तिथी
|
भाद्रपद शुक्ल ८ (२६:५३)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (२२:५७)
|
योग
|
वैधृति (२४:३४)
|
करण
|
विष्टि (१३:४३), बव (२६:५३)
|
गौरी आवाहन (दिवसभर)
पुराणात अशी कथा
आहे, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्रीमहालक्ष्मी गौरीला
शरण गेल्या. त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.
श्रीमहालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या
स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड
सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.
हे व्रत तीन दिवस
चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा
करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे
पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. (महाराष्ट्रात बहुतांश
ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही
ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून
त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी
नेसवून अलंकारांनी सजवतात. – ही एक रूढी आहे.)
भाद्रपदातील
शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन केले जाते.
गौरीची स्थापना
झाल्यानंतर दुसर्या दिवशी, ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा करून नैवेद्य
दाखवतात.
तिसर्या दिवशी, मूळ नक्षत्रावर गौरीचे नदीत विसर्जन करतात आणि परत येतांना
नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.
कहाणी ज्येष्ठागौरीची
आटपाट नगर होतं.
तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. पुढं एके दिवशीं काय झालं ? भाद्रपद महिना
आला. घरोघरी लोकांनीं गौरी आणल्या, रस्तोरस्तीं बायका दृष्टीस पडूं लागल्या. घंटा
वाजूं लागल्या. हें त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिलं. मुलं घरीं आलीं. आईला
सांगितलं, आई, आई,
आपल्या घरी गौर आण ! आई
म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करूं ? तिची पूजापत्री
केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर
कांहीं नाहीं. तुम्ही बापाजवळ जा, बाजारांतले सामान आणायला सांगा. सामान आणलं
म्हणजे गौर आणीन ! मुलं तिथून उठलीं, बापाकडे आलीं. बाबा बाबा, बाजारांत जा, घावनघाटल्याचं
सामान आणा, म्हणजे आई गौर आणील ! बापानं घरांत चौकशी केली. मुलांचा नाद
ऐकला. मनांत फार दुःखी झाला. सोन्यासारखीं मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट
पुरवतां येत नाहीं. गरिबीपुढं उपाय नाहीं. मागायला जाव तर मिळत नाहीं. त्यापेक्षा
मरण बरं म्हणून उठला. देवाचा धांवा केला. तळ्याच्या पाळीं गेला. जीव द्यावा म्हणून
निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी
सवाशीण भेटली. तिनं ह्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत
सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या.
ब्राह्मणानं म्हातारीला घरीं आणलं. बायकोनं दिवा लावला, चौकशी केली.
पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको
घरांत गेली आणि आंबिलीकरितां कण्या पाहूं लागली. तों मडकं आपलं कण्यांनी भरलेलं
दृष्टीस पडलं. तिला मोठं नवलं वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्याला सांगितली.
त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनीं पोटभर खाल्ली.
सगळीं जण आनंदानं निजलीं. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मला न्हाऊं
घालायला सांग, म्हणून म्हणाली. घावनघाटलं देवाला कर, नाहीं कांहीं
म्हणूं नको, रड कांहीं गाऊं नको. ब्राह्मण तसाच उठला, घरांत गेला, बायकोला हांक
मारली, अग अग ऐकलंस का ? आजीबाईला न्हाऊं घाल, असं सांगितलं.
आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान
आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलांबाळांसुद्धा पोटभर
जेवलीं. म्हातारीनं ब्राह्मणाला हांक मारली. उद्यां जेवायला खीर कर म्हणून
सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी, आजी, दूध कोठून आणूं ? तशी म्हातारी
म्हणाली, तूं कांहीं काळजी करूं नको. आतां ऊठ आणि तुला जितक्या
गाई-म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावीं बांध. संध्याकाळीं गोरज
मुहूर्तावर गाई-म्हशींची नांवं घेऊन हांका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल.
त्यांचं दूध काढ ! ब्राह्मणानं तसं केलं, गाई-म्हशींना हाका
मारल्या (त्या) वासरांसुद्धां धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई-म्हशींनीं भरून
गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं. दुसर्या दिवशीं खीर केली. संध्याकाळ झाली
तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आतां पोंचती
कर ! ब्राह्मण म्हणूं लागला- आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आतां सगळं प्राप्त झालं.
आतां तुम्हाला पोचत्या कशा करूं ? तुम्ही गेलां म्हणजे हें सगळं नाहीसं होईल !
म्हातारी म्हणाली, तूं कांहीं घाबरू नको. माझ्या आशीर्वादानं तुला
कांहीं कमी पडणार नाहीं. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच ! मला आज पोंचती कर !
ब्राह्मण म्हणाला, हें दिलेलं असंच वाढावं असा कांहीं उपाय सांग !
गौरीनं सांगितलं, तुला येतांना वाळू देईन, ती सार्या घरभर
टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टाक, गोठ्यांत टाक असं केलंस
म्हणजे कधी कमी होणार नाहीं. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली
प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यांत तळ्याच्या पाळीं
जावं. दोन खडे घरीं आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून
त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशीं घावनगोडं, तिसरे दिवशीं
खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवूं घालावं. संध्याकाळीं
हळदकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. संतत मिळेल. ही साठा
उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं देवाच्या दारीं, गाईंच्या गोठीं, पिंपळाच्या पारीं, सुफळ संपूर्ण.
दुर्गाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन
शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
दूर्वाष्टमी
भाद्रपद शुक्ल अष्टमीला हे
नाव आहे. या दिवशी दूर्वाविषयी व्रत करावे, असे सांगितले आहे. या व्रतास दूर्वेसह गौरी, गणेश व शिव यांची पूजा
करावयाची असते. अपत्यहीन स्त्रिया हे व्रत करतात. पूजा झाल्यानंतर आठ ग्रंथीनी
युक्त असा दोरा डाव्या हातात बांधतात. पुढील श्लोकाने दूर्वेची प्रार्थना करतात-
त्वं दुर्वेऽमृतनामासि
पूजितासि सुरासुरै: ।
सौभाग्यसन्ततिं दत्व
सर्वकार्यकारी भव ॥
यथा
शाखाप्रशाखाभिर्विस्तृतासि महीतले ।
तथा ममापि सन्तानं देहि
त्वमजरामरम् ॥
अर्थ - हे दुर्वे, अमृत हे तुझे नाव आहे. तू
देवदानवादिकांकडून पूजित आहेस. तू मला सौभाग्य आणि संतती देऊन सर्व कार्ये सिद्ध
करणारी हो. ज्याप्रमाणे शाखाप्रशाखांनी तू पृथ्वीवर पसरतेस, त्याप्रमाणे मला अजरामर असे
पुत्रसंतान दे. (माझा वंशवृक्ष तुझ्यासारखा शाखा - प्रशाखांनी युक्त कर.
या व्रताचे दुसरे पर्याय व्रत.
भाद्रपद शुक्ल सप्तमीस उपास
करावा. अष्टमीच्या दिवशी व्रताचा संकल्प करून पवित्र जागी उगवलेल्या दूर्वांवर
शिवलिंगाची पूजा करावी. शिवाला दूर्वा,
शमी,
पुष्पमाला वाहाव्यात. खजूर, खोबरे व महाळुंग यांचा
नैवेद्य दाखवावा. अक्षतायुक्त दह्याचे अर्घ्य द्यावे. ब्राह्मणांना विविध फळांची
वायने द्यावी. त्या दिवशी केवळ फलाहार करावा. उद्यापनाच्या वेळी पूजाहवन करावे.
ब्राह्मणांना व आप्तेष्टांना तिळाच्या व कणकीच्या पदार्थांचे भोजन घालावे.
फळ - सौभाग्य व संतती यांचा लाभ व इच्छापूर्ती.
महालक्ष्मी व्रत
भाद्रपद शुक्ल अष्टमीपासून
ते आश्विन कृष्ण अष्टमीपर्यंत दररोज १६ चुळा भरून प्रात:स्नान करावे. चंदनाच्या
काष्ठाची लक्ष्मीची मूर्ती स्थापन करून तिच्याजवळच सुताचा दोरा घेऊन त्याला १६
गाठी घालून त्याचा तातू करावा. त्यावेळी लक्ष्मीची पूजा करावी व लक्ष्म्यै नम:
म्हणून प्रत्येक गाठीची पूजा करावी नंतर
धनं धान्यं धरांहर्म्यं
कीर्तिसमायुर्यश: श्रियम् ।
तुरगान् दन्तिन: पुत्रान्
महालक्ष्मि प्रयच्छ मे ।'
हा मंत्र म्हणून वरील दोरा
उजव्या हातात बांधावा. हिरव्या दूर्वेची १६ पाने व १६ अक्षता हातात घेऊन कथा श्रवण
करावी याप्रमाणे करून आश्विन व. अष्टमी दिवशी विसर्जन करावे.
राधा अष्टमी
भाद्रपद महिन्याच्या दोन्ही
पक्षांतील अष्टमींना 'राधा अष्टमी' असे म्हणतात. राधेच जन्म भाद्रपद शुक्ल सप्तमीस झाला असे
समजतात आणि अष्टमीच्या दिवशी तिची पूजा करतात. पूजाविधी असा-
प्रात:काली स्नानानंतर
व्रतसंकल्प करावा व एका मंडलात मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश ठेवावा. त्यावर
असलेल्या तांब्याच्या तामनात राधेची सुवर्णमूर्ती ठेवून तिला वस्त्रे वाहावीत. मग
पूजा करून ती मुर्ती ब्राह्मणास दान द्यावी. शक्य असेल तर उपास करावा. काही लोक
या व्रतात राधाकृष्णाची पूजा करतात.
फल - पापनाश
भद्रा
१३:४३ पर्यंत भद्रा म्हणजेच
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व
दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात
तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा
येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र
असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत
चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता
येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक
तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती
अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा
रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व
पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ
आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील
काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ
मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये
विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा
मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे
अग्निभय होण्याची शक्यता असते.
अष्टमी श्राद्ध
अपराण्ह काळी अष्टमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी भाद्रपद शुक्ल ८ आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना
प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment