Tuesday, 20 March 2018

दिनविशेष - २९ मार्च २०१८




तिथी
 चैत्र शुक्ल १३ (२१:२३)
वार
 गुरुवार
नक्षत्र
 मघा (८:३९)
योग
 शूल (१२:२८)
करण
 कौलव (१०:२२), तैतिल (२१:२३)

प्रदोष

सूर्यास्तानंतर पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने  साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास करतात.
‘कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये'

 इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व षोड्शोपचारे पूजा करावी.

भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥

भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा लावताना आठ वेळा नमस्कार करावा.

धर्मस्त्वं वृष रूपेण जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।

 या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी.  

ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !!

( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे  कायमचे नाहिशे होवोत.)

हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø  सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø  मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी भौम प्रदोष करावा.
Ø  शुक्रवार: सौभाग्य किंवा स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø  शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा. 
Ø  रविवार: आयुर्दायासाठी अर्कप्रदोष हे व्रत करावे.

महावीर जयंती

महावीर जयंती हा जैन धर्मातील मुख्य धार्मिक सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.

अनंगव्रत

चैत्र शुक्ल त्रयोदशीस अनंगव्रत सांगितले आहे. हे भगवान शंकराचे एक पवित्र व्रत आहे.

महादेवाला दवणा वाहणे

या दिवशी महादेवाला दवणा वहाव्यात.

कामत्रयोदशी

चैत्र शुक्ल त्रयोदशीस मदनाचा प्रतिनिधी म्हणून दमन वृक्षाची पूजा करतात.

चैत्रावली

हा एक प्राचीन उत्सव आहे. याला मदनभंजी असेही नाव आहे. यात चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या रात्री एका उद्यानात मदन आणि रती यांची स्थापना करीत व चतुर्दशीला त्यांची पूजा करीत. हा उत्सव गीतगायन, वाद्यवादन व अश्‍लील शब्दांचा प्रयोग यांनी साजरा होत असे. दुसर्‍या दिवशी सकाळी चिखलफेकीचा खेळ खेळत.

मदनोत्सव

हे तिथिव्रत आहे. चैत्र शुक्ल त्रयोदशीला हे व्रत करतात. यात कामदेवाच्या मूर्तीची किंवा त्याच्या चित्राची समंत्र पूजा करतात. नंतर दोन गाई दान देतात. त्याच दिवशी पत्‍नी आपल्या पतीला कामदेव मानून त्याची पूजा करतात. रात्री नृत्य, नाट्य करुन जागर करतात. फल-दुःख, रोग यांतून मुक्ती व कीर्ती आणि संपत्ती यांचा लाभ. या व्रताचा कालावधी अनेक वर्षे आहे. या तिथीलाच मदनाचा पुनर्जन्म झाला, अशी कथा आहे.

मदनपूजा

हे व्रत चैत्र शुक्ल त्रयोदशीला करतात.या दिवशी स्नान करुन उंची वस्त्रावर मदनदेवाची मोहक मूर्ती स्थापन करुन गंधपुष्पांनी पूजा करावी.
नमो रामाय कामाय कामदेवस्य मूर्तये ।
ब्रह्माविष्णुशिवेंद्राणां नमः क्षेमकराय वै ।

असा मंत्र म्हणून तुपात तळलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा. रात्री जागर करून दुसरे दिवशी पारणे करावे. असे केल्याने पतिपुत्रादिकांचे अखंड सुख प्राप्त होते.

घबाड

८:३९ नंतर २१:२३ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी
तिथी: शुक्ल १३ = १३
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३ x ३ = ३९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १३ तिथी मिळवू : ३९ + १३ = ५२
आता ७ ने भागू  ५२ / ७ = ७ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

त्रयोदशी श्राद्ध

अपराण्ह काळी त्रयोदशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र शुक्ल १३ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment