Wednesday, 30 November 2016

दिनविशेष - १ डिसेंबर – २०१६



तिथी
 मार्गशीर्ष शुक्ल २ (२२:०९)   
वार
 गुरुवार
नक्षत्र
 मूळ (२९:०५)
योग
 शूल (३०:०४)
करण
 बालव (०९:०९)


अतियोगव्रत

हे एक तिथिव्रत आहे. हे केवळ स्त्रियांसाठी आहे. मार्गशीर्ष शुक्ल द्वितीयेपासून या व्रताचा प्रारंभ होतो. तांदळाच्या पिठाच्या शिवगौरीच्या प्रतिमा बनवून त्यांची पूजा व पायस-भोजन असा याचा विधी आहे. व्रतावधी एक वर्ष असतो. प्रत्येक महिन्यात या तिथीस वेगवेगळ्या नावांनी व पुष्पांनी पूजा करतात.

पितृपूजन

मार्गशीर्ष शुक्ल द्वितीयेला पितृपूजन करून व्रत केल्याने पितृगण संतुष्ट होतात आणि न केल्याने ते दुःखी होतात अशी मान्यता आहे.

मुस्लिम रबिलावल मासारंभ

मुस्लीम कालगणनेनुसार रबिलावल महिना आरंभ होत आहे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Tuesday, 29 November 2016

दिनविशेष - ३० नोव्हेंबर – २०१६



तिथी
 मार्गशीर्ष शुक्ल १ (२०:०५)   
वार
 बुधवार
नक्षत्र
 जेष्ठा (२६:३७)
योग
 धृति (२९:४०)
करण
 किंस्तुग्घ्न (०६:५८)


देवदीपावली

मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला देवदिवाळी असे नाव आहे. या दिवशी सर्व चित्तपावन ब्राह्मण कुटुंबांतून आपला कुलस्वामी, कुलदेवता व ग्रामदेवता यांना महानैवेद्य अर्पण करण्याचा कुलाचार पाळला जातो. त्याला नैवेद्य घालणे असेही म्हणतात. यावेळी मुख्य देवतांचे नैवेद्य स्वतंत्र पानावर व ग्रामदेवतांचे नैवेद्य त्यांच्या संख्येइतक्या भाताच्या मुद व पक्वान्ने एका पानावर या प्रमाणे मांडतात. वडे-घारगे (भोपळ्याचे गोड वडे) हे मुख्य पक्वान्न या वेळी करतात.
सर्व देवतांना एकाच वेळी नैवेद्य दाखविण्यात येतो. कुलदेवतेचा नैवेद्य घरातील मंडळी सेवन करतात. इतर ग्रामदेवतांचे नैवेद्य बहुधा गाईला घालतात किंवा गुरवाला अथवा गोरगरिबांना देतात. देवदिवाळीला हे जमले नाही तर पुढे चंपाषष्ठीपर्यंत सोयीच्या अशा कोणत्याही दिवशी नैवेद्य घालावेत.

हा दिवस कोकणात कोकणचा बैलपोळा किंवा देवदिवाळीया नावानं साजरा होतो. गाई, बैल, वासरे, म्हशी, रेडे यांच्या शिंगांना रंग लावून, त्यांना गोडधोड खायला घालून हा सण साजरा केला जातो. हा सण म्हणजे पशूधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे.

मार्तंड भैरव मल्हारी खंडोबा षड्रात्रोत्सवारंभ

मार्तंड (मल्हारी) खंडोबाचा सहा रात्रीचा उत्सव मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीपर्यंत असतो.  हा सहा रात्रींचा उत्सव खंडोबाचे नवरात्र म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रतिपदेला स्नान झाल्यावर घरातील पुरुषांनी देवाची नेहमीप्रमाणे पूजा करावी. देव्हाऱ्यातच लाल वस्त्र टाकून, त्यावर दोन विड्याची पाने ठेवून त्यावर खंडोबाचा टाक ठेवावा. त्याच्या जवळ किंवा समोर ताम्हण ठेवून त्यात थोडे गहू ठेवावे. त्यावर भांडे ठेवून त्यात पाणी सुपारी पैसा टाकावा. त्यावर पाच विड्याची पाने व खोबऱ्याची वाटी हळद लावून ठेवावे. नैवेद्य दाखवून आरती करावी. देवासमोर समईत तेल, समईवात घालून दिवा लावून ठेवावा. अशा रीतीने खंडोबाची पूजा करावी. सहा दिवस रोज पूजा करताना टाक न हलवता फक्त हळद-कुंकू, अक्षता, फुले वाहावीत. मात्र इतर देवांची पूजा नेहमीप्रमाणे करावी. घरातील एकाने सहा दिवस उपवास करावा व अखंड दिवा देवासमोर लावून ठेवावा.
शेवटच्या म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी देवांना नमस्कार करून टाक थोडासा हलवावा. नंतर देवासमोर ठेवलेले ताम्हण उचलून ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करावा. ताम्हण उचलताना घरातील सर्व लहान थोरांचा सहभाग असावा. ताम्हणातील हळद उडवावी (भंडारा) व नंतर खोबरे प्रसाद म्हणून वाटावे. पुरणपोळी, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी व इतर लिंबू चटणी कोशिंबीर असं सर्व नैवेद्य दाखवून दिवटीबुधलीने ओवाळून आरती करावी. सवाष्ण-ब्राह्मण जेवावयास बोलवावे.
हे सहा दिवस रोज एक फुलांची माळ खंडोबाला वाहावी.
यामागे एक कथा आहे. मार्तंड भैरवाचे मणी व मल्लासुर या राक्षसांबरोबर युद्ध चालू असताना श्री महादेवाला विजय मिळावा म्हणून सप्तऋषींनी मार्तंडभैरव या देवतेचे पूजन केले. जसजसा देवसेनेचा विजय होऊ लागला, तसे एक प्रत्येक दिवशी एक विजयमाळ देवाला वाहिली गेली. तोच विधी आपण घरी बसवलेल्या नवरात्रात करतो अशी मान्यता आहे. (काही ठिकाणी माळेची पद्धत नसते.) ज्या दिवशी देवांना विजय मिळाला, त्या दिवशी देवांचे विधीपूर्वक पूजन करून मार्तंडभैरवाचा जयघोष केला, तेच आपण तळी भरणे यातून करतो. देवांचा विजय झाल्यावर ऋषीमुनींनी मार्तंडभैरवाला अनेक सुवर्ण दिव्यांनी ओवाळले. म्हणून तळी भरल्यानंतर दिवटी-बुधली वापरून देवांना ओवाळावे.

अनरक व्रत

एक ऋतुव्रत. हेमंत व शिशिर ऋतूंत हे करतात. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून याचा प्रारंभ होतो. यात केशवपूजा व 'ॐ नमः केशवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप करतात.

कात्यायनी व्रत

नंदव्रजातील कुमारिकांनी श्रीकृष्ण पती मिळावा, म्हणून मार्गशीर्ष मासात महिनाभर व्रत केले. त्या प्रात:काळी यमुनेत स्नान करीत व कात्यायनीदेवीची वालुकामय मूर्ती बनवून तिची पूजा करीत.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

चंद्रदर्शन

अमावास्येला दिसेनासा झालेला चंद्र रविच्या पुढे १२ अंश गेला कि चंद्रदर्शन होते. १८:५५ ला पश्चिमेकडे चंद्रदर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त १५ म्हणजे महर्घ आहेत.

यमघंट योग

२६:३७ नंतर बुधवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


यमघंट योगावर जन्म झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.

याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५, गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर पुढे) देखील यमघंट योग होतो.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Monday, 28 November 2016

दिनविशेष - २९ नोव्हेंबर – २०१६



तिथी
 कार्तिक अमावास्या (१७:४८)   
वार
 मंगळवार
नक्षत्र
 अनुराधा (२३:५५)
योग
 सुकर्मा (२९:०५)
करण
 किंस्तुग्घ्न (--:--)


दर्श अमावास्या

अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
दर्श श्राद्ध
दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.

केदारगौरीव्रत

याचा आरंभ कार्तिक अमावस्येस करतात. त्या दिवशी गौरी व केदार यांची पूजा करतात. हे व्रत दक्षिणेत प्रसिद्ध आहे.

गौरीतपव्रत

या व्रताचा आरंभ कार्तिक अमावास्येला करतात. या दिवशी प्रात:स्नान आदि झाल्यावर हातात गंध, अक्षता, फुले, दूर्वा आणि उदक घेऊन

'ईशार्द्धंगहरे देवि करिष्येऽहं व्रतं तव ।
पतिपुत्रासुखावप्तिं देहि देवि नमोऽस्तु ते ॥'

असा संकल्प करावा व मध्यान्ही सूर्यनारायणास अर्घ्य द्यावे आणि
'अहं देवि व्रतमिहं कर्तुमिच्छामि शाश्‍वतम्‌ ।
तवाज्ञया महादेवि निर्विघ्नं कुरु तत्र वै ।'

अशी प्रार्थना करावी. नंतर गौरीपूजन व उपवास करावा. पूजेचे आवाहनादी सहा उपचार झाल्यावर अंगपूजा करून गंधपुष्पादी इतर दशोपचारांनी पूजन करावे आणि गौरीच्या उजव्या बाजूस गणेश व डाव्या बाजूस स्कंद यांचे पूजन करावे. नंतर तांब्याच्या अगर मातीच्या आठ पणत्यांत तुपाचे दिवे ठेवावे, रात्रभर (सूर्योदय होईतो ) ते दिवे तेवत ठेवावे. ब्रह्ममुहूर्तावर (प्रतिपदे दिवशी सकाळी ) स्नान करून नंतर ब्राह्मण दांपत्याची पूजा करावी. तांबे, पितळ व शिसे यांच्या तीन पात्रांत गूळ, काही पक्वान्ने, तीळ-तांदूळ व सौभाग्यद्रव्ये ठेवुन ते दिवे त्यावर ठेवावे आणि बगळे, कावळे आदी पक्षी ओरडू लागेपर्यंत ते न घेता तिथे बसून राहावे.
पक्षी ओरडू लागण्यापूर्वी उठल्यास सौभाग्य नष्ट होते. अशातर्‍हेने, पहिल्या वर्षी अमावास्येपासून,  दुसर्‍या वर्षी प्रतिपदेपासून, तिसर्‍या वर्षी द्वितीयेपासून या क्रमाने व्रत करीत सोळाव्या वर्षाच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला आठ ब्राह्मण दांपत्ये बोलावून मध्यान्ही सुपूजित गौरीजवळ अष्टदलावर सोम व शिव यांची पूजा करावी आणि तिखट-मिठाचे वडे, गुळपापडी, पुर्‍या, अनरसे, खीर, तूप, साखर व मोदक अशा आठ पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. या आठ पदार्थांनी भरलेली आठ जोडपाने वाढून दांपत्यांना जेवू घालावे, त्यांना वस्त्रालंकार वगैरे अर्पण करावे. ती अन्नपात्रे झाकणांसह दांपत्यांना दान द्यावी. हे व्रत स्त्रियांनी करावयाचे आहे. या व्रताने स्त्रियांना पुत्रप्राप्ती होते आणि त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट