Monday, 22 October 2018

दिनविशेष - २४ ऑक्टोबर २०१८



तिथी
आश्विन शुक्ल १५ (२२:१५)
वार
बुधवार
नक्षत्र
रेवती (९:२३)
योग
हर्षण (९:३३)
करण
विष्टि (१०:३०), बव (२२:१५)


कार्तिकस्नानारंभ

सर्व धर्मकृत्यांत स्नानास फार महत्त्व असून त्याची फार आवश्यकता असते. तसेच, स्नानामुळे मनुष्याच्या आरोग्याचे रक्षण व निरोगीपण यात वाढ होते. माघ, कार्तिक व वैशाख या महिन्यांतील नित्य स्नानाला तर आगळेच महत्त्व आहे.
कार्तिकं सकलं मासं नित्यस्नायी जितेंद्रिय: ।
जपन् हविष्यभुक्‌छान्त: सर्वपापै: प्रमुच्यते ॥'
अर्थ - संपूर्ण कार्तिक महिनाभर जितेन्दिय राहून नित्य स्नान केले व हविष्यान्न घेतले तर सर्व पापांपासून मुक्‍ती मिळते.
हे व्रत आश्‍विन पौर्णिमेस चालू करून ३१व्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेपर्यंत करावे व त्या दिवशी समाप्ती करावी. किंवा या स्नानाची सुरुवात दशमी किंवा एकादशीपासून करतात. या काळात स्नानासाठी विहीर अगर तळे यांचा वापर करावा. कुरुक्षेत्र, अयोध्या इ. तीर्थे व पुर्‍या व काशीच्या पाचही नद्यांतील स्नानाला तर आगळेच महत्त्व आहे. असे योग दुर्लभ असतात. पाण्यात उतरण्यापूर्वी बाहेरच हातपाय धुवावेत. आचमने करून शेंडीस गाठ मारून दर्भाने संकल्प सोडून मगच स्नान करावे.
हे कार्तिक स्नान पुत्रप्राप्तीसाठी व्रत म्हणून केले असेल तर स्नानानंतर अभिलाष्टक नावाचे स्तोत्र पठण करावे. संपूर्ण महिनाभर प्रात:स्नान करणे शक्य नसल्यास निदान कार्तिक शु. एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस करावे.


कुलधर्म


जेष्ठ आपत्यास ओवाळणे / आश्‍विनी

आश्‍विन पौर्णिमेस सायंकाळी आई आपल्या सर्वांत मोठ्या मुलाला (मुलगा किंवा मुलगी) ओवाळून त्याचे औक्षण करते व त्याला दूध प्यायला देते. विशेषत: महाराष्ट्रात हा प्रघात आहे. याला मुलांची आश्‍विनी करणे, असे म्हणतात.

आकाशदीप दान

आश्‍विन पौर्णिमेला (निशीथव्यापिनी ) ऎरावतावर आरूढ झालेल्या इंद्राची आणि महालक्ष्मीची पूजा करावी. उपवास करावा. गंधपुष्पादींनी पूजिलेले व तुपाचे एक लक्ष, पन्नास हजार, दहा हजार, एक हजार किंवा केवळ शंभर दीप लावून देवमंदिर, बाग- उद्याने, तुलसीवृंदावन अश्‍वत्थवृक्ष, वस्तीतील रस्ते, चौक, गल्ल्या, घराची छते इ. ठिकाणी ठेवावे. उजाडल्यावर स्नान वगैरे करून पूजा करावी. ब्राह्मणांना घृतशर्करामिश्रित खीर वाढावी. वस्त्रे, दक्षिणा देऊन सुवर्णाचे दीप दान करावे. असे केल्याने अनंतफलाची प्राप्ती होते.

आग्रयण

नवान्नप्राशन

आश्विन पौर्णिमेस  नवीन धान्याचें भक्षण;  नवीन तांदुळाच्या केलेल्या भाताचा स्थालीपाक (होम)  करुन तो भक्षण करावे

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

शरत्पूर्णिमा

या व्रतासाठी प्रदोषव्यापिनी व निशीथव्यापिनी पौर्णिमा घ्यावी. अशी पौर्णिमा पहिल्या दिवशी निशीथव्यापिनी व दुसर्‍या दिवशी प्रदोषव्यापिनी असेल तर पहिल्या दिवशी व्रत करावे.
या दिवशी काश्‍याच्या भांड्यात तूप घालून ते सुवर्णसहित ब्राह्मणास दान दिले असता ओज प्राप्त होते.
अपराह्ण काळी हत्तीची आरती केली असता उत्तम फळ मिळते. आणि अन्य प्रकारचे अनुष्ठान केले असता सफल सिद्धी होते. याखेरीज निशीथव्यापिनी आश्‍विन पौर्णिमेला सकाळच्या वेळी आराध्य देवतेला चांगल्या शुभ्र वस्त्रभूषणांनी सुशोभित करून तिची षोडशोपचार पूजा करावी आणि रात्रीच्या वेळी गाईच्या दुधाची उत्तम खीर बनवून त्यात तूप व खडीसाखर घालावी व मध्यरात्रीच्या वेळी देवतेला अर्पण करावी. तसेच पूर्णचंद्र मध्याकाशात आल्यावर त्याची पूजा करावी आणि वर सांगितलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवावा व दुसर्‍या दिवशी ती स्वत: सेवन करावी.

कौमुदी महोत्सव

आश्‍विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सव. वात्स्यायनाने याला कौमुदीजागर व वामन पुराणाने याला दीपदानजागर म्हटले आहे. बौद्धकालात हा उत्सव साजरा होत असे.
या दिवशी नगरात उत्साहाचे वातावरण पसरे. लोक गावातले रस्ते स्वच्छ करीत. घरावर ध्वज लावीत. घरेदारे पुष्पमालांनी शृंगारीत. रात्रौ दीपाराधना करीत. स्त्री-पुरुष रात्रीच्या वेळी वस्त्राभूषणांनी नटून शहरात हिंडत. जागोजाग नृत्याच्या मैफली चालत. लोक रात्रभर जागरण करीत व जुगारही खेळत. या दिवशी बलिराजाची पूजा करावी, असे वामन पुराणात सांगितले आहे.

रवि स्वाती नक्षत्र प्रवेश

११:४३ ला रवि स्वाती नक्षत्रात प्रवेश करीत आहे.

मृत्यू योग

९:२३ नंतर बुधवारी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने
हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

भद्रा

१०:३० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

पौर्णिमा श्राद्ध

अपराण्ह काळी पौर्णिमा तिथी असल्यामुळेश्राद्धतिथी आश्विन शुक्ल १५ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment