Wednesday, 16 December 2015

दिनविशेष - १७ डिसेंबर २०१५

तिथी
 मार्गशीर्ष शुक्ल ६ (११:१९) 
वार
 गुरुवार    
नक्षत्र
 शततारका (२३:३८)
योग
 वज्र (२१:२३)
करण
 गरज (२२:३०)

चंपाषष्ठी / मार्तंडभैरवोत्थापन / स्कंध षष्ठी

या दिवशी खंडोबाचे नवरात्र संपते. चंपाषष्ठीच्या दिवशी देवांना नमस्कार करून टाक थोडासा हलवावा. नंतर देवासमोर ठेवलेले ताम्हण उचलून ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करावा. ताम्हण उचलताना घरातील सर्व लहान थोरांचा सहभाग असावा. ताम्हणातील हळद उडवावी (भंडारा) व नंतर खोबरे प्रसाद म्हणून वाटावे. पुरणपोळी, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी व इतर लिंबू चटणी कोशिंबीर असं सर्व नैवेद्य दाखवून दिवटीबुधलीने ओवाळून आरती करावी. सवाष्ण-ब्राह्मण जेवावयास बोलवावे.
हे सहा दिवस रोज एक फुलांची माळ खंडोबाला वाहावी. यामागे एक कथा आहे. मार्तंड भैरवाचे मणी व मल्लासुर या राक्षसांबरोबर युद्ध चालू असताना श्री महादेवाला विजय मिळावा म्हणून सप्तऋषींनी मार्तंडभैरव या देवतेचे पूजन केले. जसजसा देवसेनेचा विजय होऊ लागला, तसे एक प्रत्येक दिवशी एक विजयमाळ देवाला वाहिली गेली. तोच विधी आपण घरी बसवलेल्या नवरात्रात करतो अशी मान्यता आहे. (काही ठिकाणी माळेची पद्धत नसते.) ज्या दिवशी देवांना विजय मिळाला, त्या दिवशी देवांचे विधीपूर्वक पूजन करून मार्तंडभैरवाचा जयघोष केला, तेच आपण तळी भरणे यातून करतो. देवांचा विजय झाल्यावर ऋषीमुनींनी मार्तंडभैरवाला अनेक सुवर्ण दिव्यांनी ओवाळले. म्हणून तळी भरल्यानंतर दिवटी-बुधली वापरून देवांना ओवाळावे.
या सणाला मार्तंडभैरवोत्थापन / स्कंध षष्ठी असेही म्हणतात.

धनुर्मासारंभ

सूर्य धनु राशीत असे पर्यंत म्हणजे मकर संक्रांती पर्यंत धनुर्मास किंवा झुंझुरमास साजरा करतात. या संपूर्ण कळत दररोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून देवाची पूजा करावी . धूतवस्त्र घालून स्वयंपाक करावा. यात तांदूळ व मुगच्या डाळीची खिचडी हा मुख्य पदार्थ असतो. तसेच वांग्याची भाजी व तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी यांचाही समावेश असतो. सूर्यास्त झाल्यावर देवाला व सूर्याला नैवेद्य दाखवून लगेच भोजन करावे.
बहुतांश लोक हा सण फ़क़्त शेवटच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवशी (भोगी) साजरा करतात.

दग्धयोग

११:१९ पर्यंत गुरुवारी षष्ठी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


घबाड

११:१९ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मूळ
चंद्र नक्षत्र : शततारका
तिथी: ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

1 comment:

  1. तळी भरणे:
    ---------------
    कुलधर्माच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी तळी भरतात. ताम्हणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारी वर नागवेळीची पाने ठेवून नारळ ठेवतात याची कलशासह पूजा करतात. पाच मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर तिनवेळा कपाळ टेकवतात् व 'येळकोट मल्हार , सदानंदाचा येळकोट, म्हाळ सातक्रान्त कड़े पठार की जय' असा जयजयकार करतात. तसेच काही प्रदेशात
    " सदानंदाचा येळकोट , येळकोट मल्हार येळकोट। हर हर महादेव।
    चिंतामण मोरया।
    भैरोबाचा चंदोबा।
    अगड़बम्ब नगारा।
    सोन्याची जेजुरी।
    मोत्याचा तुरा।
    निळा घोडा।
    पायी तोडा।
    कमर करगोटा।
    बेंबि हिरा।
    गळ्यात कंठी।
    मोहनमाळा।
    डोईवर शेला।
    अंगावर शाल।
    सदा हिलाल।
    जेजुरी जाई।
    शिकार खेळी।
    म्हाळसा सुंदरी।
    आरति करी।
    देवा ओवाळी।
    नानापरि।
    देवाच्या शृंगारा।
    कोट लागो शिखरा।
    खंडेरायाचा खंडका। भंडाराचा भड़का। बोल सदानंदाचा येळकोट।
    असे म्हणतात. हे म्हणताना हातात दिवटी-बुधली असते. विवाहापूर्वी कूलधर्म असेल, तर भाऊबंदांनीहि त्यांच्या दिवट्या आनावयाच्या असतात. नंतर वरील प्रमाणे जयजयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या-बुधल्या घेऊन थोड़े जायचे असते(किमान 5 पावले). त्या दिशेस खोबरे व् भंडारा उधळुण जयजयकार करुन घरी यायचे आणि नंतर नैवेद्य, पुरणाच्या 14 दिव्यांनी आरती करावी, जमल्यास धनगर जोडप्यास जेऊ घालावे.

    ReplyDelete