Sunday, 22 November 2015

दिनविशेष - २३ नोव्हेंबर २०१५

तिथी
 कार्तिक शुद्ध १२ (१३:१७) 
वार
 सोमवार
नक्षत्र
 रेवती (१२:१८)
योग
 सिद्धी (७:२२), व्यतीपात (२७:४०)
करण
 कौलव (२३:४६)

हरीवासार

१२:१८ पर्यंत हरीवासार आहे. द्वादशीच्या प्रथम पादाला हरीवासर असे म्हणतात.वैष्णवांनी या काळात भोजन करू नये.

सोमप्रदोष

सूर्यास्तानंतर पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने  साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास करतात.
कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन ' मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये ' इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व षोड्शोपचारे पूजा करावी.

भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥

भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृषरूपेण '
 या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन ' ऋणरोगादि' या पूर्ण मंत्राने शंकर , पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी. हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø  सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø  मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी भौम प्रदोष करावा.
Ø  शुक्रवार: सौभाग्य किंवा स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø  शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा. 
Ø  रविवार: आयुर्दायासाठी अर्कप्रदोष हे व्रत करावे.

चातुर्मास समाप्ति

चातुर्मासात केलेल्या व्रतांची सांगता करावी.

तुळसीविवाह आरंभ

पद्मपुराणमतानुसार तुलसीविवाह कार्तिक शुद्ध नवमीस दिलेला आहे. 'निर्णय सिंधू' वगैरेंचे मताने महाराष्ट्रात व कर्नाटकात द्वादशी ही तुलसीविवाहाची तिथी आहे.
पद्मपुराणानुसार कार्तिक शुद्ध नवमीला तुलसीविवाहाचा उल्लेख आढळतो; पण इतर ग्रंथांच्या मते प्रबोधिनी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस अधिक फलदायी होतो. विवाहाच्या पूर्वदिवशी तुलसीवृंदावन सारवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात व तुलसीच्या मुळात चिंचा, आवळे ठेवतात. काही लोक सकाळी, काही सायंकाळी तुलसीविवाह लावतात.
व्रत करताना विवाहापूर्वी तीन महिने आधीपासून तुळशीला पाणी घालून टवटवीत ठेवावे. प्रबोधिनी किंवा भीष्मपंचक किंवा ज्योति:शास्त्रोक्‍त मुहूर्तावर तोरण बांधून, मंडप बनवून, सोबत आणखी चार ब्राह्मण घेऊन गणपति-मातृकापूजन, नांदी श्राद्ध व पुण्याहवाचन करून टवटवीत अशा तुळशीबरोबरच सोन्याची लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व चांदीची तुळस चांगल्या आसनावर प्रतिष्ठित करावी (पूर्वाभिमुख) व यजमानांनी सपत्‍निक उत्तराभिमुख बसून 'तुलसीविवाह विधी' नुसार 'वर 'पूजन (भगवान विष्णुचे पूजन), तसेच कन्या. 'तुळस' हिचे कन्यादान इ. विधी करावेत. कुशकण्डीहवन व सप्तपदी करून वस्त्रालंकार दान द्यावेत. यथाशक्‍ती ब्राह्मण-भोजन घालून मग स्वत: जेवावे. तुळसीविवाहसमाप्तीनंतर चातुर्मासात जी व्रते घेतली असतील त्या सर्वांची समाप्ती करतात व चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील, ते पदार्थ ब्राह्मणास दान देऊन मग स्वत: सेवन करतात.

नीरांजन द्वादशी

कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी रात्रौ विष्णू चार महिन्यांच्या झोपेतून जागा होतो. म्हणून या दिवशी व्रताला आरंभ करतात. हे व्रत पाच दिवस करावयाचे असते. या कालात विष्णु, शिव, सूर्य, गौरी इ. देवतांना आणि त्याचप्रमाणे आईबाप, गाई-घोडे हत्ती यांना नीरांजनाने ओवाळावे. हे व्रत म्हणजे एकप्रकारची शांतीच आहे. अजापाल नामक राजाने हे व्रत केले होते, अशी कथा आहे. प्रत्येक वर्षी हे व्रत करावे, असे सांगितले आहे.
फल - रोगनिवारण आणि समृद्धी.

योगेश्‍वर द्वादशीव्रत

हे तिथिव्रत आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला या व्रताचा आरंभ करून द्वादशीला संकल्पपूर्वक स्नान करून विषणुपूजा करतात. उद्यापनाच्या वेळी वैदिक ब्राह्मणाला सम संख्येने द्रव्यदान करावे. वेदवेत्त्याला दुप्पट आणि पंचरात्र यज्ञ करणार्‍या आचार्याला सहस्रपट धान्य द्यावे, असे सांगितले आहे

मन्वादि

१४ मन्वंतराच्या आरंभ झाल्या अशा १४ तिथीन मन्वादि असे म्हणतात. या मन्वादी १४ तिथी पुढे दिल्या आहेत.

स्वायंभुव
 चैत्र शुक्ल तृतीया
स्वारोचीस
 चैत्र शुक्ल पौर्णिमा
उत्तम
 कार्तिक शुक्ल पौर्णिमा
तामस
 आषाढ शुक्ल पौर्णिमा
रैवत
 कार्तिक शुक्ल द्वादशी.
चाक्षुस
 आषाढ शुक्ल दशमी.
वैवस्वत
 ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
सावर्णी
 फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
दक्ष सावर्णी
 आश्विन शुक्ल नवमी.
१०
ब्रह्म सावर्णी
 माघ शुक्ल सप्तमी
११
धर्म सावर्णी
 पौष शुक्ल एकादशी.
१२
रुद्र सावर्णी
 भाद्रपद शुक्ल तृतीया.
१३
देव / रुची सावर्णी
 फाल्गुन शुक्ल अमावस्या.
१४
इंद्र/ भूती सावर्णी
 श्रावण कृष्ण अष्टमी.
मनुबाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत म्हटले आहे


महर्षय: सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा !
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा: !!                        
(श्रीमद्भ्गव्दगीता  अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण म्हणतात हे अर्जुना  सात महर्षी जन आणि त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु  हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन  माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.

शाक गोपद्म व्रत समाप्ति

आषाढ शुद्ध द्वादशी पासून स्नान करून देवघरात किंवा तुळशीपुढे ३३ गोपद्म काढून त्याची पूजा करण्याचे हे व्रत कार्तिक शुल्क एकादशीपर्यंत ४ महिने दररोज हे व्रत करतात.

घबाड

१२:१८ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: अनुराधा
चंद्र नक्षत्र : रेवती
तिथी: १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३+१२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७

बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment