Sunday, 8 January 2017

दिनविशेष - ९ जानेवारी – २०१७



तिथी
 पौष शुक्ल १२ (२६:०१)   
वार
 सोमवार
नक्षत्र
 कृत्तिका (१०:१७)
योग
 शुभ (१२:४७)
करण
 बव (१५:३३)


भागवत एकादशी

प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११ वी तिथीला एकादशी म्हटले जाते. एकादशीला हरिदिनी असेही म्हणतात. एकादशी विष्णूची तिथी मानलेली असून या दिवशी उपवास करतात. दुसर्‍या दिवशी त्याची पारणा करतात. एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील, त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसर्‍या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. भागवत एकादशी नेहमी द्वादशीयुक्त असते. वैष्णवलोक भागवत एकादशी पाळतात.
या दोन एकादश्या केव्हा मानायच्या यासंबंधी धर्मसिंधु, निर्णयसिंधु आदि ग्रंथात सविस्तर विवेचन केलेले आहे. मध्ययुगात शूलपाणीने (इ.स. १३७५- १४६०) एकादशी विवेक व रघुनंदनाने (इ.स. १६ वे शतक) एकादशी तत्त्व हे ग्रंथ फक्त एकादशीवर लिहिलेले आढळतात. या व्यतिरिक्त व्रतराज व कालतत्त्व विवेचन या ग्रंथातसुद्धा एकादशीवर भरपूर लेखन केलेले आढळते. प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षामध्ये २४ एकादश्या येतात, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीची नावे
कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जया (जयदा) व आमलकी.
कृष्ण पक्षातील एकादशीची नावे अशी
वरुथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ति (फलदा), सफला, षट्‌तिला, विजया व पापमोचनी.
या व्यतिरिक्त अधिक मास असेल त्यावेळी २ एकादशी येतात त्यांस कमला एकादशी म्हणतात.

एकादशीचे नित्यकाम्य असे प्रकार सांगितले आहेत. एकादशीच्या दिवशी ब्रह्महत्यादी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास करण्यास सांगितले जाते. वर्षाच्या २४ एकादश्या नियमाने करणे व त्या दिवशी विष्णुपूजा, जागरण, हरिकथा श्रवण इ. गोष्टी करणे हे नित्य व्रत सांगितले आहे.

काम्यव्रताविषयी कात्यायनाने लिहिले आहे ते असे जो कोणी विष्णुपरायण होऊन संसार सागरातून तरून जाऊ इच्छितो किंवा ऐश्‍वर्य, संतती, स्वर्ग, मोक्ष किंवा अन्य कोणतेही फल इच्छितो त्याने उभय पक्षातील एकादशीला अन्न ग्रहण करू नये. तुकारामाने एकादशीचे महत्त्व अभंगातून सांगितले आहे. तो अभंग असा
एकादशीस अन्नपान|
जे नर करिती भोजन|
श्‍वान विष्ठेसमान|
अधम जन तो एक॥
सेज बाजविलास भोग|
करी कामिनीशी संग|
तया जोडे क्षय रोग|
 जन्मव्याधी बळिवंत॥

कूर्मद्वादशी

पौष शुक्ल द्वादशीचे हे नाव आहे. या तिथीस नारायणप्रीत्यर्थ घृताचा कलश कासवाच्या व मंदार पर्वताच्या मूर्तीसह दान द्यावा, असे सांगितले आहे.

सुजन्म द्वादशी म्हणजे ब्रह्मद्वादशी

ज्या पौष शुक्ल १२ ला ज्येष्ठा नक्षत्र असेल त्या दिवशी विष्णूचे पूजन करून तूप दान द्यावे. गोमूत्र घेऊन उपवास करावा आणि पुढील माघादी महिन्यांत ठराविक वस्तूंचे दान आणि भोजन करावे.

माघ
तांदूळ दान व जलप्राशन
फाल्गुन
जवसदान व घृतभोजन
चैत्र
सुवर्णदान व सुपक्व शाकभोजन
वैशाख
जवसदान व दूर्वाभोजन
ज्येष्ठ
जलदान व दधिभोजन
आषाढ
सुवर्णदान व अन्न- जलदान
श्रावण
छत्रदान
भाद्रपद
तीळ, दूध यांचे दान
आश्‍विन
अन्नदान
कार्तिक
गूळ व काष्ठ यांचे दान, दूधभोजन
मार्गशीर्ष
मलयगिरी चंदन

म्हणजे कुळात श्रेष्ठता व घरात लक्ष्मी यांची प्राप्ती होते व सर्व इच्छा पूर्ण होतात.

घबाड

१०:१७ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पूर्वाषाढा
चंद्र नक्षत्र : कृत्तिका
तिथी: शुक्ल १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment