Wednesday, 19 August 2015

दिनविशेष - १८ ऑगस्ट २०१५

तिथी
 श्रावण शु ४ (२९:५३)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (१०:११)
योग
 सिद्ध (८:३२)
करण
 वणिज (१६:३४)

नागचतुर्थी (उपवास)

उपवासाचे महत्त्व

पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. `भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्‍ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख व संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो व त्याचे रक्षण होते.

नागाची पूजा करण्यामागील शास्त्र

सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

नवीन वस्त्रे व अलंकार घालण्याचे कारण

सत्येश्‍वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्‍वर समाधानी झाला. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात.

मेहंदी लावण्याचे महत्त्व

सत्येश्‍वर नागराजाच्या रूपात सत्यश्‍वेरीच्या पुढ्यात उभा राहिला. `तो निघून जाईल’, असे वाटून तिने त्याच्याकडून, म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले. ते वचन देतांना सत्येश्‍वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वत:च्या हातांवर मेहंदी काढते.

झोका खेळण्याचे महत्त्व

दुसर्‍या दिवशी सत्येश्‍वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती जंगलात सैरावैरा भटकू लागली व शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्‍वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश असतो – `जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दु:खे खाली जाऊ देत.

विनायक चतुर्थी (अंगारक योग)

मंगळवारी चतुर्थी आल्यास त्यास अंगारकी चतुर्थी म्हणतात. मंगळवारच्या दिवशी चतुर्थी हा योग अत्यन्त शुभ आणि कार्यसिद्धि देणारा असतो. गणेश अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केल्याने वर्षभर चतुर्थी केल्याचे फल मिळते.

अंगारकी गणेश चतुर्थी कथा
गणेश चतुर्थी सोबत अंगारक हे नाव असणे मंगळाचे सानिध्य दर्शविते. पौराणिक कथेनुसार पृथ्वीचा पुत्र मंगळ देवाने भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी खूप कठोर तप केले. मंगळ देवाची तपस्या आणि भक्ति ने प्रसन्न होऊन भगवान गणेशाने त्याना दर्शन दिले आणि आपल्या बरोबर रहाण्याचा आशिर्वाद दिला. मंगळ देवाना तेज आणि रक्तवर्ण यामुळे अंगारक हे नाव मिळाले आहे. याचमुळे या चतुर्थीला अंगारक चतुर्थी म्हणतात.

दुर्वागणपति व्रत

सौर पुराणा नुसार हे व्रत तीन किंवा पाच वर्षे करावे.
हे व्रत श्रावण शु. चतुर्थीला करतात. ही चतुर्थी मध्याह् नव्यापिनी धरतात. जर ती दोन्ही दिवशी असेल तर अगर दोन्हीही दिवशी नसेल तर 'मातृविद्धा प्रशस्यते' या नियमाने पूर्वविद्धा धरावी. त्या दिवशी प्रात: स्नानादी कर्मे करून एकदंत, चतुर्भुज, गजानन, सुवर्णाच्या आसनावर बसलेली अशी श्रीगणेशाची मूर्ती करावी. दुर्वाही सोन्याची करावी. नंतर सर्वतोभद्र आसनावर मंडलावर कलश स्थापन करावा. त्यावर दूर्वा ठेवून गजाननाची स्थापना करावी. त्यास लाल वस्त्र वाहावे व अनेक प्रकारच्या सुगंधित पत्री, फुले, बेलपान, आघाडा, शमी, दूर्वा आणि तुळशीपत्र अर्पण करून पूजा करावी. नंतर आरती करून
'गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन ।
व्रतं संपूर्णतां यातु त्वत्प्रसादादिभानन ॥
अशी प्रार्थना करावी. याप्रमाणे ३ अगर ५ वर्षे केल्याने सर्व अभीष्टे सिद्ध होतात.

पतेति


पारसी नववर्षारंभ

पारसी कालगणनेनुसार सन १३८५ आरंभ होत आहे.

दग्धयोग

२९:५३ नंतर मंगळवारी पंचमी असल्यामुळे होणारा दग्धयोग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


भद्रा

१६:३४ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

श्रवणी मंगळवार

दर मंगळवारी मंगळागौरी पूजन करावे.
सुवासिनी नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील प्रत्येक मंगळवारी आचरावयाचे सौभाग्यदायी मंगळागौरी ह्या देवतेचे एक व्रत. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा करतात. लग्नानंतर पहिली पाच वर्षे किंवा सात वर्षे हे व्रत पाळल्यानंतर या व्रताचे उद्यापन करतात.



सुवासिनी स्त्री श्रावणातल्या मंगळवारी आपल्या विवाहित मैत्रिणींसह शिवासमवेत असलेल्या गौरीची पूजा करते. पहिल्या वर्षी माहेरी मातृगृही हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे व्रत विशेषतः महाराष्ट्रीय ब्राह्मण स्त्री वर्गात विशेषतः आचरले जाते. बरोबरीच्या विवाहित मैत्रिणी (यांना वसोळ्याम्हणतात) एकत्र जमून मंगळागौर रात्रभर जागवितात. निरनिराळे खेळ, गाणी, उखाणे इत्यादींनी मजेत दिवस व रात्र घालवितात व दुसरे दिवशी पहाटे पूजा-आरती करून सांगता करतात. हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांकरिता आहे. जय जय मंगळगौरीम्हणून

सोळा वातींची मंगल आरती भक्तिभावाने सुवासिनी स्त्रिया करतात आणि नंतर हातात तांदूळ घेऊन बसतात व मंगळागौरीची कहाणी ऐकतात. ती कहाणी तात्पर्याने अशी : सुशीला नावाच्या एका साध्वीस मंगळागौरी प्रसन्न झाली व पुढे तिला वैधव्य प्राप्त झाले असताना मंगळागौरीने यमदूतांशी युद्ध करून तिच्या पतीचे प्राण परत आणले आणि तिला अखंड सौभाग्यवती केले. मंगळागौरीच्या भक्तिपूर्वक केलेल्या पूजेचे हे फल होय. ही कहाणी ऐकल्यावर सुवासिनी हातातील तांदूळ देवीला वाहतात. दुपारी मौन आचरून भोजन करतात.
मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा-शंकराची पूजा. पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात.पाच अथवा सात व्रते केल्यावर उद्यापन करतात.

मंगळागौरीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लखम्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असे म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल”. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणाले, “आपल्या नवऱ्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल”. असं बोलून बोवा चालता झाला.
तिनं आपल्या पतीला सांगितलं. वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर मागम्हणाली. घरदार आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटी पुत्र नाही, म्हणून दुःखी आहे.देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे”. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईलअसं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली.
वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, मोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पाच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबी एकच फळ आहे”. फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासा गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासा वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न कराम्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जाता जाता काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, “माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे”. हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला.
इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू, म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यांत शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे”. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.
दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठुन स्नान केलं, आपल्या आईल वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळायला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाही. मी त्याचे बरोबर खेळत नाही”. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. आईबापाला पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेकडो लोक येऊन जेवू लागले.
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगू लागला, “मला असं असं स्वप्न पडलं”. मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ.परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा”. ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाही”. दासींनी यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यानं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचलाअसं म्हणाली. तिनं सांगितलं. मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा”. सासर माहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment