तिथी
|
आश्विन शुक्ल १ (७:२६),
आश्विन शुक्ल २ (३०:०७)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
चित्रा (११:०१)
|
योग
|
वैधृति (११:५८)
|
करण
|
बव (७:२६), बालव (१८:४२),
कौलव (३०:०७)
|
घटस्थापना
वेदिका म्हणजे शेत. शेतीतील काळी माती आणून एका पत्रावळीवर बोटाचे उभे पेर उंचीचा व वीतभर
लांबरूंदीचा सपाट ढीग करून एक मूठभर धान्य त्यात पेरावे. हे धान्य हळदिच्या
पाण्यात रंगवून घ्यावे. यामध्ये सप्त धान्य येतात. ( तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग) पत्रावळीवर आपण जे शेत तयार केले त्यामध्ये ‘वेदिकायै नमः’ म्हणून
गंधफूल वाहून पूजा करावी. ‘सप्तधान्येभ्यो नमः’ असे
म्हणून त्या शेतात तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग ही
धान्ये पेरावी. ‘ पर्जन्याय नमः’ म्हणून त्यावर पाणी
शिंपडावे. नंतर त्यावर वरूण देवतेची स्थापना करावी. काही जण वरूण ( कलश ) मातीचा
किंवा तांब्याचा ठेवतात. त्यावर काहीजण नारळ ठेवतात. तर काही जण ताम्हण ठेवून
उपास्य देवतेची स्थापना करतात. नंतर दीपाची
प्राणप्रतिष्ठा करावी लागते. कारण शक्तीचे स्वरूप हे तेजोमय आहे. त्यासाठी
जडधातूची समई किंवा नंदादीप वापरावा.
भोदीप देवी रुपस्त्वं कर्मसाक्ष ह्यविघ्नकृत |
यावन्नवरात्रसामप्ति: स्थात्तावत्वं सुस्थिरोभव ||
अशी प्रार्थना करून दीप लावावा.
विड्याच्या पानावर कुंकूवाने अष्टदल किंवा स्वस्तिक
काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा. पानाचे देठ देवाकडे ठेवावे. नवरात्रात इतर
देवतांची षोडशोपचार पूजा करावी. टाक जागेवरून न हलविता फुलाने पाणी शिंपडावे व
उपचार करावेत. सकाळ संध्यकाळ आरती करावी. देवीची स्तोत्रे,
आरती, जोगवा म्हणावेत.
ललिता सहस्त्रनाम, सौंदर्य लहरी, देवी अथर्वशिर्ष इत्यादी जे शक्य होईल त्याचे पठण
करावे. उत्सवाच्या वातावरणामुळे मनात चांगल्या भावना येतात. आनंदी वातावरण निर्माण
होते व देवीचे सतत स्तवन केल्याने स्फूर्ती निर्माण होते.
नवरात्रारंभ
आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून
नवमीपर्यंत देवीचे नवरात्र साजरे करतात. नवरात्र म्हणजे नऊ दिवस किंवा नऊ माळा अशी
समजूत आहे. क्वचित आठ किंवा दहा दिवस येतात. नऊ दिवस व रात्रीचा कुळाचार
म्हणजे नवरात्र असा या शब्दाचा अर्थ नाही तर आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून
महानवमीपर्यंत केले जाणारे कर्म (घट स्थापना नंदादीप इ) म्हणजे नवरात्र असा
नवरात्र शब्दाचा अर्थ धर्मसिंधुकारांनी दिला आहे. म्हणून त्यात किती दिवस (८/९/१०)
असा प्रश्न नाही.
सप्तशतीची पारायणे
नवरात्रामध्ये अनेक जणांचे
घरी नवरात्र सुरु झाल्यापासून उठे पर्यंत उठेपर्यंत उपोषण असते. असे उपोषण
महानवमीच्या दिवशी सकाळी नवरात्रोत्थापन होईपर्यंतच करावे. त्यानंतर महानवमीच्याच
दिवशी उपोषणाचे पारणे करावे.
· देवीच्या नवरात्रात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची पूजा अणि
सप्तशतीचा पाठ या गोष्टींना प्राधान्य आहे. पाठ करायचा असेल तर पाठ्यपुस्तक
देवतातुल्य मानून त्याचे पूजन करावे. १, ३, ५ अशा विषम संख्यात्मक सप्तशतीची पारायणे
करावी. पाठासाठी विशेष ब्राह्मण निमंत्रित करणे असतील तर त्यांची संख्याही १, ३, ५ अशी विषम
असावी. सप्तशतीचे पाठ (पारायणसंख्या) आपल्या उद्दिष्टाच्या स्वरूपानुसार
पुढीलप्रमाणे करावे.
· फलसिद्धी १,
· उपद्रव-शांतीसाठी ३,
· सामान्यत: सर्व प्रकाराच्या शांतीसाठी ५,
· भयमुक्तीसाठी ७,
· यज्ञ-फलाच्या प्राप्तीसाठी ९,
· राज्यप्राप्तीसाठी ११,
· कार्यसिद्धीसाठी १२,
· एखाद्याला वश करण्यासाठी १४,
· सुखसंपत्तीच्या प्राप्तीसाठी १५,
· धनपुत्रप्राप्तीसाठी १६,
· शत्रू, रोग आणि राजा यापासूनच्या भयनिवारणासाठी १७,
· प्रियप्राप्तीसाठी १८,
· अनिष्ट ग्रहांच्या दोष निवारणासाठी २०,
· बंधमुक्तीसाठी २५,
· आणि मृत्युभय, व्यापक उपद्रव, तसेच देशविनाश इत्यादीपासून बचाव व्हावा आणि
असाध्य गोष्टीच्या सिद्धीस्तव, तसेच लोकोत्तर लाभास्तव, आवश्यकतेनुसार १००; १०००; दहाहजार, व एक लाखपर्यंत सप्तशतीपाठ करावे.
कुमारीपूजन
देवीव्रतांमध्ये 'कुमारीपूजन' परमावश्यक मानले गेले आहे.
शक्य तर नवरात्र संपेपर्यंत, नाही तर समाप्तीच्या दिवशी कुमारीचे पाय धुऊन तिची गंधपुष्पादींनी पूजा करावी.
तिला मिष्टान्न भोजन वाढावे.
·
एका कुमारिकेचे पूजन केले
असता ऎश्वर्यप्राप्ती होते;
·
दोघींचे पूजन केले असता भोग
व मोक्षप्राप्ती होते;
·
तिघींचे पूजन केल्याने
धर्म-अर्थ-काम यांची प्राप्ती होते;
·
चौघींच्या पूजनाने
राज्यपदप्राप्ती;
·
पाच जणींचे पूजन केल्याने
विद्याप्राप्ती;
·
सहांच्या पूजनाने षट्कर्मसिद्धी;
·
सातांच्या पूजनाने
राज्यप्राप्ती;
·
आठजणींच्या पूजेने संपत्ती
आणि
·
नऊ कुमारींची पूजा केली
असता पृथ्वीचे राज्य मिळते.
§ दोन वर्षांची मुलगी कुमारी,
§ तीन वर्षांची त्रिमूर्तिनी,
§ चार वर्षांची कल्याणी,
§ पाच वर्षांची रोहिणी,
§ सहा वर्षांची काली,
§ सात वर्षांची चण्डिका,
§ आठ वर्षांची शांभवी,
§ नऊ वर्षांची दुर्गा आणि
§ दहा वर्षांची सुभद्रा-स्वरूपिणी संबोधिली जाते.
कुमारीपूजनासाठी याहून मोठी
मुलगी अग्राह्य होय.
दूर्गापूजेमध्ये प्रतिपदेला
केसांना लावण्याची द्रव्ये-आवळा, सुगंधी तेल, इ. वहावीत,
द्वितीयेला केस
बांधण्यासाठी रेशमी दोरा वहावा,
तृतीयेला सिंदूर व आरसा
अर्पण करावा,
चतुर्थीला मधुपर्क, तिलक आणि नेत्रांजन,
पंचमीला उटणे, चंदनादी अंगराग व अलंकार
आणि
षष्ठीला फुले अर्पण करावीत.
सप्तमीला गृहमध्यपूजा,
अष्टमीला उपवासपूर्वक पूजन,
नवमीला महापूजा व कुमारीपूजन आणि
दशमीला आरती आणि विसर्जन
करावे.
याचप्रमाणे
रामकृष्णादींच्या नवरात्रमहोत्सवात स्तोत्रपाठ किंवा लीलाप्रदर्शनाचा कार्यक्रम
करावा. हा सर्व उल्लेख केवळ दिग्दर्शनात्मक आहे. तरी विशेष गोष्टींची माहिती अन्य
ग्रंथांमधून अवगत करून घ्यावी. याप्रमाणे नऊ दिवसपर्यंत नवरात्रव्रत करून दहाव्या
दिवशी दशांश हवन, ब्राह्मणभोजन आणि
व्रतोद्यापन ( विसर्जन ) करावे.
अश्वपूजा
ज्यांच्या घरी घोडे असतील, त्यांनी आश्विन शुक्ल
प्रतिपदेपासून नवमीपर्यंत रोज अश्वपूजा करावी, असे सांगितले आहे. त्याचे विधान असे - शांती व स्वस्त्यन
करणे; धणे, बिब्बे, कोष्टकोळींजन, वेखंड व मोहर्या यांची
पुरचुंडी करून घोड्याच्या गळ्यात बांधणे; वायू, वरुण, सूर्य, विष्णू, विश्वेदेव व अग्नी यांच्या
मंत्रांनी हवन करणे;
अशोक व्रत किंवा अशोका प्रतिपदा
हे व्रत स्त्रियांसाठी आहे.
आश्विन शुक्ल प्रतिपदेला नव्याने पल्लवित झालेल्या (नव्याने पालवी फुटलेल्या)
अशोकवृक्षापाशी सप्तधान्ये, गव्हाच्या लोंब्या, मोदक, डाळिंबादी ऋतुकालोद्भव
फलपुष्प ठेवून (अर्पण करून) यथाविधी पूजन करावे, आणि 'अशोक शमनोभव सर्वत्र न-कुले' असे म्हणून अर्घ्य द्यावे. बुंध्याशी उत्तम वस्त्रे
गुंडाळावीत, पताका लावाव्या. असे
केले असता व्रत करणार्या स्त्रिच्या सर्व दु:खांचे निवारण होते. जनककन्या सीता
हिने लंकेमध्ये असता अशोकवाटिकेमध्ये हे व्रत केले होते आणि त्यामुळे तिचे
शोकनिवारण झाले होते.
चंद्रदर्शन
अमावास्येला दिसेनासा
झालेला चंद्र रविच्या पुढे १२ अंश गेला कि चंद्रदर्शन होते. १९:३३ ला पश्चिमेकडे
चंद्रदर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त १५ म्हणजे महर्घ आहेत.
रवि चित्रा नक्षत्र प्रवेश
२५:१२ ला रवि चित्रा
नक्षत्रात प्रवेश करीत आहे.
दग्ध योग
३०:०७ नंतर बुधवारी तृतीया
तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
द्वितीया श्राद्ध
अपराण्ह काळी द्वितीया तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी आश्विन
शुक्ल २ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment