Friday, 31 July 2015

दिनविशेष - ३१ जुलै २०१५

तिथी
 निज आषाढ पौर्णिमा (१६:१३)
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 उत्तराषाढा (०९:५३)
योग
 प्रीती (१४:३७)
करण
 बालव (२६:४२)

व्यासपूजा / गुरुपौर्णिमा

आषाढ पौर्णिमेस 'गुरुपौर्णिमा' किंवा 'व्यासपौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. व्यास महर्षी हे शंकराचार्यांच्या रुपाने पुन्हा अवतीर्ण झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तेव्हा संन्यासी लोक त्या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात. शिष्यही त्या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करतात. पूजेचा विधी असा-
स्नानादी नित्यकर्मे आटोपून
'गुरुपरंपरासिद्ध्यर्थं व्यासपूजां करिष्ये'
असा संकल्प करतात. एक धूत वस्त्र पुढे अंथरुन त्यावर पूर्वेकडून पश्‍चिमेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा गंधाने बारा रेघा काढतात. तेच व्यासपीठ होय. मग ब्रह्मा, परापराशक्ती, व्यास, शुकदेव गौडपाद, गोविंदस्वामी व शंकराचार्य यांचे त्या व्यासपीठावर आवाहन करुन त्यांची षोडशोपचारे पूजा करतात याच दिवशी दीक्षागुरु व मातापिता यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे.
तामीळ प्रदेशात ही व्यासपूजा ज्येष्ठ पौर्णिमेस करतात. कुंभकोणम व शृंगेरी ही दक्षिण भारतातली शंकराचार्यांची प्रसिद्ध पीठे आहेत. या ठिकाणी व्यासपूजेचा महोत्सव होतो. गुरुपरंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरु मानलेले आहे. ज्ञानाचा उगम व्यासापासून होतो, अशी भारतीयांची धारणा आहे.

संन्यासिनां चातुर्मास्यारंभ

या दिवशी संयासव्रत घेतलेल्यांचा चातुर्मास आरंभ होतो. व्यासपूजन करून संन्यासी एकाच ठिकाणी दोन महिने वास्तव्य करतात.

वायुघारिणी पौर्णिमा

आषाढ शु. १५ दिवशी सूर्यास्ताच्या वेळी गणेशादी देवतांचे पूजन करुन शंखाच्या अग्रभागी तूलिकापुष्प (रुई) लावून उभे धरतात व वार्‍याच्या दिशेवरून शुभाशुभ ठरवतात. अक्षय्य तृतीयेप्रमाणे या दिवशीदेखील धान्य, प्रख्यात व्यक्ती यांची तुला करून वेगवेगळ्या पिशव्यांत ठेवतात व दुसरे दिवशी पुन्हा होणार्‍या वजनानुसार तेजामंदी वर्तवितात.

विश्‍वदेव पूजन

आषाढ पौर्णिमेला जर पूर्वाषाढा नक्षत्र असेल तर दहा विश्‍वदेवांचे पूजन करतात. त्यामुळे ते प्रसन्न होतात.

शिवशयनव्रत

आषाढ पौर्णिमेला भगवान शिव जटाजूट व्यवस्थेच्या विचारात सिंहाच्या कातड्यावर झोपतात, म्हणून त्या दिवशी पूर्वविद्धा पौर्णिमा असताना शिवपूजन करून रुद्रव्रत करतात व त्यामुळे शिवलोक प्राप्त होतो.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टी च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

मन्वादि


१४ मन्वंतराच्या आरंभ झाल्या अशा १४ तिथीन मन्वादी असे म्हणतात. या मन्वादी १४ तिथी पुढे दिल्या आहेत.

१)      चैत्र – शु. ३,
२)      चैत्र - पौर्णिमा
३)      जेष्ठ – पौर्णिमा
४)      आषाढ – शु १०,
५)      आषाढ - पौर्णिमा
६)      श्रावण – कृ ८
७)      भाद्रपद – शु ३
८)      अश्विन – शु. ९
९)      कार्तिक शु १२,
१०)  कार्तिक - पौर्णिमा
११)  पौष – शु ११
१२)  माघ – शु ७
१३)  फाल्गुन – पौर्णिमा,
१४)  फाल्गुन –अमावास्या

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment