Saturday, 19 August 2017

दिनविशेष - २७ ऑगस्ट २०१७


तिथी
 भाद्रपद शुक्ल ६ (२२:४२)
वार
 रविवार
नक्षत्र
  स्वाती (१७:४५)
योग
 ब्रह्मा (२३:१४)
करण
 कौलव (९:५५), तैतिल (२२:४२)

सूर्यषष्ठी

सप्तमीयुक्‍त भाद्रपद शुक्ल षष्ठी दिवशी स्नान, दान, जप करून व्रत केल्याने त्याचे अक्षय्य फल मिळते. विशेषत: सूर्याचे पूजन गंगादर्शन आणि पंचगव्य प्राशन याचे अश्‍वमेधासमान फळ सांगितले आहे. पूजा गंध, फूले, दीप, नैवेद्य या पंचोपचारांनी करावी.
सूर्यषष्ठी विशेषत: बिहार मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सूर्य आणि षष्ठी (दुर्गेचेच एक रूप) यांचे पूजन केले जाते. षष्ठी देवीची मृण्मयी (मातीची) मूर्ती बनवली जाते. त्यात षष्ठी देवीस आवाहन करून मध्यान्ही सूर्यदेवतेसह पंचोपचार किंवा षोडशोपचारी पूजन केले जाते. आणि पुत्र- पती- पत्नी यांची दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धी साठी प्रार्थना केली जाते.  पूजे नंतर जवळच्या नदीकाठी सर्व स्त्री-पुरुष सालंकृत होऊन एकत्र जमतात. वेताच्या टोपलीत विविध पक्वान्न भरून आणतात आणि ते गोर गरिबांना देतात व स्वत: देखील खातात. सुर्यास्तापर्यंत नृत्य आणि गाणे इ. कार्यक्रम करतात. सूर्यास्तानंतर पुढील मंत्राने अर्घ्य देतात.

ॐ एहि सूर्य सहस्त्रांशो तेजोराशे जगत्पते |
अनुकंपय मां भक्त्या गृहार्णार्घ्यं दिवाकर ||
दुसऱ्या दिवशी अर्घ्याचे साहित्य घेऊन व्रतस्थ लोक ब्रह्ममुहूर्तापासून सूर्योदयाची वाट पहातात. सूर्योदयानंतर वरील मंत्राने त्यास अर्घ्य दिले जाते. त्यानंतर सूर्यदेव व षष्ठी देवीची मूर्ती वस्त्रालंकारासहित ब्राह्मणाला दान दिली जाते. पुढील मंत्राने सूर्य आणि षष्ठी देवीचे विसर्जन करून पारणे केले जाते .     
ॐ आवाहनं न जानामि  न जानामि विसर्जनम् |
पूजां चैव न जानामि क्षमेथां परमैश्वरौ ||
मन्त्रहीनं क्रियाहिनं भक्तिहीनं सुरैश्वरो |
यत्पूजितं मया देवौ परिपूर्णं तदस्तु मे ||

बलदेवपूजन / श्री बलराम जयंती

या दिवशी बलरामाचा जन्म झाला म्हणून त्याचा उत्सव करतात.

चंपाषष्ठी

जर भाद्रपद शुक्ल षष्ठी दिवशी मंगळवार, विशाखा नक्षत्र आणि 'वैधृति' योग असेल तर 'चंपाषष्ठी' होते, यासाठी पंचमीचे दिवशी रात्रौ मनाशी संकल्प करून षष्ठी दिवशी पहाटॆ पांढरे तीळ आणि मृत्तिकामिश्रणाने स्नान करावे, कलश स्थापन करून त्यावर कुंकवाने बारा आरे काढावेत. त्यात रथ, अरुण व सूर्य याचे बारा सूर्य नावाने पूजन करावे व ब्राह्मणभोजन घालून मग स्वत: जेवावे.

कार्तिकेय दर्शन

भाद्रपद शुल्क षष्ठी हा दिवस कार्तिकेय दर्शनासाठी उत्तम मनाला जातो. या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घेतल्यास ब्रह्महत्या इ. पापांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
भाद्रपद शुध्द षष्ठी ज्याला आपण सूर्यषष्ठी म्हणतो त्या दिवशी भगवान कार्तिकेय यांचे दर्शन घेणे क्रमप्राप्त आहे. अनेक लोक मोठया प्रमाणावर भगवान कार्तिकेयाचे दर्शन घेतात परंतु दर्शन घेण्यापूर्वी घरातील देवतांना पान वीडा (दोन खाऊची पाने, 1 सुपारी, 1/2/5/10 रुपयाचे चलनातील धातूचे नाणे) ठेवून - आज सुर्यषष्ठीच्या दिवशी आम्ही देव सेनापती भगवान कार्तिकेय यांचे दर्शन घेण्याकरिता जात आहोत तरी आमच्या मार्गातील सर्व अडचणी, अडथळे पूर्णपणे दूर करुन आमच्या प्रत्येक कार्यामध्ये यश येण्याकरिता तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा - अशी प्रार्थना करावी आणि नंतरच घरातून बाहेर पडावे.

 त्यानंतर भगवान कार्तिकेय मंदिरामध्ये नारळाचे पाणी, पांढरे तीळ, मोराचे पीस, दर्भ, रुद्राक्ष, कमंडलू, मोती, पोवळा, सोने यापैकी आपणास जे शक्य असेल ते दान कार्तिकेयाचे पायावर अर्पण करण्याकरिता घेऊन जाऊन तेथेही पान वीडा (दोन खाऊची पाने, 1 सुपारी, 1/2/5/10 रुपयाचे चलनातील धातूचे नाणे) ठेवून
आज सुर्यषष्ठीच्या दिवशी आम्ही आपले दर्शन घेण्याकरिता जात आहोत तरी आमच्या मार्गातील सर्व शारिरीक, आर्थिक, मानसिक, बौध्दीक, व्यावसायीक, कोर्टकेस, विरोधकांमार्फत करण्यात येणारे विविध अभिचार, उच्चाटन प्रयोग तसेच स्मशान, कबरस्तान यांचेशी संबंधित बाहेरचा भौतिक, आधिभौतिक, दैवीक, आधिदैवीक त्रास तसेच सर्व अडथळे पूर्णपणे नष्ट करुन आमच्या प्रत्येक कार्यामध्ये यश येण्याकरिता तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, तुमची वाट शक्यतो कधी चूकणार नाही या प्रमाणे प्रार्थना करावी.

घबाड

१७:४५ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मघा
चंद्र नक्षत्र : स्वाती
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

षष्ठी श्राद्ध

अपराण्ह काळी षष्ठी तिथी असल्यामुळेज्यांची श्राद्ध तिथी भाद्रपद शुक्ल ६ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.

सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment