Friday, 31 July 2015

दिनविशेष - ३१ जुलै २०१५

तिथी
 निज आषाढ पौर्णिमा (१६:१३)
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 उत्तराषाढा (०९:५३)
योग
 प्रीती (१४:३७)
करण
 बालव (२६:४२)

व्यासपूजा / गुरुपौर्णिमा

आषाढ पौर्णिमेस 'गुरुपौर्णिमा' किंवा 'व्यासपौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. व्यास महर्षी हे शंकराचार्यांच्या रुपाने पुन्हा अवतीर्ण झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तेव्हा संन्यासी लोक त्या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात. शिष्यही त्या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करतात. पूजेचा विधी असा-
स्नानादी नित्यकर्मे आटोपून
'गुरुपरंपरासिद्ध्यर्थं व्यासपूजां करिष्ये'
असा संकल्प करतात. एक धूत वस्त्र पुढे अंथरुन त्यावर पूर्वेकडून पश्‍चिमेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा गंधाने बारा रेघा काढतात. तेच व्यासपीठ होय. मग ब्रह्मा, परापराशक्ती, व्यास, शुकदेव गौडपाद, गोविंदस्वामी व शंकराचार्य यांचे त्या व्यासपीठावर आवाहन करुन त्यांची षोडशोपचारे पूजा करतात याच दिवशी दीक्षागुरु व मातापिता यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे.
तामीळ प्रदेशात ही व्यासपूजा ज्येष्ठ पौर्णिमेस करतात. कुंभकोणम व शृंगेरी ही दक्षिण भारतातली शंकराचार्यांची प्रसिद्ध पीठे आहेत. या ठिकाणी व्यासपूजेचा महोत्सव होतो. गुरुपरंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरु मानलेले आहे. ज्ञानाचा उगम व्यासापासून होतो, अशी भारतीयांची धारणा आहे.

संन्यासिनां चातुर्मास्यारंभ

या दिवशी संयासव्रत घेतलेल्यांचा चातुर्मास आरंभ होतो. व्यासपूजन करून संन्यासी एकाच ठिकाणी दोन महिने वास्तव्य करतात.

वायुघारिणी पौर्णिमा

आषाढ शु. १५ दिवशी सूर्यास्ताच्या वेळी गणेशादी देवतांचे पूजन करुन शंखाच्या अग्रभागी तूलिकापुष्प (रुई) लावून उभे धरतात व वार्‍याच्या दिशेवरून शुभाशुभ ठरवतात. अक्षय्य तृतीयेप्रमाणे या दिवशीदेखील धान्य, प्रख्यात व्यक्ती यांची तुला करून वेगवेगळ्या पिशव्यांत ठेवतात व दुसरे दिवशी पुन्हा होणार्‍या वजनानुसार तेजामंदी वर्तवितात.

विश्‍वदेव पूजन

आषाढ पौर्णिमेला जर पूर्वाषाढा नक्षत्र असेल तर दहा विश्‍वदेवांचे पूजन करतात. त्यामुळे ते प्रसन्न होतात.

शिवशयनव्रत

आषाढ पौर्णिमेला भगवान शिव जटाजूट व्यवस्थेच्या विचारात सिंहाच्या कातड्यावर झोपतात, म्हणून त्या दिवशी पूर्वविद्धा पौर्णिमा असताना शिवपूजन करून रुद्रव्रत करतात व त्यामुळे शिवलोक प्राप्त होतो.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टी च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

मन्वादि


१४ मन्वंतराच्या आरंभ झाल्या अशा १४ तिथीन मन्वादी असे म्हणतात. या मन्वादी १४ तिथी पुढे दिल्या आहेत.

१)      चैत्र – शु. ३,
२)      चैत्र - पौर्णिमा
३)      जेष्ठ – पौर्णिमा
४)      आषाढ – शु १०,
५)      आषाढ - पौर्णिमा
६)      श्रावण – कृ ८
७)      भाद्रपद – शु ३
८)      अश्विन – शु. ९
९)      कार्तिक शु १२,
१०)  कार्तिक - पौर्णिमा
११)  पौष – शु ११
१२)  माघ – शु ७
१३)  फाल्गुन – पौर्णिमा,
१४)  फाल्गुन –अमावास्या

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

Thursday, 30 July 2015

दिनविशेष - ३० जुलै २०१५

तिथी
 निज आषाढ शु १४ (१९:०१)
वार
 गुरुवार
नक्षत्र
 पूर्वाषाढा (११:४६)
योग
 विष्कंभ (१७:५७)
करण
 गरज (०८:१५), विष्टी (२९:४०)

कोकिळाव्रतारंभ

हे व्रत अधिक आषाढ पौर्णिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत करतात. सायान्हकाली असलेल्या निज आषाढ पौर्णिमेस या व्रताचा आरंभ करून श्रावण पौर्णिमेस व्रत समाप्ती करावी.
व्रतारंभ करताना सूर्यास्त समयीव्रताचामुख्य संकल्प करावा. नक्तभोजन, भूशय्या, कोकिळा शब्द श्रवण यापैकी जे नियम करावयाचे असतील त्याचा त्याचा उच्चार पहिल्या दिवशीच्या संकल्पात करावा. तसेच १ महिना, शेवटचे ७ किंवा ३ दिवस व्रत करायचे असेल तर संकल्पात तेवढ्या दिवसांचा उच्चार करावा.
यामुळे मुख्यतः स्त्रियांना सात जन्मपर्यंत सुत, सौभाग्य, संपत्ती प्राप्त होतात.
·         या व्रतात पार्वतीचे कोकिळेच्या रूपात पूजन केले जाते.
·         आम्र वृक्षावर बसलेल्या कोकिळेची पूजा केली जाते. रुपयाच्या आम्रवृक्षावर बसलेल्या रत्नजडीत  कोकिळेच्या मुर्तीची पुजा दररोज प्रत:काळी स्नानानंतर केली जाते.
·         हे शक्य नसल्यास पाटावर आंब्याच्या वृक्षावर बसलेल्या कोकीलेल्चे चित्र काढून त्याची पूजा महिनाभर करावी.
·         महिन्याभर शक्य नसल्यास शेवटचे सात किंवा तीन दिवस हे व्रत करता येते.
·         पूजेनंतर कोकिळेचा स्वर ऐकण्याचा नियम केला असल्यास ज्या दिवशी हा स्वर ऐकू येणार नाही त्या दिवशी उपवास करावा.

व्रतविधी असा या पौर्णिमे दिवशी सांयकांळी स्नान करुन 'मी ब्रह्मचर्य पाळून कोकिलाव्रत करीन' अशी कामना करावी. त्यानंतर श्रावण कृ. प्रतिपदेस नद, नदी, नाला, ओढा, झरा, विहीर, तलाव, सरोवर अगर आड यावर
'मम धनधान्यादिसहित सौभाग्यप्राप्तये शिवतुष्टये च कोकिलाव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प करुन भिजवून वाटलेल्या आवळ्यांत सुगंधयुक्त तिळाचे तेल मिसळून ते चोळून स्नान करावे. पुढे आठ दिवसपर्यंत याप्रमाणे स्नान झाल्यावर पिठाची कोकिळा तयार करुन गंध, फुले, फळे, धूप, दीप व तिळातांदळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखावावा आणि 'तिलस्नेहे ' या मंत्राने प्रार्थना करावी. याप्रमाणे श्रावण पौर्णिमेपर्यंत करून समाप्तीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात मृत्तिकेची कोकिळा करून तिला सुवर्णाचे पंख, रत्‍नाचे डोळे लावावेत आणि वस्त्रालंकारांनी विभूषित करून सासरा, सासू, ज्योतिषी , पुरोहित अगर कथावाचक याला ती भेट द्यावी. यायोगे स्त्री इहलोकी सुख भोगून शेवटी शिवलोकात जाते.

संत मामा दांडेकर पुण्यतिथी

अंबिकाव्रत

आषाढ शु,.चतुर्दशीला उपवास करुन पौर्णिमेला प्रातःकाळी अंबिकादेवीचे पूजन करण्याने यज्ञासमान फळ मिळून विष्णुलोक प्राप्त होतो.

हरिपूजा

आषाढ शु. चतुर्दशीला ला उपवास करुन पौर्णिमेला पूर्वान्ही (सकाळी) भ. हरीचे (विष्णूचे) पूजन गंध, धूपदीप, पुष्प, नैवेद्य यांनी करावे, व जर त्या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्र असेल तर अन्नोदकाचे दान करुन एकभुक्त राहावे.

भद्रा


१९:०१ ते २९:४० पर्यंत विष्टी करण म्हणजेच भद्रा आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

Wednesday, 29 July 2015

दिनविशेष - २९ जुलै २०१५

तिथी
 निज आषाढ शु १३ (२१:२२)
वार
 बुधवार
नक्षत्र
 मूळ (१३:०८)
योग
 वैधृति (२०:५४)
करण
 कौलव (१०:२०)

प्रदोष

सूर्यास्तानंतर पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने  साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास करतात.
कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन ' मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये ' इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा लावताना आठ वेळा नमस्कार करावा. ' धर्मस्त्वं वृषरूपेण ' या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन ' ऋणरोगादि' या पूर्ण मंत्राने शंकर , पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी. हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø  सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø  मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी भौम प्रदोष करावा.
Ø  शुक्रवार: सौभाग्य किंवा स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø  शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा. 
Ø  रविवार: आयुर्दायासाठी अर्कप्रदोष हे व्रत करावे.

महाराष्ट्रीय बेंदूर (बैलपोळा)

वर्षभर शेतात कष्ट करून बळीराजाला(शेतकऱ्याला) शेतातून सोनं(धान्य) पिकवून देणाऱ्या बळीराजाच्या खऱ्या मित्राचा हा सण आहे.
वर्षभर उन,वारा आणि पावसात सतत कष्ट करणारे "बैल" यांच्यासाठी हा सोन्याचा दिवस.
सर्व शेतकरी बांधव अगदी देवाप्रमाणे आपल्या या मित्राला सजवून अगदी डौलात त्यांची मिरवणूक काढतात.
कारण बळीराजासाठी ते देवापेक्षा कमी नसतात.
मिरवणुकीनंतर मग त्यांना मानाचा"पुरणपोळी" चा नैवेद्य दाखवतात.

यमघंट योग

१३:०८ पर्यंत मूळ नक्षत्र आहे. बुधवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे हा योग झाला आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


घबाड

१३:०८ ते २१:२२ पर्यंत घबाड योग होत आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पुष्य
चंद्र नक्षत्र : पूर्वाषाढा
तिथी: १३
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३ x ३ = ३९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १३ तिथी मिळवू : ३९ + १३ = ५२
आता ७ ने भागू  ५२ / ७ = ७ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट