Wednesday, 14 November 2018

दिनविशेष - १७ नोव्हेंबर २०१८


तिथी
कार्तिक शुक्ल ९ (११:५५)
वार
शनिवार
नक्षत्र
शततारका (१४:२६)
योग
व्याघात (१८:५९)
करण
कौलव (११:५५), तैतिल (२४:४९)


कुष्मांड नवमी

कोहळा दान करावा.
कार्तिक शुक्ल नवमीस हे नाव आहे. या दिवशी कोहळा दान देण्याचे व्रत करतात. त्याचा विधी असा - कोहळा गाईच्या तुपात बुडवितात. त्याची पूजा करतात. मग तो पंचरत्‍ने, फळे, अन्न, दक्षिणा यासह पुढील मंत्राने ब्राह्मणाला दान देतात. -
'कूष्मांडं बहुबीजाढ्यं ब्रह्मणा निर्मितं पुरा ।
दास्यामि विष्णवे तुभ्यं पितृणां तारणाय च ॥

अक्षय नवमी / नवमीव्रत

कार्तिक शुक्ल नवमी दिवशी विष्णूने कूष्मांड दैत्याचा वध केला. म्हणून या तिथीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या तिथीस विष्णूची पूजा करतात. कार्तिक शुक्ल नवमी रोजी व्रतपूजा, तर्पण व अन्नदान केल्यास अनंत फलप्राप्ती होते. पूर्वाण्हव्यापि तिथी यावेळी घेण्याची प्रथा आहे. जर ही दोन्ही दिवस नसेल अगर दोन्ही दिवस असेल तर मग-
'अष्टम्या नवमीविद्धा कर्तव्या फलकांक्षिणा ।
न कुर्यान्नवमीं तात्‌ दशम्या तु ददाचन ।'
यानुसार पूर्वविद्धा तिथीच घेणे सयुक्तिक होय. या दिवशी केलेली जपतपपूजादी कृत्ये, तसेच दानपुण्यादी लाभ 'अक्षय' स्वरूपाचे असतात म्हणून ही 'अक्षय नवमी'  याही नावाने ओळखली जाते. या दिवशी गाय, सोने, वस्त्रालंकार इ.च्या दानामुळे कर्मगतीनुसार इंद्रत्व, शूरत्व वा राजेपद मिळते; इतकेच नव्हे तर ब्रह्महत्यादि पापांपासून मुक्‍ती मिळते. हीच तिथी 'धात्रीनवमी' व कूष्मांड नवमी' या नावांनीहि ओळखली जाते. त्यामुळे या दिवशी प्रात:स्नानादि उरकून धात्री (आवळ) वृक्षाखाली पूर्वाभिमुख बसून
'ॐ धात्र्यै नम: ।'
अशाप्रकारे आवाहन करुन षोडशोपचार अगर पंचोपचार पूजा करावी.
'पिता पितामहाश्‍चान्य अपुत्रा ये च गोत्रिण: ।
ते पिबन्तु मया दत्तं धात्रीमूलेऽक्षयं पय: ॥
आब्रह्मस्तंबपर्यंत देवर्षिपितृमानव: ।
ते पिबन्तु मया दत्तं धात्रीमूलेऽक्षयं पय: ।'
या मंत्रांनी आवळ्याच्या झाडाशी मुळाशी दुधाची धार धऊन
'दामोदर निवासायै धात्र्यै देव्यै नमोनम: ।
सूत्रेणानेन बध्नोमि धात्रि देवि नमोऽस्तु ते ॥'
अशा मंत्राने झाडाभोवती दोर्‍याचे वेढे द्यावेत. नंतर निरांजन अगर कर्पुरारती ओवाळून
'यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च |
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ॥ '
असा मंत्र म्हणत झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर पिकलेले कूष्मांड (कोहळा) घेऊन त्यात सोने, चांदी, पैसे इ. ठेवुन त्याची गंधाक्षतपुष्पांनी पूजा करावी.
'कूष्मांडं बहुबीजाडढ्यं ब्रह्मणा निर्मितं पुरा ।
दास्यामि विष्णवे तुभ्यं पितृणां तारणाय च ।'
अशी प्रार्थना करून सुयोग्य ब्राह्मणास गंधादी अर्पून
'ममाखिल पापक्षयपूर्वक सुखसौभाग्यदींनामुत्तरोत्तराभिवृद्धये कूष्मांडं दानं करिष्ये ।
या मंत्राने हा कोहळा त्यास दान द्यावा.

आरोग्यव्रत

कार्तिक शुक्ल नवमी रोजी अगर अन्य कोणत्याही महिन्यातील शुद्ध नवमीस उपवास करून दशमीस स्नान करून श्रीविष्णूची पूजा करावी. फळफूल अर्पण करून पक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा. तसेच चक्र, गदा, मुसळ, धनुष्य व खड्‌ग या आयुधांची लाल फुलांनी पूजा करून गोड अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा. याखेरीज मृगाजिनावर तिळांचे कमळ करून भॊवती द्रोण लावावेत. कमळावर सोनेरी किंवा चांगल्या रंगाचे अष्टदल काढून प्रत्येक पाकळीवर पूर्वादिक्रमाने मन, श्रोत्र, त्वचा, चक्षू, जिव्हा, घ्राण व बुद्धी यांची पूजा करावी.
'अनामयानींद्रियाणि प्राणश्‍च चिरसंस्थित: ।
अनाकुला च मे बुद्धि: सर्वेस्युर्निरुपद्रवा: ॥
मनसा कर्मणा वाचा मया जन्मनि जन्मनि ।
संचितं क्षपयत्वेन: कालात्मा भगवान हरि: ॥'
अशा मंत्राने यांची प्रार्थना केल्यास रोगी निरोगी होतो व दीर्घकालपर्यंत त्याची प्रकृती चांगली राहते.

तुलसीवास

कार्तिक शुक्ल नवमी रोजी प्रात:स्नान करून घरात वाळूची वेदी बनवावी. त्यावर तुळशीची सपर्ण फांदी, तुळशीचे संपूर्ण झाड, चांदीची सपर्ण फांदी व सोन्याची तुळशीची मंजिरीयुक्त प्रतिकृती ठेवुन यथाविधी पूजन करावे. यथाऋतू फळेफुले अर्पावीत. लांब वात असणारा एक तुपाचा दिवा अखंड प्रज्वलित ठेवावा व निराहार राहून रात्री कथा श्रवण करुन मग जमिनीवर झोपावे. याच प्रकारे नवमी, दशमी व एकादशीस करून मग द्वादशीस (रेवतीचा तृतीय चरण असल्यास तो सोडून मग ) ब्राह्मणदंपतीस दानधर्म करून भॊजन द्यावे व मग आपण जेवावे.

त्रिरात्र तुलसी व्रत

कार्तिक शुद्ध नवमीपासून तीन दिवस हे व्रत करतात. लक्ष्मीनारायणाच्या सुवर्णमूर्तीची तुळसीखाली पूजा, विष्णुहोम, विष्णुश्राद्ध, दांपत्यपूजा व द्वादशीला व्रताची सांगता, असा याचा विधी आहे.
फल - संतती, संपत्ती व स्वर्गप्राप्ती.

युगादि

ज्या तिथीला नवीन युगाचा आरंभ झाला त्या तिथीला युगादि असे म्हणतात. ४ युगांच्या आरंभीच्या ४ तिथी पुढील प्रमाणे आहेत.
१)
कृतयुग
 कार्तिक शुक्ल ९
२)
त्रेतायुग
 वैशाख शुक्ल ३
३)
द्वापारयुग
 माघ कृष्ण अमावास्या
४)
कलियुग
 भाद्रपद कृष्ण १३

दग्ध योग

११:५५ पर्यंत शनिवारी नवमी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी

 

दशमी श्राद्ध

अपराण्ह काळी दशमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी कार्तिक शुक्ल १० असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment