Wednesday, 10 October 2018

दिनविशेष - १३ ऑक्टोबर २०१८


तिथी
आश्विन शुक्ल ५ (३०:२८)
वार
शनिवार
नक्षत्र
अनुराधा (११:३५)
योग
आयुष्मान (७:२१)
करण
बव (१७:५६), बालव (३०:२८)


ललिता पंचमी / उपांगललिताव्रत

हे व्रत आश्‍विन शुक्ल पंचमीला करतात. यासाठी रात्रिव्यापिनी पंचमी घेतात. व्रत करणाराने त्या दिवशी आघाड्याच्या २१ काटक्या घेऊन
'आयुर्बलमिदम्'
या मंत्राने एकेकाने याप्रमाणे दात घासून स्नान करावे व शुभ्र वस्त्र परिधान करून सुवर्णमयी उपांगललितेची 'यथो मिलितोपचार द्रव्यांनी' पूजा करावी. ४८ दुर्वांची एक जुडी याप्रमाणे ४८ जुड्या ललिता देवीला वहाव्यात. रात्री चंद्रोदय झाल्यावर त्याला अर्घ्य देऊन नक्‍त व्रत करावे. (तदुपरान्त भोजन करावे. ) दुसर्‍या दिवशी देवीचे विसर्जन करावे. हे व्रत महाराष्ट्रात विशेष प्रचलित आहे.

शांतिपंचमी

आश्‍विन शुक्ल पंचमीला प्रात:स्नानादी नित्यकर्मे उरकल्यावर एका वेदीवर किंवा चौरंगावर शुभ्र वस्त्र पसरून त्यावर हिरव्या व कोवळ्या दर्भाचे १२ नाग व एक इंद्राणी बनवून त्यांची स्थापना करावी. इंद्राणीला शुद्धोदकस्नान घालावे आणि नागांना घृत, पय व उदक या तिहींचे स्थान घालावे. गंधपुष्पादिकांनी पूजा करावी. विविध प्रकारच्या नागांचे ध्यान करावे आणि
'नागा: प्रीता भवन्तीह शान्तिमाप्नोति वै विभो ।
स शांतिलोकमासाद्य मोदते शाश्‍वती: समा: ।'
अशी प्रार्थना करून
'ॐ कुरू कुल्ल्यं हुं फट् स्वाहा'
मंत्राचा १२ हजार जप करावा. या कुशनिर्मित नागांपैकी अनंत आश्‍विनात, वासुकी कार्तिकात, शंख मार्गशीर्षात, पद्म पौषात, कम्बल माघात, कर्कोटक फाल्गुनात, अश्‍वतर चैत्रात, शंखपाल वैशाखात, कालिय ज्येष्ठात, तक्षक आषाढात, पिंगल श्रावणात, व महानाग भाद्रपदात याप्रमाणे त्यांची पूजा केली असता सर्पादिकांचे भय दूर होते, सर्व प्रकारची शांती पसरते व उपर्युक्‍त मंत्राने सर्पविष निष्प्रभ होते.

पंचरात्रोत्सवारंभ

नवरात्र सुरू होण्यापूर्वी अशौच आले व महानवमीपूर्वी अशौच संपत असेल तर त्यानंतर सात, पाच, तीन अथवा एक दिवस जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्र करावे. अशौचामुळे वर सांगितल्यामुळे कमी दिवसांचे नवरात्र करतात. अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभ, पंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ अशा प्रकारे केलेला असतो. अशा दिवशी घटस्थापना करून नवमीपर्यंत नवरात्रीची पूजा करता येते.

पंचमी श्राद्ध

अपराण्ह काळी पंचमी तिथी असल्यामुळेश्राद्धतिथी आश्विन शुक्ल ५ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment