तिथी
|
कार्तिक शुक्ल १४ (१२:५४)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
भरणी (१७:५०)
|
योग
|
वरीयान (१३:३०)
|
करण
|
वणिज (१२:५४), विष्टि (२४:०५)
|
वैकुंठ चतुर्दशी
हे व्रत सनत्कुमार संहितेत
सांगितलेल्या कार्तिक माहात्म्यात आहे. अरुणोदयव्यापिनी कार्तिक शुद्ध चतुर्दशी
दिवशी हे व्रत करतात. निर्णय सिंधुकार म्हणतात की, रात्रीव्यापिनी चतुर्दशी
दिवशी विष्णुपूजेसाठी घ्यावी व विश्वेश्वराची पूजा प्रसन्नता यासाठी
अरुणोदयव्यापिनी घ्यावी. सनत्कुमार संहितेप्रमाणे उपवास मात्र आदले दिवशी करावा.
कारण हेमलंब नामक संवत्सरी कार्तिकी शुद्ध चतुर्दशी दिवशी प्रत्यक्ष भगवान
विष्णूनीच मणिमर्णिका घाटावर आंघोळ करून श्रीशिवांचे पूजन केले होते.
यासाठी विष्णुपूजेला
रात्रिव्यापिनी व शिवपूजेला अरुणोदयव्यापिनी तिथी असावी. या दिवशी प्रात:स्नान
करून उपवास करावा. सायंकाळी श्रीविष्णुची व पहाटे श्रीशिवाची १००० कमळांनी पूजा
करणारा जीवन्मुक्त होतो. वैकुंठचतुर्दशीस रात्री तुळसी व पहाटॆ शिवाला बेल
वाहावा.
या दिवशी सूर्योदयापूर्वी
नगरप्रदक्षिणा घातल्यास वैकुंठलोक प्राप्त होतो अशी भाविकांची समजूत आहे, म्हणून या दिवशी नगरप्रदक्षिणा घालतात.
पाषाण चतुर्दशी
या कार्तिक शुद्ध
चतुर्दशीला जवाच्या पिठाची चौरसाकार भाकरी करून गौरी (पार्वती ) ची पूजा करावी व
तिला त्या भाकरीचा नैवेद्य दाखवावा. नंतर आपण तसलीच भाकरी खावी. यायोगे सुख, संपत्ती व सौंदर्य यांची प्राप्ती होते.
कार्तिक उद्यापन
कार्तिक शुद्ध चतुर्दशीस
गणपति-मातृका, नांदीश्राद्ध, पुण्याहवाचन, सर्वतोभद्र, ग्रह व हवनाची यथायोग्य वेदी बनवून रात्री तीवर त्या त्या देवांची स्थापना
करून पूजा करावी. यासाठी यथाशक्ती भगवान विष्णूची सायुध सुवर्णमूर्ती बनवून
व्रतोद्यापन-कौमुदी किंवा व्रतोद्यापन-प्रकाश यानुसार सर्वतोभद्र मंडळ स्थापित
केलेल्या सोन्याच्या कलशावर उक्त मुर्तीची यथाविधी स्थापना, प्रतिष्ठा व पूजा करून रात्रभर जागरण करावे व पौर्णिमेस पहाटे प्रात:स्नानादी
उरकून गोदान, वस्त्रदान, शय्यादान, अन्नदान इ. करून तीस
दांपत्यांना भोजन द्यावे व व्रतविसर्जन करून मित्रपरिवारासह मग जेवावे.
कार्तिकी किंवा मत्स्यावतार दिन
कार्तिक शुद्ध चतुर्दशी
दिवशी ब्रह्मा, विष्णू, महेश, आदित्य व अंगिरा यांनी हे पर्व फार परमपवित्र
आहे असे सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी स्नान, दान, होम, यज्ञ, उपासना इ. केल्यास अनंतपट फळ मिळते. या दिवशी
कृत्तिका नक्षत्र असेल तर हिला 'महाकार्तिकी' म्हणतात. या दिवशी भरणी
नक्षत्र असेल तर हिचे जादा फळ असते, व रोहिणी असेल तर हिचे महत्त्व वाढते. याच दिवशी
सायंकाळी भगवान विष्णूनी मत्स्यावतार धारण केला होता, त्यामुळे या दिवशी दान
केल्यास यज्ञाचे फळ मिळते. तसेच जर या दिवशी चंद्रमा व बृहस्पती कृत्तिका
नक्षत्रात असतील तर हिला 'महापौर्णिमा' नामाभिधान आहे. या दिवशी चंद्र कृत्तिकेत व
सूर्य विशाखात असेल तर 'पद्मक' योग असतो. की जो पुष्करातही दुर्लभ आहे. या
दिवशी संध्याकाळी त्रिपुरोत्सव करून
'कीटा: पतंगा: मशकाश्च वृक्षे जले स्थले ये विचरन्ति जीवा:
।
दृष्ट्वा प्रदीपं नहि
भगिनस्त्वें मुक्तरूपाहि भवन्ति तत्र ॥'
असे म्हणुन दीपदान केल्यास
पुनर्जन्मापासून मुक्ती मिळते. जर या दिवशी कृत्तिकेत 'विश्वस्वामी' चे दर्शन घेतले तर ब्राह्मण सात जन्मपर्यंत वेदपारंगत व धनवान बनतो.
याच दिवशी चंद्रोदयाच्या
वेळी शिवा, संभूती, प्रीती, संतती, अनसूया व क्षमा या सहा तपस्वी
कृत्तिकांची पूजा करावी; कारण या सहाही जणी कार्तिकेयाच्या माता होत.
· कार्तिकेय, खड्गी (शिवा), वरुण, हुताशन व सशूक (मोडयुक्त) धान्य या वस्तू
संध्याकाळी दरवाजावर टांगण्यायोग्य असल्याने गंधपुष्प इ. नी यांचे पूजन केल्यास
शौर्य, वीर्य, धैर्य, इ. गोष्टी वाढतात.
· कार्तिकीस नक्तव्रत करून बैल दान केल्यास शिवपदाची प्राप्ती होते.
· जर गाय, घोडा, हत्ती, रथ, तूप इ. वस्तूंचे दान केल्यास संपत्ती वाढते.
· या दिवशी सोपवास हरिस्मरण केल्यास अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळून सूर्यलोकाची
प्राप्ती होते.
· आपल्या अगर दुसर्याच्या कन्येचे 'सालंकृत' कन्यादान या दिवशी केल्यास 'संतानव्रत' पूर्ण होते.
· सोन्याचा मेंढा दान केल्यास ग्रहबाधा नष्ट होते, व
· या पौर्णिमेपासून सुरू करून वर्षभर दर पौर्णिमेस नक्त व्रत केले तर सर्व
मनोरथ पूर्ण होतात.
ब्रह्मकूर्च
कार्तिक शुद्ध चतुर्दशीस
रोजी स्नानानंतर उपवासाचा संकल्प सोडून देवांना जल, अक्षता, इ. व पितरांना जल, तीळ इ. वाहून
१) कपिला गाईचे 'गोमूत्र'
२) काळ्या गाईचे 'गोमय',
३) पांढर्या गाईचे 'दूध',
४) पिवळ्या गाईचे 'दही',
५) कबर्या गाईचे 'तूप'
घेऊन सर्व वस्तू एकत्र
मिसळाव्यात व गाळाव्यात. नंतर त्यात दर्भ-जल टाकून रात्री हे 'पंचगव्य' प्याल्यास ताबडतोब सर्व पापतापांपासून मुक्ती मिळून, सर्व रोगदोष दूर होतात. अद्भुत
अशी शक्ती प्राप्त होऊन पराक्रम व निरोगीपणात वाढ होते.
आवळी पूजन व भोजन
कार्तिक पौर्णिमेस आवळी
वृक्षाची पूजा करतात. मृदुमान्य दैत्याने देवांना स्वर्गातून स्थानभ्रष्ट केले.
तेव्हा देवांनी पृथ्वीवर येऊन आवळीच्या झाडाचा आश्रय घेतला. त्या दिवसापासून या
वृक्षाला या दिवशी पूज्यत प्राप्त झाली. म्हणून कार्तिक पौर्णिमेस या वृक्षाची
पूजा विहित आहे. पूजेच्या वेळी आवळीला सूत गुंडाळतात. श्रीफलयुक्त अर्घ्य देतात.
तिच्या चारी दिशांना बलिदान करतात. अष्ट दिशांना तुपाचे दिवे लावतात. पुढील
मंत्राने प्रार्थना करतात
धात्रिदेवि नमस्तुभ्यं
सर्वपापक्षयंकरि ।
निरोगं कुरु मां नित्यं
निष्पापं धात्रि सर्वदा ॥
नंतर पितरांचे तर्पण, घृतपात्रदान व दंपतीभोजन करून व्रत समाप्त करतात.
त्रिपुरारी पोर्णिमा
कार्तिक पौर्णिमेस हे नाव
आहे. या दिवशी रात्री घरात,
देवळात आणि घराबाहेरही दिवे लावतात. दीपदान
द्यावे, गंगास्नान करावे आणि कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यावे, असा विधी आहे. निरनिराळ्या देवस्थांनात दगडी दीपमाळा असतात, त्याही या दिवशी पाजळतात. या दीपोत्सवाला त्रिपुर पाजळणे असे म्हणतात.
दीपोत्सवाचा मंत्र असा -
कीटा: पतंगा: मशकाश्च
वृक्षा जले स्थले ये विचरन्ति जीवा: ।
दृष्ट्वा प्रदीपं न च
जन्मभागिनो भवन्ति नित्यं श्वपचा हि विप्रा: ॥
त्रिपुरीज्वलन व्रत
कार्तिक पौर्णिमेस या
व्रताचे नाव आहे. या पौर्णिमेस आरंभ करून पुढील वर्षाच्या कार्तिकी पौर्णिमेस
व्रताचे उद्यापन करतात. या व्रताचा मुख्य देव शिव आहे. दरमहा पौर्णिमेला शिवापुढे
निरनिराळ्या प्रकारच्या ७५० वाती लावणे, निरनिराळी दीपपात्रे दान करणे, नैवेद्यासाठी निरनिराळे अन्नपदार्थ करणे, शिवाच्या निरनिराळ्या
नावांचा आदेश करून ते पदार्थ शिवाला अर्पण करणे, असा या व्रताचा विधी आहे.
दुसर्या दिवशी दांपत्याला भोजन घालून वस्त्रालंकारांनी त्याची संभावना करायची
असते. उद्यापनाच्या दिवशी संकल्पपूर्वक ब्रह्मादी देवतांची स्थापना, कलशावर पूर्णपात्रात शिवाची सुवर्ण प्रतिमा ठेवून तिची पूजा करतात. नंतर
पितळेच्या दीपपात्रात अठरा धाग्यांनी बनविलेल्या ७५० वाती तुपात भिजवून त्यांनी
देवाची आरती करतात. रात्री जागरण करून दुसर्या दिवशी समिधा, तीळ पायस व तूप या हविर्द्रव्यांनी हवन करतात. शेवटी गोदान, पीठदान करून बारा दापंत्यांना यथाशक्ती वस्त्रालंकार व सौभाग्य वायने देतात.
कार्तिकी व्रत
तामिळ लोकांचे एक व्रत.
कार्तिकी पौर्णिमेस पंचमहाभूतांप्रीत्यर्थ हे व्रत करतात. यात अग्नीला प्राधान्य
असते. यामुळेच सूर्यास्तानंतर घरीदारी दिवे लावून सर्वत्र प्रकाश करणे हे या
व्रताचे वैशिष्ट्य आहे.
दक्षिण अर्काट जिल्ह्यातील
तिरुवन्नमलाईच्या शिव-मंदिरात हा व्रतोत्सव थाटाने साजरा करतात. या वेळी त्या सर्व
डोंगरावर रोषणाई होते व शिखरावर एक मोठी मशाल पेटविली जाते. या उत्सवात पालापाचोळा
एकत्र करून जाळण्याची प्रथा आहे.
निचेंगोडू, पळणि व वेदारण्यम् व तिरुचेंदूर येथेही हा उत्सव करतात.
याच्या कथेचे पर्याय
पुढीलप्रमाणे
१) सर्वांगाच दाह होत होता म्हणुन बलिराजाने हे
व्रत केले.
२) महिषासुराशी लढताना शिवलिंग भग्न झाले, म्हणून त्या पापाच्या क्षालनासाठी पार्वतीने हे व्रत केले.
स्कंदजयंती
कार्तिकी पौर्णिमे दिवशी
स्कंदजयंती मानतात व त्या दिवशी स्कंदमूर्तीची पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेस
कृत्तिका नक्षत्र असताना स्कंदाचे दर्शन घेणारा धनवान व वेदपारंगत होतो. दक्षिणेत
या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजा करून एका उंच स्तंभावर अग्नी
प्रज्वलित करतात.
कार्तिकस्वामी दर्शन
१७:५० नंतर पौर्णिमा व
कृत्तिका नक्षत्र या योगावर कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे.
विधी : प्रथम तेथे स्नान करून कार्तिकेयाचे दर्शन घेऊन दर्भ, चन्दन, फुले, दशांग धूप, दीप अर्पण करून
कार्तिकेयाचे वाहन मयूर त्याची पूजा करून नंतर पुढे दिलेले श्लोक म्हणून एक एक
उपचार अर्पण करावा।
कमण्डलुर्जलापूर्ण:
स्वर्णगर्भ: सुलक्षण: |
अर्पितस्ते महासेन
प्रसन्नोऽनेन मे भव ||
या श्लोकाने जलाने भरलेला व
त्यात किंचित सुवर्ण घातलेला कमण्डलु समर्पण करावा.
ब्रम्हसूत्रं महादिव्यं
प्रीतये ते मयार्पीतम् |
ब्रम्हजन्मास्तु मे देव
ब्रम्हसूत्रसमर्पणात् ||
ब्राम्हण जन्म
प्राप्तीकरिता या श्लोकाने यज्ञोपवीत अर्पण करावे.
गोमतीतीरसंभूता गोपी वापी
समुद्भवा |
मृदर्पिता मया तुभ्यं
ब्रम्हजन्माप्तये गुह ||
या श्लोकाने गोपीचंदन
समर्पण करावे.
उपवीतानि शुभ्राणि
पवित्राणि शिवात्मज |
पुरतस्तेऽर्पयाम्यद्य
प्रसादार्थं तव प्रभो ||
या श्लोकाने पोवते अर्पण
करावे. (पोवते म्हणजे कापसाचे सुत काढून त्याची नवसुती करून त्या नवसुतीची आठ
ग्रंथीची (गाठीची) माळ).
तिला: काश्यपसंभूतास्तिला:
पापहरा: स्मृता: |
पादयोरर्पितास्तेऽद्य
सर्वपापापनुत्तये ||
सर्व पाप दूर होण्याकरिता
या श्लोकाने तीळ अर्पण करावे.
दर्भा ब्रम्हमया
विष्णुस्वरूपा रुद्ररूपिण: |
प्रीत्यर्थं तव देवेश
न्यस्ता: पादतले मया ||
या श्लोकाने दर्भ अगर कुश
चरणावर अर्पण करावे.
अष्टाविंशतिसंख्याकै
रुद्राक्षैर्योजिता मया |
अर्पिता तव हस्तेच गृहाण
सुरसैन्यप ||
या श्लोकाने अठ्ठावीस
रुद्राक्षांची माळ अर्पण करावी.
सुवर्णमुत्तमं लोके
भुक्तिमुक्तिप्रदं तथा |
अर्पितं तव देवेश
दैन्याज्ञानापनुत्तये ||
दैन्य व अज्ञान नाहीसे
होण्याकरिता या श्लोकाने सुवर्ण अर्पण करून नमस्कार करावा.
श्रीकार्तिकस्वामींचे
दर्शनास जाणार्यांना हे वरील आठ श्लोक येणे आणि वरील वस्तूही जवळ ठेवणे आवश्यक
आहे. कार्तिक शुध्द पौर्णिमेस कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा हा विधि आहे.
भाद्रपद शुध्द षष्ठीला
कार्तिकेयाचे दर्शन घेतले वा स्मरण केले असता पापांचा नाश होतो. भविष्य पुराणात
कार्तिकेयाची मृतिकेची मूर्ती करून पूजा करावयास सांगितले आहे. नीलतीर्थांचे स्मरण
करून स्नान करावे आणि वरील प्रमाणे उपचार अर्पण करावेत.
कुलधर्म
धनुरयन
१४:३० ला रवि सायन धनु
राशीत प्रवेश करीत आहे.
भारतीय अग्रहायण मासारंभ
भारतीय कालगणनेनुसार अग्रहायण मास (मार्गशीर्ष मास)
आरंभ होत आहे.
यमघंट योग
१७:५० नंतर गुरुवारी कृत्तिका
नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
|
यमघंट योगावर जन्म
झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण
केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता
कुलक्षय
देवास्थापाना केली असता
मृत्यू हि फळे मिळतात.
याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५,
गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर
पुढे) देखील यमघंट योग होतो.
भद्रा
१२:५४ नंतर २४:०५ पर्यंत
भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ
आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील
काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ
मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
पौर्णिमा श्राद्ध
अपराण्ह काळी पौर्णिमा
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी कार्तिक शुक्ल पौर्णिमा असेल तर या
दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment