Tuesday, 24 November 2015

दिनविशेष - २५ नोव्हेंबर २०१५

तिथी
 कार्तिक शुद्ध १४ (७:०९), कार्तिक शुद्ध १५ (२८:१४) 
वार
 बुधवार
नक्षत्र
 भरणी (७:३८), कृत्तिका (२९:२७)
योग
 परिघ (२०:१६)
करण
 विष्टी (१७:४०)

वैकुंठ चतुर्दशी

हे व्रत सनत्कुमार संहितेत सांगितलेल्या कार्तिक माहात्म्यात आहे. अरुणोदयव्यापिनी कार्तिक शुद्ध चतुर्दशी दिवशीच हे व्रत करतात. निर्णय सिंधुकार म्हणतात की, रात्रीव्यापिनी चतुर्दशी दिवशी विष्णुपूजेसाठी घ्यावी व विश्‍वेश्‍वराची पूजा प्रसन्नता यासाठी अरुणोदयव्यापिनी घ्यावी. सनत्कुमार संहितेप्रमाणे उपवास मात्र आदले दिवशी करावा. कारण हेमलंब नामक संवत्सरी कार्तिकी शुद्ध चतुर्दशी दिवशी प्रत्यक्ष भगवान विष्णूनीच मणिमर्णिका घाटावर आंघोळ करून श्रीशिवांचे पूजन केले होते.
यासाठी विष्णुपूजेला रात्रिव्यापिनी व शिवपूजेला अरुणोदयव्यापिनी तिथी असावी. या दिवशी प्रात:स्नान करून उपवास करावा. सायंकाळी श्रीविष्णुची व पहाटे श्रीशिवाची १००० कमळांनी पूजा करणारा जीवन्मुक्‍त होतो. वैकुंठचतुर्दशीस रात्री तुळसी व पहाटॆ शिवाला बेल वाहावा.
या दिवशी सूर्योदयापूर्वी नगरप्रदक्षिणा घातल्यास वैकुंठलोक प्राप्त होतो अशी भाविकांची समजूत आहे, म्हणून या दिवशी नगरप्रदक्षिणा घालतात.

पाषाण चतुर्दशी

या कार्तिक शुद्ध चतुर्दशीला जवाच्या पिठाची चौरसाकार भाकरी करून गौरी (पार्वती ) ची पूजा करावी व तिला त्या भाकरीचा नैवेद्य दाखवावा. नंतर आपण तसलीच भाकरी खावी. यायोगे सुख, संपत्ती व सौंदर्य यांची प्राप्ती होते.

कार्तिक उद्यापन

कार्तिक शुद्ध चतुर्दशीस गणपति-मातृका, नांदीश्राद्ध, पुण्याहवाचन, सर्वतोभद्र, ग्रह व हवनाची यथायोग्य वेदी बनवून रात्री तीवर त्या त्या देवांची स्थापना करून पूजा करावी. यासाठी यथाशक्‍ती भगवान विष्णूची सायुध सुवर्णमूर्ती बनवून व्रतोद्यापन-कौमुदी किंवा व्रतोद्यापन-प्रकाश यानुसार सर्वतोभद्र मंडळ स्थापित केलेल्या सोन्याच्या कलशावर उक्‍त मुर्तीची यथाविधी स्थापना, प्रतिष्ठा व पूजा करून रात्रभर जागरण करावे व पौर्णिमेस पहाटे प्रात:स्नानादी उरकून गोदान, वस्त्रदान, शय्यादान, अन्नदान इ. करून तीस दांपत्यांना भोजन द्यावे व व्रतविसर्जन करून मित्रपरिवारासह मग जेवावे.

कार्तिकी किंवा मत्स्यावतार दिन

कार्तिक शुद्ध चतुर्दशी दिवशी ब्रह्मा, विष्णू, महेश, आदित्य व अंगिरा यांनी हे पर्व फार परमपवित्र आहे असे सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी स्नान, दान, होम, यज्ञ, उपासना इ. केल्यास अनंतपट फळ मिळते. या दिवशी कृत्तिका नक्षत्र असेल तर हिला 'महाकार्तिकी' म्हणतात. या दिवशी भरणी नक्षत्र असेल तर हिचे जादा फळ असते, व रोहिणी असेल तर हिचे महत्त्व वाढते. याच दिवशी सायंकाळी भगवान विष्णूनी मत्स्यावतार धारण केला होता, त्यामुळे या दिवशी दान केल्यास यज्ञाचे फळ मिळते. तसेच जर या दिवशी चंद्रमा व बृहस्पती कृत्तिका नक्षत्रात असतील तर हिला 'महापौर्णिमा' नामाभिधान आहे. या दिवशी चंद्र कृत्तिकेत व सूर्य विशाखात असेल तर 'पद्मक' योग असतो. की जो पुष्करातही दुर्लभ आहे. या दिवशी संध्याकाळी त्रिपुरोत्सव करून

'कीटा: पतंगा: मशकाश्‍च वृक्षे जले स्थले ये विचरन्ति जीवा: ।
दृष्ट्‌वा प्रदीपं नहि भगिनस्त्वें मुक्‍तरूपाहि भवन्ति तत्र ॥'

असे म्हणुन दिपदान केल्यास पुनर्जन्मापासून मुक्‍ती मिळते. जर या दिवशी कृत्तिकेत 'विश्वस्वामी' चे दर्शन घेतले तर ब्राह्मण सात जन्मपर्यंत वेदपारंगत व धनवान बनतो.

याच दिवशी चंद्रोदयाच्या वेळी शिवा, संभूती, प्रीती, संतती, अनसूया व क्षमा या सहा तपस्वी कृत्तिकांची पूजा करावी; कारण या सहाही जणी कार्तिकेयाच्या माता होत.
·         कार्तिकेय, खड्‌गी (शिवा), वरुण, हुताशन व सशूक (मोडयुक्‍त) धान्य या वस्तू संध्याकाळी दरवाजावर टांगण्यायोग्य असल्याने गंधपुष्प इ. नी यांचे पूजन केल्यास शौर्य, वीर्य, धैर्य, इ. गोष्टी वाढतात.
·         कार्तिकीस नक्‍तव्रत करून बैल दान केल्यास शिवपदाची प्राप्ती होते.
·         जर गाय, घोडा, हत्ती, रथ, तूप इ. वस्तूंचे दान केल्यास संपत्ती वाढते.
·         या दिवशी सोपवास हरिस्मरण केल्यास अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळून सूर्यलोकाची प्राप्ती होते.
·         आपल्या अगर दुसर्‍याच्या कन्येचे 'सालंकृत' कन्यादान या दिवशी केल्यास 'संतानव्रत' पूर्ण होते.
·         सोन्याचा मेंढा दान केल्यास ग्रहबाधा नष्ट होते,
·         या पौर्णिमेपासून सुरू करून वर्षभर दर पौर्णिमेस नक्‍त व्रत केले तर सर्व मनोरथ पूर्ण होतात.

ब्रह्मकूर्च

कार्तिक शुद्ध चतुर्दशीस रोजी स्नानानंतर उपवासाचा संकल्प सोडून देवांना जल, अक्षता, इ. व पितरांना जल, तीळ इ. वाहून
१)      कपिला गाईचे 'गोमूत्र'
२)      काळ्या गाईचे 'गोमय',
३)      पांढर्‍या गाईचे 'दूध',
४)      पिवळ्या गाईचे 'दही',
५)      कबर्‍या गाईचे 'तूप'
घेऊन सर्व वस्तू एकत्र मिसळाव्यात व गाळाव्यात. नंतर त्यात दर्भ-जल टाकून रात्री हे 'पंचगव्य' प्याल्यास ताबडतोब सर्व पापतापांपासून मुक्‍ती मिळून, सर्व रोगदोष दूर होतात. अद्‌भुत अशी शक्‍ती प्राप्त होऊन पराक्रम व निरोगीपणात वाढ होते.

त्रिपुरारी पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमेस हे नाव आहे. या दिवशी रात्री घरात, देवळात आणि घराबाहेरही दिवे लावतात. दीपदान द्यावे, गंगास्नान करावे आणि कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यावे, असा विधी आहे. निरनिराळ्या देवस्थांनात दगडी दीपमाळा असतात, त्याही या दिवशी पाजळतात. या दीपोत्सवाला त्रिपुर पाजळणे असे म्हणतात. दीपोत्सवाचा मंत्र असा -
कीटा: पतंगा: मशकाश्‍च वृक्षा जले स्थले ये विचरन्ति जीवा: ।
दृष्ट्वा प्रदीपं न च जन्मभागिनो भवन्ति नित्यं श्‍वपचा हि विप्रा: ॥

त्रिपुरीज्वलन व्रत

कार्तिक पौर्णिमेस या व्रताचे नाव आहे. या पौर्णिमेस आरंभ करून पुढील वर्षाच्या कार्तिकी पौर्णिमेस व्रताचे उद्यापन करतात. या व्रताचा मुख्य देव शिव आहे. दरमहा पौर्णिमेला शिवापुढे निरनिराळ्या प्रकारच्या ७५० वाती लावणे, निरनिराळी दीपपात्रे दान करणे, नैवेद्यासाठी निरनिराळे अन्नपदार्थ करणे, शिवाच्या निरनिराळ्या नावांचा आदेश करून ते पदार्थ शिवाला अर्पण करणे, असा या व्रताचा विधी आहे. दुसर्‍या दिवशी दांपत्याला भोजन घालून वस्त्रालंकारांनी त्याची संभावना करायची असते. उद्यापनाच्या दिवशी संकल्पपूर्वक ब्रह्मादी देवतांची स्थापना, कलशावर पूर्णपात्रात शिवाची सुवर्ण प्रतिमा ठेवून तिची पूजा करतात. नंतर पितळेच्या दीपपात्रात अठरा धाग्यांनी बनविलेल्या ७५० वाती तुपात भिजवून त्यांनी देवाची आरती करतात. रात्री जागरण करून दुसर्‍या दिवशी समिधा, तीळ पायस व तूप या हविर्द्रव्यांनी हवन करतात. शेवटी गोदान, पीठदान करून बारा दापंत्यांना यथाशक्‍ती वस्त्रालंकार व सौभाग्य वायने देतात.

कार्तिकी व्रत

तामिळ लोकांचे एक व्रत. कार्तिकी पौर्णिमेस पंचमहाभूतांप्रीत्यर्थ हे व्रत करतात. यात अग्नीला प्राधान्य असते. यामुळेच सूर्यास्तानंतर घरीदारी दिवे लावून सर्वत्र प्रकाश करणे हे या व्रताचे वैशिष्ट्य आहे.
दक्षिण अर्काट जिल्ह्यातील तिरुवन्नमलाईच्या शिव-मंदिरात हा व्रतोत्सव थाटाने साजरा करतात. या वेळी त्या सर्व डोंगरावर रोषणाई होते व शिखरावर एक मोठी मशाल पेटविली जाते. या उत्सवात पालापाचोळा एकत्र करून जाळण्याची प्रथा आहे.
निचेंगोडू, पळणि व वेदारण्यम् व तिरुचेंदूर येथेही हा उत्सव करतात.
याच्या कथेचे पर्याय पुढीलप्रमाणे
१)      सर्वांगाच दाह होत होता म्हणुन बलिराजाने हे व्रत केले.
२)      महिषासुराशी लढताना शिवलिंग भग्न झाले, म्हणून त्या पापाच्या क्षालनासाठी पार्वतीने हे व्रत केले.

स्कंदजयंती

कार्तिकी पौर्णिमे दिवशी स्कंदजयंती मानतात व त्या दिवशी स्कंदमूर्तीची पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेस कृत्तिका नक्षत्र असताना स्कंदाचे दर्शन घेणारा धनवान व वेदपारंगत होतो. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजा करून एका उंच स्तंभावर अग्नी प्रज्वलित करतात.

आवळी पूजन व भोजन

कार्तिक पौर्णिमेस आवळी वृक्षाची पूजा करतात. मृदुमान्य दैत्याने देवांना स्वर्गातून स्थानभ्रष्ट केले. तेव्हा देवांनी पृथ्वीवर येऊन आवळीच्या झाडाचा आश्रय घेतला. त्या दिवसापासून या वृक्षाला या दिवशी पूज्यत प्राप्त झाली. म्हणून कार्तिक पौर्णिमेस या वृक्षाची पूजा विहित आहे. पूजेच्या वेळी आवळीला सूत गुंडाळतात. श्रीफलयुक्त अर्घ्य देतात. तिच्या चारी दिशांना बलिदान करतात. अष्ट दिशांना तुपाचे दिवे लावतात. पुढील मंत्राने प्रार्थना करतात

धात्रिदेवि नमस्तुभ्यं सर्वपापक्षयंकरि ।
निरोगं कुरु मां नित्यं निष्पापं धात्रि सर्वदा

नंतर पितरांचे तर्पण, घृतपात्रदान व दंपतीभोजन करून व्रत समाप्त करतात.

कार्तिक स्वामी दर्शन

सकाळी ०७:३८ पासुन गुरुवारी पहाटे ४:१४ पर्यंत पौर्णिमा व कृत्तिका नक्षत्र असल्याने या योगावर कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे.

विधी : प्रथम तेथे स्नान करून कार्तिकेयाचे दर्शन घेऊन दर्भ, चन्दन, फुले, दशांग धूप, दीप अर्पण करून कार्तिकेयाचे वाहन मयूर त्याची पूजा करून नंतर पुढे दिलेले श्लोक म्हणून एक एक उपचार अर्पण करावा।

कमण्डलुर्जलापूर्ण: स्वर्णगर्भ: सुलक्षण: |
अर्पितस्ते महासेन प्रसन्नोऽनेन मे भव ||
या श्लोकाने जलाने भरलेला व त्यात किंचित सुवर्ण घातलेला कमण्डलु समर्पण करावा.

ब्रम्हसूत्रं महादिव्यं प्रीतये ते मयार्पीतम् |
ब्रम्हजन्मास्तु मे देव ब्रम्हसूत्रसमर्पणात् ||
ब्राम्हण जन्म प्राप्तीकरिता या श्लोकाने यज्ञोपवीत अर्पण करावे.

गोमतीतीरसंभूता गोपी वापी समुद्भवा |
मृदर्पिता मया तुभ्यं ब्रम्हजन्माप्तये गुह ||
या श्लोकाने गोपीचंदन समर्पण करावे.

उपवीतानि शुभ्राणि पवित्राणि शिवात्मज |
पुरतस्तेऽर्पयाम्यद्य प्रसादार्थं तव प्रभो ||
या श्लोकाने पोवते अर्पण करावे. (पोवते म्हणजे कापसाचे सुत काढून त्याची नवसुती करून त्या नवसुतीची आठ ग्रंथीची (गाठीची) माळ).

तिला: काश्यपसंभूतास्तिला: पापहरा: स्मृता: |
 पादयोरर्पितास्तेऽद्य सर्वपापापनुत्तये ||
सर्व पाप दूर होण्याकरिता या श्लोकाने तीळ अर्पण करावे.

दर्भा ब्रम्हमया विष्णुस्वरूपा रुद्ररूपिण: |
प्रीत्यर्थं तव देवेश न्यस्ता: पादतले मया ||
या श्लोकाने दर्भ अगर कुश चरणावर अर्पण करावे.

अष्टाविंशतिसंख्याकै रुद्राक्षैर्योजिता मया |
अर्पिता तव हस्तेच गृहाण सुरसैन्यप ||
या श्लोकाने अठ्ठावीस रुद्राक्षांची माळ अर्पण करावी.

सुवर्णमुत्तमं लोके भुक्तिमुक्तिप्रदं तथा |
अर्पितं तव देवेश दैन्याज्ञानापनुत्तये ||
दैन्य व अज्ञान नाहीसे होण्याकरिता या श्लोकाने सुवर्ण अर्पण करून नमस्कार करावा.

श्रीकार्तिकस्वामींचे दर्शनास जाणार्यांना हे वरील आठ श्लोक येणे आणि वरील वस्तूही जवळ ठेवणे आवश्यक आहे. कार्तिक शुध्द पौर्णिमेस कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा हा विधि आहे.

भाद्रपद शुध्द षष्ठीला कार्तिकेयाचे दर्शन घेतले वा स्मरण केले असता पापांचा नाश होतो. भविष्य पुराणात कार्तिकेयाची मृतिकेची मूर्ती करून पूजा करावयास सांगितले आहे. नीलतीर्थांचे स्मरण करून स्नान करावे आणि वरील प्रमाणे उपचार अर्पण करावेत.

तुलसी विवाह समाप्ति

प्रबोधिनी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस तुलसी विवाह अधिक फलदायी होतो.

गुरुनानक जयंती

गुरुनानक हे शीख धर्माचे संस्थापक व दहा शीख गुरूंपैकी प्रथम गुरू होते. त्या निमित्त गुरुद्वारा मध्ये आकर्षक रोषणाई, लंगर इ. चे आयोजन केले जाते.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

कार्तिकस्नान समाप्ति

आश्‍विन पौर्णिमेस चालू करून ३१व्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेला या व्रताची समाप्ती करावी.

मन्वादि

१४ मन्वंतराच्या आरंभ झाल्या अशा १४ तिथीन मन्वादि असे म्हणतात. या मन्वादी १४ तिथी पुढे दिल्या आहेत.

स्वायंभुव
 चैत्र शुक्ल तृतीया
स्वारोचीस
 चैत्र शुक्ल पौर्णिमा
उत्तम
 कार्तिक शुक्ल पौर्णिमा
तामस
 आषाढ शुक्ल पौर्णिमा
रैवत
 कार्तिक शुक्ल द्वादशी.
चाक्षुस
 आषाढ शुक्ल दशमी.
वैवस्वत
 ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
सावर्णी
 फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
दक्ष सावर्णी
 आश्विन शुक्ल नवमी.
१०
ब्रह्म सावर्णी
 माघ शुक्ल सप्तमी
११
धर्म सावर्णी
 पौष शुक्ल एकादशी.
१२
रुद्र सावर्णी
 भाद्रपद शुक्ल तृतीया.
१३
देव / रुची सावर्णी
 फाल्गुन शुक्ल अमावस्या.
१४
इंद्र/ भूती सावर्णी
 श्रावण कृष्ण अष्टमी.
मनुबाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत म्हटले आहे
 महर्षय: सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा !
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा: !! 
(श्रीमद्भ्गव्दगीता  अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण म्हणतात हे अर्जुना  सात महर्षी जन आणि त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु  हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन  माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.

भद्रा


०७:०९ नंतर १७:४० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

1 comment:

  1. कार्तिकस्वामी दर्शन....
    (नोट:या दिवशी श्रीकार्तिकेयची मुर्ती किंवा फोटोला मनातील इच्छा सांगून मोर पंख वाहवा)
    श्रीशिवपार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव, श्रीगजानानचे ज्येष्ठ भ्राता श्रीकार्तिकेय/कार्तिकस्वामी.
    “कार्तिक महिना, पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र” या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृत्तिका नक्षत्र असेल तेव्हा श्रीकार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभकाल मानला जातो. श्रीकार्तिकेय ये बल,बुध्दी,साहस आणि यशस्वितेचे प्रतिक मानले गेले आहे. तो शिवगणांचा सेनापती मानला जातो. त्यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांचे अधिपत्य श्रीकार्तिकेयाकडे आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे "धनसंपत्तीकारक"ही मानले गेले आहे. कार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी सबंध वर्ष हे धनलाभाचे जातेच असा माझ्यासह अनेकांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आर्थिक अडचणीत, कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणीकाळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते असा समज आहे. श्रध्दा असेल तर हा अनुभव नक्कीच येतो. विशेष म्हणजे इतरवेळी कार्तिकेयाचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रीयांना वर्ज्य असले तरी या पर्वणीकाळात स्त्रीयादेखील कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात हे विशेष आहे.

    कार्तिकेय ला दर्शनाचे वेळी त्यांना दंड, पाण्याने भरलेला कमंडलु, २७ रुद्राक्षांची माळ, कमळाचे फुल (किंवा कोणतीही पांढरी फुले) आणि दर्भ अर्पण करण्याची प्रथा आहे. अनेक भक्त प्रतिकात्मक पातळीवर सोने (सुवर्ण-Gold) देखील अर्पण करतात ( हे प्रतिकात्मक अर्पण असल्याने ते किमान १०० मिलीग्रॅम असले तरी चालते). दर्शनाचे वेळी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेऊन, वरीलपैकी शक्य असतील त्या वस्तुंचे अर्पण करावे आणि अपेक्षित प्रार्थना करावी. दर्शनाचे वेळी कार्तिकस्वामींच्या २८ नावांचा उल्लेख असलेले "प्रज्ञाविवर्धन स्तोत्रा"चे पाठ केल्यास अधिक उत्तम. विशेषत: विद्यार्थीदशेतील मंडळींनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ करुन कार्तिकेयाचे दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले गेले आहे. (विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी हे पर्वणी दर्शन खुप शुभ असते)

    सकाळी उठुन स्नान, दैनंदिन पुजाअर्चा आटोपुन, आईवडील, गुरुंना नमस्कार करुन, शुचिर्भुतपणे दर्शन घ्यावे. वरीलपैकी शक्य असतील त्या गोष्टी अर्पण कराव्यात, प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ जमतील तसे करावेत. त्या दिवशी मद्यपान, मांसाहार अर्थातच कटक्षाने वर्ज्य करावा. ब्रह्मचर्यपालनही करावे…


    प्रज्ञाविवर्धन स्तोत्र
    अस्य श्रीप्रज्ञाविवर्धन-स्तोत्र-मंत्रस्य सनत्कुमारऋषि:।
    स्वामी कार्तिकेयो देवता। अनुष्टुप् छंद:।
    मम सकल विद्यासिद्ध्यर्थं जपे विनियोग:।
    श्रीस्कंद उवाच।।
    योगीश्वरो महासेन: कार्तिकेयोSग्निनन्दन:।
    स्कंद:कुमार: सेनानी: स्वामिशंकरसंभव: ।।१।।
    गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वज:।
    तारकारिरुमापुत्र: क्रौंचारिश्च षडानन: ।।२।।
    शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्ध:सारस्वतो गुह:।
    सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रद: ।।३।।
    शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तिमार्गकृत।
    सर्वागमप्रणेताच वांछितार्थप्रदर्शन: ।।४।।
    अष्टाविंशति नामानि मदीयानीति य: पठेत्।
    प्रत्यूषं श्रद्धयायुक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।।
    महामंत्रमयानीति मम नामानुकीर्तनम्।
    महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ।।६।।
    || इति श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम्।
    या दर्शनपर्वणीचा लाभ घ्या

    पुराणातील कार्तिकेय चे नाव
    1. कार्तिकेय
    2. महासेन
    3. शरजन्मा
    4. षडानन
    5. पार्वतीनन्दन
    6. स्कन्द
    7. सेनानी
    8. अग्निभू
    9. गुह
    10. बाहुलेय
    11. तारकजित्
    12. विशाख
    13. शिखिवाहन
    14. शक्तिश्वर
    15. कुमार
    16. क्रौञ्चदारण

    कार्तिकेय परिवार
    पिता - भगवान शिव
    माता - भगवती पार्वती
    भाऊ - गणेश (छोटा भाऊ)
    बहीण - अशोक सुन्दरी
    पत्नि - देवसेना (कुमारी)
    वाहन - मोर (संस्कृत - शिखि)

    ReplyDelete