Thursday, 10 November 2016

दिनविशेष - ११ नोव्हेंबर – २०१६




तिथी
 कार्तिक शुक्ल ११ (९:१३), कार्तिक शुक्ल ११ (३०:२४)  
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 उत्तराभाद्रपदा (२५:००)
योग
 हर्षण (१६:१०)
करण
 बव (१९:५३)

भागवत एकादशी

प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११ वी तिथीला एकादशी म्हटले जाते. एकादशीला हरिदिनी असेही म्हणतात. एकादशी विष्णूची तिथी मानलेली असून या दिवशी उपवास करतात. दुसर्‍या दिवशी त्याची पारणा करतात. एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील, त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसर्‍या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. भागवत एकादशी नेहमी द्वादशीयुक्त असते. वैष्णवलोक भागवत एकादशी पाळतात.
या दोन एकादश्या केव्हा मानायच्या यासंबंधी धर्मसिंधु, निर्णयसिंधु आदि ग्रंथात सविस्तर विवेचन केलेले आहे. मध्ययुगात शूलपाणीने (इ.स. १३७५- १४६०) एकादशी विवेक व रघुनंदनाने (इ.स. १६ वे शतक) एकादशी तत्त्व हे ग्रंथ फक्त एकादशीवर लिहिलेले आढळतात. या व्यतिरिक्त व्रतराज व कालतत्त्व विवेचन या ग्रंथातसुद्धा एकादशीवर भरपूर लेखन केलेले आढळते. प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षामध्ये २४ एकादश्या येतात, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीची नावे
कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जया (जयदा) व आमलकी.
कृष्ण पक्षातील एकादशीची नावे अशी
वरुथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ति (फलदा), सफला, षट्‌तिला, विजया व पापमोचनी.
या व्यतिरिक्त अधिक मास असेल त्यावेळी २ एकादशी येतात त्यांस कमला एकादशी म्हणतात.

एकादशीचे नित्यकाम्य असे प्रकार सांगितले आहेत. एकादशीच्या दिवशी ब्रह्महत्यादी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास करण्यास सांगितले जाते. वर्षाच्या २४ एकादश्या नियमाने करणे व त्या दिवशी विष्णुपूजा, जागरण, हरिकथा श्रवण इ. गोष्टी करणे हे नित्य व्रत सांगितले आहे.

काम्यव्रताविषयी कात्यायनाने लिहिले आहे ते असे जो कोणी विष्णुपरायण होऊन संसार सागरातून तरून जाऊ इच्छितो किंवा ऐश्‍वर्य, संतती, स्वर्ग, मोक्ष किंवा अन्य कोणतेही फल इच्छितो त्याने उभय पक्षातील एकादशीला अन्न ग्रहण करू नये. तुकारामाने एकादशीचे महत्त्व अभंगातून सांगितले आहे. तो अभंग असा
एकादशीस अन्नपान|
जे नर करिती भोजन|
श्‍वान विष्ठेसमान|
अधम जन तो एक॥
सेज बाजविलास भोग|
करी कामिनीशी संग|
तया जोडे क्षय रोग|
 जन्मव्याधी बळिवंत॥

विष्णु प्रबोधोत्सव / प्रबोधैकादशी उत्सव किंवा कृत्य

आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या 'चातुर्मास' भरच्या कालात ब्रह्मा, इन्द्र, रुद्र, अग्नी, वरुण, कुबेर, सूर्य, चंद्र इ. नी वंदित असे जगत्पालक योगेश्‍वर भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करीत असतात. भक्‍तलोक त्यांच्या शयन परिवर्तन व प्रबोधा (जागृति) साठी लक्षपूर्वक विविध घर्मकृत्ये करीत असतात. त्यांपैकीच हे प्रबोध व्रत होय. खरे पाहता, परमेश्‍वर एक क्षणही झोप घेत नाही. तरी 'यथा देहे तथा देवे' मानणारे लोक शास्त्रानुसार धर्मकृत्ये करतातच.
कार्तिक शुक्ल एकादशी रोजी हे व्रत केले जाते. झोपलेल्या भगवान विष्णूल दीर्घ निद्रेतून जागे करण्यासाठी
१)      वेगवेगळ्या सुभाषितांचे व स्तोत्रांचे वाचन, पुराणे भगवत्कथाश्रवण व विविध भजनांचे गायन,
२)      शंख, घंटा, मृदंग, नगारा, तंबोरा इ. वाद्ये वाजविणे,
३)      विविध देवोपम खेळ, लीला, नाच इ. विधी केले जातात. तसेच,
'उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद त्यज निद्रां जगत्पते ।
त्वयि सुप्ते जगन्नाथ जगत् सुप्तं भवेत् इदम् ।'
'उत्थिते चेष्टते सर्वमुत्तिष्ठोत्तिष्ठ माधव ।
गता मेघा वियच्चैव निर्मलं निर्मला दिशा: ।'
'शारदानि च पुष्पाणि गृहाण मम केशव ।'
इ. मंत्र म्हणून विष्णुचे सिंहासन (किंवा मंदिर) विविध पानाफुलांनी, हारतोरणादिकांनी सजवून, 'विष्णुपूजा, पंचदेवपूजा-विधान' किंवा 'रामार्चनचंद्रिका' इ. नुसार योग्य पद्धतींनी पूजा करावी.

नंतर
('यज्ञेन यज्ञमयजन्त देवा: तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
तेहनाकं महिमान: सचन्तयत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा: । .....

अशी मंत्र पुष्पांजली वाहून
'इयं तु द्वादशी देव प्रबोऽधाय विनिर्मिता ।
त्वयैव सर्वलोकानां हितार्थ शेषशायिना ॥'
'इदं व्रतं मया देव कृतं प्रीत्यै तव प्रभो ।
न्यूनं संपूर्णतां यातु त्वप्रसादाज्जनार्दन ॥'

अशीप्रार्थना करून प्रल्हाद नारद, पुंडलीक, व्यास, अंबरीप, शुक, भीष्म, शौनक इ. भक्‍तांचे स्मरण करून तीर्थप्रसाद वाटावा. नंतर रथ ओढल्यास प्रत्येक पावलाला यज्ञ केल्याचे पुण्य मिळते.

ज्यावेळी बळीराजास पाताळात दडपून तीन पावले भूमिदान घेऊन वामन परत गेला, तेव्हा जाताना दैत्यराज बळीने वामनास रथात बसविले व स्वत: रथ ओढला. म्हणून ही क्रिया केल्याने भगवान विष्णू योगनिद्रेचा त्याग करून जागृत होतात. व विविध कार्यास प्रवृत्त होतात. आपले जगाच्या पालन-पोषणाचे काम व रक्षणाचे कार्य चालू करतात. प्रबोधिनीच्या पारण्याच्या वेळी रेवतीनक्षत्राचा तृतीय चरण असेल तर त्यात भोजन करू नये.

पुराणपरत्वे या उत्सवाच्या दिवशी विधिविधानांत फरक आहे. तथापि कार्तिक शुक्ल एकादशी अथवा द्वादशीस त्याला जागे करणे, असे मानतात. या उत्सवाला जोडूनच काही ठिकाणी 'तुळसीविवाह' करतात.

बकपंचक

हे एक व्रत आहे. कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात श्रीविष्णू निद्रेतून जागा होतो. या पाच दिवसांना बकपंचक म्हणतात. या पाच दिवसांत बगळासुद्धा मासा खात नाही. म्हणून माणसाने या पाच दिवसांत मांसाहार वर्ज्य करावा.

भीष्मपंचक

प्रबोधिनी म्हणजे कार्तिक शुक्ल एकदशीपासून चालू झालेले हे व्रत पौर्णिमेस संपते. यासाठी कामक्रोधादीचा त्याग करून दया, क्षमा, उदारता इ. चा अवलंब करावा. सोने अगर चांदी यांची लक्ष्मीनारायणाची मूर्ती करून वेदीवर बसवावी. उपलब्ध गंध, फूल, धूप व दीप यांनी तिची पूजा करून नैवेद्य दाखवावा, पाच दिवसपर्यंत निराहार, फलाहार, एकभुक्त, मिताहार किंवा नक्‍तव्रत इ. पैकी जमेल तसे व्रत करावे. रोज पद्मपुराणातीला कथांचे श्रवण करावे. नियमित पूजेशिवाय पहिल्या दिवशी विष्णुच्या ह्रदयाची कमळांनी, दुसर्‍या दिवशी कटिप्रदेशाची बेलाने, तिसर्‍या दिवशी गुडघ्यांची केवड्याने, चौथ्या दिवशी पावलांची चमेलीच्या फुलांनी व पाचव्या दिवशी सर्व शरीराची तुलसीमंजिर्‍यांनी पूजा करावी. रोज
'ॐ नमो वासुदेवाय'
चा शंभर, हजार, दहा हजार अगर जमेल तितका जप करावा. व्रताच्या शेवटी ब्राह्मणदंपतीला भोजन घालून मग स्वत: जेवावे आपल्याकडे पुष्कळ स्त्रिया एकादशी, द्वादशी निराहार; त्रयोदशी शाकाहार; व चतुर्दशी, पौर्णिमा पुन्हा निराहार राहून मग प्रतिपदेस सकाळी ब्राह्मण दंपतीस भोजन घालून मग स्वत: जेवतात.

चातुर्मास्य समाप्ति

चातुर्मासात केलेल्या व्रतांची सांगता करावी.

तुलसी विवाह आरंभ

पद्मपुराणमतानुसार तुलसीविवाह कार्तिक शुक्ल नवमीस दिलेला आहे. 'निर्णय सिंधू' वगैरेंचे मताने महाराष्ट्रात व कर्नाटकात द्वादशी ही तुलसीविवाहाची तिथी आहे.
पद्मपुराणानुसार कार्तिक शुक्ल नवमीला तुलसीविवाहाचा उल्लेख आढळतो; पण इतर ग्रंथांच्या मते प्रबोधिनी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस अधिक फलदायी होतो. विवाहाच्या पूर्वदिवशी तुलसीवृंदावन सारवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात व तुलसीच्या मुळात चिंचा, आवळे ठेवतात. काही लोक सकाळी, काही सायंकाळी तुलसीविवाह लावतात.
व्रत करताना विवाहापूर्वी तीन महिने आधीपासून तुळशीला पाणी घालून टवटवीत ठेवावे. प्रबोधिनी किंवा भीष्मपंचक किंवा ज्योति:शास्त्रोक्‍त मुहूर्तावर तोरण बांधून, मंडप बनवून, सोबत आणखी चार ब्राह्मण घेऊन गणपति-मातृकापूजन, नांदी श्राद्ध व पुण्याहवाचन करून टवटवीत अशा तुळशीबरोबरच सोन्याची लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व चांदीची तुळस चांगल्या आसनावर प्रतिष्ठित करावी (पूर्वाभिमुख) व यजमानांनी सपत्‍निक उत्तराभिमुख बसून 'तुलसीविवाह विधी' नुसार 'वर 'पूजन (भगवान विष्णुचे पूजन), तसेच कन्या. 'तुळस' हिचे कन्यादान इ. विधी करावेत. कुशकण्डीहवन व सप्तपदी करून वस्त्रालंकार दान द्यावेत. यथाशक्‍ती ब्राह्मण-भोजन घालून मग स्वत: जेवावे. तुळसीविवाहसमाप्तीनंतर चातुर्मासात जी व्रते घेतली असतील त्या सर्वांची समाप्ती करतात व चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील, ते पदार्थ ब्राह्मणास दान देऊन मग स्वत: सेवन करतात.

नीरांजन द्वादशी

कार्तिक शुक्ल द्वादशीच्या दिवशी रात्रौ विष्णू चार महिन्यांच्या झोपेतून जागा होतो. म्हणून या दिवशी व्रताला आरंभ करतात. हे व्रत पाच दिवस करावयाचे असते. या कालात विष्णु, शिव, सूर्य, गौरी इ. देवतांना आणि त्याचप्रमाणे आईबाप, गाई-घोडे हत्ती यांना नीरांजनाने ओवाळावे. हे व्रत म्हणजे एकप्रकारची शांतीच आहे. अजापाल नामक राजाने हे व्रत केले होते, अशी कथा आहे. प्रत्येक वर्षी हे व्रत करावे, असे सांगितले आहे.
फल - रोगनिवारण आणि समृद्धी.

योगेश्‍वर द्वादशीव्रत

हे तिथिव्रत आहे. कार्तिक शुक्ल एकादशीला या व्रताचा आरंभ करून द्वादशीला संकल्पपूर्वक स्नान करून विषणुपूजा करतात. उद्यापनाच्या वेळी वैदिक ब्राह्मणाला सम संख्येने द्रव्यदान करावे. वेदवेत्त्याला दुप्पट आणि पंचरात्र यज्ञ करणार्‍या आचार्याला सहस्रपट धान्य द्यावे, असे सांगितले आहे

पंढरपूर यात्रा / कार्तिकी व्रत किंवा कृत्तिका व्रत

कार्तिक शुक्ल एकादशीपासून अथवा पौर्णिमेपासून हे व्रत करतात. कुरुक्षेत्र, प्रयाग, पुष्कर, नैमिष, मूलस्थान किंवा दुसर्‍या कोणत्याही तीर्थाच्या ठिकाणी स्नान करणे. कृत्तिकांच्या सोने, चांदी, रत्‍ने, लोणी व पीठ यांच्या सहा मूर्ती करून त्यांना सुशोभित करून ब्राह्मणांना दान देणे असा याचा विधी आहे.
कार्तिक शुद्ध एकादशीस पंढरीची वारी करतात.

मन्वादि

१४ मन्वंतराच्या आरंभ झाल्या अशा १४ तिथीना मन्वादि असे म्हणतात. या मन्वादि १४ तिथी पुढे दिल्या आहेत.
स्वायंभुव
 चैत्र शुक्ल तृतीया
स्वारोचीस
 चैत्र शुक्ल पौर्णिमा
उत्तम
 कार्तिक शुक्ल पौर्णिमा
तामस
 आषाढ शुक्ल पौर्णिमा
रैवत
 कार्तिक शुक्ल द्वादशी.
चाक्षुस
  आषाढ शुक्ल दशमी.
वैवस्वत
 ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
सावर्णी
 फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
दक्ष सावर्णी
 आश्विन शुक्ल नवमी.
१०
ब्रह्म सावर्णी
 माघ शुक्ल सप्तमी
११
धर्म सावर्णी
 पौष शुक्ल एकादशी.
१२
रुद्र सावर्णी
 भाद्रपद शुक्ल तृतीया.
१३
देव / रुची सावर्णी
 फाल्गुन शुक्ल अमावस्या.
१४
इंद्र/ भूती सावर्णी
 श्रावण कृष्ण अष्टमी.
मनुबाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत म्हटले आहे

महर्षय: सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा !
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा: !!                        
(श्रीमद्भ्गव्दगीता  अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण म्हणतात हे अर्जुना  सात महर्षी जन आणि त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु  हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन  माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.

शाक-गोपद्म व्रत समाप्ति

आषाढ शुक्ल द्वादशी पासून स्नान करून देवघरात किंवा तुळशीपुढे ३३ गोपद्म काढून त्याची पूजा करण्याचे हे व्रत कार्तिक शुल्क एकादशीपर्यंत ४ महिने दररोज हे व्रत करतात.

अमृतयोग

२५:०० नंतर शुक्रवारी रेवती नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.  
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

भद्रा

९:१३ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष माणू नये.

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय. तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व कार्यास प्रशस्त मानावे.


घबाड

९:१३ नंतर २५:०० पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: विशाखा
चंद्र नक्षत्र : उत्तराभाद्रपदा
तिथी: १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

क्षयदिन

ज्या तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment