तिथी
|
चैत्र शुक्ल पौर्णिमा (१८:०७)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
हस्त (२९:५६)
|
योग
|
वृद्धि (७:२०), ध्रुव (२९:११)
|
करण
|
विष्टि (६:४८), बव(१८:०७), बालव (२९:३२)
|
वैशाख स्नानारंभ
चैत्र शुक्ल पौर्णिमेपासून वैशाख शुक्ल
पौर्णिमेपर्यंत प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी कोठेही तीर्थक्षेत्री, अथवा नदी, विहीर, आड, तुळे किंवा सरोवर किंवा स्वतःच्या घरीदेखील शुद्ध
थंड पाण्याने स्नान करावे आणि नित्य आन्हिक झाल्यावर
'ॐ नमो भगवते
वासुदेवाय'
किंवा
'हरे राम हरे
राम'
या मंत्राचा यथाशक्ती जप करुन
एकच वेळ भोजन करावे. एकतीस दिवसापर्यंत असा क्रम ठेवल्यास अनेक प्रकारचे रोग व दोष
दुर होतात व त्याचा प्रभाव आणि पुण्य वाढतात.
हनुमान जयंती
हनुमानजयंती हे व्रत आहे. ज्या पंचांगाच्या
आधाराने या व्रताचा निर्णय घेतला जातो, त्यापैंकी काहींच्या मते हनुमानजन्मतिथी अश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते ती चैत्र शुक्ल पौर्णिमा आहे.
कोणत्याही देवतेची जन्मतिथी ही एकच असते; फक्त हनुमानाच्याच बाबतीत असे दुमत आहे. हे याचे एक वैशिष्ट्य होय. याविषयीच्या
ग्रंथात दोन्ही तिथींचे उल्लेख आहेत, परंतु त्यांमधील आशयात फरक आहे. पहिला दिवस 'जन्मदिवस' म्हणून व दुसरा
'विजयाभिनंदनाचा महोत्सव-दिवस' सांगितला आहे.
'उत्सवसिंधु' नामक ग्रंथात लिहीले आहे, अश्विन वद्य चतुर्दशी,
मंगळवार, स्वातिनक्षत्र, मेषलग्न या सुमुहूर्तावर प्रत्यक्ष शिवशंकरांनी
अंजनीच्या उदरी हनुमानाच्या रूपाने जन्म घेतला. 'व्रतरत्नाकर' मध्येही असेच
म्हटले आहे की, अश्विन व भूततिथीला
(चतुर्दशीला) मंगळवारी रात्री (महानिशा) अंजनीच्या उदरी हनुमानाचा जन्म झाला. पुर्वोक्त
ग्रंथात स्वाती नक्षत्र व मेषलग्न हे अतिरिक्त उल्लेख आहेत. परंतु कार्तिक पौर्णिमेस
कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे वद्य चतुर्दशीला चित्रा किंवा स्वाती नक्षत्र असेल ही
गोष्ट संभवनीय नाही.
याच्या उलट 'हनुमदुपासनाकल्पद्रुम' नामक ग्रंथात- हा एका महाविद्वान पंडिताने लिहिलेला संकलन-ग्रंथ आहे. चैत्र
शुक्ल पौर्णिमेला मंगळवारी मूंजगवती मेखला असलेल्या, कौपिन वस्त्रधारी आणि यज्ञोपवीत धारण केलेल्या हनुमानाचा जन्म झाला, असा उल्लेख आहे. त्याचबरोबर असेही लिहीले आहे की, (पुत्रकामेष्टी) यज्ञप्रसाद म्हणून कैकेयीला मिळलेल्या
पिंडाचा अंश घारीमार्फत अंजनीला मिळाला. तो भक्षण केल्यामुळे तिच्या उदरी हनुमंताचा
जन्म झाला. हा भाग असंबद्ध वाटतो. कारण स्कंदादी पुराणांतील अनेक कथांवरुन असे दिसते
की, हनुमानाचा जन्म रामाच्या बर्याच
अगोदर झाला असला पाहिजे.
रामचरित्राच्या संशोधनाच्या दृष्टीने
वाल्मीकी रामायण अधिक मान्य समजले जाते. रामायणाच्या किष्किंधा कांडाच्या ६६ व्या सर्गात
हनुमानजन्मकथा आहे. त्यावरुन एक गोष्ट कळून येते की, अंजनीच्या उदरी हनुमानाचा जन्म झाला. जन्म पावताच क्षुधाग्रस्त झालेल्या हनुमंताने
आकाशात झेप घेतली आणि उगवता सूर्य हे एक पक्व फळ आहे, असे समजून त्याकडे उड्डाण केले. त्या दिवशी पर्वतिथी (अमावस्या) असल्यामुळे
सूर्याला ग्रासण्यासाठी राहू आला होता. परंतु सूर्याच्या दिशेने उड्डाण करीत येणारा
हनुमान हा दुसरा राहू आहे, असे समजून
इंद्राने त्याच्यावर वज्रप्रहार केला. त्यामुळे त्याची हनुवटी छाटली गेली. म्हणून त्याला
हनुमान असे नाव पडले. या कथाभागात चैत्र किंवा कार्तिक या महिन्यांचा नामनिर्देश नाही.
इतर ग्रंथात कल्पनाभेदामुळे अथवा अपसमजुतीने
चैत्र मासाचा उल्लेख केला गेला असावा.
हनुमानाचे एक जन्मटिपणही आहे. त्यात
चतुर्दशी तिथी, मंगळवार, चित्रानक्षत्र यांचा उल्लेख आहे. पण महिन्याचे नाव
नाही. कुंडलीमध्ये सूर्य, मंगळ, गुरु, भृग आणि शनी हे उच्चीचे ग्रह असून ते अनुक्रमे ४,
१, ७, ३, आणि १० या स्थानी आहेत. ही स्थिती पाहता, हनुमंताचा जन्म अश्विन वाद्य चतुर्दशीला रात्री झाला असावा, असे अनुमान निघते आणि चैत्र शुक्ल पौर्णिमेला सीताशोध, राक्षसांचे उपमर्दन, लंकादहन, समुद्रोल्लंघन आदी
गोष्टीत विजय मिळवून हनुमान निर्विघ्नपणे परत आल्याबद्दल वानरांनी मोठ्या आनंदाने विजयोत्सव
साजरा केला होता आणि सर्व नर-वानर सुखी झाले होते. म्हणून या दोन्ही दिवशी व्रतोत्सव
केल्यास 'अधिकस्य अधिकं फलम् ।'
या व्रतासाठी तात्कालीक किंवा रात्रिव्यापिनी
तिथी ग्राह्य समजतात. ही तिथी दुपक असेल तर, व्रत दुसर्या दिवशी करावे. व्रत करणाराने हनुमानजयंतीच्या व्रतानिमित्त धनत्रयोदशीच्या
रात्री रामसीता आणि हनुमंताचे स्मरण करीत भूमिशयन करावे व रूपचतुर्दशीला अरुणोदयापूर्वी
उठून रामसीता आणि हनुमान यांचे पुन्हा स्मरण करून प्रातःस्नानादी नित्यकर्मे लवकर उरकावी.
नंतर हातामध्ये उदक घेऊन
ममाखिलानिष्टनिरसनपूर्वकसकलाभीष्टसिद्धये
तेजोबलबुद्धिविद्याधनधान्यसमृद्धयायुरारोग्यादिवृद्धये
च हनुमद्व्रतं तदङ्गीभूतपूजनं च
करिष्ये ॥
असा संकल्प करावा. हनुमानाच्या पूर्वीच
प्रतिष्ठापित प्रतिमेसमीप पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे आणि अत्यंत विनीत भावाने
अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहं दनुजवनकृशानुं
ज्ञानिनामग्रगण्यम् ।
सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिवरदूतं
वातजातं नमामि ॥
अशी प्रार्थना करावी आणि यथाविधी षोडशोपचार
पूजा करावी. स्नानासाठी जवळ उपलब्ध असेल तर नदीचे पाणी घ्यावे, नाहीतर श्रीजलमिश्रित विहिरीचे पाणी घ्यावे. वस्त्र
म्हणून लाल कौपीन किंवा पीतांबर, गंध
म्हणून केशरमिश्रित चंदन घ्यावे. मूंज गवताचे यज्ञोपवीत अर्पण करावे. फुले म्हणून शतपत्रे
(हजार), केवड्याची पाने, कण्हेरी किंवा अन्य पिवळी फुले घ्यावी. धूप म्हणून
अगरु, तगरादि घ्यावा. तुपाची वात दीप
म्हणून लावावी. तुपात तळलेले अनरसे किंवा तुपात तळलेले गुळमिश्रित उकडीचे मोदक किंवा
केळी वगैरे फळे नैवेद्यास घ्यावी. आरती, नमस्कार, पुष्पांजली आणि प्रदक्षिणा
झाल्यावर
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं
बुद्धिमतां वरिष्ठं ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं
शिरसा नमामि ॥
अशी प्रार्थना करुन प्रसाद वाटावा आणि
शक्य असेल तर ब्राह्मणभोजन घालून स्वतः जेवावे. दिपोत्सव,
स्तोत्रपाठ, गायन, वादन, कीर्तन वगैरे गोष्टी यथासंभव करुन रात्र जागवावी.
एखाद्या कार्यसिद्धिच्या उद्देशाने
व्रत करावयाचे असेल तर मार्गशीष शु. त्रयोदशीला प्रातःस्नान वगैरे उरकून एका वेदीवर
अक्षतांच्या पुंजीची तेरा कमळे काढावी. त्यावर यथाविधी पूजा केलेला जलपूर्ण कलश स्थापन
करावा. त्यावर पिवळे वस्त्र घालावे. त्यावर १३ कमळांच्या १३ गाठी घातलेला नऊ पदरी पिवळा
दोरा ठेवावा. नंतर वेदीची पुजा करावी. उपरोक्त विधीनुसार हनुमंताची पूजा, जप, ध्यान, उपासना आदी गोष्टी कराव्यात.
ब्राह्मणभोजन घालून स्वतः भोजन केले असता व्रताची पूर्तता व इष्ट मनोरथ पूर्ण होतात.
सर्व देवांना दवणा वाहणे
या दिवशी सर्व देवांना दवणा वाहाव्यात.
यवाग्रयण
आग्रयणाचे प्रकार तीन आहेत . व्रीह्याग्रयण
, यवाग्रयण , आणि श्यामाकाग्रयण.
मन्वादि
१४ मन्वंतराच्या आरंभ झाल्या अशा १४
तिथीना मन्वादि असे म्हणतात. या मन्वादि १४ तिथी पुढे दिल्या आहेत.
१
|
स्वायंभुव
|
चैत्र शुक्ल तृतीया
|
२
|
स्वारोचीस
|
चैत्र शुक्ल पौर्णिमा
|
३
|
उत्तम
|
कार्तिक शुक्ल पौर्णिमा
|
४
|
तामस
|
आषाढ शुक्ल पौर्णिमा
|
५
|
रैवत
|
कार्तिक शुक्ल द्वादशी.
|
६
|
चाक्षुस
|
आषाढ शुक्ल दशमी.
|
७
|
वैवस्वत
|
ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
|
८
|
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
|
९
|
दक्ष सावर्णी
|
आश्विन शुक्ल नवमी.
|
१०
|
ब्रह्म सावर्णी
|
माघ शुक्ल सप्तमी
|
११
|
धर्म सावर्णी
|
पौष शुक्ल एकादशी.
|
१२
|
रुद्र सावर्णी
|
भाद्रपद शुक्ल तृतीया.
|
१३
|
देव / रुची सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल अमावस्या.
|
१४
|
इंद्र/ भूती सावर्णी
|
श्रावण कृष्ण अष्टमी.
|
‘मनु’ बाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत म्हटले आहे
महर्षय: सप्त पूर्वे
चत्वारो मनवस्तथा !
मद्भावा मानसा जाता येषां लोक
इमा प्रजा: !!
(श्रीमद्भ्गव्दगीता अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण म्हणतात
हे अर्जुना सात महर्षी जन आणि त्यांच्याही
पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात
यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.
कुलधर्म
खंडोबा देवतेचे कुलाचार चैत्री पौर्णिमेला
केले जातात.
कुलाचारामध्ये परंपरेने जे धार्मिक
आचार पिढ्यान-पिढ्या चालत आलेले आहेत ते केले जातात.
तळी उचलली जाते. भंडारा उधळला जातो.
कोटंबा धन-धान्याने भरून दान करतात. काही ठिकाणी जागरण गोंधळ देखील केला जातो.
काही ठिकाणी चैत्र शुक्ल दशमी पासून पौर्णिमेपर्यंत
घट बसवून नवरात्र साजरे करतात.
अन्वाधान
अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो.
त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा
हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा
असतो.
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी
चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती
शिवाजी महाराज पुण्यतिथी असते.
चित्रा पौर्णिमा
दक्षिण भारतात चैत्र पौर्णिमेस म्हणजेच
चित्रानक्षत्रावर जो उत्सव केला जातो, त्याला चित्रा पौर्णमी म्हणतात. या उत्सवात शिव व चित्रगुप्त यांची पूजा करतात.
चैत्री पौर्णिमा
प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला पूर्णचंद्राचे, तत्प्रकाशक सूर्याचे आणि विष्णुरूपी सत्यनारायणाचे
व्रत केले जाते. त्यासाठी चंद्रोदयव्यापिनी पौर्णिमा ग्राह्य मानतात. या व्रतात देवपूजन
, दानपुण्य,
तीर्थस्नान आणि पुराणश्रवणादी विधी केल्याने पूर्ण फळ मिळते.
त्या दिवशी चित्रानक्षत्र असेल तर चित्रमय वस्त्राचे दान करावे म्हणजे सौभाग्यवृद्धी
होते.
चंद्रनक्षत्र
चैत्र पौर्णिमेस सोमवार आला असता
हे व्रत करतात. यात चंद्राची पूजा, चंद्राच्या
रौप्यमूर्तीचे दान, तूप आणि तीळ यांचे
हवन करावयाचे असते.
फल- चंद्रलोकाची प्राप्ती.
महाचैत्री
चैत्र पौर्णिमेला गुरु व चंद्र यांची
युती चित्रानक्षत्रात झाली तर तिला महाचैत्री असे म्हणतात. ही दानादी कृत्यांना विशेष
पुण्यप्रद असते.
रवि रेवती नक्षत्रात प्रवेश
१८:५१ ला रवि रेवती नक्षत्रात
प्रवेश करीत आहे.
मृत्यू योग
२९:५६ पर्यंत शनिवारी हस्त नक्षत्र
असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार
– अनुराधा
|
सोमवार
– उत्तराषाढा
|
मंगळवार
– शततारका
|
बुधवार
– अश्विनी
|
गुरुवार
– मृग
|
शुक्रवार
– आश्लेषा
|
शनिवार
– हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार
होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.
यमघंट योग
२९:५६ पर्यंत शनिवारी हस्त नक्षत्र
असल्यामुळे यमघंट होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार
– मघा
|
सोमवार
– विशाखा
|
मंगळवार
– आर्द्रा
|
बुधवार
– मूळ
|
गुरुवार
– कृत्तिका
|
शुक्रवार
– रोहिणी
|
शनिवार
– हस्त
|
|
यमघंट योगावर जन्म झाल्यास
बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता
मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.
याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५, गुरुवार
व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर पुढे) देखील
यमघंट योग होतो.
भद्रा
६:४८ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण
आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान
शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा
नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली
व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक
चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध
व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र
असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र
असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र
असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे
फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास
तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे
चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून
विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत
निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका
भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग,
अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित
कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा
मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय
होण्याची शक्यता असते.
पौर्णिमा श्राद्ध
अपराण्ह काळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र शुक्ल पौर्णिमा आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे
महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या
काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा
सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त
सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ
बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment