Sunday, 16 August 2015

दिनविशेष - १५ ऑगस्ट २०१५

तिथी
 श्रावण शु १ (२२:२२)
वार
 शनिवार
नक्षत्र
 मघा (२८:०६)
योग
 परिघ (अहोरात्र)
करण
 किंस्तुघ्न (९:२०)

नक्तव्रतारंभ

दिवसा भोजन न करता उपोषणाचा एकदा पाणी पिणे व सुर्यास्तानंतर भोजन करणे म्हणजे नक्तव्रत.

स्वातंत्र्य दिन

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजांपासून स्वतंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरणूवका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

श्रावणी शनिवार


दर शनिवारी नरसिंह-पिंपळ-शनि-मारुति पूजन करावे.

संपत शनिवारची कहाणी:
------------------------------
ऐका परमेश्वरा शनिदेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण रहात होता. त्याला तीन सुना होत्या. पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे. सकाळीच जेवी, लेकी-सुना सुद्धा शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणं आपला नित्याप्रमाणं शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं. “मुली मुली, आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरीमडक्यात काही दाणे पहा. थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकऱ्या कर. केनीकुर्डूची भाजी कर. तेरड्याचं बी वाटून ठेव”. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले तेवढेच तिनं दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या. केनीकुर्डूची भाजी केली. तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं नि सासूसासऱ्याची वाट पहात बसली. इतक्यांत तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल. घरात गेली, चार तेलाचे थेंब घेतले, त्यांच्या अंगाला तेल लावलं. वाटलेले बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला, तो काय दिला? ‘तुला काही कमी पडणार नाही’, म्हणून म्हणाला. आपलं उष्टं वळचणीला खोचलं, शनिदेव अदृश्य झाले. काही वेळानं घरी सासूरासासरा, दीरजावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाली. आपल्या घरात तर काही नव्हतं. हे असं कशानं आलं, म्हणून आश्चर्य करू लागली.
दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली? शनिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ठ्याचं रूप घेतलं, ब्राह्मणाच्या घरी आले. मागच्यासारखंच मला न्हाऊ घाल, माखू घाल, म्हणून म्हणू लागले. ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलूं लागली, “बाबा, आम्ही काय करावं! आमच्याजवळ काही नाहीं”. देव म्हणाले, “जे असेल त्यातलच थोडंसं मला दे”. ब्राह्मणाची सूनेला काही असलं तरी नाहीसं होईल” असा त्यांनी शाप दिला नि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडीमडकी पाहू लागली. तिला काही सापडलं नाही. संध्याकाळ झाली, सासूसासरा घरी आली. सर्व तयारी पाहू लागली. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला रागं भरली. सुनेनं झालेली हकीकत सांगितली.
पुढं तिसरा शनिवार आला. ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला, अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? काही वेळानं सासुसासरा घरी आली, जेवणाची तयारी पाहू लागली, तो तिथं काही दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं, मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला, मनांत फार खिन्न झाली.
पुढं चौथ्या शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं? गलितकुष्ठ्याचं रूप धरलं. ब्राह्मणाचे घरी आला. सुनेला म्हणू लागला. “बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव”. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाजीभाकर खायला दिली. त्याचा आत्मा थंड झाला. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझाच आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्टं वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडीमडकी पाहू लागली. डाळदाणा दृष्टीस पडला. तो काढला, तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासूसासऱ्यांची वाट पहात बसली. इतक्यात सासूसासरा तिथं आली. सुनेला विचारू लागली. “मुली मुली, आज तू काय केलं आहेस”? सुनेनं सांगितलं, “सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे. टाकळ्याची चोखणी आहे. आंघोळीला ऊन पाणी आहे. जेवायला बाजरीची भाकरी आहे. तोंडी लावायला केनीकुर्डूची भाजी आहे”. सासूसासऱ्यांस आनंद झाला. “आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठुन आणलसं”? म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली. दिलेला आशिर्वाद सांगितला. सासऱ्याला आनंद झाला.
इतक्यात काय चमत्कार झाला? सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीवर हिरेमोत्ये दृष्टीस पडली सुनेला दाखविली, ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, “देवानं मुलीला दर्शन दिलं”. पुढं दुसऱ्या सुनांस हकीकत विचारली, त्यांनी दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं, “आम्ही त्याला काही दिलं नाही, त्याचा त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्यामडक्यात दाणे नाहीसे झाले. म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला”. पुढं सासुसासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागला.
जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला. तसा तुम्हा आम्हा होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य : कोणी काही मागण्यास आला तर त्याला संतुष्ट करावे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment