Monday, 17 December 2018

दिनविशेष - १९ डिसेंबर २०१८


तिथी
मार्गशीर्ष शुक्ल ११ (७:३६), मार्गशीर्ष शुक्ल १२ (३०:२६)
वार
बुधवार
नक्षत्र
भरणी (२८:१२)
योग
शिव (२१:५५)
करण
विष्टि (७:३७), बव (१९:०७), बालव (३०:२६)


भागवत एकादशी

प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११ वी तिथीला एकादशी म्हटले जाते. एकादशीला हरिदिनी असेही म्हणतात. एकादशी विष्णूची तिथी मानलेली असून या दिवशी उपवास करतात. दुसर्‍या दिवशी त्याची पारणा करतात.
एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील, त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसर्‍या दिवशी भागवत असे लिहिलेले असते.
एकादशीव्रत स्मर्तांसाठी पारणाप्रधान आहे आणि भागवतांना उपोषणप्रधान आहे. पारण्यास द्वादशी सुर्योदयास असलेल्या दिवसाचे आधीचे दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी स्मार्तांनी उपोषण करावे. भागवतांना उपोषणाचे दिवशी दशमी वेध होता कामा नये. दशमी वेध होत असेल म्हणजे एकादशीच्या सूर्योदयापूर्वी अरुणोदय काळी (१ तास ३६ मिनिट) दासाहामी असेल तेव्हा दशमीविद्ध एकादशीचा दिवस सोडून द्वादशीचे दिवशी भागवत सांप्रदायांनी एकादशी व्रत करावे असा मुख्य नियम आहे. अशा वेळेस त्रयोदशी दिवशी पारणे होईल.
·         याच प्रमाणे एकादशीचा क्षय झाला तर  दशमीचे दिवशी स्मार्त एकादशी आणि द्वादशीस भागवत एकादशी करावी.
·         द्वादशीचा क्षय झाला तर दशमीचे दिवशी स्मार्त एकादशी आणि एकादशीचे दिवशी भागवत एकादशी करावी.
·         द्वादशीची वृद्धि असेल तेव्हा एकादशीचे दिवशी स्मार्त एकादशी आणि अहोरात्र असलेल्या द्वादशीचे दिवशी भागवत एकादशी करावी.
·         एकादशीची वृद्धि असता अहोरात्राचे दुसरे दिवशी असलेल्या एकादशीस स्मार्त व भागवत संप्रदायांनी एकाच दिवशी एकादशी करावी.

या दोन एकादश्या केव्हा मानायच्या यासंबंधी धर्मसिंधु, निर्णयसिंधु आदि ग्रंथात सविस्तर विवेचन केलेले आहे. मध्ययुगात शूलपाणीने (इ.स. १३७५- १४६०) एकादशी विवेक व रघुनंदनाने (इ.स. १६ वे शतक) एकादशी तत्त्व हे ग्रंथ फक्त एकादशीवर लिहिलेले आढळतात. या व्यतिरिक्त व्रतराज व कालतत्त्व विवेचन या ग्रंथातसुद्धा एकादशीवर भरपूर लेखन केलेले आढळते.

प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षामध्ये २४ एकादश्या येतात, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीची नावे
कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जया (जयदा) व आमलकी.
कृष्ण पक्षातील एकादशीची नावे अशी
वरुथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ति (फलदा), सफला, षट्‌तिला, विजया व पापमोचनी.
या व्यतिरिक्त अधिक मास असेल त्यावेळी २ एकादशी येतात त्यांस कमला एकादशी म्हणतात.

एकादशीचे नित्यकाम्य असे प्रकार सांगितले आहेत. एकादशीच्या दिवशी ब्रह्महत्यादी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास करण्यास सांगितले जाते. वर्षाच्या २४ एकादश्या नियमाने करणे व त्या दिवशी विष्णुपूजा, जागरण, हरिकथा श्रवण इ. गोष्टी करणे हे नित्य व्रत सांगितले आहे.

काम्यव्रताविषयी कात्यायनाने लिहिले आहे ते असे जो कोणी विष्णुपरायण होऊन संसार सागरातून तरून जाऊ इच्छितो किंवा ऐश्‍वर्य, संतती, स्वर्ग, मोक्ष किंवा अन्य कोणतेही फल इच्छितो त्याने उभय पक्षातील एकादशीला अन्न ग्रहण करू नये. तुकारामाने एकादशीचे महत्त्व अभंगातून सांगितले आहे. तो अभंग असा
एकादशीस अन्नपान|
जे नर करिती भोजन|
श्‍वान विष्ठेसमान|
अधम जन तो एक॥
सेज बाजविलास भोग|
करी कामिनीशी संग|
तया जोडे क्षय रोग|
 जन्मव्याधी बळिवंत॥

गीताजयंती

सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी दिवशी गीता, श्रीकृष्ण, व्यास आदींच्या पूजा करून गीताजयंतीचा उत्सव साजरा करावा. गीतापाठ, गीतेवर व्याख्यान, प्रवचन इ. कार्यक्रम करावे. शक्य असेल तर गीतेची मिरवणूक काढावी.

दीपव्रत

मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला या व्रताचा आरंभ करतात. हे व्रत एक वर्षभर करावयाचे असते. याचा विधी- पहाटे नदीवर स्नान करतात. नंतर वैदिक मंत्र म्हणून लक्ष्मीनारायणाला पंचामृताने स्नान घालतात. तांब्याच्या अथवा मातीच्या दिव्यात नऊ धाग्यांची वात घालून तो दिवा देवापुढे ठेवतात. उद्यापनाच्या वेळी सोन्याचा दिवा करून दान देतात.
फल-विष्णुलोकप्राप्ती.

घबाड

७:३६ नंतर २८:१२ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मूळ
चंद्र नक्षत्र : भरणी
तिथी: शुक्ल १२ = १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

फत्तेहयाजदहम

यालाच फत्तेह-ए-यज्दाहम / फत्तेह-दोअज़-दहम (Fateha-i-Yajdaham or Fateha Doaz daham) असेही म्हणतात. इस्लामी प्रेषित घोस-ए-अझम शेख अब्दुल कादिर गिलानी रहमतुलाह (Ghos e Azam Shaikh Abdul Qadir Gilani Rahmtullah) यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. बांगलादेश मध्ये या दिवशी राष्टीय सुट्टी असते. भारत आणि पाकिस्तान या देशातही हा सण साजरा केला जातो. याला Big Eleventh किंवा Badi Gyarween Sharif असेही संबोधले जाते.

भद्रा

७:३७ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका

योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

द्वादशी श्राद्ध

अपराण्ह काळी द्वादशी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष शुक्ल १२ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment