सुवासिनी
स्त्रियांनी सौभाग्यवृद्धीसाठी करावयाचे एक व्रत. हे ज्येष्ठ पौर्णिमेला करतात.
ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीपासून पौर्णिमेस हे त्रिरात्रव्रत करावे, असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास
करणे अशक्य असेल, त्यांनी
फक्त पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य
देवता असून, सत्यवान सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता
आहेत. या व्रताचा विधी असा:
नदीकाठी
वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्या.
मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर अर्घ्य द्यावे. मग पुढील मंत्राने
सावित्रीची प्रार्थना करावी.-
सावित्रि
ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणि ।
तेन
सत्येन मां पाहि दुःखसंसारसागरात् ।
अवियोगो
यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।
अवियोगस्तथाऽस्माकं
भूयाज्जन्मनि जन्मनि ॥
पूजा
झाल्यावर संध्याकाळी सुवासिनींसह सावित्रीची कथा श्रवण करावी.
या
व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रुढी मात्र वेगळी आहे.
सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा तिथेच सजीव झाला, या संकेताला अनुसरुन स्त्रिया या
दिवशी वडाचीच पूजा करतात. त्यासाठी त्या वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या
मुळाशी पाणी घालतात आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करतात; नंतर त्याच्या मुळाशी असलेल्या
सावित्री-ब्रह्मदेव ; सत्यवान-सावित्री, धर्मराज व नारद यांच्या प्रतिमांचे
पूजन करतात व प्रार्थना करतात. पूजेनंतर सुवासिनींना सौभाग्यवायने देतात.
व्रताचे
उद्यापन करताना ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला अल्पाहार करतात. त्रयोदशीच्या दिवशी
व्रताचा संकल्प करतात. वटवृक्षाच्या मुळाशी किंवा घरी चंदनाने काढलेल्या
वटवृक्षाच्या मुळाशी सर्वत्रोभद्र मंडलावर कलश मांडतात आणि त्याच्यावर सात
धान्यांनी भरलेले वेळूचे शिप्तर ठेवतात. त्याच्या जवळच चांदीचा वटवृक्ष, लाकडांचा भारा, कुर्हाड , व चांदीचा रथ मांडतात. रथात चांदीचा पलंग मांडून
त्याच्यावर ब्रह्मा, सावित्री, सत्यवान, त्याची पत्नी सावित्री, यमधर्म आणि नारद यांच्या सुवर्णाच्या प्रतिमा ठेवतात.
सुवर्णाच्या प्रतिमा शक्य नसल्यास मातीच्या प्रतिमा ठेवतात व त्याची पूजा करतात.
रात्री सावित्रीचे चरित्रकथन, नृत्य, गीते इ. कार्यक्रम करतात. चवथ्या
दिवशी आचार्यद्वारा हवन व यथाशक्ती चोवीस, सोळा, बारा
किंवा आठ दांपत्यांची पूजा करतात. गोदान, शय्यादान
व प्रतिमादान देऊन आणि ब्राह्मणभोजन घालून व्रताची समाप्ती करतात.
भारतखंडात
अनेक पतिव्रता प्रसिद्ध आहेत; पण
त्यांत सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. एखाद्या सुवासिनीने दुसर्या स्त्रीला
नमस्कार केला असता, ती
'जन्मसावित्री हो' असाच आशीर्वाद तिला देते. सावित्री
हे भारतीय संस्कृतीत अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरले आहे.
बंगालमध्ये
वटसावित्रीव्रत करण्याची रीत थोडी वेगळी आहे. बंगाली सुवासिनी या दिवशी आपल्या
पतीची पूजा करतात. त्या प्रसंगी पतीच्या अंगाला सुगंधी तेल व चंदनाची उटी लावतात, त्याच्या गळ्यात फुलांचा हार
गालतात आणि त्याला नवीन वस्त्र देतात. याव्यतिरिक्त , त्या यमाचीही पूजा करतात. आणि त्याला फुले, फळे व वडाची डहाळी अर्पण करतात.
वट सावित्री कथा
भद्र देशाचा राजा अश्वपी. त्याची एकुलती एक कन्या सावित्री. ती रूपसंपन्न व
सद्गुणी मुलगी होती. ती उपवर झाली तेव्हा राजाने तिला, 'तू इच्छेप्रमाणे पतीची निवड कर' - असे सांगितले तेव्हा
सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्राला वरले. सत्यावानाचा पिता द्युमत्सेन
हा आंधळा व राज्यभ्रष्ट होता. म्हणून आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत असे.
सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुषी आहे हे देवर्षी नारदांना ठाऊक
होते. म्हणून त्यांनी व अश्वपती राजाने सावित्रीला दुसर्या वराची निवड करण्यास
सांगितले, परंतु 'ज्याला मी मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसर्या पुरूषाचा मी विचारही करणार
नाही,' असे सावित्रीने निश्चयपूर्वक सांगिलते व सत्यवानाशीच विवाह केला.
काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला.
तेव्हा सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. कारण नारद मुनींच्या सांगण्यावरून
सत्यवानाच्या मृत्यूचा हा दिवस आहे ते दिला ठाऊक होते.
लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली. म्हणून एका वडाच्या
झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे
प्राण नेण्यासाठी स्वत: यम तेथे आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला.
क्षणभरातच सत्यवानाचे प्राण हरण करून यम जाऊ लागला.
तशी सावित्रीही त्याच्यामागून निघाली. यमाने तिची समजूत घालून, तिला परत जाण्यास
सांगितले. तेव्हा सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना, तिची पतिनिष्ठा व
कर्तव्य यासंबंधी सुसंवाद व विद्वत्तापूर्ण विवेचन केले.
तिच्या वाक्चातुर्याने यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला चार वर देऊ केले, तेव्हा सावित्रीने
त्याच्याकडून पहिल्या वराने श्वशुराला दृष्टी, दुसर्या वराने त्याला
राज्यप्राप्ती, तिसर्या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ आणि चौथ्या वराने
पतीचे-सत्यवानाचे प्राण मागून घेतले. अशा प्रकारे पतिव्रत्याच्या बळावर सावित्रीने
पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वत:च्या दिव्य, अलौकिक गुणांमुळे ती जगात अजरामर
झाली.
No comments:
Post a Comment