तिथी
|
चैत्र शुक्ल ११ (२५:३२)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
पुष्य (११:२८)
|
योग
|
सुकर्मा (१८:११)
|
करण
|
वणिज (१४:३८), विष्टि (२५:३२)
|
कामदा एकादशी
हे व्रत चैत्र शुद्ध एकादशीला करतात.
पूर्वदिवशी म्हणजे दशमीला मध्यान्ही जव, गहू आणि मूग यांचा एकवेळ आहार करुन श्रिविष्णूचे स्मरण करावे. दुसर्या दिवशी
एकादशीला प्रातःस्नान व नित्यकर्मे उरकल्यावर
ममाखिलपापक्षयपूर्वक परमेश्वरप्रीतिकामनाय
कामदैकादशीव्रतं करिष्ये ।
असा संकल्प करुन रात्री भगवान श्रीविष्णूची
मूर्ती झोपाळ्यावर बसवुन तिच्यासमोर जागर करावा. दुसर्या दिवशी पारणे करावे. याने
सर्व पापे दूर होतात. या एकादशीला पंढरीची वारी करतात. या वारिला 'चैत्रवारी' असे म्हणतात.
कथा
युधिष्ठिर म्हणाला, 'वासुदेवा, तुला नमस्कार असो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? ते मला सांग.'
श्रीकृष्ण म्हणाले, 'राजा, पूर्वी दिलिपाने विचारले असता, वसिष्ठ ऋषीने जी पुरातन कथा सांगितली, तीच कथा मी तुला सांगतो. मन एकाग्र करून ती ऐक.'
दिलीप राजाने विचारले, 'हे भगवन् चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे
नाव काय व तिचा पूजाविधी काय ते मला कृपा करून सांगा.'
वसिष्ठ म्हणाले, 'राजा, चांगले विचारलेस. मी तुला सर्व सांगतो. या एकादशीचे नाव कामदा आहे. ही एकादशी
फार पुण्यकारक आहे आणि पापरूपी काष्ठांना ती वणव्याच्या अग्नीप्रमाणे जाळून टाकते.
राजा, या एकादशीची कथा पाप नष्ट करणारी
व पुत्र देणारी आहे. ऐक तर.'
पूर्वी पाताळात सुवर्णरत्ने जडवलेल्या
रम्य भोगी नगरात मदोन्मत्त नाग राहत असत. राजा पुंडरीक त्यांचा पुढारी होता. तो त्या
नगरात राज्य करीत असे. गंधर्व, अप्सरा
व किन्नर त्या राजाची सेवा करीत असत.
त्यामध्येच श्रेष्ठ अप्सरा ललिता व
ललित नावाचा गंधर्व होता. हे जोडपे कामपीडित झालेले होते. त्यांची एकमेकांवर फार प्रीती
होती. ते स्वतःच्या धनधान्याने संपन्न असलेल्या सुंदर घरात आनंदाने क्रीडा करीत असत.
ललितेच्या ह्रदयात तिच्या पतीचे वास्तव्य निरंतर होते. ललित गंधर्वाच्याही मनात फक्त
त्याची प्रेयसी ललिता हिचाच निवास होता.
एकदा राजा पुंडरीक आपल्या नागांसह क्रीडा
करीत सभेत बसला ओता. त्यावेळी ललित गंधर्व गायन करीत होता;
पण त्याची प्रेयसी ललिता जवळ नव्हती. तिचे स्मरण केल्यामुळे गंधर्वाच्या
गायनात चुका होऊ लागल्या.
त्याची ही गाण्यामधील पदे गाळण्याची
चूक कर्कोटक नागाच्या लक्षात आली. ही चूक कोणत्या कारणामुळे होत आहे हेही त्याला समजले.
त्याने गायनातील ही चूक पुंडरीक नागराजाला कळवली.
त्यामुळे पुंडलीक रागावला. त्याचे नेत्र
क्रोधाने लाल झाले. मदनाने मन आतुर झालेल्या त्या ललित गंधर्वाला त्याने शाप दिला की
'हे दुर्बुद्धे, माझ्यासमोर गायन करताना पत्नीच्या चिंतनात तू चुका
केल्यास म्हणून तू मांसभक्षण करणारा व मनुष्य खाणारा राक्षस हो.'
'राजा, त्याच्या
या शापानुसार तो ललितगंधर्व राक्षस झाला. त्याचे तोंड भयंकर होते व नेत्र विक्राळ होते.
त्याला पाहिल्या बरोबरच भीती वाटत असे. त्याचे हात चार कोस लांब होते. आणि मुख पर्वतावरील
गुहेसारखे भयंकर होते. त्याचे नेत्र चंद्र-सूर्यासारखे प्रखर होते व मान पर्वतासारखी
उंच होती. त्याच्या नाकपुड्या गुहेसारख्या भासू लागल्या आणि ओठ दोन कोस लांबीचे झाले
होते. अशाप्रकारे त्याचे शरीर बत्तीस कोसांचे झाले. आपल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी
तो ललित-गंधर्व असा विक्राळ राक्षस झाला. आपल्या पतीचे शरीर असे अक्राळ-विक्राळ झालेले
पाहून अप्सरा ललितेला फार दुःख झाले. तिच्या मनात आले, 'माझा पती शापाने पीडित होऊन राक्षस झाला आहे. आता मी काय करू ? कोठे जाऊ?' असे विचार मनात येऊन तिला चैन पडेनासे झाले. आता ती ललिता आपल्या पतीसह गहन
वनात फिरू लागली.
तो राक्षस,
संचार करण्यास कठीण असलेल्या भयंकर वनात फिरत असे. विक्राळ रूपाचा
तो राक्षस नित्य पापे करीत असे. आणि मनुष्ये मारून खात असे. पण त्यालाही दुःखपीडा होत
असे व रात्रंदिवस शांती लाभत नसे. त्या गहन वनात आपल्या पतीबरोबर फिरताना दुःखी झालेली
ती ललिता आपल्या पतीची ही अवस्था पाहून फार रडत असे.
अशाप्रकारे फिरत असता ती ललिता एकदा
सहजच विंध्य पर्वताच्या विस्मयकारक शिखरावर येऊन पोहोचली. तेथे तिला ऋष्यशृंग मुनीचा
मंगलदायक आश्रम दिसला. ती त्वरेने आश्रमात गेली आणि विनयाने नम्र होऊन ऋष्यशृंग ऋषीपुढे
उभी राहिली. तिला पाहून ऋषी म्हणाला, 'हे कल्याणी, तू कोण आहेस? तू कुणाची कन्या ? येथे कशासाठी आली आहेस? मला
सर्व काही सत्य सांग पाहू.'
ललिता म्हणाले,'वीरधन्वा नावाचा गंधर्व आहे. त्या माहात्म्याची
मी कन्या आहे. माझ नाव ललिता. मी माझ्या पतीकरता येथे आले आहे. माझा पती शापाच्या दोषामुळे
भयंकर रूपाचा व पापे करणारा राक्षस झाला आहे. त्याची ही अवस्था पाहून मला सुख लाभत
नाही व चैन पडत नाही. हे ऋषीश्रेष्ठा, मी कोणते प्रायश्चित्त केले असता माझा पती राक्षसयोनीतून मुक्त होईल ? ते प्रायश्चित्त करण्याची मला आज्ञा करा म्हणजे
मी ते करीन.'
ऋष्यशृंग ऋषी म्हणाला, 'हे सुंदर ललिते. सध्या चैत्र महिन्याचा शुक्ल पक्ष
आहे. आता येणारी एकादशी कामदा एकादशी आहे. या एकादशीचे व्रत केले तर ती मनुष्याच्या
सर्व इच्छा पूर्ण करते. म्हणून हे कल्याणी, मी सांगतो त्या विधीप्रमाणे तू या एकादशीचे व्रत कर. या व्रताचे पुण्य तू आपल्या
पतीला दे. पुण्य दिल्याबरोबर एका क्षणातच त्याचा शापदोष नाहीसा होईल'
मुनींचे हे बोलणे ऐकून ललितेला फार
आनंद झाला. राजा, तिने एकादशीच्या दिवशी
उपवास केला. द्वादशीच्या दिवशी ती ऋष्यशृंग ऋषीच्या जवळ वासुदेवा समोर उभी राहिली.
आपल्या पतीचा उद्धार व्हावा म्हणून ती म्हणाली, 'मी उपवास करून कामदा एकादशीचे जे व्रत केले त्याच्या पुण्यप्रभावाने माझ्या
पतीचे पिशाच्चत्व नष्ट होऊ दे.'
ललिता असे म्हणताच त्याच क्षणी त्या
गंधर्वाचे पाप नष्ट झाले व त्याला दिव्यदेह मिळाला. त्याचे राक्षसत्व गेले आणि तो पुन्हा
गंधर्व झाला. त्याच्या अंगावर रत्नांचे व सुवर्णाचे अलंकार आले. तो पुन्हा ललितेसह
क्रीडा करू लागला. मग ते जोडपे विमानात बसले. दोघांची रूपे पूर्वीपेक्षा फारच सुंदर
झाली, व ते दोघे शोभून दिसू लागले. हे
सर्व कामदा एकादशीच्या व्रतामुळे झाले.
राजा, ही कामदा एकादशी खूप प्रयत्न करून करावीच. ब्रह्महत्येसारखे पाप नष्ट करणारी
व पिशाच्च योनीतून सोडवणारी ही कथा मी तुला लोकांच्या कल्याणाकरिता सांगितली. त्रैलोक्यात
याहून श्रेष्ठ असे दुसरे व्रत नाही. या एकादशीचे माहात्म्य जो वाचेल किंवा ऐकेल त्याला
वाजपेय यज्ञाचे फळ मिळेल.
॥वराहपुराणातील कामदा नावाच्या एकादशीचे
माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
अधिकमासातल्या शुक्ल एकादशीला हे व्रत
करतात. या व्रताने विष्णुरुपता लाभते.
श्रीकृष्ण दोलोत्सव
श्रीकृष्णाची पूजा करून झोपाळ्यावर स्थापना करावी.
ही मूर्ती ताम्हणात घेऊन पूजा करून झोपाळ्यात ठेवावी.
घबाड
२५:३२ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत
(दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्र : आश्लेषा
तिथी: शुक्ल १२ = १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.
भद्रा
१४:३८ नंतर २५:३२ पर्यंत भद्रा म्हणजेच
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी
भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा
गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी
आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक
चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध
व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन
राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व
वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर
राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच
त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री
असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे
त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच
घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच
घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका
भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग,
अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि
संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा
मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे
अग्निभय होण्याची शक्यता असते.
एकादशी श्राद्ध
अपराण्ह काळी एकादशी तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र
शुक्ल ११ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह
काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या
काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना
सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३
मुहूर्त सायंकाळ असतो.
अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी
सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ
प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment