Saturday, 18 June 2016

दिनविशेष - १९ जून - २०१६


तिथी
 जेष्ठ शुक्ल १४ (१५:३१)  
वार
 रविवार
नक्षत्र
 जेष्ठा (अहोरात्र)
योग
 साध्य (९:०२)
करण
 विष्टी (२८:०५)

पंचतपव्रत

ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशीला गार्हपत्य, दक्षीणाग्नी, सभ्य, आहवनीय व भास्कर हे पाच अग्नी प्रज्वलित करावेत व सर्व दिवसभर ते प्रज्वलित ठेवावेत. सायंकाळी शंकर प्रसन्न व्हावेत म्हणून सुवर्णाच्या गाईचे दान देऊन मग स्वतः जेवावे. त्यायोगे शंकर प्रसन्न होतात.

वटपोर्णिमा

सुवासिनी स्त्रियांनी सौभाग्यवृद्धीसाठी करावयाचे एक व्रत. हे ज्येष्ठ पौर्णिमेला करतात. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीपासून पौर्णिमेस हे त्रिरात्रव्रत करावे, असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल, त्यांनी फक्त पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून, सत्यवान सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा:
नदीकाठी वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्या. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर अर्घ्य द्यावे. मग पुढील मंत्राने सावित्रीची प्रार्थना करावी.-
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणि ।
तेन सत्येन मां पाहि दुःखसंसारसागरात् ।
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।
अवियोगस्तथाऽस्माकं भूयाज्जन्मनि जन्मनि ॥
पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनींसह सावित्रीची कथा श्रवण करावी.
या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रुढी मात्र वेगळी आहे. सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा तिथेच सजीव झाला, या संकेताला अनुसरुन स्त्रिया या दिवशी वडाचीच पूजा करतात. त्यासाठी त्या वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळाशी पाणी घालतात आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करतात; नंतर त्याच्या मुळाशी असलेल्या सावित्री-ब्रह्मदेव ; सत्यवान-सावित्री, धर्मराज व नारद यांच्या प्रतिमांचे पूजन करतात व प्रार्थना करतात. पूजेनंतर सुवासिनींना सौभाग्यवायने देतात.
व्रताचे उद्यापन करताना ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला अल्पाहार करतात. त्रयोदशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करतात. वटवृक्षाच्या मुळाशी किंवा घरी चंदनाने काढलेल्या वटवृक्षाच्या मुळाशी सर्वत्रोभद्र मंडलावर कलश मांडतात आणि त्याच्यावर सात धान्यांनी भरलेले वेळूचे शिप्तर ठेवतात. त्याच्या जवळच चांदीचा वटवृक्ष, लाकडांचा भारा, कुर्‍हाड , व चांदीचा रथ मांडतात. रथात चांदीचा पलंग मांडून त्याच्यावर ब्रह्मा, सावित्री, सत्यवान, त्याची पत्नी सावित्री, यमधर्म आणि नारद यांच्या सुवर्णाच्या प्रतिमा ठेवतात. सुवर्णाच्या प्रतिमा शक्य नसल्यास मातीच्या प्रतिमा ठेवतात व त्याची पूजा करतात. रात्री सावित्रीचे चरित्रकथन, नृत्य, गीते इ. कार्यक्रम करतात. चवथ्या दिवशी आचार्यद्वारा हवन व यथाशक्ती चोवीस, सोळा, बारा किंवा आठ दांपत्यांची पूजा करतात. गोदान, शय्यादान व प्रतिमादान देऊन आणि ब्राह्मणभोजन घालून व्रताची समाप्ती करतात.
भारतखंडात अनेक पतिव्रता प्रसिद्ध आहेत; पण त्यांत सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. एखाद्या सुवासिनीने दुसर्‍या स्त्रीला नमस्कार केला असता, ती 'जन्मसावित्री हो' असाच आशीर्वाद तिला देते. सावित्री हे भारतीय संस्कृतीत अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरले आहे.
बंगालमध्ये वटसावित्रीव्रत करण्याची रीत थोडी वेगळी आहे. बंगाली सुवासिनी या दिवशी आपल्या पतीची पूजा करतात. त्या प्रसंगी पतीच्या अंगाला सुगंधी तेल व चंदनाची उटी लावतात, त्याच्या गळ्यात फुलांचा हार गालतात आणि त्याला नवीन वस्त्र देतात. याव्यतिरिक्त , त्या यमाचीही पूजा करतात. आणि त्याला फुले, फळे व वडाची डहाळी अर्पण करतात.

भद्रा


१५:३१ नंतर २८:०५ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment