Wednesday, 14 March 2018

दिनविशेष - २२ मार्च २०१८





तिथी
 चैत्र शुक्ल ५ (१३:५२)   
वार
 गुरुवार
नक्षत्र
 कृत्तिका (१८:०५)
योग
 विष्कंभ (११:०१)
करण
 बालव(१३:५२), कौलव (२४:५९)

कल्पादि

ब्रह्मदेवाच्या  दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)     चैत्र - शुक्ल ५,
२)     चैत्र – कृष्ण ५
३)     वैशाख – शुक्ल ३
४)     कार्तिक - शुक्ल ७
५)     मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)     माघ – शुक्ल १३
७)     फाल्गुन – शुक्ल ३
धर्मसिंधु ग्रंथात चैत्र कृष्ण ५ न सांगता चैत्र शुक्ल प्रतिपदा सांगितली आहे.

विष्णूचा दोलोत्सव

श्रीविष्णूंचा दोलोत्सव साजरा करावा. श्रीविष्णूंची पूजा करून झोपाळ्यावर स्थापना करावी. ही मूर्ती ताम्हणात घेऊन पूजा करून झोपाळ्यात ठेवावी.

हयव्रत

चैत्र शुक्ल पंचमीला हे व्रत करतात. या तिथीला हयपंचमी असेही म्हणतात.
फल- संकटनिवारण.

कुमारव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल पंचमीला करतात. त्या दिवशी मयूरारुढ कार्तिकस्वामीची सुवर्णसमान मूर्ती बनवून त्याचे पूजन करावे. आचार्यांना वस्त्रदान व सुवर्णदान करावे. उपवास करावा आणि चांगल्या वैद्याच्या संमतीने ब्राह्मीचा रस व तूप घ्यावे. अशा प्रकारे प्रत्येक शुद्ध पंचमीला याप्रमाणे एक वर्षपर्यंत हे व्रत केले असता व्रत करणारा महाबुद्धिमान होतो. शास्त्राचे आकलन सहजतेने होते आणि शास्त्रार्थामध्ये 'स्फुरणशक्‍तीचा' चांगला विकास होतो.

पंचरात्र

नवरात्र व्रतांमधीलच हे एक व्रत आहे. याचे वैशिष्ट्य असे की, या व्रतात पंचमीला एकभुक्‍त व्रत करतात. षष्ठीला नक्‍त व्रत, सप्तमीला अयाचित भोजन घेतात, अष्टमीला उपवास (निराहार) आणि नवमीला व्रताचे पारणे करतात. हे व्रत केल्याने देवी अधिक प्रसन्न होते.

लक्ष्मीव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल पंचमीला करतात. या व्रतात लक्ष्मीचे पूजन करुन सुवर्णाचे कमलपुष्प दान करावे असे सांगितले आहे. असे केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांचा परिहार होतो.

श्रीव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल पंचमीच्या दिवशी करतात. यासाठी तृतीयेला अभ्यंगस्नान करुन शुद्धवस्त्र परिधान करावे. शुभ्र माला धारण करावी व व्रतमग्न व्हावे. तूप ,दही यांजबरोबर भात सेवन करावा. चतुर्थीला स्नान करुन पुनश्‍च व्रतस्थ व्हावे आणि पंचमीला प्रातःस्नानादी नित्यविधी उरकून लक्ष्मीचे पूजन करावे. पूजेमध्ये धान्य, हळद, आले, ऊस, गूळ व मीठ या वस्तू वाहाव्या आणि लक्ष्मीसूक्‍त म्हणून कमलपुष्पे वाहावीत. ती न मिळाल्यास बिल्वपत्रे (बिल्वकाष्ठे) आणि तीही न मिळाल्यास केवळ घृताची आहुती द्यावी. पुष्करिणी (कमलपुष्पांचे तळे)- मध्ये स्नान करुन सुवर्णदान करावे.
फल: लक्ष्मी प्राप्ती /  श्रीप्राप्ती.

सौभाग्यव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल पंचमीला करतात. या व्रतात पृथ्वी, पंचमी आणि चंद्र यांचे गंधादी साहित्याने पूजन करुन एकवेळ भोजन करुन राहतात. हे व्रत केल्याने आयुष्य आणि ऐश्‍वर्य वाढते.

भारतीय चैत्र मासारंभ

भारतीय कालगणनेनुसार चैत्र मास, शके १९४० आरंभ होत आहे.

घबाड

१८:०५ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्र : रोहिणी
तिथी: ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

दग्ध योग

१३:५२ नंतर गुरुवारी षष्ठी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


यमघंट योग

१८:०५ पर्यंत गुरुवारी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


यमघंट योगावर जन्म झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.

याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५, गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर पुढे) देखील यमघंट योग होतो.


षष्ठी श्राद्ध

अपराण्ह काळी षष्ठी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र शुक्ल ६ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment