती - मधुमालती ही वेल तशी शहरात बंगल्यांमध्‍ये सहज बघावयास मिळते. ही एक काष्ट वेल आहे. गुलाबी, पांढर्‍या, पिवळया रंगाची फुले व सदाहरित पाने हे त्याचे वैशिष्टय. फुफ्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.
६)      माका - पावसाळयात आढळणारी ही वनस्पती डोंगर - टेकडयांवर नजर लावून तिचा शोध घ्यावा लागतो. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे औषध. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते.
७)      बेलपत्र - शंकराचे बेलपत्र सर्वांना परिचित आहे. या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो.
८)      धोतरा - धोतर्‍याचा काळा, पांढरा, व राजधोतरा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचे औषध काढतात. वेदनाशक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. ही वनस्पती पडिक जागेत उगविणारी विषारी वनस्पती आहे. काटेरी पांढर्‍या लांब नरसळ्यासारखे फूल दमा, कफ, संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरते. या वनस्पतींची रोपे शहरात रस्त्याच्या कडेला हमखास दिसतात.
९)      तुळस - ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना पळवून लावणारी तुळस जवळपास प्रत्येक घरात बघावयास मिळते. तुळशीत राम, कृष्ण असे दोन प्रकार असले तरी आणखी तीन चार इतर प्रकारही आहेत. कफ, दम, सर्दी, कीटक दंश तसेच कॅन्सर सारख्या रोगांवर तुळशीचा रस औषध उपयोगी पडतो.
१०)  दुर्वा - ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. पांढरी (श्वेत) आणि निळा (नील) या दोन जाती आहेत. पांढ-या दुर्वा गणेशाला प्रिय असते. आपल्याकडे तिला 'हरळ' म्हणतात.  नाकातून रक्त येणे, ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दूर्वांचा रस अमृतासमान असतो. दूर्वा रस्त्याच्या बाजूला, बागेतही मिळतात.
११)  शमी - शमीला सुप्त 'अग्नीदेवता' असेही म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची रवी ठेवतात. हा वृक्ष कोरडया हवामानात वाढणारा आहे. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी ठरते.
१२)  विष्णुकांता - या वनस्पतीला आपल्याकडे 'शंखपुष्पी' म्हणतात. बुध्दीवर्धक म्हणून ही वनस्पती विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहेत. ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. निळसर फुले येणारी ही वनस्पती जमिनीलगत उगविणारी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारावर औषध म्हणून केला जातो. नदीच्या बाजूला, डोंगर-टेकडया आदी ठिकाणी ही आपण बघू शकतो.
१३)  आघाडा - ऋषीपंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी त्याचा वापर करतात. आघाडा मुखरोग व दंतरोगावर उत्तम औषध आहे. ही वनस्पती पडिक जागेत माळरानांवर बघावयास मिळते.
१४)  डाळिंब - आपल्याकडे आरक्ता आणि गणेश अशा दोन जाती मोठयाप्रमाणात बघावयास मिळतात. देखणी फुले, काहीसे काटेरी झुडूप आहे. याचा उपयोग जंतावर गुणकारी आहे. काविळीसाठीही उपयोग केला जातो.
१५)  डोरली - या रोपाला 'काटे रिंगणी' म्हणूनही ओळखतात. या वनस्पतीच्या पानवर देखील काटे असतात. त्वचारोग, पोटातील विकार, मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरते. आदिवासी भागात हे झुडूप मोठ्या प्रमाणात आढळते.
१६)  देवदार - हा महाकाय वृक्ष पश्चिम घाट, हिमालयात आढळतो. या वृक्षाचे लाकूड अतिशय मजबूत असते. कफ, पडसे, संधिवात यासाठी याचा रस फायदेशीर ठरतो. याची झाडे महाराष्ट्रात नाशिकजवळ पेठ, हरसूल भागात देखील दिसतात.
१७)  कण्हेर - कण्हेरीची पाने व मुळाचा साठा औषधी आहे. परस बागेतही हमखास दिसणारी वनस्पती एक विषारी झुडूप आहे. याच्या फुलांना सुगंध असतो. वात विकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो.
१८)  मारवा - ही सुवासिक वनस्पती असून विविध प्रकारच्या जखमा, भाजणे, किंवा कोणत्याही कारणांमुळे त्वचेवर आलेल्या डागांसाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते. नवीन संशोधनात तर मारव्यापासून कर्करोगावर औषध तयार करण्यास यश आले आहे. ही वनस्पती घरात कुंडीतदेखील लावता येते.
१९)  रूई - रुई या वनस्पतीला 'मांदार' म्हणूनही ओळखतात. ओसाड जागेत ही वनस्पती मोठया प्रमाणात दिसते. हिला पांढर्‍या, जांभळया रंगाची फुले येतात. हत्तीरोगावर हे फार उत्तम औषध आहे. तसेच कुष्ठरोगावर देखील त्याचे औषध प्रभावी ठरते. पांढरी रूई गणेशाला अधिक प्रिय असते.
२०)  अर्जुन - हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी पट्टयात हिला ओळखतात. या वृक्षाचा उल्लेख रामायणात देखील आढळतो. हृदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते. या वनस्पतीत कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.
२१)  जाई - या वनस्पतीला जास्मीन देखील म्हणतात. ही वनस्पती शहरात मोठया प्रमाणात दिसते. तोंड आल्यावर जाईची पाने खातात, तसेच जुन्या जखमांवर जाईचा पाला लावला जातो.

जैन संवत्सरी (चतुर्थी पक्ष)

जैन संप्रदायातील लोक भाद्रपद महिन्यात पर्यूषण पर्व साजरे करतात. श्वेताम्बर संप्रदायाचे  पर्यूषण ८ दिवस असते तर  दिगंबर संप्रदायाचे लोक १० दिवस पर्यूषण पर्व साजरे करतात. त्यांस 'दसलक्षण' असेही म्हणतात.

रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्र प्रवेश

२०:४१ ला रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करीत आहे. रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रवि नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
चंद्र नक्षत्र: स्वाती

वाहन मेंढा

रवि नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
वाहन
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
घोडा
पर्वतावर पाऊस पडेल
कोल्हा
पाऊस पडणार नाही.
बेडूक
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
मेंढा
पाऊस पडणार नाही.
मोर
अल्पवृष्टी होईल.
उंदीर
अल्पवृष्टी होईल.
महिष
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
गाढव
अल्पवृष्टी होईल.
० / ९
हत्ती
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
रवि नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
चंद्र नक्षत्र: स्वाती
अंतर: ४
४ ला ९ ने भागले असता बाकी राहते ४. म्हणून वाहन उंदीर आहे. याचाच अर्थ रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात असताना पाऊस पडणार नाही.

नक्षत्रसंज्ञा : सू सू

सूर्य नक्षत्रे
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्रे
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती

दोन्ही सूर्य नक्षत्रे
 वारा सुटेल
दोन्ही चंद्र नक्षत्रे
 पाऊस पडणार नाही
एक चंद्र व दुसरे सूर्य
 पाऊस पडेल
रवि नक्षत्र : उत्तराफाल्गुनी = सूर्य नक्षत्र
चंद्र नक्षत्र: स्वाती = सूर्य नक्षत्र
दोन्ही सूर्य नक्षत्र आहेत. याचा अर्थ रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात असताना वारा सुटेल.

स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री, स्त्री

स्त्री नक्षत्रे
 आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
पुरुष नक्षत्रे
 अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा ,उत्तराभाद्रपदा, रेवती
नपुंसक नक्षत्रे
 विशखा, अनुराधा, जेष्ठा

सूर्य नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.

रवि नक्षत्र : उत्तराफाल्गुनी = स्त्री नक्षत्र
चंद्र नक्षत्र: स्वाती = स्त्री नक्षत्र

दोन्ही स्त्री नक्षत्र आहेत. त्यामुळे रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात असताना अल्पवृष्टी होईल.

पावसाचा अंदाज घेताना या बरोबरच रविच्याच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.

भद्रा

१४:५२ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

चतुर्थी-पंचमी श्राद्ध

अपराण्ह काळी चतुर्थी आणि पंचमी या दोन्ही तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी भाद्रपद शुक्ल ४ किंवा भाद्रपद शुक्ल ५ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

No comments:

Post a Comment