Friday, 14 August 2015

दिनविशेष - १४ ऑगस्ट २०१५

तिथी
 निज आषाढ अमावास्या (२०:२३)
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 आश्लेषा (२५:२८)
योग
 वरियान (२९:४९)
करण
 चतुष्पाद (७:३३)

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

दर्श अमावास्या

अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
दर्शश्राद्ध : दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.

दीपपूजन

आषाढी अमावास्या "दीप अमावास्या" म्हणुन पाळली जाते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांना (नीराजन, पणती, समयी पासून कंदील, इलेक्ट्रिक दिव्यापर्यन्त सर्वांना ) घासून पुसून स्वच्छ करून ते पेटवले जातात. त्यांची पूजा केली जाते.
१) दीप अमावास्या व २) दीपावली हे दोन वार्षिक सण "दीप" या दैवताला खास समर्पित आहेत.

ज्याप्रमाणे शंकराला पाच (सांकेतिक) तोंडे व दत्तात्रेयाला तीन (सांकेतिक) तोंडे आहेत असे वैदिक सांगणे आहे, त्याच प्रमाणे "अग्नी" या वेदिक दैवताला दोन (सांकेतिक) तोंडे आहेत असे त्याचे वर्णन मिळते. उष्णता (Thermal Energy) व प्रकाश (Radiant Energy) हीच ती दोन तोंडे आहेत असे दिसते. मानवी डोळ्यांना दिसणारा प्रकाश फ़ारच कमी असला तरी शास्त्रीय दृष्टीने (प्रकाश किरणांचे अनंत प्रकार आहेत व ) प्रत्येक घन, द्रव वा वायुरूप पदार्थातून त्या पदार्थाच्या तापमानानुकूल प्रकाश त्यातून बाहेर फ़ेकला जातो. तापमान ६०० डिग्री सेन्टीग्रेड पेक्षा जास्त झाल्यावरच तो मानवी चक्षुंना दृष्य होऊ लागतॊ. अशाप्रकारे कोणत्याही पदार्थाची उष्णता व त्यांतून फ़ेकला जाणारा प्रकाश ही दोऩ्ही त्या पदार्थाची अविभाज्य रूपे आहेत. अग्नि देवतेच्या या
दोन तोंडांना अलग करता येणे अशक्य आहे.

दिव्यांच्या अवसेची कहाणी

ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतें. तिथें एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशीं घरातला पदार्थ स्वत: खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनीं विचार केला कीं, हा आपल्यावर उगाच आळ
आला आहे, तेव्हां हिचा आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनीं विचार केला व रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली.
दुसरे दिवशीं हिची फजिती झाली. सासू व दिरांनीं निंदा केली. घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे कीं, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वत: ते लावावेत, खडीसाखरेच्या खड्यानें त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या अवसेच्या दिवशीं त्यांस चांगला नैवेद्य दाखवावा. याप्रमाणे ही घरांतून निघाल्यावर तें सारें बंद पडलें.
पुढे ह्या अवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तेथें त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवांतले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करीत कीं कोणाचे घरीं जेवावयास काय केलें होतें ? कशी कशी पूजा मिळाली. वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनीं आपापल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला, बाबांनो, काय सांगूं ? यंदा मजसारखा हतभागीं कोणी नाहीं. मी दरवर्षीं सर्व दिव्यांत मुख्य असावयाचा, माझा थाटमाट जास्तीं व्हावयाचा. त्या मला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत. इतके म्हटल्यावर त्यास सर्व दीपकांनीं विचारलें, असें होण्याचें कारण काय ? मग तो सांगूं लागला, बाबांनो, काय सांगूं ? मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिने एके दिवशीं घरातला पदार्थ स्वत: खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनीं विचार केला कीं, हा आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां हिचा आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशीं हिची फजिती झाली. सासू व दिरांनीं निंदा केली. घरांतून तिला घालवून दिली. म्हणून मला असे दिवस आले. ती दर वर्षास माझी पूजा करी त असे. जेथें असेल तेथें ती खुशाल असो, असें म्हणून दिव्यानें आशीर्वाद दिला.

सदरहू घडलेला प्रकार राजानें श्रवण केला. घरीं आला. कोणीं प्रत्यक्ष पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली. तेव्हां कोणींहि पाहिलें नाहीं असें समजलें. मग तिला मेणा पाठवून आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्‍या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानें राज्य करूं लागली.


तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण

मृत्यूयोग

२५:२८ पर्यंत शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.

रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment