Monday, 10 September 2018

दिनविशेष - १५ सप्टेंबर २०१८


तिथी
भाद्रपद शुक्ल ६ (१४:४५)
वार
शनिवार
नक्षत्र
अनुराधा (२६:४९)
योग
विष्कंभ (२२:५४)
करण
तैतिल (१४:४५), गरज (२७:१४)

कार्तिकेय दर्शन

भाद्रपद शुल्क षष्ठी हा दिवस कार्तिकेय दर्शनासाठी उत्तम मनाला जातो. या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घेतल्यास ब्रह्महत्या इ. पापांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
भाद्रपद शुध्द षष्ठी ज्याला आपण सूर्यषष्ठी म्हणतो त्या दिवशी भगवान कार्तिकेय यांचे दर्शन घेणे क्रमप्राप्त आहे. अनेक लोक मोठया प्रमाणावर भगवान कार्तिकेयाचे दर्शन घेतात परंतु दर्शन घेण्यापूर्वी घरातील देवतांना पान वीडा (दोन खाऊची पाने, 1 सुपारी, 1/2/5/10 रुपयाचे चलनातील धातूचे नाणे) ठेवून - आज सुर्यषष्ठीच्या दिवशी आम्ही देव सेनापती भगवान कार्तिकेय यांचे दर्शन घेण्याकरिता जात आहोत तरी आमच्या मार्गातील सर्व अडचणी, अडथळे पूर्णपणे दूर करुन आमच्या प्रत्येक कार्यामध्ये यश येण्याकरिता तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा - अशी प्रार्थना करावी आणि नंतरच घरातून बाहेर पडावे.

 त्यानंतर भगवान कार्तिकेय मंदिरामध्ये नारळाचे पाणी, पांढरे तीळ, मोराचे पीस, दर्भ, रुद्राक्ष, कमंडलू, मोती, पोवळा, सोने यापैकी आपणास जे शक्य असेल ते दान कार्तिकेयाचे पायावर अर्पण करण्याकरिता घेऊन जाऊन तेथेही पान वीडा (दोन खाऊची पाने, 1 सुपारी, 1/2/5/10 रुपयाचे चलनातील धातूचे नाणे) ठेवून
आज सुर्यषष्ठीच्या दिवशी आम्ही आपले दर्शन घेण्याकरिता जात आहोत तरी आमच्या मार्गातील सर्व शारिरीक, आर्थिक, मानसिक, बौध्दीक, व्यावसायीक, कोर्टकेस, विरोधकांमार्फत करण्यात येणारे विविध अभिचार, उच्चाटन प्रयोग तसेच स्मशान, कबरस्तान यांचेशी संबंधित बाहेरचा भौतिक, आधिभौतिक, दैवीक, आधिदैवीक त्रास तसेच सर्व अडथळे पूर्णपणे नष्ट करुन आमच्या प्रत्येक कार्यामध्ये यश येण्याकरिता तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, तुमची वाट शक्यतो कधी चूकणार नाही या प्रमाणे प्रार्थना करावी.

बलदेवपूजन / श्री बलराम जयंती

या दिवशी बलरामाचा जन्म झाला म्हणून त्याचा उत्सव करतात.

सूर्यषष्ठी

सप्तमीयुक्‍त भाद्रपद शुक्ल षष्ठी दिवशी स्नान, दान, जप करून व्रत केल्याने त्याचे अक्षय्य फल मिळते. विशेषत: सूर्याचे पूजन गंगादर्शन आणि पंचगव्य प्राशन याचे अश्‍वमेधासमान फळ सांगितले आहे. पूजा गंध, फूले, दीप, नैवेद्य या पंचोपचारांनी करावी.
सूर्यषष्ठी विशेषत: बिहार मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सूर्य आणि षष्ठी (दुर्गेचेच एक रूप) यांचे पूजन केले जाते. षष्ठी देवीची मृण्मयी (मातीची) मूर्ती बनवली जाते. त्यात षष्ठी देवीस आवाहन करून मध्यान्ही सूर्यदेवतेसह पंचोपचार किंवा षोडशोपचारी पूजन केले जाते. आणि पुत्र- पती- पत्नी यांची दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धी साठी प्रार्थना केली जाते.  पूजे नंतर जवळच्या नदीकाठी सर्व स्त्री-पुरुष सालंकृत होऊन एकत्र जमतात. वेताच्या टोपलीत विविध पक्वान्न भरून आणतात आणि ते गोर गरिबांना देतात व स्वत: देखील खातात. सुर्यास्तापर्यंत नृत्य आणि गाणे इ. कार्यक्रम करतात. सूर्यास्तानंतर पुढील मंत्राने अर्घ्य देतात.

ॐ एहि सूर्य सहस्त्रांशो तेजोराशे जगत्पते |
अनुकंपय मां भक्त्या गृहार्णार्घ्यं दिवाकर ||
दुसऱ्या दिवशी अर्घ्याचे साहित्य घेऊन व्रतस्थ लोक ब्रह्ममुहूर्तापासून सूर्योदयाची वाट पहातात. सूर्योदयानंतर वरील मंत्राने त्यास अर्घ्य दिले जाते. त्यानंतर सूर्यदेव व षष्ठी देवीची मूर्ती वस्त्रालंकारासहित ब्राह्मणाला दान दिली जाते. पुढील मंत्राने सूर्य आणि षष्ठी देवीचे विसर्जन करून पारणे केले जाते .     
ॐ आवाहनं न जानामि  न जानामि विसर्जनम् |
पूजां चैव न जानामि क्षमेथां परमैश्वरौ ||
मन्त्रहीनं क्रियाहिनं भक्तिहीनं सुरैश्वरो |
यत्पूजितं मया देवौ परिपूर्णं तदस्तु मे ||

चंपाषष्ठी

जर भाद्रपद शुक्ल षष्ठी दिवशी मंगळवार, विशाखा नक्षत्र आणि 'वैधृति' योग असेल तर 'चंपाषष्ठी' होते, यासाठी पंचमीचे दिवशी रात्रौ मनाशी संकल्प करून षष्ठी दिवशी पहाटॆ पांढरे तीळ आणि मृत्तिकामिश्रणाने स्नान करावे, कलश स्थापन करून त्यावर कुंकवाने बारा आरे काढावेत. त्यात रथ, अरुण व सूर्य याचे बारा सूर्य नावाने पूजन करावे व ब्राह्मणभोजन घालून मग स्वत: जेवावे.

गौरी आवाहन (दिवसभर)

पुराणात अशी कथा आहे, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्रीमहालक्ष्मी गौरीला शरण गेल्या. त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्रीमहालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.

हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. (महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. ही एक रूढी आहे.)

भाद्रपदातील शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन केले जाते.
गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी, ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात.
तिसर्‍या दिवशी, मूळ नक्षत्रावर  गौरीचे नदीत विसर्जन करतात आणि परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.

कहाणी ज्येष्ठागौरीची

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. पुढं एके दिवशीं काय झालं ? भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनीं गौरी आणल्या, रस्तोरस्तीं बायका दृष्टीस पडूं लागल्या. घंटा वाजूं लागल्या. हें त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिलं. मुलं घरीं आलीं. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण ! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करूं ? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर कांहीं नाहीं. तुम्ही बापाजवळ जा, बाजारांतले सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन ! मुलं तिथून उठलीं, बापाकडे आलीं. बाबा बाबा, बाजारांत जा, घावनघाटल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणील ! बापानं घरांत चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनांत फार दुःखी झाला. सोन्यासारखीं मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवतां येत नाहीं. गरिबीपुढं उपाय नाहीं. मागायला जाव तर मिळत नाहीं. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धांवा केला. तळ्याच्या पाळीं गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं ह्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरीं आणलं. बायकोनं दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्‍यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरांत गेली आणि आंबिलीकरितां कण्या पाहूं लागली. तों मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवलं वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्‍याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनीं पोटभर खाल्ली. सगळीं जण आनंदानं निजलीं. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मला न्हाऊं घालायला सांग, म्हणून म्हणाली. घावनघाटलं देवाला कर, नाहीं कांहीं म्हणूं नको, रड कांहीं गाऊं नको. ब्राह्मण तसाच उठला, घरांत गेला, बायकोला हांक मारली, अग अग ऐकलंस का ? आजीबाईला न्हाऊं घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलांबाळांसुद्धा पोटभर जेवलीं. म्हातारीनं ब्राह्मणाला हांक मारली. उद्यां जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी, आजी, दूध कोठून आणूं ? तशी म्हातारी म्हणाली, तूं कांहीं काळजी करूं नको. आतां ऊठ आणि तुला जितक्या गाई-म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावीं बांध. संध्याकाळीं गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नांवं घेऊन हांका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ ! ब्राह्मणानं तसं केलं, गाई-म्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांसुद्धां धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई-म्हशींनीं भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं. दुसर्‍या दिवशीं खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आतां पोंचती कर ! ब्राह्मण म्हणूं लागला- आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आतां सगळं प्राप्त झालं. आतां तुम्हाला पोचत्या कशा करूं ? तुम्ही गेलां म्हणजे हें सगळं नाहीसं होईल ! म्हातारी म्हणाली, तूं कांहीं घाबरू नको. माझ्या आशीर्वादानं तुला कांहीं कमी पडणार नाहीं. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच ! मला आज पोंचती कर ! ब्राह्मण म्हणाला, हें दिलेलं असंच वाढावं असा कांहीं उपाय सांग ! गौरीनं सांगितलं, तुला येतांना वाळू देईन, ती सार्‍या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टाक, गोठ्यांत टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाहीं. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यांत तळ्याच्या पाळीं जावं. दोन खडे घरीं आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशीं घावनगोडं, तिसरे दिवशीं खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवूं घालावं. संध्याकाळीं हळदकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. संतत मिळेल. ही साठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं देवाच्या दारीं, गाईंच्या गोठीं, पिंपळाच्या पारीं, सुफळ संपूर्ण.

घबाड

१४:४५ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराफाल्गुनी
चंद्र नक्षत्र : अनुराधा
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment