Saturday, 26 November 2016

दिनविशेष - २७ नोव्हेंबर – २०१६



तिथी
 कार्तिक कृष्ण १३ (१२:४७)   
वार
 रविवार
नक्षत्र
 स्वाती (१८:०५)
योग
 शोभन (२७:३१)
करण
 विष्टि (२६:०५)


शिवरात्री

कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे विशेष महत्व आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, आळंदी

आळंदी येथे अजानवृक्षाखाली संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला जिवंत समाधी घेतली म्हणूनच या स्थानास संजीवन समाधी म्हटले जाते. याठिकाणी आषाढी-कार्तिकी एकादशीला यात्रा भरते तसेच ज्ञानेश्वर समाधी दिनी येथे उत्सव असतो.
ही वारी कलियुगातील मोक्षदायी वारी आहे असे मानले जाते. आळंदी येथे श्रीज्ञानेश्‍वर महाराजांची समाधी आहे. त्यामुळे आळंदीस क्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आहे. पुराणान्तरी ह्या क्षेत्राचा शिवपीठ म्हणून महिमा गाजत होता. पूर्वी या क्षेत्रास आनंदविपिन, वारुण, कपिल, अलका व सिद्धक्षेत्र अशी पाच नवे असल्याचा स्कंदपुराणात उल्लेख आहे व संतांच्या अभंगात अलंकापुरी, अलंकापूर, अलंकावती या नावांनी आळंदीचा उल्लेख योतो. पुढे शके ६९० त 'अलंदीय' असा उल्लेख सापडतो. त्यासच पुढे 'आळंदी' हे नाव प्राप्त झाले.
श्रीज्ञानेश्‍वरांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी, कृष्णजन्माच्या वेळी झाला म्हणून त्यांना विष्णुचा अवतार मानतात. ज्ञानदेवांनी धर्म, अर्थ, काम व मोक्षाचे हे चार पुरुषार्थ सांगून वारकरी सांप्रदायात भक्‍ती हे मोक्ष आणि स्वात्मसुखाचे श्रेष्ठ साधन असल्याचे सांगून, प्रसंगी चमत्कार दाखवून ईश्‍वरभक्‍ती वाढविली. एवढेच नव्हे तर भगवान विष्णु ज्ञानेश्‍वरांच्या रूपाने अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी अवतीर्ण झाले असल्याने त्यांनी

यारे यारे लहानथोर । याती भलते नारीनर ।
करावा विचार । न लागे चिंता कोणासी ॥

असे म्हणून सर्व अधिकारांच्या लोकांना पाचारण केलेले आहे.
ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, हरिपाठ व अभंग इ. ग्रंथ मुमुक्षूंसाठी लिहून ठेवावे. नंतर ज्ञानदेवांना आपले इहलोकीचे कार्य समाप्त झाले, असे वाटले. म्हणुन पांडुरगाजवळ त्यांनी समाधीची अनुज्ञा मागितली. पांडुरंगाकडून वचन मिळाले ते-

कृष्णपक्षीं तुज निर्धारा । भेट देत जाईन ॥
कार्तिक शुद्ध एकादशी । पंढरीयात्रा होईल सरिशी ।
दुसरी कृष्णपक्षी निर्धारेसी । तुज दिधली असे ॥

असे वचन मिळताच ज्ञानेश्‍वरांनी जिवंत समाधी घेण्याचा आपला निर्धार जाहीर केला.

भद्रा

१२:४७ नंतर २६:०५ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष माणू नये.

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय. तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व कार्यास प्रशस्त मानावे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment