Tuesday, 8 December 2015

दिनविशेष - ९ डिसेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण १३ (१४:१७) 
वार
 बुधवार    
नक्षत्र
 विशाखा (२२:५६)
योग
 अतिगंड (११:१०)
करण
 विष्टी (२६:५५)

शिवरात्रि

कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे विशेष महत्व आहे.

श्री. ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, आळंदी

आळंदी येथे अजानवृक्षाखाली संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी कार्तिक कृ. त्रयोदशीला जिवंत समाधी घेतली म्हणूनच या स्थानास संजीवन समाधी म्हटले जाते. याठिकाणी आषाढी-कार्तिकी एकादशीला यात्रा भरते तसेच ज्ञानेश्वर समाधी दिनी येथे उत्सव असतो.
ही वारी कलियुगातील मोक्षदायी वारी आहे असे मानले जाते. आळंदी येथे श्रीज्ञानेश्‍वर महाराजांची समाधी आहे. त्यामुळे आळंदीस क्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आहे. पुराणान्तरी ह्या क्षेत्राचा शिवपीठ म्हणून महिमा गाजत होता. पूर्वी या क्षेत्रास आनंदविपिन, वारुण, कपिल, अलका व सिद्धक्षेत्र अशी पाच नवे असल्याचा स्कंदपुराणात उल्लेख आहे व संतांच्या अभंगात अलंकापुरी, अलंकापूर, अलंकावती या नावांनी आळंदीचा उल्लेख योतो. पुढे शके ६९० त 'अलंदीय' असा उल्लेख सापडतो. त्यासच पुढे 'आळंदी' हे नाव प्राप्त झाले.
श्रीज्ञानेश्‍वरांचा जन्म श्रावण व. अष्टमीच्या मध्यरात्री म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी, कृष्णजन्माच्या वेळी झाला म्हणून त्यांना विष्णुचा अवतार मानतात. ज्ञानदेवांनी धर्म, अर्थ, काम व मोक्षाचे हे चार पुरुषार्थ सांगून वारकरी सांप्रदायात भक्‍ती हे मोक्ष आणि स्वात्मसुखाचे श्रेष्ठ साधन असल्याचे सांगून, प्रसंगी चमत्कार दाखवून ईश्‍वरभक्‍ती वाढविली. एवढेच नव्हे तर भगवान विष्णु ज्ञानेश्‍वरांच्या रूपाने अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी अवतीर्ण झाले असल्याने त्यांनी

'यारे यारे लहानथोर । याती भलते नारीनर ।'
करावा विचार । न लागे चिंता कोणासी ॥'

असे म्हणून सर्व अधिकारांच्या लोकांना पाचारण केलेले आहे.
ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, हरिपाठ व अभंग इ. ग्रंथ मुमुक्षूंसाठी लिहून ठेवावे. नंतर ज्ञानदेवांना आपले इहलोकीचे कार्य समाप्त झाले, असे वाटले. म्हणुन पांडुरगाजवळ त्यांनी समाधीची अनुज्ञा मागितली. पांडुरंगाकडून वचन मिळाले ते-

कृष्णपक्षीं तुज निर्धारा । भेट देत जाईन ॥५॥
कार्तिक शुद्ध एकादशी । पंढरीयात्रा होईल सरिशी ।
दुसरी कृष्णपक्षी निर्धारेसी । तुज दिधली असे ॥६॥

असे वचन मिळताच ज्ञानेश्‍वरांनी जिवंत समाधी घेण्याचा आपला निर्धार जाहीर केला.

अमृतयोग

२२:५६ नंतर बुधवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृतसिद्धी योग होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

भद्रा


१४:१७ नंतर २६:५५ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.  विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment